मेरा कुछ सामान ...
सोसण्याच्या पार झाले
दु:ख आता फार झाले..

शोषणारे देशप्रेमी
भांडणारे ठार झाले..

काय कुठल्या चाहुलींनी
लांडगे होश्शार झाले..

झेलली मी वादळे पण,
आसवांचे वार झाले..

सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले..

रात मागे चांद नुसता,
चांदणे बेजार झाले..

तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले..

मारव्याची साद येता,
आज मी गंधार झाले...
मेरा कुछ सामान ...
असे आज काही घडावे कशाने
तुझी याद यावी सुचावे तराणे...

कधी गायिलेले तराणे उमटता
अवेळीच यावे भरोनी नभाने...

नभाने करावी धरा चिंब आणि
धरेने नटावे नव्या वैभवाने...

नवे साज ल्यावे, नवे गंध प्यावे
नवे गंध वार्‍यात मिसळून जावे...

नवे गंध जावे नभाच्या प्रवासा
नभाला कळावे तुझे गूज त्याने...

नभाने कथावे खुळ्या पश्चिमेला
तिने लाजुनी सप्तरंगात न्हावे...

अशी सांज बघता नुरावेच भान
तुझ्या आठवांनी झुरावेच प्राण...

पुन्हा आज काही घडे हे अशाने
तुझी याद आली नि सुचले तराणे...
मेरा कुछ सामान ...
मुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood  मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...
शाय:- investment  banker  from  Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..
अरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift  झाल्यावर तिथे त्याला काही video tapes  सापडतात.. यास्मिन नूर च्या...
चित्रपटाला तिचंच narration  आहे फक्त.. तिने तिच्या भावाला पत्र पाठवण्याऐवजी त्याच्यासाठी बनवलेल्या tapes ... कळत नकळत अरुण पण तिच्या विचारांकडे ओढला जातो..तिच्या भावनांत गुंतत जातो... तिला शोधायचा प्रयत्न पण करतो...
 कोणत्या न कोणत्या धाग्याने एकमेकांशी बांधली गेलेली चार माणसं आणि त्यांचा एका कालखंडातला प्रवास..प्रत्येकाच्या कथेची गुंफण सुंदर प्रकारे केली आहे आणि शेवटाकडे जाताना व्यक्तिरेखा पण अशाच स्पष्ट होत जातात... एक चित्र पुरं व्हायला लागणाऱ्या काळातला प्रवास.. म्हटल तर धोबी घाट कथा आहे या काळाची..अरुणच्या त्या चित्राची..  मुन्नाच्या स्वप्नांची... शायच्या शोधाची... यास्मिन च्या जगण्याची... मुंबई डायरिज हे चित्रपटाचे नाव अगदी सार्थ ठरवलंय या चित्रपटाने... एखाद्या डायरी मधल्याच एका काळाची कथा, एक भाग वाटतो हा.. यातल्या प्रत्येकानेच आपलं काम इतक सुंदर केलंय की कोणाला कमी म्हणावं आणि कोणाला सरस म्हणावं.. चित्रपटाचा अजून एक plus point  किव्वा किरणचा strong  point  म्हणू आपण हवं तर...पण हा चित्रपट बननेला नाहीये.. हा तिने बनवलाय.. आणि हा बनण्यापूर्वी जसाच्या तसा तिच्या डोक्यात होता आणि त्याचप्रमाणे बनवला तिने तो.. Its a perfectly planned and imiplemented work...
आमीर खान सारखा गुणी कलाकार पुरेपूर वापरला गेला नाहीये हे कुठेतरी खटकत रहात.. इतर सगळ्या व्यक्तिरेखा जितक्या स्पष्टपणे व्यक्त झाल्यात, रंगल्यात तितका 'अरुण' रंगला नाहीये.. त्याचा मनस्वीपणा, विचार, भावना व्यक्त करणाऱ्या प्रसंगांची कमतरता जाणवत रहाते.. चित्रपटात आमीरला कमी वाव मिळाल्याची भर climax त्याच्यावर चित्रित करून भरून काढली आहे.. अर्थात त्याच्या अभिनयाची वेगळ्याने प्रसंशा करण्याची गरजच नाही इथे..
लिहायचं म्हटलं तर direction मधल्या बारकाव्यांविषयी, कथेतील बारीक सारीक जागांविषयी बरंच लिहिता येईल.. पण ते वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघणं आणि अनुभवणच असत छान आहे.. जाता जाता इथे चित्रपटाच्या पार्श्वसंगीताविषयी उल्लेख न करणं म्हणजे विषय अर्धवट सोडणं आहे.. Gustavo Santaololla च्या संगीतासोबतच पावसाच्या वेळी, चित्र काढतानाच्या वेळी ठुमरीचा वापर प्रसंगांना खूपच उठाव आणणारा आहे..
हा चित्रपट निश्चितच हिंदी चित्रपटाची समीकरणं बदलणारा आहे.. या आधी असे प्रयोग झाले नाहीत असं नाही..पण ते प्रयोग प्रायोगिक किव्वा class फिल्म म्हणूनच मर्यादित राहिले...रजत कपूर, विनय पाठक आणि त्यांच्या टीम ने खरच काही सुंदर कलाकृती दिल्या आहेत... मला सध्या आठवतोय तो त्यांचा मिथ्या चित्रपट... त्याच्या विषयी बोलायचं तर सगळं तेच लिहावं लागेल.. पण सांगायचं यासाठी की हे असे काही चित्रपट art  फिल्म म्हणूनच बघितले गेले...
किरण ने कुठेतरी स्वत:च्याच मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिचा world सिनेमा च्या मार्केट मध्ये उभा राहू शकेल, पसंतीस उतरू शकेल असा सिनेमा बनवण्यात इंटरेस्ट आहे.. पण माझ्या मते तिचा सिनेमा आर्ट फिल्म च्या नावाखाली अडकून पडलेला उत्तम सिनेमा प्रेक्षकांपर्यंत एक दर्जेदार commercial सिनेमा म्हणून पोहचवू शकेल.. माझा एक खूप आवडता mexican director आहे, Alejandro inarittu..  त्याच्या पद्धतीचा एक खूप हलकासा प्रभाव जाणवला मला आणि जो बॉलीवूड साठी खरच वेगळा आणि स्तुत्य आहे.. बॉलीवूड मध्ये ज्या प्रकारच्या चित्रपटाची मी इतके वर्षे वाट पहात होते ते समोर आल्याचं बघून खरच आनंद होतोय आज.. इथम पुढे Indian cinema म्हणजे फक्त नाच, गाणी, कॉमेडी न रहाता एक दर्जेदार कलाकृती म्हणून समोर येतील अशी इच्छा करते...
मेरा कुछ सामान ...
हा पहा हा चाललेला थोर मेळा
पाप स्वप्नी पण असे तोरा निराळा..

आज संधी लाभली अन बोलला तो
पापण्यांच्याही पहार्‍यातून डोळा..

राजहंसा ना तमा ह्या कावळ्यांची
होऊ दे वाटेल तितकी फौज गोळा...

गे, बटा का परत आणे चेहर्‍यावर
का हवा वार्‍यास वेडा हाच चाळा..

बोलती रागावल्या गोपी कुणाला
जा.. नको ना माठ फोडू खोडसाळा..

रंग माझा वेगळा हे जाणते मी
पांढरा वाटो कुणा वाटेल काळा..
मेरा कुछ सामान ...
जिथे तिथे का दिसशी मजला, तुझाच कायम विचार आहे
तुझ्याविना या जगात माझा, जगावयाला नकार आहे..

जुनेच काही मनात दाटे, फुटेल जेव्हा नवी पल्लवी
असो नसो हा वसंत आता, मनात माझ्या बहार आहे..
 
भिनून जावा नसानसातून, दंश असा दे, मला नव्याने
नको म्हणाले किती तरीही, मनात त्याला रुकार आहे..
 
खुणावणारे क्षितीज आता, कथे मला हे असे तराणे,
तिथे नवे ने सुरेल जगणे, जिथे आता अंध:कार आहे..
 
झुलायला मी दु:ख-सुखाचे, अविरत येथे झुलले झोके,
इथून पुढचा हरेक क्षण जीवना तुझ्यावर उधार आहे..
मेरा कुछ सामान ...
खोटे तुझे उमाळे, भुलण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही...

माझे म्हणू असे मी, कोणी न राहिलेले
गणती फुका सुखाची, करण्यात अर्थ नाही...

झाले कुठे जरासे आसू स्वतंत्र माझे
झाले हसेच त्यांचे, रडण्यात अर्थ नाही..

सांभाळले जरी मी, विरलेच व्योम अंती,
आता तयात तारे, विणण्यात अर्थ नाही..

उरली न ती खुमारी, स्वप्नातल्या क्षणांना
रात्रीवरी उगाचच, रुसण्यात अर्थ नाही..

सांगू कसे कुणाला, आले कुठून कोठे
खोट्या दिशा कि भाग्यच्?, पुसण्यात अर्थ नाही...

मृत्यू दिला तुम्ही जो, स्वीकारला सुखाने
आता दुवा जिण्याची, देण्यात अर्थ नाही..