मेरा कुछ सामान ...
लावायचा होता ना तुला आपल्या नात्याचा थांग..
आणि माझ्या मते ते अथांग होतं..
कसे वेडे हट्ट तरी असतात..
कसले वेडे दिवस...
कशाला हवं असायचं तुला विश्लेषण करायला प्रत्येक गोष्टीचं?
पाण्यात उतरण्या आधीच तळाचा अंदाज घ्यायची तुझी घाई,
आणि ते छान उतरुन अनुभवायची माझी पद्धत..
कधी कधी विश्लेषण करण्याच्या नादात विसरुन जातो ना आपण अनुभवणं?
समजलं नाही का तुला हे?
की अनुभवण्याच्या नादात साध्या गोष्टीही लक्षात यायच्या राहून जातात,
हे मला समजलं नाही..
जे असेल ते..
थोडी वाट पहायला हवी होती का आपण?
उशीरा का होईना सापडला असताच की आपल्याला तळ, आपल्या नात्याचा..
फक्त पाणी गढूळायला नको होतं रे..!
मेरा कुछ सामान ...
या आयुष्याचं काय करायचं असतं? म्हणजे नेमका उद्देश काय असतो? मी खरच सांगते मी महत्वाकांक्षी नाही. low aim is crime वगैरे वाक्य ज्यांना आवडतात त्यांना आवडो आणि ज्यांना अशी महत्वाकांक्षा आहे त्यांना असो. पण सगळ्याच लोकांवर महत्वाकांक्षी असण्याचं आणि स्पर्धा करण्याचं बंधन का? कशासाठी? मला सामाजिक बांधिलकीची वगैरे फार चाड नाही. दुरुन तमाशा बघणार्‍यांतला पिंड म्हणा हवंतर. कारण सगळंच निरर्थक वाटतं. जन्म निरर्थक.. जगणं निरर्थक.. निरर्थकाचाच खेळ वाटतो सगळा मला तरी. महित नसलेल्या वाटेवरुन माहित नसलेल्या गावाकडे जाणारा हा प्रवास. गाव कुठलं आहे हे माहित नाही त्यामुळे कुठे थांबूही शकत नाही. हा प्रवास मुक्कामाला न पोहचताच संपणार आहे. हा प्रवास माझ्यासोबत संपणार आहे की प्रवासासोबत मी संपणार आहे. आणि मी च संपून गेले तर काय गाव आणि काय मुक्काम? मेल्यानंतरचं कोणी बघितलंय? मला नाही फरक पडत मी मेल्यावर कोण किती रडेल याचा? कोणी रडेल की नाही याचा तरी.. मला नाही वाटत फार लोकप्रियता असावी आयुष्यात.. किंवा पैसा, सुखं वगैरे... घर, गाडी, विमानप्रवास वगैरे नसतानाही सुख असतंच की. मेल्यावर घर कुठे नेणार आहे मी.? या इतक्या इतक्याश्या मुक्कामात टीचभर जागेसाठी नाही आटापिटा करावा वाटत मला तर माझं काय चुकलं? 
एखादं माणूस फकिर असू नये का? असूच शकत नाही का? काही माणसं असतात ना (म्हणजे खरंतर पुरुष कारण माझ्यातरी बघण्यात आजवर एकही अशी बाई नाही..) बापजाद्यांनी कमवून ठेवलेल्या किंवा स्वत:च कमवलेल्या पैशावर मनमौजी रहाणारी.. त्यांना कुटुंबिय असतात किंवा नसतात. असले तरी ते त्यांना बांधून ठेवू शकत नाही कारण ते पुरुष असतात. नावं ठेवतील कदाचित पण फकिर आहे म्हणुन त्यांचा जगण्याच हक्क कोणी नाकारत बसत नाही. मग माझा पण नाकारला जाऊ नये असं मला वाटलं तर माझं काय चुकलं? मला माझं आयुष्य जगायला कोणाची परवानगी का लागावी? माझा जन्म होवुन अनेक वर्षे लोटली. मला एक हाडामांसाचं शरीर आहे आणि ते जगवायला जे जागतं ते मिळवायची, कमवायची ता़कद, कौशल्य, बुद्धी इ. गोष्टीही आहेत आणि ते मी कमवतेय देखिल. मग तरीही मला स्वत:वर अधिकार मिळवायला माझं अस्तित्व सिद्ध का करावं लागावं. 'मी आहे' एवढ्या गोष्टीने ते का सिद्ध होत नाही. माझं होत नाही तर मग पुरुषांचं कसं होतं? का होतं? आधी मला स्त्री मुक्ती फॅसिनेटींग वाटायची.. मग दांभिक वाटायला लागली. आता काहीच वाटत नाही. काही प्रश्न जेन्युइन आहेत पण मला फक्त माझ्यापुरतं उत्तर हवय. कोणी स्वार्थी म्हटलं तर म्हणो. स्वतः काहीतरी भव्यदिव्य मिळवा, काहीतरी करुन दाखवा (म्हणजे काय?) आणि मग तुम्हाला तुमच्या मनासारखं वागता येईल हे साटंलोटं का? अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा.. हे सगळं अधिक अधिक मिळवायच्या अपेक्षा का? सामान्यपणे लोकांना वाटतं तसं (लोक म्हणतेय मी बायका नाही) घर-संसार ही स्वप्न नाही आली कधी मनात पण मग म्हणून समाजप्रवर्तक, द्र्ष्टा नेता वगैरे होण्याची स्वप्न पाहिली पाहिजेत असं का? उदात्त हेतूला वाहिलेलं आयुष्य अर्थपूर्ण वगैरे असा काही समज असेल.. तर असू दे ना. मी कुठे नाही म्हटलं? पण तो समज मला पटलाच पाहिजे का?  नेतृत्वगुण, समजूतदारपणा, बाणेदार वृत्ती, सोशिकपणा, सात्विकता वगैरे वगैरे चं गुणगाण इतकं ऐकत आलेय मी की अशीच आहे असं मला वाटायला लागलेलं एके काळी. वास्तविक माझ्यात कोणतेही नेतृत्वगुण वगैरे नाहीत. मी कोणालाही दिशा वगैरे दाखवु शकत नाही, समजून घेऊ शकत नाही, ज्याला मी धडाडी, बाणेदारपणा समजत वगैरे समजत होते तो निव्वळ आक्रस्ताळेपणा आहे. आणि हे सगळं उमजलं तेव्हा निराशेच्या खोल गर्तेत जाण्याचा पण अनुभव घेवुन झालाय माझा. पण मी अशी आहे तर मी काय करु? आपल्या खर्‍या भावना दडपून उगीच सोशिकतेचा किंवा प्रेमळपणाचा आव मला नाही आणावासा वाटत. आणि मला महान महान स्वप्नही नाही पडत.. यात माझं काय चुकलं?
कुठलं बंधन नाही.. बेड्या नाहीत.. अपेक्षा नाही.. अपेक्षापूर्ती नाही. जगण्यापुरतं कमवावं..मनमोकळं हसावं. बोलावसं वाटेल त्याच्याशी बोलावं. कधी पंडीतजींच्या मियां मल्हारात तर कधी गुर्टूबाईंच्या ठुमरीत बुडून जावं... मोत्झार्ट चालू असताना व्हॅन गॉग अजून वेगळा समजतो का हे शोधण्यात तासन तास घालवावे.. बर्गमन पाहताना फुटून जावं.. पाठीवारच्या सॅकमध्ये २ कपडे आणि पायात चपला एवढ्या भांडवलावर वाट फुटेल तिकडे चालत रहावं. कुठल्यातरी गावात रात्र कुडकुडावी.. कुठल्यातरी पर्वतावर दिवस तळपावा.. माहित नसलेल्या तळ्यात सुर्य बुडावा.. हात लाऊन पाहता येईल एतका चंद्र जवळ भासावा... कुठल्या आडवाटेने न समजलेल्या भाषेतलं गाणं कानी यावं आणि सोबत रहाता येणार नाही हे माहित असूनही जीव ओवाळून टाकणारे प्रियजन भेटावेत.... बस्स.. जगणं जाणून घेत रहावं आणि जाणून घेत रहावं.. रोज कळतय वाटेपर्यंत नव्याने अडकावं.. अडकलय असं वाटेपर्यंत सुटून जावं.. मला असं जगावसं वाटलं तर काय चुकलं? आयुष्याचा प्रवास खर्‍या अर्थाने प्रवासच व्हावा.. आणि हिमालयाच्या किंवा आल्पस् च्या कुशीत किंवा अ‍ॅमेझॉनच्या खोर्‍यात, किंवा नाईल च्या काठी किंवा पॅसिफिकच्या मध्यावर.. कुठेही संपून जावं कसलाही मागमूस न ठेवता..मातीचा देह मातीत मिसळून जावा.. मला असं मरावसं वाटलं तर माझं काय चुकलं?
मेरा कुछ सामान ...
जन्माला येतो तेव्हाही वाहतच असतं रक्त शरीरात,
वाढत जातं दिसामासांनी..
आपल्याही नकळत अव्याहतपणे सुरु असते प्रक्रिया त्याच्या निर्माणाची..
शुद्धीकरणाची..
येणार्‍या प्रत्येक क्षणागणिक
आणि जाणार्‍या प्रत्येक श्वासागणिक
एकेका थेंबामागे घडत असतं महाभारत...
अखंडपणे..
अचानक वार होतो एखादा आणि भळभळायला लागतं..
.
.
.
.
.
.
कवितापण अशीच जन्माला येते....
मेरा कुछ सामान ...
Hii..!
प्रिय लिहिलं नाही कारण तू मला प्रिय आहेसच याची मला खात्री नाही. किंवा खूप जास्त प्रिय असावीस. Narcissist ना शेवटी.. ह्म्म्म.. कशी आहेस? म्हणजे आता मला खरच आठवत नाही की तू कशी आहेस. स्वतःविषयी विचार करताना मला नेहमी असं वाटतं की, ' अर्रे मी अशीच तर आहे पहिल्यापासून, फक्त आता स्वतःविषयी अमुक अमुक गोष्ट शब्दांत मांडू शकते. (आणि गरज पडलीच तर त्यामागची कारणमीमांसादेखिल स्पष्ट करु शकते.)' असो, तर याप्रकारे तुझ्याविषयीदेखिल मला काही आठवत नाही, त्यामुळे काही नवीनही वाटत नाही.
हल्ली मी परत बोलायला लागलेय. म्हणजे खाई खाई सुटल्यावर माणसं जशी खात सुटतात तशी मी बोलत सुटलेय त्याच्याशी. त्यामुळेच मी त्याला माझी दर्दभरी दास्ताँ पण सांगितली. (वास्तविक, जे झालं त्याच्याविषयी मला दर्दच काय पण इतरही काही वाटत नाही.) पण बहुधा लोकांना दर्द वाटत असावा. म्हणून मग मी देखिल तो वाटू देते. म्हणजे मलाही कधी कधी रडायला हक्काचा खांदा मिळेल अशी आशा वाटते. खरंतर तो नाही मिळाला तरी हरकत नसते. मिळाल्याचा आनंदही नसतो, बरं, तो खांदा मी वापरेनच याचीही खात्री नसते. पण हा खांदा मिळण्याचा प्रकार भलताच रोमँटीक असतो. खांद्यावर रडून झाल्यावर जे काही होतं ते मात्र प्रॅक्टीकल असतं. (की नॅचरल?) पण खरी गंमत ही नाहीये. खरी गंमत ही आहे की, हे सगळं माहित असूनही असंच व्हावसं वाटतं. (व्हावसं वाटतच असंही नाही पण होऊ नये यासाठीही मी काही करत नाही.)
मी फार मी मी करते. कदाचित मला दुसरं काहीच करता येत नसावं. हे जाणवलं की मी विचार करते. shame based conscience आणि guilt based conscience यातला कुठला मला जास्त सूट होईल याचा. कुठलाच नाही असं उत्तर मिळालं की मला विकृत असल्यासारखं वाटतं. आत्महत्या करणे हा चांगला मार्ग असू शकतो पण ते फारचं रोमँटीक वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात मी भलतीच प्रॅक्टीकल असल्यामुळे मला ते जमणार नाही हे ही जाणवतं. स्वतःला नाकारण्यात काही हशील नाही कारण मग माझं नसलेलं conscience कुठूनसं "खोटारडी! खोटारडी" म्हणून ओरडू लागतं. स्वतःला स्विकारणं हा रोमँटीसिजम आहे. त्यामुळे तो ठराविक काळानंतर संपतो. माझ्याबाबतीत तो संपला आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींना अर्थ नाही.
मिळवायचंय ते मिळत नाही ही समस्या नाहीच आहे. काय मिळवायचं तेच समजत नाही ही समस्या आहे. बरं ते समजलं आणि काही मिळालं तरी मग त्यानंतर इतर काही हवसं वाटणारच नाही याची काय खात्री? किंबहुना असं वाटेल याचीच शक्यता जास्त. मग मला काहीच मिळवावसं वाटत नाही. तरी पण मी उत्तरं मिळवते. मिळवायला, गमवायला किंवा बदलायला ती माणसांपेक्षा कमी हानिकारक असतात.  बायका कन्फ्युज असतात असं पुरुषांचं मत असतं हे मला हल्लीच कळलं. आपल्यात बाईपणाचा अवशेष सापडला याचा आनंद मानून घ्यावा असा माझा विचार होता पण मग मला इतर बर्‍याच गोष्टींप्रमाणे याही गोष्टीचा बाईपणाची स्पेसिफिक संबंध लावता येत नाही असं कळलं.
मला पाऊस पडताना परत परत का रोमँटीक वाटत रहातं याचं उत्तर मिळवायचा प्रयत्न चालुये सध्या. असं वाटणं हा मी स्वतःशी केलेला अजून एक खोटारडेपण आहे असा निष्कर्ष निघाल्यास मला खूप काळाने परत एकदा वाईट वाटू शकतं.
असो. आजच्याला इतकच. काळजी घे म्हणत नाही मी तुला. कारण ते खोटं वाटतं. You are sane (selfish?) enough to take care of yourself. जाते.
Bye..!