Showing posts with label सिनेमाच्या जगात.... Show all posts
Showing posts with label सिनेमाच्या जगात.... Show all posts
मेरा कुछ सामान ...
अ‍ॅनिमेशन चित्रपट म्हणजे फक्त लहान मुलांसाठी असलेला प्रकार हा आपल्याकडचा एक सर्वसाधारण समज आहे. पण परदेशातले अ‍ॅनिमेशन चित्रपट, त्यांतील विषयांचं वैविध्यं आणि प्रगल्भता बघता कोणत्याही प्रौढाला खिळवून ठेऊ शकतील असेच हे चित्रपट आहेत. त्यातही खास उल्लेखनीय म्हणजे अमेरीकन आणि जपानी चित्रपट. आणि अजूनच स्पेसिफिकली बोलायचं झालं तर जपानमध्ये अबालवृद्धांसाठी म्हणून जे काही अ‍ॅनिमेशन चित्रपट बनवले जातात त्यासाठी अ‍ॅनिमे (anime) ही संज्ञा वापरली जाते. या विभागात केवळ प्रौढांसाठीच असलेल्या अतिशय किचकट, गुंतागुंतीच्या विषयापासून लहान मुलांसाठी असलेल्या हलक्याफुलक्या विषयापर्यंत सगळ्याचा समावेश होतो. त्यामानाने अमेरीकन अ‍ॅनिमेशन अजून तरी 'फक्त प्रौढांसाठी' या विभागात तशी मोजकीच आहेत.
अर्थातच यात डिस्नेचा सिंहाचा वाटा नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण तो मान्य करुनही पिक्सरने बनवलेली अ‍ॅनिमेशन जास्त गोड, गोंडस, लोभसवाणी वाटतात हे मान्य करायलाच हवं. २००६ मध्ये डिस्नेने पिक्सर विकत घेतली खरी तरीही पिक्सर च्या नावाखाली बनणार्‍या चित्रपटांचं वलय काही कमी झालं नाही. या बॅनरखाली बनणारे चित्रपट आणि त्यातील पात्रं मनात घर करुन जातात हे नक्की. मग तो 'टॉय स्टोरी' मधला 'वूडी' असो की 'मॉन्स्टर्स' मधला 'सुली'. 'फायंडिंग निमो' मधला 'मार्लिन' असो की 'अप' मधला 'रसेल'.
फक्त एखाद्या ठराविक साच्यामधल्या नीतीकथा किंवा सुष्ट-दुष्ट संघर्ष दाखवण्यापलीकडे या चित्रपटांमध्ये बरंच काही दाखवलं गेलंय. माणसांचे राग, लोभ, प्रेम, माया, स्वार्थ, भीती, दुष्टपणा.. सगळंच... आणि फक्त इतक्यावरच न थांबता माणसाच्या अशा वर्तणूकीला त्याची परिस्थिती जबाबदार असते, असू शकते आणि प्रेमाचा, सहकार्याचा हात मिळाला तर माणूस कोणतीही, कितीही त्रासदायक परिस्थिती बदलू शकतो या सगळ्या गोष्टी कोणताही उपदेशाचा आव न आणता अतिशय मनोरंजक रीतीने आपल्यासमोर उलगडत जातात. आणि हे मनुष्यीकरण (humanization) ते कोणत्याही, अगदी कोणत्याही वस्तूला लागू करु शकतात. आणि ते ही इतक्या चपखल की आपण प्रेमातच पडावं त्यांच्या. 'कार्स' मधल्या गाड्या, 'वॉल-इ' मधले रोबोटस्, 'टॉय स्टोरी' मधली खेळणी, 'रॅटाटूई' मधला उंदिर या सगळ्या मनुष्येतर गोष्टींचं इतकं छान चित्रण केलंय की ही पात्रं माणसांइतकीच आपल्या जवळची होऊन जातात. रडत, धडपडत, थोडं घाबरत चाचरत आपल्या आतल्या भीतीवर मात करत नवा रस्ता शोधणारे हे सगळे जण मग आपलंच रुप वाटायला लागतात.
चित्रपटाचं किंवा कोणत्याही कलाकृतीचं यश यातच सामावलेलं असतं की किती लोकं तिच्याशी नाळ जोडू शकतात, रिलेट करु शकतात. त्यामुळेच प्रत्येक काळाच्या मानसिकतेनुसार त्या त्या काळाचे नायक-नायिकांचे साचे बदलत गेलेले आपल्याला पहायला मिळतात. पण हे निर्जिव किंवा मनुष्येतर प्राण्यांच्या संदर्भात करणं किती जोखमीचं काम असेल याची कल्पना ते काम करणार्‍यांनाच असावी. आणि असं जोखमीचं काम असूनही पिक्सर त्यात दर वेळी उत्तमरित्या यशस्वी होत आलेत हे नक्की..
जपानी अ‍ॅनिमे मात्र जरा गंभीर मामला आहे. त्यात हलकेफुलके चित्रपट नाहीतच असं नाही पण त्यातल्या गंभीर विषयांचं प्रमाण आणि प्रत बघता त्यांचा उल्लेख अत्यावश्यक आहे. पहिल्यांदा असा गंभीर चित्रपट पाहिला तेव्हा अ‍ॅनिमे ही काय भानगड असते हे मला माहिती नव्हतं. आणि चित्रपट होता, 'ग्रेव्ह ऑफ फायरफ्लाईज'. चित्रपटाची कथा दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या एका बहिण-भावाभोवती फिरते. हल्लीच माझ्या वाचनात आलं की ही अकियुकी नोसाका यांच्या खर्‍या आयुष्यातली घटना आहे. हा चित्रपट पाहिला तेव्हा रडू आवरेचना. अर्थात चित्रपट फार सुंदर आहे आणि माणसाचं माणसाशी वेदनेच्या पातळीवर असं जोडलं जाणंही तितकच खरं. पण चित्रपट झाल्यावर, रडून झाल्यावर विचार आला की काय म्हणून लहान मुलांनी असे चित्रपट पहावेत? आणि मग त्यावेळी मला भावाकडून कळालं की हा लहान मुलांसाठीचा चित्रपट नाहीये. अ‍ॅनिमे वगैरे वेगळा प्रकार असतो. मग मात्र वेड्यासारखी या चित्रपटांच्या पाठी लागले मी. किती किती विषय आणि किती भावगर्भ चित्रपट. आणि काही तर इतके गुंतागुंतीची की त्यावर बेतलेल्या चित्रपटांनी हॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली. उदाहरणच द्यायचं झालं तर 'घोस्ट इन द शेल' वर बेतलेला 'मॅट्रिक्स' किंवा 'पॅपरिका' वरुन नोलान ला सुचलेला 'इनसेप्शन'. या चित्रपटांच्या विषय वैविध्यामुळे आणि गुंतागुंतीमुळे जसं थक्का व्हायला होतं तसंच त्यात जाणवणार्‍या तीव्र जपानी संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या दर्शनानेदेखिल.बर्‍याचदा विदेशी चित्रपट म्हटले की त्यात अमेरिकन आणि युरोपियन चित्रपटांचाच भरणा असतो. अर्थात त्यांचं श्रेय तेवढं आहेच या उद्योगाला पण ते सगळे चित्रपट थोड्या फार फरकाने एकाच मातीतले, एकच संस्कृतीचे वाटतात. आणि मग त्या पार्श्वभूमीवर इराणी किंवा जपानी चित्रपट नजरेला, मनाला आणि बुद्धीलाही सुखावणारे, वेगळं काहीतरी बघितल्याचं समाधान देणारे वाटतात. पाश्चिमात्यांच्या तोडीस तोड तांत्रिक प्रगती पण त्याच वेळी जपानी लोकांनी त्यांच्या संस्कृतीची मर्मस्थानं ज्या कसोशीने जपली आहेत किंवा त्यात काळानुरुप बदल केले आहेत ते बघून कौतुक वाटायला लागतं. Spirited away, Howl’s moving castle, Secret world of arrietty, princess mononake.. स्वप्नकथेपासून अगदी ग्लोबलायझेशन, क्लायमेट चेंजपर्यंत कोणत्याही विषयावर आणि साध्या कौटुंबिक, आत्मचरीत्रात्मक ते sci-fi पर्यंत सगळ्या प्रकारात जपानी अ‍ॅनिमेशनने बाजी मारली आहे. पण हे असं ग्लोबल आणि प्रगत होत असतानाही चित्रपटभर तीव्रतेने जाणवणारा जपान फॅक्टर अनुभवायला भारी वाटतो. जणू काही दोन तास दुसर्‍या जगाची सफर करुन आलो आपण.
असाच काहीसा अनुभव 'पर्सेपॉलिस' आणि 'वॉल्ट्ज विथ बशीर' बघताना आला. 'पर्सेपॉलिस' हा चित्रपट त्याच नावाच्या आत्मचरीत्रात्मक चित्र-पुस्तकावर (कॉमिक बुक) बेतलेला आहे. ज्यात लेखिकेने इराणमधल्या इस्लामिक क्रांतीच्या आधीच्या आणि नंतरच्या आयुष्याचं चित्रण केलं आहे. तसंच 'वॉल्ट्ज विथ बशीर' या इस्त्रायली चित्रपटामध्ये अंशतः स्मृती हरवलेला एक सैनिक लेबॅनॉन युद्धातल्या त्याच्या भूतकाळाचा शोध घेताना दाखवलाय. हाही चित्रपट खर्‍या घटनांवर बेतलेला आहे. पण हे असे चित्रपट विरळाच. मक्तेदारी म्हणावी अशी अमेरीकन आणि जपानी चित्रपटांचीच.
हे सगळं आठवण्याचं कारण? उगाच विचार करताना वाटलं बिम्मच थोडा मोठा होऊन रसेल बनतो आणि तोच पुढे जाऊन लंपन होतो. (जी.ए.कुलकर्णींच्या धीरगंभीर आणि गूढ व्यक्तिमत्वाशी विसंगत असे लहान मुलांसाठी 'बखर बिम्म ची' नावाचे एक भन्नाट पुस्तक त्यांनी लिहिलय. सर्वांनी अगदी आवर्जून वाचावं असंच पुस्तक आहे ते.) आणि मग विचार आला की आपल्याकडे को बिम्म आणि लंपनच्या रुपाने आनंदाचा खजिना आहे तो कधी असा अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून जगासमोर येणार?
वास्तविक या सर्व चित्रपटांवर स्वतंत्र लेख होतील इतके भारी चित्रपट आहेत हे, पण त्यावर नंतर कधीतरी.. सवडीने. तूर्तास मात्र बिम्म आणि लंपनच्या संदर्भात पडलेले अनुत्तरीत प्रश्न घेऊनच थांबते.
मेरा कुछ सामान ...
Alejandro González Iñárritu ची ओळख २०१० मध्ये झाली तेव्हा त्याचे triology of death चे तिन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्याला पण ३ वर्षे उलटून गेलेली आणि 'Biutiful' अजून प्रदर्शनाच्या वाटेवर होता. म्हणजे त्याचे प्रदर्शित झालेले तिन्ही आणि लगेचच प्रदर्शित झालेला 'Biutiful' बघितल्याला ५ वर्षे झाली. आणि खरं सांगायचं तर आता ते चित्रपट नीटसे आठवतही नाहीत. नक्की काय संवाद होते, नक्की काय मांडणी होती, पार्श्वसंगीत कितपट प्रभावशाली होतं, कोणत्या प्रसंगानंतर कोणता प्रसंग होता, खरंच नीटसं आठवत नाही. काही गोष्टी अंधुक आठवतात.. चित्रपटातील व्यक्तिरेखा, त्यांचे हावभाव, स्थळं, एकूणच कथा, चित्रपटाची संकल्पना.. पण काही गोष्टी खूप व्यवस्थित आठवतात.. Maya angelou चं एक वाक्य आहे..
"People will forget what you said..
People will forget what you did..
But people will never forget how you made them feel.."
And I remember that movies of Iñárritu made my heart feel so ached.. They had tremendous hold on my mind and heart. I remember that thing very clearly..  कोणतीही अस्सल कलाकृती माणसांइतकीच जिवंत असते.. चालत्याबोलत्या माणसांप्रमाणेच आपल्या आयुष्यावर परिणाम करते.. आणि कदाचित आपण विसरुन जाऊ, चित्रातली नेमकी रेषा, कॅनव्हासचा नेमका रंग, गाण्यातली नेमकी जागा, कवितेतला नेमका शब्द किंवा चित्रपटाची नेमकी मांडणी, पण त्या कलाकृतीने आपल्याला जी अनुभूती दिली, ती विसरणं शक्य नाही.. आणि म्हणूनच Iñárritu चे चित्रपट ऑल टाईम फेव्हरीट सदरात टाकता येतात.
त्याचा २००० साली आलेला पहिला चित्रपट 'amores perros', (Love's A bitch) माणसाच्या क्रौर्याची, एकनिष्ठेची आणि विश्वासघाताची गोष्ट.. चित्रपटाचं इंटरेस्टींग नाव हे चित्रपट बघण्याचं तात्कालिक कारण ठरलं असलं तरी Iñárritu च्या मांडणीने मनावर घेतलेली पकड त्याचे इतर चित्रपट शोधण्यास आणि बघण्यास कारणीभूत ठरली. एकमेकांत गुंतलेली कथानकं, वेगवेगळी माणसं, त्यांच्या वेगळ्या कथा, आणि कोणत्यातरी घटनेने, प्रसंगाने जोडली गेलेली त्यांची आयुष्य, जी कदाचित एरवी कधीच जोडली जाणं शक्य नाही. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांत घडलेले पुढे-मागे मांडणी असलेले प्रसंग.. आणि अतिशय प्रभावी मध्यवर्ती कल्पना. दिग्दर्शकाला काय पोहचवायचं आहे हे जेव्हा त्याला स्वतःला ५००% स्पष्टपणे माहित असतं तेव्हाच अशी मांडणी करण्याचं तो धाडस करु शकतो. नंतर आलेले triology of death मधले२००३ सालचा '21 gram' आणि २००६ मधला, 'Babel', हे चित्रपटही मांडणीच्या दृष्टीने 'amores perros' सारखे. अर्थात triology असल्यांमुळे मध्यवर्ती कल्पनेसोबतच मांडणीतील सारखेपणाही गरजेचा ठरला असावा. पण हे तिन्ही चित्रपट खिळवून ठेवणारे.. हृदयात काहीतरी दाटून आलंय असं वाटायला लावणारे ठरले हे निश्चित. 'amores perros' मधली डॉग फाइट, '21 gram' मधला गोळीबाराचा प्रसंग, 'Babel' मध्ये वाळवंटात अडकलेल्या नॅनीची घालमेल.. असे काही प्रसंग आहेत जे अजून मनात घर करुन आहेत.
(मांडणीच्या दृष्टीने क्लिष्टता असणारे, किंवा सुरीअलिझम वाले चित्रपट खर्‍या अर्थाने दिग्दर्शकाचे चित्रपट ठरतात असं मला वाटतं. अशा चित्रपटांमध्ये शक्यतो कोणाची भूमिका वठली नाही असं होत नाही. म्हणजे अशा चित्रपटांचा कलाकारांविषयी दृष्टीकोन असा वाटतो की, तुम्ही वाईट अ‍ॅक्टींग करुच शकत नाही. तुम्ही भूमिका ही चांगलीच केली पाहिजे. दिग्दर्शक इतर कोणते एक्स्क्युजेस मान्यच नाही करणार..आणि Iñárrituचे सगळे चित्रपट "चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे" हे दाखवून देणारे आहेत.)
जरी त्याची triology of death २००६ सालच्या 'Babel' पर्यंतच असली तरी पुढच्या दोन्ही चित्रपटांमध्ये नायकाचा मृत्यू आणि दु:खाचे विभ्रम (की विभ्रमांचे दु:ख?) या दोन्ही कल्पना आहेतच. आणि त्याचा यंदा ऑस्कर च्या यादीत सर्वात आघाडीवर असलेला, "Birdman or (The Unexpected Virtue of Ignorance)" हा चित्रपट.. ज्या चित्रपटामुळे त्याच्याविषयी लिहिलंच पाहिजे यावर शिक्कामोर्तब झालं. Birdman ही कथा आहे एका सुपरहिरोची.. एकेकाळी सुपरहीरो असलेला नायक, कालांतराने कामाला पारखा होतो आणि एका नाटकाद्वारे स्वतःला अभिनेता-दिग्दर्शक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. पण तुलनेने साधी वाटणारी ही कथा प्रेक्षकांना पूर्णवेळ खिळवून ठेवते. मोजक्याच मोठ्याच्या मोठ्या शॉटस् मध्ये केलेलं चित्रिकरण, पार्श्वसंगीतात मुख्यत्वे ड्रमचा केलेला वापर, नायकाचं त्याच्या भोवतालच्या लोकांच्या नजरेतून जाणवणारं वास्तव आणि त्याच्या स्वतःच्या मनात असलेली त्याची 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा, त्याची मुलगी, सहकारी, वेगळी झालेली बायको, अधूनमधून भेटणारे चाहते, बरे वाईट समिक्षक या सगळ्यांचीच गुंफण इतकी उत्तम झाली आहे की चित्रपटाला इतकी नामांकनं मिळाली नसती तरच नवल. आणि चित्रपटाचा सुरीअलिस्टीक शेवट हा माझा वैयक्तिक आवडता भाग. त्याविषयीची वेगवेगळी मतं नेटवर सर्वत्र वाचता येतीलच.
 जरी तो त्याच्या पहिल्या चित्रपटापासून (म्हणजे पहिल्या फुल्ल लेंग्थ चित्रपटापासून) 'बेस्ट फॉरेन लॅग्युअज फिल्म' च्या कॅटेगरीत नामांकन मिळवत असला तरी, यंदा त्यांचं नामांकन अमेरीकेतूनच असल्यामुळे त्याला ऑस्कर मिळण्याची शक्यता वाढली आहे हे नक्की. (या आधीचे चित्रपट अमेरीकेत बनले असते तर एव्हाना नक्कीच त्याच्या नावावर ऑस्कर जमा झाला असता.) त्याच्या स्पर्धेत असणारा "The Grand Budapest Hotel" हा चित्रपटही काही कमी नाहिये. एखादी गोष्ट चांगली कशी सांगावी याचं उत्तम उदाहरण आहे. पण Iñárritu सोबत इतक्या वर्षांचं असलेलं प्रेक्षकाचं नातं, त्याच्या सर्वंच चित्रपटांमध्ये त्याने केलेली उत्तम कामगिरी, आणि एकूणच कॉमेडी पेक्षा माणसाच्या मनातल्या खेळांकडे असलेली ओढ यामुळे माझं पारडं तरी Iñárritu कडेच झुकतय..
त्याला यंदाचा ऑस्कर मिळाला तर तो नक्कीच The Expected Virtue Of Excellence समजता येईल.. :-)

(With Iñárritu in leading race, the oscar ceremony this year is a must watch and with Neil Patrick Harris hosting the show, I wouldnt miss it for the world.. Countdown has already started.. fingers crossed.. Go Iñárritu...! Best Wishes...)
मेरा कुछ सामान ...
They say movie is the most beautiful lie. Then why everyone including the director try so hard to make it realistic? Make it believable? Make it true? People are anyways paying to watch their lies. Then why not to give them the lie in such a way that they will know its a lie? They will know its not real.. Its surreal.. And there are not more surrealistic, more astoundingly amusing films than those of Luis Bunuel's..
काही माणसं पहिल्या भेटीतच आवडतात. बोलायला लागली की कळून जातं, ही "आपली माणसं". आणि Buñuelची पहिली फिल्म बघितली तेव्हाच जाणवलं हा "आपला". आपल्याच माळेतला.. आणि मग त्याच्याविषयी वाचताना जेव्हा त्याचं "Give me two hours a day of activity, and I'll take the other 22 in dreams -- provided I can remember them." हे वाक्य वाचनात आलं तेव्हा फक्त माझ्या त्या वाटण्यावर शिक्कामोर्तब झालं.
त्याचा The Exterminating Angel किती महिने माझ्या स्पॅनिश फिल्म्स च्या फोल्डर मध्ये पडून होता कोण जाणे. पण जेव्हा तो चित्रपट पाहिला तेव्हा मेंदूला झटका बसला. मनात म्हटलं कुठे होतास तू इतके दिवस? भेटला कसा नाहीस? कसं काही कळलं नाही तुझ्याविषयी? अशाप्रकारे बुनुएल, Director's special फोल्डर मध्ये त्याच्या सगळ्या फिल्म्ससह विराजमान झाला आणि माझा शोध सुरु झाला बुनुएल नावाच्या स्वप्नाचा.. स्वप्नच म्हटलं पाहिजे त्याला. कारण स्वप्नांइतक्याच त्याच्या फिल्म्स स्वप्नवत आहेत आणि त्याला स्वप्नं जितकी प्रिय होती तितक्याच त्याच्या फिल्म्स मला प्रिय आहेत.
चित्रपट क्षेत्राच्या इतिहासात चांगले दिग्दर्शक खूप आहेत. त्यातले आवडीचेही अनेक. पण ज्यांच्यासाठी वेडं व्हावं असे किती? बर्गमननंतर मला भेटलेला Buñuel पहिलाच.
१९०० साली स्पेन मध्ये जन्मलेला आणि १६व्या वर्षापर्यंत अगदी धार्मिक वृत्तीच्या Luis Buñuel ला, चर्चच्या अतार्किक कृतींनी नास्तिक बनवलं आणि तो शेवटपर्यंत नास्तिक राहिला. त्याच्या उपसाहगर्भ विनोदी शैलीत त्याने म्हटलेलं "I’m still an atheist, thank God." हे वाक्य प्रसिद्ध आहे. बॉक्सिंग, व्हायोलिन आणि हिप्नॉटिझमनंतर सिनेमाचं त्याला लागलेलं वेड आयुष्यभर टिकलं. ५० वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत त्याने सगळ्या प्रकारचे चित्रपट बनवले. पण त्याचं खरं कसब होतं surrealism.. आणि ते त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच स्पष्टपणे दिसतं.
जगातील सगळ्यात प्रसिद्ध शॉर्ट फिल्म असा ज्याचा उल्लेख केला जातो ती Un Chien Andalou, ही त्याची पहिली फिल्म जी त्याने Salvador Dali सोबत बनवली. त्यांचं ध्येय्य नक्की होतं. "Our only rule was very simple: no idea or image that might lend itself to a rational explanation of any kind would be accepted. We had to open all doors to the irrational and keep only those images that surprised us, without trying to explain why". त्यांचा हा एकमेव नियम त्यांनी तंतोतंत पाळला आणि सिनेमाला काही अविस्मरणीय इमेजेस दिल्या. त्यांची दुसरी फिल्म L'Âge d'Or पण अशीच..कथा नसलेली घटनांची जंत्री.. त्यातही त्या घटना क्षणोक्षणी प्रेक्षकांना धक्का देत राहतील, त्यांच्या श्रद्धा-भावनांवर प्रश्न उपस्थित करतील, विचार करणार्यांना विचार करायला भाग पाडतील, तर इतरांना नुसत्याच दुखावतील अशा..
तो नास्तिक असला तरी त्याच्या चित्रपटांमध्ये त्याने कायम देवाचा शोध आणि देव शोधणार्यांच्या दांभिकतेचा माग घेतला. त्याच्या मते God and Country are an unbeatable team; they break all records for oppression and bloodshed, आणि नेमका हाच धागा त्याने चित्रपटांमध्ये पकडलाय. मग The Diary of a Chambermaid मधली rightist nationalist movement असो, की That Obscure Object of Desire मधली दहशतवादी हल्ल्यांची पार्श्वभूमी असो की The Discreet Charm of the Bourgeoisie मधली युद्धाची परिस्थिती असो. म्हणूनच त्याचे चित्रपट खूप खरे वाटतात पण त्याचवेळी चित्रपटातील घटना मात्र अतिशय surrealistic आणि पात्रं कमालीची दांभिक, बूर्झ्वा, बुद्धीजीवी, mediocre वगैरे.. एकूण काय, तर तोच त्याचा एकमेव नियम.
त्याची सुरुवात जरी त्याच्या मास्टर टेक्निकने झाली असली तरी त्याचे सर्वोत्तम समजले गेलेले चित्रपट त्याने पन्नाशीनंतरच बनवले. आणि उत्तरोत्तर त्याच्या चित्रपटांतील surrealistic content आणि मांडणीतील बांधणी अधिकच प्रभावी होत गेली.
देव-देवत्व-दांभिकता, माणसाच्या अतृप्त लैंगिक आकांक्षा आणि मध्यमवर्गीय बंदिस्त मानसिकता असे ढोबळमानाने त्याच्या चित्रपटांच्या विषयांचे वर्गीकरण करता येईल.
Viridiana, Simon of the Desert आणि The Milky Way मध्ये त्याने देव-देवत्व-दांभिकता यांचा मार्मिक वेध घेतला आहे. यात कोणत्याही पात्राच्या तोंडी भले मोठे तत्वज्ञानाचे डोस नाहीत की देवाचा पराभव दाखवण्याचा अट्टहास नाही पण साध्या साध्या प्रसंगातून, फ्रेम्समधून, जगाचं वास्तव समोर येतं.. जे कदाचित आपल्यालाही दिसत असतं पण आपणच बघण्याचं टाळत असतो. कारण काळं-पांढरं असं वर्गीकरण करणं आपल्याही सोयीचं असतं.
This Strange Passion, The Diary of a Chambermaid, Belle de jour, Tristana आणि That Obscure Object of Desire मध्ये त्याने माणसाच्या अतृप्त लैंगिक आकांक्षांचा अवकाश मांडला आहे. मग त्या वेडाकडे झुकणार्‍या संशयाच्या रुपात असोत की फ्रॉईडच्या संकल्प्नांवर बेतलेल्या माणसाच्या अदृश्य वासनांच्या रुपात असोत. 'असं का?' याचा प्रवास दाखवण्यापेक्षा, 'असं आहे', 'असं असतं' हे दाखवणं तसं धाडसाचं समजलं पाहिजे. कारण 'असं का?' याचं स्पष्टिकरण प्रेक्षकांना मिळालं की लगेच प्रेक्षक स्वतःला त्यापासून अलग करु शकतात. पण 'असं असतं' हे दाखवलं की मग सुटका नाही. असं असतं, ते कोणाच्याही बाबतीत असू शकतं. कारण ती माणसंही आपल्यासारखीच आहेत.  Well behaved, well mannered, well settled.. आणि तरीही त्यांच्या अतिशय योग्य दिसणार्या बाह्यरुपात काही 'अयोग्य' इच्छांचे दमन केलेलं आहे.
The Exterminating Angel, The Discreet Charm of the Bourgeoisie आणि The Phantom of Liberty या चित्रपटांमध्ये मध्यमवर्गीय बुद्धीजीवी, तथाकथित पापभीरु पण मुळात सामर्थ्यहीन समाजाचं पितळ जसं उघडं पाडलं आहे तसं क्वचितच कोणाला जमलं असेल. आणि surrealist मांडणी असूनसुद्धा ते सोडून देता येत नाही हे विशेष. ते तुम्हाला झपाटतं, तुमच्यात भिनतं आणि तुमच्यातल्या mediocrityला अपमानित करुनच राहतं.
The Exterminating Angel विषयी वाचताना वारंवार एकच गोष्ट मला आढळली, ती म्हणजे तथाकथित सुसंस्कृत समजल्या गेलेल्या रितीरिवाजांतील फोलपणा, तरीही त्यांना चिकटून राहण्याची मानवी वृत्ती, थोड्याशाही धक्क्याने गळून पडणारे माणसाचे मुखवटे यांच्यावर दिलेला भर. पण एका बंदिस्त समाजासाठी ही कथा जितकी लागू होते तितकीच एका स्वतंत्र माणसासाठी पण लागू होते असं मला वाटलं. आपलंही असंच झालेलं असतं. कोणती अदृश्य रेषा असते जी आपण ओलांडू शकत नाही? का ओलांडू शकत नाही? आपल्याला इतकं सामर्थ्यहीन का समजतो आपण? आणि मग कोणत्या तरी एका क्षणी आपण बळ एकवटून बाहेर पडतो. आणि कळतं किती सोपं होतं ते.. पण तरीही तिथून बाहेर पडल्यावर नवीन चौकटीत अडकण्याची शक्यता राहतेच..
आपण बुद्धीजीवी माणसं. स्वतःला लॉजिकल समजतो.. रॅशनल समजतो. एकूणच अॅटिट्युड असा की, 'Talk some sense and you have my attention.’ Then how long can someone hold your attention without making any sense? Without any logic? Perfectly irrational but you just cant escape the truth in the images. You don’t dare to ask for logic because what you see is the sheer brilliance.
माणसांच्या भावना, वासना, नाती, भीती यांचा उल्लेख जिथे येतो तिथे बर्गमन ला वगळणं अशक्य आहे. आणि तो तर माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे बुनुएल आणि बर्गमन ची तुलना होणं स्वाभाविक होतं. त्या दोघांच्याही चित्रपटांमध्ये आशयाच्या सारखेपणासोबत अभिव्यक्तीतील खरेपणाही आढळतो. पण बर्गमनच्या चित्रपटांत जसे आपण क्षण गोठवून टाकणार्‍या क्षणांनी आपण घायाळ होऊन जातो तसे बुनुएलच्या फिल्म्स बघताना होत नाही. बर्गमनचे अनेक संवाद, त्याच्या चित्रपटातील अनेक वाक्यं फ्रेम करुन ठेवावीत अशी आहेत पण बुनुएल या बाबतीत कितीतरी वेगळा. एखादा झटका लागून वास्तवात यावं असे संवाद नसल्यामुळेच कदाचित बुनुएलच्या स्वप्नामधून आपण बाहेरच येत नाही. चित्रपट संपेपर्यंत गुंतवून ठेवण्याचं अचाट सामर्थ्य त्याच्या प्रत्येक दृश्यात, प्रत्येक रचनेत आहे. आणि अशी शक्ती फक्त खरेपणाचीच असू शकते. त्याच्या डोक्यात त्याला हवी असलेली दृश्यं इतकी पक्की असायची की तो सहसा एडिटींगमध्ये काहीच टाकून द्यायचा नाही. स्वतःच्या कामाविषयी इतकी खात्री किती जणांना असते? (अमृता प्रीतम तिने लिहिलेलं कधी खोडायची नाही म्हणे.. डोक्यात येईल ते अथपासून इतिपर्यंत लिहून काढायची..) स्वतःच्या कामावर निष्ठा आणि जे वाटतं ते निर्भिडपणे मांडण्याचं धैर्य यातूनच त्याच्या कलाकृती घडल्या. तो स्वतःही म्हणाला, "I never made a single scene that compromised my convictions or my personal morality." आणि यासाठी त्याला अनेकदा चर्चचा आणि गव्हर्नमेंटचाही रोष पत्करावा लागला. अनेक वर्षे त्याला मातृभूमीपासून दूर मेक्सिको मध्ये काढावी लागेली, शेवटी तो तिथलाच नागरीक झाला.
त्याच्या प्रत्येक चित्रपटावर अनेकानेक लेख लिहावेत, कित्येक अंगांनी चर्चा व्हावी इतकी गहनता त्यात नक्कीच आहे. एका लेखात त्याने मांडलेल्या विषयांचा आढावा घेणं तसं अवघडच.. पण त्याच्याविषयी काही लिहिल्याशिवाय त्याने डोक्यात भरवुन दिलेली वादळं काही कमी होणार नाहीत हे माहिती असल्यामुळेच हा खटाटोप.
बुनुएलने त्याच्या चित्रपटांत surrealism मोठ्या प्रमाणावर हाताळला. पण पुन्हा पुन्हा पाहूनही त्यात तोचतोचपणा येत नाही हेच त्याचं यश आहे. त्याच्याकडू इतर काही करण्याची अपेक्षाही नाही. त्याला जे सर्वोत्तम जमतय तेच त्याने द्यावं आणि कितीदा देऊनही प्रत्येक वेळी आधीपेक्षा सरस काहीतरी निर्माण व्हावं असं झालं त्याच्याबाबतीत. किती किती प्रकारच्या प्रतिमा.. डिनर पार्टीसाठी म्हणून जमलेली आणि एका अदृश्य रेषेच्या आत अडकलेली माणसं, वास्तविक जेवणाची संधी कधीही न मिळूनदेखिल पुन्हा पुन्हा त्यासाठी एकत्र जमणारी माणसं, कोणत्याही कारणशिवाय एकच व्यक्तिरेखा साकारायला दोन नायिका, मुलगी समोरच असून तिच्या अपहरणाची नोंद करण्याचे सोपस्कार, एकाच वेळी, एकाच प्रवासात, दोन वेगळ्या कालखंडातले अनुभव, नायिकेच्या तिच्या तिलाच न उमगलेल्या तृष्णा, वासनांतून जन्माला आलेले क्रुर खेळ आणि सूड, माणसाच्या स्वार्थीपणाने होणारा ईश्वरी दयेचा अपमान..पुन्हापुन्हा पाहूनही पुन्हा पहावासा वाटणारा, कितीही विचार केला तरी न संपणारा, प्रत्येक वेळी नव्याने गवसणारा बुनुएल..त्याच्याविषयी नव्याने काही लिहिण्याचं सामर्थ्य माझ्या लेखणीत येईपर्यंत तूर्तास त्याचाच एक विचार जो त्याच्या निर्मितीचं सार सांगतो आणि आपल्या जगाचं वास्तव.. "...since we are all apt to believe in the reality of our fantasies, we end up transforming our lies into truths."
त्याची स्वप्नांची यात्रा जरी १९८३ मध्ये संपली असली तरी त्याने निर्माण करुन ठेवलेलं स्वप्नांचं जग कायमच नव्या स्वप्नभरल्या नजरांना आकर्षित करत राहिल हे नक्की.

---------------------------------------------------------------------------------------
माझा बर्गमन..
http://merakuchhsaman.blogspot.in/2011/04/blog-post_16.html
मेरा कुछ सामान ...

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही आलेला स्पेशल वीक. थंडीसोबत लागणारे वेध आणि येणारं स्पेशल फिलींग. रोज सकाळी उठून उत्साहाने हव्याहव्याश्या काळोखात शिरायचं जिथे एक पूर्णतं अनोळखी जग माझ्यासाठी उभं असायचं.. दर वर्षी वाटतं की हे कधी संपूच नये आणि मग तरी ते एक दिवस संपतं.. ह्म्म.. असो..
नेहमीप्रमाणेच या वर्षीचे काही प्रयोग फसले काही यशस्वी झाले. त्या सगळ्याच म्हणजे या वर्षीच्या पिफमध्ये पाहिलेल्या चित्रपटांचा हा थोडक्यात रीव्हू..

Kamr Palm (kaf elqamar) - Egypt

चित्रपटाचं रेटींग खूप चांगलं होतं ते बघून म्हटलं महोत्सवाची सुरुवात यानेच करावी पर बात कुछ जमी नही. आपल्याकडे बॉलीवूडमध्ये असले खूप सिनेमे बघितल्यामुळे असेल. दिग्दर्शकाने कथा थोडी घुमवून सांगितल्यामुळे चित्रपट बघितला जातो कारण कथेमध्ये काहीच नवीन नाहीये. विधवा आई (आमिर), तिची ५ मुलं (मुलगे) एका खेड्यात रहात असतात. त्यांच्या वडिलांचं स्वप्न असतं की घर बांधावं. मग आईची फारशी इच्छा नसतानाही मुलांना शहरात पैसे कमवायला जायची परवानगी देते आणि मोठ्या भावावर सगळ्यांना एकत्र ठेवायची जबाबदारी. मग एक एक भाई का बिछडना और माँ के अंतिम समय मे पास आना.. भारी अभिनय आणि मांडणी पण मस्ट वॉच नाही.



The last step (Pele Akher) - Iran


गेल्या वर्षी सेपरेशन आणि या वर्षी लास्ट स्टेप बघून इरानी चित्रपटांविषयी आणि खासकरुन इरानी दिग्दर्शकांच्या बुद्धीमत्तेविषयी कौतुक वाटायला लागलं आहे.. सुंदर चित्रपट. कथा, मांडणी, अभिनय.. सगळंच सुंदर. ज्या पद्धतीने कथा उलगडत जाते ते पहाणे तर फारच सुंदर. इथे कथेविषयी काहीही सांगुन मजा नको घालवायला.. मस्ट वॉच.


The tortoise, an incarnation (Kurmavatara) - India


या चित्रपटाविषयी काय बोलावं.? बोलू तेवढं कमीच. गांधी कोणाला किती आणि कसे समजले हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण खरा प्रश्न आहे तो गांधी आचरणात आणण्याचा. वेगवेगळ्या विरोधाभासांनी भरलेल्या या काळात गांधीवादही कसा सोयीस्करपणे वापरला जातो त्यावर मार्मिक भाष्य करणारा हा चित्रपट. गांधींना TRP मध्ये मो़जणे, गांधी झालेल्या माणसाचे त्याच गेट अप मधले सामान्य वागणे. नक्की बघावा असा चित्रपट..


The delay  ( LaDemora) - Uruguay, Mexico, France


ठिक ठाक चित्रपट. साधीशीच कथा. तशीच मांडणी. उत्पन्न फारसे नसलेल्या एका मध्यमवयीन बाईवर ३ मुलांची आणि अल्झायमर्स झालेल्या म्हातार्‍या वडिलांची जबाबदारी. रोजच्या त्रासाला कंटाळून वडिलांना वृद्धाश्रमात सोडायला जाते पण तिथे निराधार नसल्यामुळे घेत नाहीत. बहिण वडिलांची जबाबदारी घ्यायला तयार नसते. आणि विचारांच्या अशाच गोंधळात ती त्यांना अनोळखी रस्त्यावर सोडून येते. मग त्यांचं हट्टाने तिथेच तिची वाट पाहत थांबणं आणि तिनेही अस्वस्थ होऊन त्यांना न्यायला परत जाणं.. Thats all the movie is about.


Rose ( Roza) - Poland


दुसर्‍या महायुद्धाच्या काळातला चित्रपट. महायुद्ध काळातील sexual atrocities and mental harassment  चं चित्रण अंगावर शहारे आणणारं. इतकी वर्षे उलटून पण ती जखम कायम का भळभळत राहते हे नव्याने जाणवतं असे चित्रपट बघताना. ऱोझ चा संघर्ष जितका वेदनादायक तितकाच खिळवून ठेवणाराही. वॉर फिल्म्स आवडत असतील तर मस्ट वॉच.


Material (Material) - South Africa


जड जड सिनेमे बघून झाल्यावर मूड हलका करणारा चित्रपट अनपेक्षितपणे मिळाला.  The movie gives some genuine laughter. The stand up comedy used is just awesome. फार ड्रामा नाही. क्लायमॅक्स मध्येही काही नौटंकी नाही असा सरळ साधा फॅमिली मूव्ही.  Too many references of bollywood, so its feels funny. कधी फॉर अ चेंज काही वेगळ्या प्रकारची कॉमेडी आणि हलका फुलका चित्रपट पहायचा असेल तर नक्की पहा..


The Parade (Parade) - Serbia


समलिंगी व्यक्ती समाजात खुल्या मनाने स्विकारल्या जाणार्‍या संघर्षाच्या काळातील सर्बिया इथला हा चित्रपट. विषय गंभीर असला तरी हलक्या फुलक्या सादरीकरणामुळे चित्रपट जड होत नाही. स्ट्रेट लोकांचा मुळातच समलिंगींकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन आणि एका घटनेच्या निमित्ताने (परेडच्या निमित्ताने) घडलेल्या सहवासाने त्यात होत गेलेला बदल हा कालखंड खूप सुरेख मांडलाय. फक्त असं वाटलं की सगळी कथा कदाचित साधारण १०० मिनिटात बसू शकली असती ती उगीच १२० मिनिटांची केलीये.


Barbara (Barbara) - Germany


दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातील जर्मनीत घडलेली कथा. सुरेख अभिनय, सुंदर कथा. सुरेख मांडणी. बार्बरा च्या अभिनयाला विशेष दाद द्यावी लागेल.  शेवटपर्यंतची तिच्या निर्णयातली अनिश्चितता आणि मनातली अस्वस्थता खूपच छान व्यक्त केलीये तिने.  प्रत्येक प्रसंगात बार्बरा आणि आंद्रे यांची एकमेकांसोबतची कामाच्या वेळेची ट्युनिंग आणि वैयक्तिक पातळीवरचे संबंध या दोन्ही अवस्था खूपच चांगल्या मांडल्या आहेत. खूप चांगला चित्रपट.


Noor (Noor) - Pakistan


ट्रांसजेंडर व्यक्तींची होरपळ मांडणारा अजून एक चित्रपट. हा पूर्ण बघता नाही आला. पण बघताना सतत 'बोल' ची आठवण येत राहिली. आणि त्याचं दिग्दर्शन याच्यापेक्षा चांगलं होतं असं वाटलं. असो.. पूर्ण न पाहिल्यामुळे फार लिहिणं शक्य नाही.



बालक-पालक,

खूप महत्वाच्या विषयावरचा चांगला चित्रपट. याविषयी फार लिहित नाही. ऑलरेडी सगळीकडेच खूप चर्चा चालू आहे.. :-)


Frozen Silende (Silencio en la nieve) - Spain


खूप सार्‍या अप्रतिम वॉर फिल्म्स पाहण्याचा अनुभव असल्यामुळे की काय पण हा चित्रपट अगदीच सुमार वाटला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मन सैनिकांमध्येच घडणार्‍या खूनांची रहस्यकथा आहे. But it neither feels mystery nor a war film. युद्धकाळातलं वातावरण वाटत नाही. म्हणजे पुरेसं वाटत नाही. आणि रहस्यकथा चालू आहे हा परिणाम पण मध्येच नाहीसा होऊन परत कधीतरी परत आल्यासारखा वाटतो. जर्मन सैनिकांमध्ये एका अधिकार्‍याच्या हुकूमावरुन त्यांच्यातल्याच एका सैनिकाच्या बायकोचा बलात्कार केला जातो आणि त्यात गुंतलेल्या ४ सैनिकांना तिचा नवरा मारत असतो. आणि हा मारेकरी कोण हे शोधण्याचे काम एका माजी पोलिस आधिकारी असलेल्या सैनिकावर पडतं. त्याच्या शोधाची ही कथा.  Not so good.


Something in the air ( Apra s mai) - France



It is a really good script but director just wasted it. The people you have understanding (or at least idea) of the peculiar political situation and emotional trauma the europian youth was going through in 70's, could understand the script well. Unnecessary detailing ruined the pace of story. कम्युनिस्ट विचारांनी भारवलेला कॉलेजचा तरुण ते एक स्थिर जीवन जगू लागलेला माणूस हे एका विद्यार्थ्याचं रुपांतर अजून खूप चांगलं मांडता आलं असतं.  त्या नायकामध्ये काळानुसार होत जाणारे बदल स्क्रीन वर कुठे दिसतच नाहीत. एक ठराविक कालखंड दाखवायचा असतो अशा वेळी वेशभूषाकारांच्या कौशल्याला बराच वाव असतो. पण यात कुठे त्याचा वापर झालेला दिसत नाही. तरीपण कथेसाठी बघावा असा चित्रपट..

The fifth season of the year (Piata pora roku) - Poland


खूप गोड चित्रपट. हा चित्रपट बघताना गेल्या वर्षीच्या Las acasia ची आठवण झाली. पण ही कथा कितीतरी जास्त सुंदर आहे आणि तशीच मांडलीये. आपल्या नवर्‍याच्या अस्थी समुद्रात वाहण्यासाठी घेऊन चाललेली म्हातारी आणि तिच्यासोबत तिच्याच वयाचा ड्रायव्हर. दोन पूर्णतः भिन्न क्लासमधले लोकं. त्यांच्या सवयींमधला, वागण्या बोलण्यातला फरक पण एकाच पिढीचे असल्यामुळे येणारे काहीसे साधर्म्य याची त्यांची त्यांनाच होत जाणारी जाणिव, हा प्रवास त्यांच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठीही खूप खास बनवते. अप्रतिम अभिनय. सुंदर चित्रपट..


Araf - Somewhere in between - Turkey


दोन तासाच्या चित्रपटात सगळे मिळून अर्धा तासाचे संवाद आहेत.. बाकी वेळ काही होतच नाही. होतच नाही.. होतच नाही. मी वाट बघत बसलेले की कधी काही होईल चित्रपटात. पण शेवटपर्यंत काही खास होत नाही. नाही म्हणायला नायिकेच्या अ‍ॅबॉर्शन चा प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. पण बाकी चांगलं किंवा वाईट काहीच नाही. एक तरुण मुलगी एका मध्यमवयीन ट्रकवाल्याच्या प्रेमात पडते. तिला प्रेग्नंट करुन तो गायब होतो. तिच्यावर प्रेम करणार्‍या मुलाचा प्रेमभंग. तिचं अ‍ॅबॉर्शन आणि मग तिचं त्या मुलाबरोबर लग्न अशी कथा आहे. कधीच बघितला नाही हा चित्रपट तरी काही बिघडणार नाही. अगदीच सुमार.


Everybody in our family (Toata lumea din famlia noastra) - Romania


एका साध्या कथेवरचा अप्रतिम चित्रपट. एका क्षणासाठीही लक्ष विचलित होणार नाही अशी खिळवून टाकणारी मांडणी आणि अप्रतिम अभिनय. एका घटस्फोटीत जोडप्यातील नवरा, आपल्या मुलीला सुट्टीसाठी घेऊन यायल्या तिच्या आईकडे जातो. Somehow the situation turns violent. आणि मग काय काय घडतं त्याची ही कथा. त्या लहान मुलीसकट सगळ्यांचा अप्रतिम अभिनय.. मस्ट वॉच.


Post tenebras lux - Mexico


Frankly speaking, मला या चित्रपटातलं फारसं काही कळलं नाही. या चित्रपटाला अ‍ॅवॉर्ड वगैरे आहेत म्हणे.. :-( असो.. चित्रपटातली सिनरी फक्त खूप खूप खूप भारीए होती. प्रमाणाबाहेर सुंदर.. आणि चित्रपटातला शेवटचा प्रसंग काहीच्या काही. डोक्यावरचा केस हाताने उपटावा तसा तो माणूस स्वतःच्या मानेपासून डोकं उपटतो आणि मरतो.. yuuuuuk... आत्महत्या करायचे बाकी काही मार्ग नाही मिळाले का. अशा कल्पना सुचत तरी कशा असतील..? :-|


Rust and bone (De rouille et d'os) - France


माशांच्या हल्ल्यांत आपले पाय गमावुन बसलेली डॉल्फिन प्रशिक्षक आणि illegal बॉक्सिंग करणारा नायक यांच्यातलं नातं आणि त्याच वेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर या नात्याचा पडलेला परिणाम याची ही कथा. खूप छान चित्रपट. सुरेख अभिनय. का कोण जाणे पण शेवटी 21 grams ची आठवण झाली. मस्ट वॉच..


Hella W - Finland


पुन्हा एकदा WW2  चा काळ. पण ही Hella W ची सत्यकथा आहे. फिनलंड मधली एक यशस्वी व्यावसायिक, राजकारणी, कवयित्री आणि नाटककार.. चित्रपटात वातावरणनिर्मिती खूपच छान केलीये. पार्श्वसंगीत खूप खास. बाकी अभिनय आणि कथा यासाठी मस्ट वॉच आहेच. (सत्यकथा तशाही बर्‍याच प्रमाणात युनिक असतात.)


Laurence anyways - France

PIFF चा शेवट एका चांगल्या सिनेमाने झाल्याचं समाधान मिळालं हा सिनेमा पाहून.  168 min seems too long for any cinema but for the story spanning over 10 years, it was necessary. लॉरेन्स आणि त्याची बायको फ्रेड.. अनेक वर्षे सोबत राहिल्यावर आणि खूप चांगली केमिस्ट्री असतानादेखिल, लॉरेन्स एक दिवस फ्रेड ला सांगतो की त्याला स्त्री व्हायचंय. आणि त्याला हे गेली अनेक वर्षे वाटतय. या नंतरचा १० वर्षांचा काळ या चित्रपटात मांडलाय.. त्याचं आणि फ्रेड चं नातं, त्याचं आणि त्याच्या आईचं नातं, समाजातले संघर्ष अशा अनेक धाग्यांविषयी आहे हा चित्रपट. फ्रेडने त्याच्या बाजूने उभं राहणं आणि त्याच वेळी त्याला नाकारणं, दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम कायम रहाणं पण तरीही आपालल्या अस्तित्वासाठी चाललेली धडपड खूप छान मांडलीये. मस्ट वॉच..
मेरा कुछ सामान ...
Las acasias - Spain - 85 min - 2010
खरं सांगायचं तर हा चित्रपट मी स्पॅनिश मनसोक्त ऐकता यावी म्हणून गेलेले. ती भाषा एक मला उगीचच आवडते. पण या पातळीवर साफ अपेक्षाभंग झाला माझा. ५ मि. झाली, १० झाली, १५ झाली.. कोणी काही बोलायलाच तयार नाही. आणि नंतर जे काही संवाद झाले त्यावरुन या चित्रपटात संवाद नाममात्रच असणार आहेत याची जाणिव झाली. पण थिअटर खचाखच भरलं होतं, लोकं बाजूने उभे होते त्यामुळे चित्रपट नक्कीच चांगला असणार हे मी ताडलं आणि बसून राहिले. बसले ते बरंच केलं असं वाटलं सिनेमा पाहिल्यावर. भारी सिनेमा आहे. एक ट्रकड्रायव्हर, त्याच्या ट्रकमधून प्रवास करणारी एक बाई आणि तिची ५ महिन्याची मुलगी. एक मूल सोबत प्रवास करणार म्हटल्यावर काहीश्या त्रासानेच या प्रवासाला सुरुवात होते. अनोळखी माणसांत होईल तेवढंच जुजबी बोलणं. आणि मग अख्ख्या प्रवासात फार काही न बोलताही होत राहिलेला त्यांचा संवाद. तिघांचीही अप्रतिम एक्स्प्रेशनस्.. अगदी त्या ५ महिन्यांच्या बाळाचीसुद्धा..! चित्रपटाची मुख्य गरज, चित्रपटाचा गाभाच त्यांच्या एक्स्प्रेशनस् चा आहे. फार बोलणं होतच नाही दोघांत. अगदी त्यांच्या पूर्वायुष्याची पण जुजबीच माहिती घेटलिये. पण म्हणून कुठे काही कमी वाटत नाही. जी कथा आहे ती अगदी नीट पोहचलिये. छान सिनेमा.!

Voice Over (Zad kadar) - Bulgeria - 2010 - 107 min
विघटनपूर्व सोव्हियतच्या सामाजिक परिस्थितीची कल्पना असेल तर हा चित्रपट मस्ट वॉच आहे. त्या एका कालखंडात माणसांच्या वैयक्तिक आयुष्यात चाललेली सरकारची पराकोटीची ढवळाढवळ, व्यक्तिस्वातंत्र्यावरची बंधनं आणि त्यांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम यांचं दर्शन घडवणारा हा चित्रपट. एक कॅमेरामॅन, ज्याचं त्याच्या प्रोफेशन वर प्रचंड प्रेम आहे. त्याच्या मुलाला तिथल्या हवामानाचा त्रास होतोय म्हणून त्याची बायको मुलाला घेऊन बर्लिन ला जाऊन राहते. आणि त्यांच्या संवादातून चित्रपट पुढे सरकत जातो. त्यांची पत्र ज्यांत तिने त्याला बर्लिनला येण्याविषयी लिहिलेलं असतं, त्यांचे फोनवरचे संवाद या सगळ्यांचं इंटर्प्रिटेशन ते हेर कसे करतात आणि त्यातून त्यांचं नातं कसं अफेक्ट होत जातं हे बघणेबल आहे. भारी सिनेमा..

All that remains - Switzerland - 2010 - 92 min
दोन रस्ते.. महासागरांच्या टोकांकडे जाणारे.. दोन वेगळी शहरं.. भिन्न संस्कृती.. या रस्त्यांवरुन चाललेला ४ माणसांचा प्रवास. एकमेकांच्या दिशेला चाललेला पण एकत्र न येणारा.. मध्ये पसरलेल्या समुद्रामुळे. छान संवाद. दोन्ही जोड्यांचं निर्माण होत जाणारं नातं. नकोसं असलं तरी टाकून देता न येणारं आणि त्यातच कधीतरी मग क्म्फर्टेबल होत जाणारं. मस्त सिनेमा.

या व्यतिरिक्त, Moneyball, Anytime anywhere, Palwan fate हे चित्रपटही पाहिले. Moneyball चं दिग्दर्शन भारी आहे. चित्रपटच भारी. पण विंग्रजी सिनेमाविषयी काही खास वाटू नये असाच मोसम होता. Anytime anywhere हा एक तामिळ चित्रपट पाहिला. नेहमीच्या साऊथ इंडियन सिनेमापेक्षा काहीतरी वेगळा, थोडा फार लाईट पण गंभीर शेवटाचा. Palwan fate चा कॉन्सेप्ट तर भारी होता पण सिनेमा बघताना मला झोप लागलेली.. अरेरे पहिली २० मि. पाहिला मग २० मि. झोपले मग परत १० मि. पाहिला आणि बाहेर पडले..

नॉन सिनेमॅटीक हायलाईट म्हणजे, बिग बी ला एका फुटावरुन पाहिलं. त्याच्या मागोमाग रानीला कोणी भाव देत नसताना पाहिलं. पहिल्या दिवशीच्या गोंधळात कोणीही कोणाशी आपणहोऊन बोलताना अनुभवलं (जे कोथरुडात नॉर्मली होत नाही.. डोळा मारा ) मध्येच कधीतरी महेश भट्ट फिरत होता.
याखेरीज, या वर्षांतल्या ठळक घडामोडी..

१) पुने युनिव्हर्सिटी आणि जर्मन युनि. चा टाय अप. (२०११)
२) मॅक्सम्युलर आणि FTII च्या सोबत जर्मनीच्या सहकार्याने NFAI मध्ये ३ दिवसांचा जर्मन चित्रपट महोत्सव. (गेल्या १-२ महिन्यांत)
३) पिफ च्या कंट्री फोकस मध्ये जर्मन सिनेमा.
४) बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे जर्मन एन्व्हॉय.
५) बेस्ट सिनेमा, इफ नॉट अस, हु? (जर्मन) डोळा मारा हाहा

असो... तर अशी ही १०व्या पिफची कहाणी सुफळ संपूर्ण.. स्मित
मेरा कुछ सामान ...
Times and winds (Bes vakit) - Turkey - 2006 - 111 min
३ लहान मुलं. एकाला आपल्या वडिलांचा खून करायचाय कारण ते त्याच्यापेक्षा त्याच्या लहान भावावर जास्त प्रेम करतात, दुसर्‍याला आपल्या शाळेतल्या बाई खूप खूप आवडत असतात आणि एक मुलगी, जिच्या घरात नुकतच एक बाळ आलेलं असतं. पौगंडावस्थेत असताना मुलांची मानसिक स्थिती कशी अस्थिर आणि अनप्रेडिक्टेबल असते याचं चित्रण करणारा हा चित्रपट. यांचा सोबती एक अनाथ मुलगा. एका डोंगरावरच्या खेड्यात चाललेलं यांचं आयुष्य, नव्यानेच कळू लागलेल्या काही गोष्टी, भावना.. बदलत जाणार्‍या ॠतूंसोबत त्यांचं बदलत जाणारं विश्व यांची ही कथा. तीन वेगळी आयुष्यं, म्हटलं तर वेगळी म्हटलं तर जोडलेली, या सगळ्यांच्या आतील भावना आणि वरची वागणूक हे सर्वच पहाण्यासारखं. सगळ्यांचा उत्तम अभिनय. उत्तम सिनेमॅटोग्राफी.

The day I was not born (Das lied in mir) German - 2010 - 92 min
एका लहानश्या मुलीचे आई-वडील हिटलरच्या सैनिकांनी उचलून नेल्यावर, त्या कुटुंबाचे मित्र तिला स्वत:कडेच ठेवून घेतात. तिच्या नातेवाईकांपासून लपवून. अर्थात त्यांचं तिच्यावर खूप प्रेम असतं. हीच मोठेपणी स्विमर होते. एकदा स्पर्धेसाठी जात असताना एका एयरपोर्टवर स्पॅनिश बालगीत ऐकून आपल्याला ते गाणं माहिती असल्याचं तिला जाणवतं. आणि इथून चित्रपटाला सुरुवात होते. तिला सत्य समजण्याची वेळ जवळ आलीये कदाचित, हे जाणवून तिचे वडीलही तिथे येतात आणि मग त्यांच्याकडून जेव्हा कळतं की ती त्यांची खरी मुलगी नाही तेव्हा सुरुवात होते तिच्या स्वत:च्या शोधाची. अर्थातच वडिलांचं सहकार्य नाममात्रच लाभतं. त्यांचा जीव तिच्यात खूप गुंतलाय हे जाणवतय पण आपल्या परिवारापासून त्यांनी आपल्याला वेगळं केलय याचा प्रचंड रागही आहे. नवीन भेटलेल्या माणसांवर प्रेम वाटतय पण तितकाच अनोळखीपणाही आहे. या सगळ्या मानसिक स्थित्यंतरांमधून जाणारा तिचा प्रवास छानच मांडलाय.

Belvedere - Bosnian- Herzegovian - 2010 - 90 min
शरीरावरच्या जखमा किती काळ राहतात? आणि भीतीच्या? Belvedere ही अशीच एक महायुद्धातून वाचलेल्या ज्यूंची छावणी. त्यातल्या एका कुटूंबाची कथा. कुटुंबातल्या ३ पीढ्यांची कथा. ज्यातली एक अख्खी पीढी नाहीशी झालिये पण तिचं अस्तित्व कायम जाणवत राहतं. प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगात झालेल्या जखमांच्या खुणा वावरतायेत पण पुढची पीढी अगदीच अनभिज्ञ. कधी कधी या खुणा स्विकारायलादेखिल नाकारणारी तर कधी काहीच न समजून गोंढळून जाणारी. अफाट अभिनय आणि अप्रतिम दिग्दर्शन. आजोबा आणि त्यांचा लहानगा नातू. आजोबांच्या २ बहिणी. एकीने अख्खं कुटुंब गमावलय आणि त्यांना कुठे पुरलय याची जागा तरी कळावी यासाठी तिची चाललेली ओढाताण. दुसरीचा फक्त मुलगा वाचलाय, जो अमेरीकन रीअ‍ॅलीटी शो मध्ये जायचं स्वप्न पाहतोय. या सगळ्यांची ही कथा. प्रत्येकाच्या वेगळ्या मनःस्थितीची, सहनशीलतेची, भीतीची.. युद्धातल्या छळाइतक्याच भयानक त्याच्या आफ्टरइफेक्टची.. भीतीच्या जखमा कदाचित माणसाबरोबरच संपत असाव्यात. मस्ट वॉच.

Black Thursday (czarny czwartek) - Poland - 2011 - 105 min
७० च्या सुमारास पोलंड सरकारने अचानक केलेल्या अन्नधान्याच्या भाववाढीबद्दल कामगारांनी दिलेला लढा कसा दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला याची ही कथा. ७० चा काळ असल्यामुळे त्या प्रसंगांच्या मूळ चित्रफीती उपलब्ध होत्या. त्यातल्या घटनांची पार्श्वभूमी रंगीत चित्रपट म्हणून दाखवून, ती घटना ओरिजिनल कृष्णधवल स्वरुपातली, अशी या चित्रपटाची मांडणी केलेली आहे. घडणार्‍या घटना इतक्या त्रासदायक आहेत की या मांडणीचं कौतूक चित्रपट सुरु असताना मनात येत नाहीच. संपल्यावरच जाणवतं. मस्ट वॉच यादीतला अजून एक सिनेमा.
मेरा कुछ सामान ...
दर वर्षी नवीन वर्षाच्या चाहुलीसोबतच चित्रपटरसिक ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) १२ ते १९ जानेवारीत पार पडला. यात पहायला मिळालेल्या काही चांगल्या सिनेमांविषयी थोडसं....

Here without me (inja bedoone mah) - Iran - 2011 - 100 min
एक इरानची लाईफस्टाईल सोडता हा चित्रपट बघताना काहीच अनोळखी वाटलं नाही. प्रत्येक पात्राच्या भावना इतक्या प्रभावीपणे मांडल्या होत्या की जगातल्या कोणत्याही भागातील माणूस त्या कुठे ना कुठे रीलेट करु शकेल. चित्रपटात तीनच मुख्य पात्र. आई आणि तिची २ मुलं. लग्नाला आलेली अपंग मुलगी जिला अपंगपणामुळे काँम्लेक्स आहे, चित्रपट कथा लिहिण्याची स्वप्न पहाणारा पण परिस्थितीमुळे कारखान्यात काम करणारा तिचा भाऊ आणि या सगळ्यात, आपल्या रोजच्या आयुष्यातल्या प्रश्नांमध्ये अडकलेली या मुलांची आई. सगळ्याच्या सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या सुंदर व्यक्त होत जातात. त्यांच्या सगळ्या भावना अतिशय पर्सनल असूनही त्यांची तगमग सगळ्यांपर्यंत पोहचवण्यात त्या यशस्वी झाल्यात. मुलीचं लग्न तिच्या आवडत्या मुलाशी व्हावं म्हणून चाललेली तिची धडपड पाहताना 'बातो बातो में' मधल्या रोझी ची आठवण आली मला तरी. अर्थात हा सिनेमा गंभीर पण तरीही अंगावर येणारा नाही. काही कथा हॅपी एंडिंग केल्या की फारच फिल्मी वाटतात पण याचं तसं झालं नाही. शेवटाकडे चित्रपट निघाला तेव्हा मी खरच इच्छा करत होते हॅपी एंडिंग हवम आणि ते तसच होतं. अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि उत्कृष्ट अभिनयाचा हा चित्रपट नक्की पहावा असाच आहे.

Red heart (Dli sur) - Iraq - 2011 - 78 min
एकमेकांच्या प्रेमात पडलेलं एक किशोरवयीन जोडपं. मुलीची आई नुकतीच वारलेली. घर, भावंडांना सांभाळून शाळा करणारी ती. आणि आपलं दुसरं लग्न व्हावं म्हणून तिला एका वेडगळ मुलाशी लग्नाची सक्ती करणारा तिचा बाप. त्याच्या तावडीतून पळून गेल्यावर त्या जोडप्यावर काय काय प्रसंग येतात याची ही कथा. ऐकिव किंवा वाचून कितीही माहिती असली तरी तिथली परिस्थिती पडद्यावर पाहताना कायमच अंगावर येते.. ह्म्म...

Return Ticket (Dao fu yan liu bai li) - Taiwan - 2011 - 88 min
नवीन वर्षासाठी गावी जाणार्‍या बसेस च्या कमतरतेतून फायद्याच्या उद्देशाने एका बसची एक ट्रिप अ‍ॅरेंज करुन काही कमाई करु पहाणारा एक ग्रुप. त्यांची तिकीटं विकणारी एक बाई आणि तीची घरमालकीण. या ना तय निमित्ताने शांघायमध्ये येऊन राहिलेल्या दोघींची ही कथा. अगदी डायरेक्टली काही गोष्टी न सांगता, दाखवताही दोघींची आयुष्य आपपल्या पद्धतीने बदलत जातात हे चांगलच दाखवलय. शेवटी जिला जायचं नसतम ती घरी जाते आणि जी जायचा विचार करत असते ती जाणं रहित करते. यु नेव्हर नो.. असं काहीसं.. छान चित्रपट..!

Nader and simin: A seperation (Jodaeiye Nadar az simin) - Iran - 2011 - 123 min
Brilliant direction.. हा एकच शब्द सुचतोय मला तरी. अतिशय देखणा अभिनय आणि उत्कृष्ट कथा. चित्रपट बघताना इतकं गुंतायला होतं की डोक्यात इतर काही विचारांना जागाच राहत नाही. चित्रपटाच्या बर्‍याच गोष्टींचे निर्णय प्रेक्षकांवरच सोपवलेत त्यामुळे आपली जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागते. एक घटना, २ कुटुंब. प्रत्येक माणूस आपल्या फायद्यासाठी त्या घटनेचे कसं इंटरप्रीटेशन आणि मॅनिप्युलेशन करतो ते बघताना डायरेक्टर्ला सलाम करावा वाटतो. या घटनेच्या निमित्ताने उच्च आणि कनिष्ट वर्गातली परिस्थिती आणि मानसिकता यांचंही यथार्थ दर्शन होतं. घटना संपून जाते पण आयुष्य चालूच राहतं. आणि हे उर्वरीत सगळं घेऊनच आपण बाहेर पडतो. हॅट्स ऑफ...

Pina - German - 2011 - 100 min
Pina Bousch.. ७०, ८० ची प्रसिद्ध जर्मन नृत्यांगणा. तिच्याच कोरीओग्राफिज वापरुन तिच्या सहकलाकारांनी तिला केलेला हा सलाम. तिच्या सहकलाकारांची तिच्याविषयीची मतं, तिच्या सांगितलेल्या आठवणी आणि डान्सेस यांचं कोलाज म्हणजे हा चित्रपट. डान्सची विशेष आवड असेल तर नक्की पहावा असा..
मेरा कुछ सामान ...
वेदनेतलं सौंदर्य अजून कळायचं होतं आणि वेदनेतही कला असते हे गावी नव्हतं त्या वयातली ही गोष्ट.. इतर कोणत्याही मराठी घराप्रमाणे आमच्याही घरात "स्मिता पाटील" हे नाव कौतुकाने, आदराने घेतलं जायचं. त्याबरोबरच व्यक्त व्हायची तिच्या अकाली निधनाची हळहळ आणि तिच्या सौंदर्याचा आवर्जून केलेला उल्लेख. तिला बघायची प्रचंड उत्सुकता तेव्हापासूनची. मग तिचा फोटो असाच कधीतरी कुठेतरी पाहिला तेव्हा मात्र ग्रेसची संध्याकाळ चेहर्‍यावर उतरल्यासारखे भाव आणि २८ युगांची वेदना साठवणारे ते डोळे बघून जे काही वाटलं त्यात 'सुंदर आहे' हा विचार अजिबातच नव्हता. आणि तिथून पुढे अनेक वर्ष हे मत काही बदललं नाही. पण ते काहीही असलं तरी तिच्याकडे वळून वळून पहावं असं काहीतरी त्या चेहर्‍यात नक्की होतं. काय ते अजूनही पुरेसं उलगडलय असं वाटत नाही पण एखाद्या गोष्टीविषयी गूढ आकर्षण वाटावं आणि मोठ्या माणसाच्या आड लपून लहान मुलं जशी भीतीदायक गोष्ट पहात रहातात तसं तिच्याकडे पाहत रहावं असं मात्र वाटलेलं.
आज वाटतं की तिच्या या संमोहीत करणार्‍या आकर्षणाचं मूळ आहे तिच्या डोळ्यात.. बॉलीवूडमध्ये सुंदर सुंदर डोळ्यांवर सगळं मिळून जेवढं लिहिलं असेल कदाचित तेवढंच एकट्या स्मिताच्या डोळ्यांवर लिहिलं गेलं असेल. तिच्याविषयीचा कोणताही संदर्भ तिच्या डोळ्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही.
तसं त्यानंतर तिला पडद्यावर पाहिलेलं ते म्हणजे "पग घुंगरु बांध" आणि "आज रपट जाये" मध्ये. आणि ते पाहून कळलं नव्हतं की हिचा का एवढा बोलबाला आहे.
smita patil1.jpg
तिला खळखळून हसताना कधी पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. अगदीच उमटलं तर एखादं तृप्ततेचं हसू वाटावं, समजतय- न समजतय तोवर नाहिसं होऊन जाणारं हसूच पाहिलय मी तिच्या चेहर्‍यावर. माणसाच्या नेणिवा त्याच्या जाणिवांवर सदैव कुरघोडी करत असतात असं वाटतं तिचं हसू पाहिलं की.. तिच्या नेणिवांमधली खोल दु:ख तिच्या चेहर्‍यावर नितळ हसू येऊच द्यायची नाहीत जणू. तशी हसली असेल तरी 'स्मिता पाटील' म्हटलं की तो चेहरा नजरेसमोर येत नाही. सगळ्यात असून नसल्यासारखा वाटावा असा तिचा वावर. अतिशय निर्विकारपणे एखादा योगी संसारात वावरावा तशीच भासायची ती कायम. एक खूप गूढ वर्तुळ वावरतय भोवती आणि त्याच्या परिघात फार कमी लोकांना प्रवेश आहे असं वाटायचं.. कदाचित त्यामुळेच त्या परीघात जाणार्‍यांवर तिचं जे प्रेम असेल ते अजून जास्त उत्कट होत असेल..
स्वतःचे स्वतंत्र विचार असलेली, आपलं डोकं वापरणारी, आपली मतं मांडणारी आणि वाटा चोखाळणारी होती ती. मेंढरांच्या कळपातलं तिचं वेगळेपण चटकन नजरेत भरेल कोणाच्याही अशी. तिचं समर्पण आणि निष्ठा तिच्याकडे बघताच कळुन येते नाही? ८ महिन्यांचे गरोदर असताना चित्रपटसृष्टीसाठी निघालेल्या मोर्चात भर उन्हात अन्यथा कोण कशाला चालेल? तिची बंडखोर वृत्ती तिच्या कामातूनही व्यक्त झालीच पण दुर्दैव असं की तिच्या बोल्डपणाची चर्चा प्रमाणापेक्षा जास्त झाली. 'चक्र'मधलं तिचं अफाट काम त्या अंघोळीच्या प्रसंगाने झाकोळलं गेलं जणू. तसं तिच्या नितळ, मोहमयी सौदर्य आणि झळाळत्या कलागुणांची दखल अगदी हॉलीवूडकडूनही घेतली गेली म्हणा. प्रसिद्ध अमेरिकन समिक्षक Elliott Stein म्हणालेला "At 25 Smita is clearly the queen of Indian parallel cinema, as much an icon for film-makers of the milieu as was Anna Karenina for young directors in France at the outset of their new wave. Patil is not a classic beauty but the lady glows. She never makes a false move on screen." एकाच काळात "उंबरठा" आणि "अर्धसत्य" सारख्या परस्परविरोधी भूमिका स्मिताच साकारु जाणे.
तिचा ज्योतिषशास्त्राचा खूप चांगला अभ्यास होता म्हणे. राज बब्बरशी लग्न झाल्यावर ती त्याला म्हणायची "आपलं लग्न तर झालं, पण मी तुझी फार काळ साथ नाही देऊ शकणार." हल्लीच बच्चनने कुठेतरी स्मिताच्या अशा गूढ स्वभावाविषयी सांगितलं. त्याचा तो 'कुली' चा जगप्रसिद्ध अपघात होण्याच्या आदल्या रात्री १ ला स्मिताचा कॉल आलेला त्याला. तिने विचारलं, "आप ठिक तो है. मुझे बहुत बुरा सपना आया आपके बारे में" आणि दुसर्‍या दिवशी हा अपघात झाला त्याला. ती खरच गूढ होती का?
तब्बल ७ वर्ष ती समांतर चित्रपटांशीच सलग्न राहिली. "आज रपट जाये" गाण्याच्या चित्रिकरणानंतर ती घरी येऊन रडलेली ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती असते. आणि तिची वृत्ती बघता ते खरंही वाटतं. कमर्शिअल सिनेमातली स्पर्धा आणि वेळा सांभाळताना माझ्यातल्या माणसाचा मी अपमान करतेय असं मला वाटतं हे तिचं वाक्यच खूप काही सांगुन जातं.
स्मिता-नसीरुद्दीन्-गिरीश कर्नाड यांची जुगलबंदी बघणं हा कायमच एक भारी अनुभव असतो. स्मिता-नसीर चा बाजार मधला प्रसंग, ज्यात स्त्री-मुक्तीवर भाष्य केलय. इतक्या सहज साध्या प्रसंगात ते जे सांगून जातात- खरं तर स्त्रीला स्वत:पासूनच मुक्त व्हायची गरज आहे. आज ह्याचा आधार, हा नाही म्हणून त्याला सोडून दुसर्‍याकडे जाणे ही मुक्ती नव्हे. असं कोणाकडे जावसं वाटणंच थांबायची क्रिया म्हणजे मुक्ती आहे. आणि अगदी हेच मला आठवलं गौरीचं "कारागृहातून पत्रे" वाचताना. त्या कथेची नायिका पण अशाच काही विचारांची. अर्थात ती कथा असल्याने त्यात अजून बरच काही मांडलय ते तिथेच वाचण्यासारखं..(गौरीच्या कथा कधी मोठ्या पडद्यावर मांडता आल्या असत्या तर स्मिताला नक्की कालिंदीची भूमिका करायला आवडली पण असती. आणि तिला तीच मिळाली असती कदाचित.)
मंथन मध्ये स्मिता-गिरीशची दृश्य आवर्जून पहावी अशी. खासकरुन तिची म्हैस मेल्यावर ती त्याच्याकडे जाते आणि तो तिला पैसे देऊ करतो. ती घेत नाही. बाहेर पळत सुटते रडत रडत. तिला खरी अपेक्षा असते त्याच्या सहानुभूतीची. त्यालाही हे माहित असून त्याच्या स्वतःच्या मर्यादांमध्ये तो अडकलेला असतो. त्याचाही मुद्राभिनय लाजवाब आणि स्मिताची तर सगळीच देहबोली.. अगदी सुरुवातीच्या क्षणापासून.
तिला तिच्या जवळच्या मैत्रिणी 'स्मि' म्हणायच्या म्हणे. ती एक उत्कृष्ट फोटोग्राफरही होती. तिने अगदी व्यावसायिक वाटावेत असे फोटो काढले आहेत. हेमामालिनीचं देखिल फोटोशूट केलेला तिने. आणि "अगदी प्रोफेशनल वाटतात फोटो" अशी दाद पण मिळवलेली.
खरंतर राज बब्बरशी तिने लग्न करायचा घेतलेला निर्णय अर्थातच धक्कादायक होता सगळ्यांना. रातोरात तिची प्रतिमा खराब झाली. पण असल्या गोष्टींची पर्वा करणार्‍यांतली ती कधीच नव्हती. खरतर लग्नही केलंच पाहिजे असाही तिचा आग्रह नव्हता. समाजाला दाखवायला म्हणुन काही करायला कायमच तिचा विरोध. म्हणुनच कदाचित "जैत रे जैत" ची नायिका खर्‍या स्मिताच्या जवळ जाणारी वाटते. म्हणजे स्मिता प्रेम करेल तर ते तिच्यासारखच करेल. तिचं ते बाजिंदी असणारं मनमानी रुप, तिचं ढोलियावरचं प्रेम. आणि ते मिळवण्यासाठी तिने केलेलं सगळंकाही हे केवळ शब्दातीत. नुसत्या "जैत रे जैत" वर पानंच्या पानं लिहावीत असं.
१७ ऑक्टोंबर १९५५ ला एका मंत्री आणि समाजसेविका दांपत्याच्या पोटाला जन्माला आलेली ही मुलगी. मराठी शाळेत शिकलेली. अस्सल मराठी वातावरणात वाढलेली स्मिता. पहिल्यांद कॅमेरासमोर आली ती बातम्या द्यायला म्हणुन.. घाईघाईत तिने जीन्सवर गुंडाळलेल्या साडीत लोक तिला "साडीत खूप सुंदर दिसतेस" अशी प्रतिक्रिया द्यायचे तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचं खट्याळ हसू कसं असेल याची कल्पनापण अभावानेच करवते. बुद्धाच्या बंद डोळ्यांआड जे अफाट दु;ख होतं तसच काहीसं स्मिताच्या उघड्या, टपोर्‍या डोळ्यांबाबत. तिथेच श्याम बेनेगलनी स्मिताला टिपलं. "चरनदास चोर" हा लहान मुलांचा चित्रपट असला तरी 'स्मिता पाटील' आणि 'श्याम बेनेगल' ही दोन नावं चित्रपटसृष्टीला दिल्यावबद्दल तो कायम लक्षात राहिल.
आयुष्य हा शेवटी एक निर्दयी, विरोधाभासात्मक खेळ आहे याची परत जाणिव व्हावी अशा घटनांतील एक घटना म्हणजे स्मिताचा शेवट आहे. स्त्री-सक्षमीकरणाच्या अनेक गोष्टी ज्यात तिने पुढाकार घेतला त्यात मातामृत्यूप्रमाण रोखण्याच्या बाबींचाही समावेश होता. आणि तिच्या मृत्यूनंतर आता इतक्या वर्षांनी मृणाल सेन म्हणाले की निष्काळजीपणामुळेच स्मिताचा मृत्यू झाला. प्रतिकच्य जन्मानंतर १३ अवघ्या काही दिवसांनी, १३ डिसेंबर १९८६ ला स्मिताचं असं निघुन जाणं हा चित्रपटसृष्टीला बसलेला नक्कीच मोठा धक्का होता. कारण चित्रपटसृष्टीची गणितं बदलण्याचं सामर्थ्य ती बाळगुन होती. आपल्या पदार्पणातच शबानाला टक्कर दिली होती तिने आपसुकच. लोकांच्या मनात कायमच त्यांची स्पर्धा राहिली. पहिल्या दोन चित्रपटांनंतरच तिची तुलना शबानाशी होवु लागली होती. स्मिताला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मात्र शबानाच्या आधी मिळाला. आणि मग शबानाला तीन सलग ८३ (अर्थ), ८४ (खंडहर), ८५ (पार). आणि हे शेवटपर्यंत चालुच राहिलं.
उण्यापुर्‍या १० वर्षांची कारकीर्द. सगळे मिळून ८० चित्रपट. २ राष्ट्रीय आणि १ फिल्मफेअर आणि पद्मश्री विजेती. ती एकमेव आशियाई चित्रपट कलाकार आहे जिचे चित्रपट पॅरिस आणि ला रोशलमध्ये व्यक्तिविशेष म्हणुन प्रदर्शित केले गेले. शेवटी 'स्मिता' विषयी काहीही विचार करताना ना.धो. महानोरच जास्त योग्य वाटतात. "या पंखावरती, मी नभ पांघरती, मी भिंगरभिवरी बाई चांदन्यात न्हाती" असो किंवा "असं एखादं पाखरु वेल्हाळ, त्याला सामोरं येतया आभाळ" असो. माझ्यासाठी तरी अशीच आहे स्मिता..
-----------------------------------------------------------------------------
(गौरी न वाचलेल्यांसाठी: कालिंदी ही गौरीच्या "थांग" आणि "मुक्काम" ची नायिका. थोडी थोडी उंबरठा मधल्या स्मितासारखी. पण कालिंदीला पार्टनर पण सापडतो.)
मेरा कुछ सामान ...
एखादं छानसं चित्र काढायला घ्यावं, ते मनाप्रमाणे जमतही यावं पण मध्येच लहर फिरल्यासारखे त्यात गडद, उदासिन रंग भरावेत आणि मग असंच फाडून फेकून द्यावं असं काहीसं नियतीने गुरुदत्तच्या बाबतीत केल्यासारखं वाटतं कायम त्याचा विचार करताना. पण त्या चित्राच्या राहिलेच्या, अस्तित्वात असलेल्या खुणा इतक्या विलोभनीय आहेत की आयुष्याच्या या कुटील आणि जटील प्रक्रियांचा राग येतो पण गुरुदत्तच्या अलौकिक प्रतिभेची पाळंमुळंदेखिल अशाच कुठल्यातरी गुंतागुंतीच्या प्रक्रियेत असतील हे जाणवुन स्तब्ध व्हायला होतं.
वसंत कुमार शिवशंकर पडुकोण.. ९ जुलै १९२५ ला बेंगलोरमध्ये जन्माला आलेला हा मुलगा पुढे गुरुदत्त नावाने चित्रपट क्षेत्रातला महारथी ठरला.. १९४१-४६ त्याने उदयशंकर यांच्याकडे त्याने ५ वर्षे नृत्य, नाट्य प्रशिक्षण पण घेतलं. त्यावेळी त्याने सादर केलेलम सर्पनृत्य त्याच्या मृत्यूविषयी असलेल्य गूढ ओढीचं प्रतिक होतं का? खरा कलाकार हा नेहमी असमाधानी असतो म्हणतात. पण त्याचं असमाधानी असणं त्याला इतकं अस्वस्थ करुन गेलं का? किंवा का करुन गेलं?उण्यापुर्‍या ३९ वर्षांचं आयुष्य आणि त्यात सगळं मिळून २० वर्षांचं करीअर. त्यातही सुरुवातीची काही वर्षे किरकोळ भुमिका, सहाय्यक दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक अशी कामं करण्यात गेली.. आणि हा माणुस जगातला एक नामवंत दिग्दर्शक बनला. टाइम्स च्या १० रोमँटीक सिनेमांच्या यादीत त्याच प्यासा आहेच, झालच तर १०० बेस्ट चित्रपटांमध्ये पण त्याचा समावेश आहे आणि तो स्वतः सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक..
गुरुदत्त म्हटलं की खूप पूर्वी लहानपणी कधी बघितलेली त्याची पहिली झलक आजही नजरेसमोर जशीच्या तश्शी उभी रहाते. एक शांत, धीरगंभीर मूर्ती, ठसठशीत चेहरा, विशाल भालप्रदेश, त्याच्यावरच्या नाजुकशा आठ्यांचं जाळं आणि काळेभोर डोळे. त्या नजरेला नजर द्यायचं सामर्थ्य राहु नये, आपल्या आतलं काहीतरी शोषून घेतेय असं वाटायला लावणारी ती नजर. अशी काही वेदना त्याच्या नजरेत आहे की आपसूक नजर खाली तरी झुकावी नाहीतर त्याच्या नजरेतच गुंतून तरी पडावी. त्याच्या चेहर्‍यावरची ही वेदना कधीच पुर्णपणे नाहीशी झालेली मी तरी पाहिली नाही. अगदी मि. & मिसेस ५५ मध्ये मधुबालासोबतचे नटखट रुमानी प्रसंग करताना पण त्या आठ्या तशाच.. ( and again हे सांगितल्याशिवाय रहावत नाही की हा सिनेमा मधुबालासाठी पाहिलाच पाहिजे. तिने विशीतली अल्लड, लग्नाळलेली, अरागस यौवना अशी काही उभी केलिय की आह..! तिच्या त्यातल्या एका एका वाक्यावर, अदेवर मी हजार जन्म ओवाळायला तयार.. तिच्यावर परत कधीतरी..) पण तिच्यासमोरही हा पठ्ठ्या असा काही उभा राहिलाय की तिच्या त्या अलौकिक वावरापुढे तो अजिबात झाकोळला जात नाही. मोस्ट रोमँटीक जोड्यांमध्ये ही जोडी नक्की..!
फ्रेंच न्यु वेव्ह ची चळवळ अजून व्याख्येत बसायची होती, आकाराला यायचे होती त्यावेळी गुरुदत्तने त्याचा प्यासा बनवला होता. किंबहुना Francois Truffaut चा 400 blows (१९५९), जो खर्‍या अर्थाने इटालियन निओरीअ‍ॅलिझम सिनेमामध्ये प्रयत्नपूर्वक आणणारा प्रयोग म्हणून पाहिला जातो त्याच्या २ वर्षे आधी प्यासा (१९५७) प्रदर्शित झाला होता. 400 blows मधली एका किशोरवयीन मुलाची कथा आणि प्यासामधल्या युवकाची व्यथा ही एकाच पातळीवरची आहे. गुरुदत्त हा खर्‍या अर्थाने चित्रपटाच्या क्षेत्रातील एक दूरदृष्टी असलेला, स्वतःची प्रतिभा, विचार असलेला, वेगळ्या वाटा चोखाळणारा एक बुद्धीमान दिग्दर्शक होता. आशियाई सिनेमा त्यावेळी जगात एवढा प्रभावी नसल्यामुळे कदाचित गुरुदत्तचे प्रयत्न व जागतिक पातळीवरील मान्यता मर्यादित राहिली पण त्याहीवेळी त्याचे चित्रपट जर्मनी, फ्रांस आणि जपान मध्ये हाऊसफुल चालत होते हे विशेष.!
'कागज के फूल' हा त्याचा त्याच्या अपेक्षेबाहेर फ्लॉप झालेला एकमेव चित्रपट पण आज हा सिनेमा गुरुदत्तची अजोड कलाकृती म्हणुन पाहिला जातो आणि अर्थातच तो आहे. सिनेमास्कोप चे तंत्रज्ञान पहिल्यांदा हिंदी सिनेमात वापरले गेले ते याच चित्रपटाच्या निमित्ताने. झाली गंमत अशी की त्यावेळी २० सेंच्युरी फॉक्स ही चित्रपटातली प्रसिद्ध कंपनी भारतात काही चित्रिकरण करत होती आणि परत जाताना त्यांच्या लेन्सेस इथेच राहुन गेल्या. त्याचदरम्यान गुरुदत्त 'कागज़ के फूल' साठी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात होता. त्याला ही बातमी कळाल्याबरोबर लगेच तो आपले सिनेमॅटोग्राफर मुर्थींना घेवुन तिथे पोहचला आणि त्या लेन्सेस त्याने मिळवल्या. त्या चित्रपटात त्याने केलेल्या कॅमेर्‍याच्या करामती आणि छायाप्रकाशाचा वापर हे कायमच चर्चेत राहिलेले आहेत पण 'वक्तने किया क्या हंसी सितम'च्या वेळी गुरुदत्त विचार करत असताना अचानक सूर्यप्रकाशाची एक तिरीप त्याला दिसली आणि त्याने ठरवलं की असं काहीतरी आपल्याला करायचय आणि मग त्याच्या इच्छेनुसार सेटच्या छतावर सूर्यप्रकाशाचा आणि आरशांचा वापर करुन प्रकाशाचा तो झोत निर्माण केला ज्यात एक झालेल्या गुरुदत्त आणि वहिदाच्या प्रतिमांनी त्यांच्या आत्म्याच्या मिलनाची कल्पना त्याला हवी तशी साकारली पडद्यावर. गीता दत्तच्या जादुई आवाज आणि बर्मनदाच्या सूरांच्या पार्श्वभूमीवर कैफी आझमींच शब्द आणि हा छायाप्रकाशाचा केलेला खेळ बघणार्‍याच्या मनावर कायमचा ठसा उमटवुन जातो हे मात्र खरं..! 'कागज़ के फूल' मधल्या अशा अनेक प्रसंगांचा उल्लेख करता येईल.या चित्रपटात प्रथमच कथा पुढे नेण्यासाठी गाण्यांचा वापर करण्यात आला. ही कथा त्याच्या स्वतःच्या आयुष्याची कथा होती आणि ती स्वत:ची वाटू नये म्हणुन त्याने त्यात अनेक वेळ बदलही केले. त्यातल्या त्याचा आणि वहिदाच्या भेटीचा प्रसंग, वहिदाला पार्टीत पाहिल्यानंतर झालेला त्याचा-तिचा संवाद, त्याचं आणि त्याच्या मुलीचं नातं अशा अनेकानेक गोष्टी माझ्यातरी कायमच्या स्मरणात राहिल्यात.
त्याच्या प्यासाच्या निर्मितीवर एक स्वतंत्र कथा होईल एतक्या गोष्टी त्या चित्रपटाशी निगडीत आहेत. अबरार अल्वीच्या या मूळ कथेचं नाव होतं 'कश्मकश', मूळ नायक होता 'चित्रकार किंवा लेखक', गुलाबोचं पात्र नव्हतंच. अबरार ला माटुंग्याला भेटलेली खरीखुरी गुलाबो गुरुदत्तसमोर त्यांनी मांडली आणि प्यासाची कथा त्याच्या मनात पुर्ण झाली. उच्चभ्रु, पांढरपेशा समाजाच्या तकलादु भावना मांडायला सोन्यासारख्या झळझळीत मनाच्या पण परिस्थितीने वेश्या बनवलेल्या गुलाबोपेक्षा बळकट विरोधी बाजू अजून काय असू शकते? प्यासाचे पहिले काही प्रसंग चित्रित झाल्यावर ते जेव्हा पाहिले गेले तेव्हा सगळ्या लोकांचं मत पडलं की गुलाबोच्या भुमिकेसाठी वहिदा योग्य नाही. तिला बदलण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव पण आला पण त्याने ऐकलं नाही. पुढ कलकत्त्याला जाऊन जेव्हा 'जाने क्या तुने कही' चित्रित झालं, ते पाहिल्यावर मात्र सगळ्यांनी एकमताने निर्वाळा दिल की हीच गुलाबो. बाकी त्या गाण्यात वहिदाने जो काही अभिनय केलाय त्यावर फिदा आपण..! (त्यातली तिची अदाकारी बघून 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल' हे गाणं वहिदा-गुरुदत्त जोडीवर चित्रित झालेलं पहायला काय मजा आली असती राव.! असा विचार कायम मनात येऊन जातो)
'ये दुनिया अगर मिल भी जायें तो क्या है' म्हणणारा त्याच्यातला नायक आयुष्याकडून बर्‍याच अपेक्षा करत असावा. त्याची polyamorous relationship ची ओढ मात्र ना गीता दत्त समजू शकली ना वहिदा. काळाच्या पुढे दृष्टी असलेल्या या कलाकाराच्या अपेक्षाही काळाच्या पुढच्या असाव्यात. गुणी आणि सुंदर स्त्रीयांविषयी त्याला कायमच आकर्षण राहिलं त्याच्या आयुष्यभर. विजया-गीता-वहिदा.. आणि यातल्या कोणा एकीला निवडायची त्याची इच्छा नव्हती. खासकरुन गीता-वहिदा मध्ये. एकदा गुरुदत्त म्हणालेला, "लाइफ में यार क्या है। दो ही तो चीज है, कामयाबी और फेल्युअर। इन दोनों के बीच कुछ भी नहीं है। देखो ना, मुझे डायरेक्टर बनना था, बन गया, एक्टर बनना था बन गया, पिक्चर अच्छी बनानी थी, अच्छी बनी। पैसा है सबकुछ है, पर कुछ भी नहीं रहा।"
त्याच्या आयुष्यात त्याने ज्या लोकांना चित्रपटांसाठी निवडलं ते मात्र शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहिले. जॉनी वॉकर, अबरार अल्वी, व्ही.के.मुर्ती.. चित्रपटाच्या यशापयशाचा त्याच्या या नात्यांवर काही परिणाम नाही होऊ दिला त्याने. पण अबरार अल्वीने प्रसिद्ध केलेल्या गुरुदत्तच्या आठवणींत त्याने स्वत:विषयीच जास्त लिहिल्याचं ऐकलं तेव्हा परत एकदा या क्षेत्रातल्या मुखवट्यांची चीड आल्यावाचून राहिली नाही. आणि गुरुदत्तच्या जाण्यानंतर त्यांच्या हातून कोणतीही खास कलाकृती निर्माण झालेली नाही हे विशेष.. असो..
'चौदहवी का चांद' आणि 'साहब, बीबी और गुलाम' हे चित्रपट गुरुदत्तने दिग्दर्शित केले नसले तरी त्यांच्यावर गुरुदत्तची छाप स्पष्ट जाणवते. आणि या चित्रपटांशी कायम त्याचं नाव जोडलेलंच रहाणार आहे. त्याने अभिनेता व्हावं अशी काही त्याची खास इच्छा नव्हती. किंबहुना प्यासासाठी त्याने दिलीपकुमारची निवड केलेली (थँक गॉड तो आला नाही आणि गुरुदत्तने तो रोल केला.)
फ्रेंच न्यू वेव्ह ची जी auteur theory होती ती गुरुदत्तला अगदी तंतोतंत लागू होते. सिनेमा बनवण्यात तंत्रज्ञान असलं तरी त्याची सर्जनशीलता सगळ्या प्रकारचे तांत्रिक अडथळे पार करुन झळाळुन उठायला समर्थ होती.
गुरुदत्तने त्याच्या आयुष्यातलं पहिलं स्वतंत्र दिग्दर्शन वयाच्या २६व्या वर्षी केलं. देव आनंदच्या बाझी चित्रपटाचं. तिथुन पुढे १३ वर्षांचा काळ फक्त.. यानंतरही त्याने काही थ्रिलर चित्रपट बनवले. सी.आय्.डी, आरपार, जाल वगैरे. पण गुरुदत्त म्हटलं की डोळ्यासमोर प्रामुख्याने येणारी नावं म्हणजे, प्यासा, कागज़ के फूल, साहिब, बीबी और गुलाम आणि चौदहवी का चांद..!
त्याच्या या वैयक्तिक आयुष्यातल्या अपयशाने पोखरलेला हा प्यासा मि. ५५, १० ऑक्टोंबरच्या रात्री दारुच्या नशेत झोपेच्या अतिरिक्त गोळ्या खाऊन एकटा जावा?"गमसे अब घबराना कैसा, गम सौ बार मिला" असं का नाही म्हटला तो त्याच्या खर्‍या आयुष्यात? का नाही स्वतःची अशी समजूत काढू शकला?
आपल्या मुलांना एकदा भेटू द्यावं म्हणुन गीता दत्त सोबत झालेलं भांडण पुरं पण करता येऊ नये? आपल्या मुलांना भेटता पण येऊ नये त्याला? 'ये इन्सां के दुष्मन समाजो की दुनिया' ही दुनिया कदाचित तुझ्यासाठी नव्हतीच रे कधी.. पण तरी तू आल्यासारखं थोडं थांबायला पहिजे होतंस... त्याचं या जगात येणं आणि जाणं चटका लावुन जाणारं होतं खरं.. त्याच्याविषयी विचार करताना The Shawshank Redemption मधलं एक वाक्य कायम मनात घोळत रहातं,"Andy being gone. I have to remind myself that some birds aren't meant to be caged. Their feathers are just too bright. And when they fly away, the part of you that knows it was a sin to lock them up DOES rejoice. But still, the place you live in is that much more drab and empty that they're gone." जगातून निघुन गेलेल्या गुरुदत्तच्या संदर्भात जग असंच दिसलंय मला कायम..!
मेरा कुछ सामान ...
Love is as contagious as a cold. It eats away at your strength, morale... If everything is imperfect in this world, love is perfect in its imperfection असं तो म्हटला खरं पण चित्रपटांवर प्रेम करुनही ते अतिशय perfect बनवले त्याने. कुठेही काही imperfect राहिलं नाही त्या प्रेमात.
चित्रपट तसं पाहिलं तर मनोरंजनाच्या क्षेत्रातलं अगदी नवं माध्यम. अगदी दिड दोनशे वर्षांचा हा प्रवास. पण हे कथा मांडण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. किंबहुना सर्वात प्रभावी म्हटलं तरी वावगं ठरू नये. सूरांमधली आर्तता, चित्राच्या रंग-रेषांचे अर्थ, कवितेची गूढता समजाऊन घ्यायला रसिकाला स्वतःची एक क्षमता लागते, शक्ती-बुद्धी खर्च करावी लागते. पण बहुतांशी चित्रपटात 'ये हृदयीचे ते हृदयी घालणं बरच सोपं असतं. समोर दिसणारी माणसं समजावुन घेणं हे एखाद्या पुस्तकातील व्यक्तीरेखा वाचून, तिचं चित्र डोक्यात तयार करुन मग समजावुन घेण्यापेक्षा सहज करण्यासारखं आणि कमी कटकटीचं काम असतं. (अर्थात हे फक्त खराखुरा अभिनय करणार्‍यांविषयी.. अभिनयाच्या नावाखाली जमलेल्य बाजरगर्दीविषयी नाही..) तर असं हे माध्यम. पण तरीही कल्पनाविलास, खूप सारी अ‍ॅक्शन, हॉरर, थ्रिलर यापेक्षा माणसच्या खोल मनात दडलेल्या भावना, नात्यांचे पैलु, रंग, भावभावना दाखवणार्‍या कलाकृती माझ्या जास्त जिव्हाळ्याच्या. आणि कदाचित त्यामुळेच stanley kubrick पेक्षा Ingmar Bergman आणि Nolan पेक्षा Alejandro Inarittu जास्त जवळचा. आवडते, प्रतिभावान सगळेच पण Bergman जास्त जिव्हाळ्याचा.
इन्गमार बर्गमन- एक जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक. अनेक महान दिग्दर्शकांसाठी आयडॉल ठरलेला आणि रसिकांसाठी पर्वणी. १४ जुलै १९१८ ला स्वीडनमध्ये एका नर्सच्या आणि धर्मगुरुच्या पोटी जन्माला आलेला 'इन्गमार'ने बर्‍याच कडक म्हणावं अशा वातावरणात बालपण घालवलं. त्याच्या चुकांबद्दल बंद, अंधार्‍या कपाटात वेळ पण घालवला. त्यानंतर १६व्या वर्षी बर्गमनने हिटलरच्या सेनेत रीतसर ५-५ महिन्यांचे दोन कंपल्सरी सेशन पण पूर्ण केले. आणि १९३७ मध्ये त्याचा खरा प्रवास सुरु झाला. स्टॉक्लोहोममध्ये ड्रामा स्कूलमध्ये नाव घातलं त्याने कला आणि वाड्मयाच्या अभ्यासासाठी.
बर्गमनने त्याच्या एका मुलाखतीत म्हटलेलं की त्याला एक अख्खा सिनेमा close up मध्ये करायला आवडेल. कलाकारांच्या चेहर्‍याचा अशक्य सुंदर उपयोग करुन घेतला त्याने भावना, प्रसंग, त्यांची तीव्रता लोकांपर्यंत पोहचवायला. आणि यासाठी कायम त्याच्या कंपूत अतिशय चांगल्या कलाकारांचा संच राहिला. Liv Ullmann, Bibi Andersson, Erland Josephson, Ingrid Thulin, Max von Sydow हे त्याच्या चित्रपटातून कायमच समोर येत राहिलेले काही कलाकार. Persona मध्ये तर एकही वाक्य न बोलता Liv ने जे काही चेहर्‍यावर दाखवलय, त्या भावना, ती गूढता आपल्या मनावर कायमची छाप पाडून जाते. आणि तिच्यावरच चित्रित झालेला दुसर प्रसंग म्हणजे Cries and Whispers मध्ये तो तिच्या म्हातारं होत जाण्याचं वर्णन करत असताना तिच्या चेहर्‍यावर एकटक खिळुन राहिलेला कॅमेरा. तिने जे काही दाखवलय त्या चेहर्‍यावर ती म्हणजे कविताच आहे एक. ग्रेसची कविता. त्याच्या सगळ्या सिनेमांची खासियत म्हणजे हे प्रचंड ताकदीचे कलाकार, त्यांचे भले मोठे close ups आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे अप्रतिम भाव. मुद्राभिनय किती जास्त प्रेक्षणिय असू शकतो, किती परिणाम करु शकतो हे पहायचं असेल तर बर्गमनचा सिनेमा पहावा.
I write sripts to serve as skeletons awaiting the flesh and sinew of images असं तो स्वत:च म्हटलाय अणि नंतर तर त्याच्या कलाकारांमध्य आणि त्याच्यामध्ये इतका छान सूर जुळला होता की तो आपल्या सिनेमाचे संवाद वगैरे लिहायचा नाही, कलाकारांना प्रसंग आणि व्यक्तिरेखा समजावुन दिली की त्या प्रसंगी ती व्यक्ती कशी वागेल, काय बोलेल हे तुम्हीच म्हणा असं तो सांगायचा. The more you become personal, the more it becomes universal हे वाक्य बर्गमनच्या सिनेमाला अगदी १००% लागु होतं. त्याचे सगळेच विषय, प्रेम, राग, भीती, द्वेष, वेडेपणा, आजारपण, विश्वासघात असे.. माणसाच्या मनाच्या अशा काही अवस्था ज्यात माणुस सर्वांत जास्त अस्थिर, चंचल, स्फोटक असतो. माणसाच्या मनात खोलवर दडलेले सगळे विकार उफाळुन आलेले असतात. स्वतः बर्गमनने त्याच्या २ सर्वोत्कृष्ट कलाकृती त्याच्या आजरपणाच्या काळात लिहिल्यात ज्यावेळी तो मानसिकरीत्यापण खचलेला होता, nervous breakdown च्या अवस्थेला पोहचलेला होता.
त्याचा सिनेमा बघायला जाणार असाल तर मात्र अतिशय सावध! आपलं सगळं लक्ष त्या दिड-दोन तासात कुठेच विचलित न होऊ देता, त्याच्या प्रत्येक सेकंदावर लक्ष देऊनच सिनेमा पहावा लागतो. कारण बहुतेकदा तो चित्रपट पहाण्याची ती पहिली आणि शेवटची वेळ असते. तो चित्रपट पहाण्याचं धाडस आपल्याकडून परत होईलच याची काहीच खात्री देता येत नाही. आणि त्यामुळेच त्या चित्रपटातलं कोणतही वाक्य, कोणतंही expression चुकवणं पण मुळीच परवडणारं नसतं! त्याच्या चित्रपटातली बरीचशी वाक्यं अशी असतात की आपण स्तब्ध व्हायलाच पाहिजे. एखादं पुस्तक वाचता वाचता मध्येच एखादी ओळ अशी येते की की तशीच ओलांडून आपण पुढे नाही जाऊ शकत तसेच. थांबावच लागतं तिथे. विचार करावा वाटतो, मुरवुन घ्यावं वाटतं ते.. आणि असे प्रसंग खूपदा येतात बर्गमनचा सिनेमा बघताना. त्याच्या भाषेत सांगायचं तर, "no form of art goes beyond ordinary consciousness as film does. Straight to our emotions, deep into the twilight room of the soul!" आणि त्याने माणसाच्या मनातल्या या संधीप्रकाशाच्या वेळा अशक्य समर्थपणे उभ्या केल्यात. 'संधीप्रकाश' किती नेमका शब्द वापरलाय! दिवसाचा सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारा, हुरहुर लावणारा, कावरंबावरं करणारा हा काळ. एक दिवस सोडून चाललेला असतो कधीच परत न येण्यासाठी, रात्रही पटकन कुशीत घेत नसते. दिवस ठीक असतो, रात्र पण, संध्याकाळ चढत जाणं हे मात्र जीवघेणं असतं. अशा जीवघेण्या कालखंडांची मालिका मनात घेवुन माणुस वावरत असतो कुठेतरी. या सगळ्या अंतरीच्या कळांचं त्या उत्कटतेने चित्रण करणारा एक बर्गमनच!
Wild Strawberries मधला तो खडूस वाटणारा म्हातारा आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळुन बघताना त्याला झालेल्या जाणिवा, घडलेल्या गोष्टी, घडाव्याशा वाटणार्‍या पण न घडलेल्या गोष्टी, आठवणी, मृत्यूची भीती या सगळ्याच्या भोवर्‍यांत त्याचं अडकणं, उलगडत जाणं अत्यंत प्रेक्षणिय असतं. Me and my wife are dependent on each other. It is out of selfish reasons we haven't beaten each other to death a long time ago. असं एखादं मध्येच येवुन जाणारं वाक्य आजुबाजूच्या अनेक नात्यांचं अपरिहार्य वास्तव मांडतात समोर. आणि When your were little you belived in Santa Claus, now you belive in God हे वाक्य माणसाच्या आगतिकतेचं.
त्याच्या Persona विषयी बोलायला तर शब्दच नाहीत माझ्याकडे. नि:संशय ती त्याची सर्वोत्तम कलाकृती आहे. Persona आणि Hour of the Wolf हे त्याचे माझ्यावर सर्वात जास्त स्वार झालेले चित्रपट आहेत. त्यांच्या प्रभावातून बाहेर यायला तुम्हाला किती वेळ लागेल हे तुम्ही खरच नाही सांगु शकत. Hour of the Wolf हा त्याचा एकमेव हॉरर सिनेमा. हा चित्रपट नेहमी वास्तव आणि आभास (स्वप्न) यांच्या सीमेवर चालत रहातो. अशाच एका प्रसंगावर येऊन संपतो. ते नक्की काय होतं, कशाचं रुपक, काय म्हणायचय हे सगळे घोर आपल्या जीवाला लावुन सिनेमा संपून जातो. आणि परत 'You see what you want to see!' म्हणत सत्य आणि आभास यातलं खरं खोट ठरवायची जबाबदारी पण घेत नाहीत त्या व्यक्तीरेखा. असाच एक प्रसंग Cries and Whispers मध्ये पण आहे. सत्य की स्वप्न याची जबाबदारी प्रे़क्षकांवर सोडूनदेखिल मनावर कायमचा ठसा आणि विचार करायला लावतील अशा कल्पना मनात सोडून जातात हे प्रसंग. Hour of the Wolf मधली growing old together ची संकल्पना अशीच पकड घेणारी. केवळ अफाट. हा चित्रपट कित्येक दिवस मनातून जात नव्हता. वातावरणनिर्मितीचा अभ्यास करावा हा चित्रपट पाहुन एखाद्याने. तीच गोष्ट नात्यांची. The Silence मधलं दोन बहिणींचं नातं असो की Persona मधलं नर्स, पेशंटचं नातं असो. नाती वरवर काय, कशी असतात आणि त्याच्या मागे किती खोलवर दडलेल्या कोणकोणत्या गोष्टी असतात याची जाणीव कदाचित त्या नात्यातील माणसांना होणं पण अवघड असतं. अशा या गोंधळाच्या जागांतील नेमक्या ठिकाणी बोट ठेवतो तो. त्या व्यक्तीरेखा मग आपल्यातूनच बाहेर आल्यासारख्या वाटायला लागतात. Smiles of a Summer Night मधली I am tired of people, but it cant stop me from loving them म्हणणारी म्हातारी Mrs. Armfeldt माझ्यातूनच बाहेर आल्यासारखी वाटायला लागली मला. हे वाक्य ऐकलं तेव्हा मुव्ही पॉज करुन बसलेले मी. कित्ती कित्ती जास्त नेमक्या भावना आहेत या.! तीच पुढे म्हणते Beware of good deeds. They cost far too much and leave a nasty smell..!
Winter Light मध्ये पण त्याच्याकडे प्रेम व्यक्त करायला आलेली ती तिच्या कष्टाने धरुन ठेवलेल्या स्वाभिमानामागे असलेली समर्पणाची तीव्र ओढ व्यक्त करते तेव्हा पण असचं स्तब्ध व्हायला होतं.
मी कोणाच्यातरी मुलाखतीत वाचलं की पाहिलं होतं, माणुस तेच चांगल्याप्रकारे मांडू शकतो जे तो स्वत: जगलाय. तेच लोकांना भिडू शकेल असं पोहचवु शकतो तो. कदाचित नात्यातली गुंतागुंत, माणसाच्या अशा सगळ्या भावना लोकांपर्यत इतक्या समर्थपणे पोहचवु शकण्यामागे त्याचं स्वतःचं आयुष्य आहे कुठेतरी. चार अयशस्वी आणि पाचव्या २५ वर्ष टिकलेल्या संसारासोबत त्याची अनेक अफेअर्स पण झाली. सगळी मिळुन ९ मुलं. या सगळ्या गुंतागुंतीच्या नात्यांच्या छटा त्याच्या सिनेमांमध्ये नक्कीच पडल्या असणार. किंबहुना त्याच्या सगळ्याच विचारांच्या. वयाच्या ८व्या वर्षीपासून त्याचा देवावरचा विश्वास उडाला होता म्हणे. आणि The Silence मध्येच हा शोध संपलेला त्याच्यामते. पण त्याही आधी The Seventh Seal मध्ये 'We must make an idol of our fear, and call it god.' हे म्हणुन गेलाच आहे तो.
शेवटी ६० वर्षांची प्रदीर्घ कारकिर्द.. ६३ चित्रपटांचे, टिव्ही सिरीअलचे दिग्दर्शन, ६३ च्या कथा, निर्मिती आणि अनेक कामं.. ३ ऑस्कर अशी भरघोस कामगिरी केल्यावर त्याचं एकुणच मत असं होतं की, "My basic view of things is not to have any basic view of things. From having been so dogmatic, my views on life have been dissolved. They dont exist anymore." इतका अशक्य माणुस त्याच्या कलाकृतीतून अनुभवणं हे खूप भारी असतं. खरतर त्याच्यावर लिहायची पन योग्यता नाही माझी पण रहावलं नाही. कायम शोध घेत रहावं अशी व्यक्ती आहे बर्गमन माझ्यासाठी. प्रचंड आदर्, आकर्षण आणि गूढतेचं वलय असतं कायम त्याचा विचार करताना. आणि कितीही नाही म्हटलं, अशक्यता माहिती असली तरी वाटून जातं, "अगदी आता आता पर्यंत पण होता तो. ३० जुलै २००७ पर्यंत.. एकदा, फक्त एकदा भेटता आलं असतं तर..."
मेरा कुछ सामान ...
मी जरा जास्तच उशीरा जन्म घेतला याची प्रामाणिक खंत ज्या लोकांकडे बघुन मला वाटते त्यातलं एक ठळक नाव म्हणजे किशोर कुमार.. आभास कुमार गांगुली.. मुख्य म्हणजे त्याच्या आवाजाने आणि त्याबरोबरच वेळोवेळी कळत गेलेल्या विक्षिप्तपणाच्या कथांमुळे. (कारण जगाने वल्ली ठरवलेल्या लोकांबद्दल आकर्षण तर आहेच पण त्यांच्यासोबत माझं सूत जरा लवकरच जमतं असा माझा अनुभव आहे.. असो..)
"कुणी विचारायला येवु नये, नाहीतर खूप चिडचिड होईल" असं वाटतं आणि "कोणी विचारायला का येत नाहीये?" असं वाटुन पण त्रागा होत असतो अशा वेळी किशोरचा आवाज पांघरुन बसणे हा कायमच एक सोयिस्कर मार्ग असतो.
शब्दांकडे अतिरीक्त लक्ष देण्याची खोड म्हणजे माझ्या आठवणींपलीकडची. मला आठवतय तेव्हापासून गाण्यातील शब्दांकडे जरा जास्तच चिकित्सकपणे लक्ष देत आलिये मी. अगदी सूरप्रधान शास्त्रिय गायकी ऐकतानापण ती चीज सगळी समजत नाही तोवर अस्वस्थ वाटत रहातं. पण शब्दांकडे लक्षच जाऊ नये किंवा त्यांना दुय्यम स्थान मिळावं अशी काही जादू आपल्या आवाजाने करुन, त्याच्या सूरांनीच तो मला ओढुन, बांधुन ठेवायला लागला तेव्हा मात्र त्याच्यापुढे हात टेकले मी.
किशोरच्या गाण्यातल्या या गद्यात घेतलेल्या छटा, म्हणजे एखादं उपहासात्मक हास्य, एखादा उसासा या गोष्टी जितक्या खल्लास करतात तितक्या कोणाच्याच नाही असा माझा तरी अनुभव आहे. "कैसे कहे हम, प्यारने हमको" या गाण्यात तो जे ऊपहासाने हसलाय ना की प्रत्यक्ष त्या सिच्युअशनला असं हास्य कोणी दिलं तर संबंधित व्यक्तीने तिथेच शरमेनं मरुन जावं.
त्याच्याविषयीच्या सगळ्या कथा म्हणजे एकेक आश्चर्यच वाटायच्या ऐकताना. आणि नंतर नंतर त्याच्याविषयी काहीही ऐकल्याचं आश्चर्य वाटलं तर त्या आश्चर्य वाटण्याचं आश्चर्य वाटावं इतकं त्याचं विक्षिप्तपण अंगवळणी पडलं. निर्माते पैसे वेळेवर न देण्याच्या भीतीने म्हणे त्याला कायम ग्रासलेलं असायचं. त्यातून त्या वाटण्यापोटी त्याने केलेले सत्राशे साठ प्रकार तर त्याहून अजब. कुठे अर्धाच मेकअप कर, कुठे शुटींगमधून पळुनच जा, कुठे निर्मात्याच्या घराबाहेर रोज सकाळी जाऊन ओरड, घराबाहेर "beware of kishore" अशी पाटीच लाव.. एक ना दोन, हजार कथा. विक्षिप्त वाटायला लावणार्‍या.. पण त्याचबरोबर त्याचं स्वत:च्याच परसदारच्या वृक्षराजीशी गप्पा मारणं, त्यांना मित्र मानणं, मधुबालासाठी इस्लाम स्विकारणं, शेवटपर्यंत तिची सोबत करणं याही काही गोष्टी त्याचा विचार करुन करुन हैराण करायला लावणार्‍या. आणि "आ चलके तुझे मै लेके चलुं" मधल्या हळुवार भावना लिहिणारा हाच झुमरु आहे हे कळलं तेव्हापासून तर मनाला चटका लावुन गेलाय तो. तो नक्की कसा होता, काय होता याचा विचार करणं हा रिकाम्या वेळेचा छंदच बनून गेला मग..
किशोर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो त्याचा मिष्किल, खट्याळ चेहरा पण कदाचित त्याच्या इच्छेप्रमाणे तो रिटायर्ड होऊन खांडव्याला जाऊन राहिला असता तर या खट्याळ चेहर्‍यामागे लपलेला "आ चलके.." लिहिणार्‍या कवीने त्याच्याकडून नक्कीच काहीतरी लिहुन घेतलं असतं.. तो थोडा अजून उलगडायला मदत झाली असती कदाचित..
कॉलेजच्या काळात असताना लागलेलं किशोरच वेड मात्र पुरं झपाटून टाकणारं होतं. तेव्हा त्याच्या बर्‍याच पैलुंचा वेड्यासारखा शोध घेतला मग. मधुबालाच्या जिवंतपणाला आणि खळखळत्या उत्साहाला तितकीच समर्थ साथ देऊ शकणारा एक किशोरच वाटायचा मला. बाकी एखादा गुरुदत्त सोडला तर सगळेच तिच्यासमोर पानी कम वाटायचे. अगदी कधी कधी देवानंदसुद्धा... ती सुद्धा त्याच्यासोबत बालिशपणा करताना फुलून आल्यासारखी वाटायची कायम मलातरी. "चांद रात, तुम हो साथ" असो, "आंखोमे तुम दिल मे तुम" असो नाहीतर "हाल कैसा है" किंवा "पांच रुपय्या बारा आना".. माहित नाही नक्की काय ते, पण त्याचं अस्तित्वच मोहून टाकणारं होतं. आजही ही सगळी गाणी दोनशे अठराव्यांदा ऐकतानादेखिल मी नाचत असते एवढं मात्र खरं.. आणि त्याची दु:खी गाणी ऐकणं हा तर सोहळाच असतो. नको नको म्हणताना ओढत नेतोच तो आपल्याला त्या मनस्थितीत.. क्षणात तोडुन टाकतो सगळ्या जगापासून..
त्याला सगळ्यात समर्पक विशेषण द्यायचं झालं तर मला एवढच सुचतं की त्याचा आवाज उमदा होता. म्हणजे खरच त्याची गाणी ऐकताना कायम असं वाटायचं की एखादं देखणं, भारदस्त व्यक्तिमत्व गातय. त्यामुळे प्रत्यक्षात त्याची बरीच गाणी पाहिली तेव्हा प्रचंड मोठा भ्रमनिरास झालेला माझा.
त्याची आवर्जुन बोलावी, उल्लेख करावी अशी गाणी भरपूर आहेत आणि एखाद्या गाण्यातल्या एखाद्या ओळीत त्याने केलेल्या करामती सांगायच्या म्हटलं तर तेच लिहित बसावं लागेल मला. पण मला वाटतं त्याचा असा शोध घेत रहाणं हेच जास्त छान आहे. एखादं गाणं शंभरवेळा ऐकुन झालेलं असतानासुद्धा अचानक नंतर त्याने एखाद्या शब्दांत केलेली गंमत जाणवते तेव्हा आपल्याही नकळत आपण त्याला दाद देवुन जातो.
तसं आज त्याच्याविषयी बोलायचं काही खास कारण नाही पण त्याच्याविषयीचं हे सगळं वाटणं मांडायचं होतं कुठेतरी.. त्याचा सूर सच्चा होता, लकबी वेड्या.. काळजाला सुगंधी जखमा करुन गेलेला मोगरा होता तो.. किशोर.. त्याच्या नावाप्रमाणेच - आभास.. त्याच्या सूरांनी वार करुन छळणारा. आणि या जखमांसाठीच कायम त्याच्या मागे मागे जायला भाग पाडणारा..
मेरा कुछ सामान ...
गुलजार.... नाव ऐकलं की आजही एक क्षण खूप मोठा प्रवास करुन येते मी.. काळजाचा ठोका चुकल्यासारखा वाटतो त्या सगळ्या क्षणांच्या आठवणींनी.. गुलजारविषयी हे असं नक्की कशामुळे वाटतं? "ए जिंदगी गले लगाले.." या त्यांच्या शब्दांचा आधार घेत अनेक कडवट क्षणांनंतर आयुष्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत राहिले म्हणुन? मनाच्या तळापासुन जीव पिळवटुन प्रेम करावसं वाटलं तेव्हाही त्यांचे अनेक अनेक शब्द मनात घुमत राहिले म्हणुन? "मुस्कुराऊ कभी तो लगता है, जैसे होठोंपे कर्ज रखा है.." या शब्दांचा शब्दश: प्रत्यय घेतला म्हणुन? की नंतर नंतर त्यांचे शब्द म्हणजे फक्त त्यांच्या-माझ्यातलाच संवाद आहे असं वाटायला लागलं म्हणुन..?
जेव्हापासून कवितेतलं काही विशेष कळत नव्हतं तेव्हापासुन गुलजारचे शब्द सोबतीला आहेत. याचं श्रेय जितकं त्या संगीतातील आर्ततेला आहे तितकंच ते गुलजारच्या शब्दांच्या नेमकेपणाला आहे. मला आपलं कायम असं वाटत रहातं की गुलजारकडे छान लयीत मुरवत घातलेल्या शब्दांची एक बरणी असली पाहिजे, त्यामुळे त्यांचे सगळेच शब्द कसे गाण्याच्या धून मध्ये विरघळुन जातात.
पुढे जेव्हा गुलजारचं रावीपार, त्रिवेणी वै वाचनात आलं तेव्हा त्याच्या अजुन बर्‍याचशा रुपांचा परिचय झाला. पण आजही गुलजार म्हटलं की, "दिल ढूंढता है फिर वोही" च आठवतं.. अतिशय नॉस्टॅल्जिक मूड मध्ये नेणारी ही रचना पण मला मात्र कायमच एक परफेक्ट रोमँटिक चित्र वाटत आलिये. "बर्फिली सर्दियोंमे, किसी भी पहाडसे, वादिमें गुंजती हुयी खामोशियां सुने" म्हटलं की आजही सर्रकन् काटा येतो अंगावर..
आणि मग वेळोवेळी भेटत गेलेला गुलजारचा चांद, त्याचे वेगवेगळे ऋतू.. मोरा गोर अंग लै ले पासुन सुरु झालेली ही जादू अजुनही, दिल तो बच्चा है जी म्हणतेच आहे.. बुलबूलोको अभी इंतजार करने दो म्हणतेच आहे. माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या क्षणांना गुलजारच्या शब्दांच्या सोबतीने अविस्मरणीय करुन ठेवलं आहे.
गुलजारकडून प्रेमाचे धडे गिरवता गिरवता मी गुलजारच्या प्रेमाच्याच प्रेमात पडत होते. गुलजारच्या शब्दांची वेडी होत होते. त्यांचे शब्द म्हणजे नशा नव्हते.. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर,"जादु है जो सर चढेगा, और जो उतरेगी शराब है" ती जादू होती.. ती जादू आहे.. आणि त्यामुळेच ती कधी कमी नाही होणार.. ती कायम तेवढीच गूढ रहाणार आहे.
गुलजार हे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सगळ्या उत्कट भावनांच्या क्षणांचे साथीदार आहेत. अजुनही ह्रूदयात एक अनामिक, उचंबळुन टाकणारी लाट उमटते गुलजारचं नाव ऐकलं की, त्यांना पाहिलं की.. आणि ते कायमच तसं रहाणार आहे. एका रंगीत, सुगंधी धुक्यात हरवलेली असते मी गुलजारच्या शब्दांसोबत असताना. फक्त मलाच कळु शकेल असं काहितरी, मलाच दिसु शकेल असं काहितरी ते लिहितायेत असं वाटतं मला. "जिना तो सिखा है मरके, मरना सिखादो तुम" हे मागणं मागायला शिकवलं पण गुलजारने आणि पुरवलं पण गुलजारने..
"शायद किसी नदियापर चलता हुवा तू मिले" मधल्या अल्लड वयातल्या भावनांपासून "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही" पर्यंतचा प्रेमाचा प्रवास गुलजारच्या कल्पनाविलासांवर/ त्यांच्या शब्दांवरच तर चालत आलाय. आणि मग 'त्या' वयातुन बाहेर आल्यावर गुलजारच्या बाकीच्या रुपांचा शोध सुरु झाला. तसं त्यांच्या, "तुझसे नाराज नही जिंदगी.." किंवा "ए जिंदगी गले लगा ले"ची जादु नव्हती असं नाही. पण "आदतन जिये जाते है, जिये जाते है.. ये आदते भी अजीब होती है" किंवा "फिर ना मांगेगे जिंदगी यारब तुझसे, ये गुनाह हमने एक बार कर लिया" हे म्हणणारा गुलजार जेव्हा भेटला तेव्हापासुन तर आता कोणतीच भावना गुलजारशिवाय पुर्ण होत नाही. "दर्द ने कभी लोरिया सुनायी तो, दर्द ने कभी नींदसे जगाया रे" या ओळी ऐकुन त्यांच्या प्रेमात अधिकाधिक रुतत जाण्यापासून नाही रोखू शकले मी स्वतःला. तशी इच्छा पण नाहीये म्हणा.. मी गुलजारचं प्रेम पाहिलं आणि मग प्रेम जगले. मी माझं आयुष्य जगले आणि मग गुलजारची कविता पाहिली. अगदी अगदी माझ्यासाठीच असलेली. माझ्या आयुष्यातले अनेक क्षण गुलजारच्या शब्दांचे ऋणी आहेत.
त्यांच्या शब्दांचं शहारुन येणं असं आहे की लाजाळुनेही चकित व्हावं.. उत्कटता अशी की, क्षणभर पतंगाला प्रश्न पडावा.. औदासिन्य असं की शिशिर पण फिका वाटावा.. आणि दु:ख असं की अग्नि सुसह्य भासावा..
"तेरी इक हंसीके बदले, मेरी ये जमीन ले ले.. मेरा आसमान ले ले" ही म्हणजे अगदी "कुबेर होवुन तुझ्यात यावे, होवुन जावे पुरे भिकारी" च्या पण पुढची पायरी आहे. कारण कुबेराच्या त्या लुटून जाण्याला पण अट आहे तुझा बधीर ओठ गिळण्याची, पण इथे मात्र एका हास्याच्या बदल्यातच सगळा सौदा आहे.
गुलजारच्या काव्यातील प्रेमाला भारावुन सुरु झालेला हा प्रवास कधी आयुष्याच्या सगळ्या अंगप्रत्यंगाचा भाग बनुन गेला तो क्षण आठवणं अशक्य आहे. गुलजारचे अनेक कल्पनाविलास, अनेक रुपकं अशी आहेत की ज्यांच्यावर बोलावं तितकं थोडंच वाटेल. अशा किती किती कल्पना सांगाव्या? नुसता गुलजारचा चंद्र म्हटला तरी डोळ्यास्मोर उभी रहाणारी त्याची अनंत रुपं, "चांद की भी आहट ना हो बादल के पीछे चले" मधला उत्कटतेच्या चरम सीमेवर आलेला चंद्र असो किंवा "रात को खिडकीसे चोरी चोरी नंगे पॉव" येणारा खट्याळ चंद्र असो किंवा "नीली नदी के परे गीला स चांद खिल गया" मधला शांत, धीरगंभीर तरी अधीरसा वाटणारा चंद्र असो किंवा"चांद निगल गयी दैया रे, अंग पे ऐसे छाले पडे" मधला आग लावणारा, वणवा भडकवणारा चंद्र असो किंवा "उस रात नही फिर घर जाता वो चांद यही सो जाता है" मधला तारे जमीनपर बघुन मोहरलेला चंद्र असो "तेरे बिना चांदका सोणा खोटा रे.." मधला त्याच्याशिवाय निष्प्रभ वाटणारा चंद्र असो.. त्यांच्या कवितांत डोकावुन जाणारा "लॉनके सुखे पत्ते सा चांद" असो किंवा "एक चांदकी कश्ती मे चल पार उतरना है" म्हणत रात्रीचा नावाडी झालेला चंद्र.. तर सगळ्यात पहिला, "बदरी हटाके चंदा, चुपकेसे झांके चंदा" मधला एका अधीर प्रेयसीची बोलणी खाणारा चंद्र.. आणि या चंद्रासोबत आलेली लसलसणारी वेदना.. "ओ मोरे चंद्रमा, तेरी चांदनी अंग जलाये
तेरी उंची है अटारी, मैने पंख लिये कटवाये.."
काय बोलावं? शब्द खुंटतात माझे तरी.. गुलजारनी सिनेमामधल्या प्रसंगाला अनुसरुनच गाणी लिहिली पण ते लिहिताना त्या भावनेच्या इतक्या गाभ्यापर्यंत गेले की ती गाणी त्या प्रसंगापेक्षाही खूप जास्त बनून गेली. जसं की,"एक छोटा लम्हा है जो खत्म नही होता, मै लाख जलाता हू ये भस्म नही होता"मधला प्रत्येकाच्याच आयुष्यात नक्की असणारा असा एक क्षण किंवा "उम्र लगी कहते हुये, दो लब्ज थे इक बात थी" मधली प्रत्येकाच्याच आयुष्यात नक्की असणारी अशी एक गोष्ट..
त्यांच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक मात्रेत, प्रत्येक रिकाम्या जागेत जी नजाकत आहे ती अगदी रेशमाच्या लडीसारखी आपली आपल्यालाच उलगडावी लागते. गुलजारच्या भाषेत बोलायचं तर अगदी "एकही लट सुलझानेमें सारी रात गुजारी.." मधल्या सारखं.. त्या रंगीत धुक्यात आपणच हरवुन जाता जाता नविन काहीतरी शोधायचं असतं.. त्यांच्या त्या अनंत कल्पना आणि प्रत्येक कल्पनेची अनंत रुपं.. एखादी "खत मे लिपटी रात.." एखादी, "फिर वोही रात है" मधली "रातभर ख्वाब मे देखा करेंगे तुम्हे" म्हणत स्वप्नांची खात्री देणारी रात.. एखादी, सीली सीली जलनेवाली बिरहाकी रात तर कुठे, नैना धुंवा धुंवा करणारी धीरे धीरे जलनेवाली रैना
त्यांची ही उत्कट लेखणी हलकीफुलकी होते तेव्हा पण सहज म्हणुन जाते, "चांदका टिका मथ्थे लगाके रात दिन तारोंमे जिना विना इझी नही" किंवा "चांद से होकर सडक जाती है उसिसे आगे जाके अपना मकान होगा...", "जो सरमे सोच आयेगी, तो पॉवमे मोच आयेगी" अशी मजा करता करता हळुन कुठे सांगुनही जाते, "दुनियासे भागे दुनियामें.. दुनियाको हुयी हैरानी.."
ह्म्म.. गुलजारची भाव व्यक्त करायची पद्धत पण त्या भावनांइतकीच अनवट. त्यामुळे या इतक्या मोठ्या आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वेळी त्या शब्दांचा, रुपकांचा एक वेगळाच अर्थ लागतो. आणि तो इतका परफेक्ट असतो की प्रत्येक वेळी "युरेका....." म्हणुन ओरडावसं वाटतं. मला आवडणारी गुलजारची गाणी तीच आहेत. त्यात भर पडतेय पण जुनी अजुनही तितकीच प्रिय. पण मी जशी मोठी होत चाललेय तसे त्या शब्दांचे निराळेच अर्थ उमजू लागलेत मला. आणि गुलजारच असं हे उलगडत जाणं मला फार फार फार प्रिय आहे.......

गुलजारसाठी...

न जाने किस दिन ये सफर शुरु किया था मैने..
न जाने कबसे आपके लफ्ज मेरी सांस बन गये..

न जाने कबसे,
अक्सर बुझती हुयी रातो मे मिला किया है
आपका चांद पहाडोंके परे..
बादलोकी सिलवटोंमे आपके खयाल ढुंढता हुवा..
हमेशा बेच जाता है मुझे सपने
चंद आसुंओके बदले..
(सुना है चांदनी नाराज रहती है उससे आज कल..
कह रही थी,
आपके खयालोंमे आकर बडा मगरुर हो गया है..)

न जाने कब एक बार,
खुशबूका एक झोका जिंदगी लेके आया था...
कहां, गुलजारसे मिलकर आ रहा हु..
इससे पहलेकी इत्र बनाके रखती उसका
निकल गया देखतेही देखते
जिंदगी की तरह...

न जाने कबसे,
मेरी हमसफर बनी है आपकी कल्पनाये..
एक कोहरासा बना रहता है,
गुजरती हुं जिस किसी रास्तेसे..
छुनेकी कोशिश की थी एक बार,
तो पिघल गया..
गीली उंगलीयोपे डुबते हुये सुरज की किरने
चमकती रही बस्स...

न जाने कितनी बार,
आपकी कहांनिया लोरी सुनाती रही..
जब दिन खत्म हो जाता था कुछ पलोंमे,
और एक पल रातभर
इन्कार करता रहता था गुजरनेसे...

ह्म्म...
अब तो लगता है जैसे,
सदिया बीत गयी हो ये सफर शुरु किये..
पर ना जाने कबसे,
आपकी नज्मोंका सजदा करतीं आयी हुं
मै हर पल..
के कभी मेरी जिंदगीभी एक दिन,
आपकी कोई नज्म बन जाये...!
----------------------------------------------------------------------------------------------------------
खरतर लिहायला सुरुवात करण्याआधी गुलजारशी संबंधित माझ्या आठवणी लिहायचं ठरवलं होतं मी. पण मग लिहिता लिहिता स्वतःला विसरुनच गेले. गुलजार तेवढे राहिले शिल्लक.. स्मित
मेरा कुछ सामान ...
मुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood  मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...
शाय:- investment  banker  from  Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..
अरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift  झाल्यावर तिथे त्याला काही video tapes  सापडतात.. यास्मिन नूर च्या...
चित्रपटाला तिचंच narration  आहे फक्त.. तिने तिच्या भावाला पत्र पाठवण्याऐवजी त्याच्यासाठी बनवलेल्या tapes ... कळत नकळत अरुण पण तिच्या विचारांकडे ओढला जातो..तिच्या भावनांत गुंतत जातो... तिला शोधायचा प्रयत्न पण करतो...
 कोणत्या न कोणत्या धाग्याने एकमेकांशी बांधली गेलेली चार माणसं आणि त्यांचा एका कालखंडातला प्रवास..प्रत्येकाच्या कथेची गुंफण सुंदर प्रकारे केली आहे आणि शेवटाकडे जाताना व्यक्तिरेखा पण अशाच स्पष्ट होत जातात... एक चित्र पुरं व्हायला लागणाऱ्या काळातला प्रवास.. म्हटल तर धोबी घाट कथा आहे या काळाची..अरुणच्या त्या चित्राची..  मुन्नाच्या स्वप्नांची... शायच्या शोधाची... यास्मिन च्या जगण्याची... मुंबई डायरिज हे चित्रपटाचे नाव अगदी सार्थ ठरवलंय या चित्रपटाने... एखाद्या डायरी मधल्याच एका काळाची कथा, एक भाग वाटतो हा.. यातल्या प्रत्येकानेच आपलं काम इतक सुंदर केलंय की कोणाला कमी म्हणावं आणि कोणाला सरस म्हणावं.. चित्रपटाचा अजून एक plus point  किव्वा किरणचा strong  point  म्हणू आपण हवं तर...पण हा चित्रपट बननेला नाहीये.. हा तिने बनवलाय.. आणि हा बनण्यापूर्वी जसाच्या तसा तिच्या डोक्यात होता आणि त्याचप्रमाणे बनवला तिने तो.. Its a perfectly planned and imiplemented work...
आमीर खान सारखा गुणी कलाकार पुरेपूर वापरला गेला नाहीये हे कुठेतरी खटकत रहात.. इतर सगळ्या व्यक्तिरेखा जितक्या स्पष्टपणे व्यक्त झाल्यात, रंगल्यात तितका 'अरुण' रंगला नाहीये.. त्याचा मनस्वीपणा, विचार, भावना व्यक्त करणाऱ्या प्रसंगांची कमतरता जाणवत रहाते.. चित्रपटात आमीरला कमी वाव मिळाल्याची भर climax त्याच्यावर चित्रित करून भरून काढली आहे.. अर्थात त्याच्या अभिनयाची वेगळ्याने प्रसंशा करण्याची गरजच नाही इथे..
लिहायचं म्हटलं तर direction मधल्या बारकाव्यांविषयी, कथेतील बारीक सारीक जागांविषयी बरंच लिहिता येईल.. पण ते वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघणं आणि अनुभवणच असत छान आहे.. जाता जाता इथे चित्रपटाच्या पार्श्वसंगीताविषयी उल्लेख न करणं म्हणजे विषय अर्धवट सोडणं आहे.. Gustavo Santaololla च्या संगीतासोबतच पावसाच्या वेळी, चित्र काढतानाच्या वेळी ठुमरीचा वापर प्रसंगांना खूपच उठाव आणणारा आहे..
हा चित्रपट निश्चितच हिंदी चित्रपटाची समीकरणं बदलणारा आहे.. या आधी असे प्रयोग झाले नाहीत असं नाही..पण ते प्रयोग प्रायोगिक किव्वा class फिल्म म्हणूनच मर्यादित राहिले...रजत कपूर, विनय पाठक आणि त्यांच्या टीम ने खरच काही सुंदर कलाकृती दिल्या आहेत... मला सध्या आठवतोय तो त्यांचा मिथ्या चित्रपट... त्याच्या विषयी बोलायचं तर सगळं तेच लिहावं लागेल.. पण सांगायचं यासाठी की हे असे काही चित्रपट art  फिल्म म्हणूनच बघितले गेले...
किरण ने कुठेतरी स्वत:च्याच मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिचा world सिनेमा च्या मार्केट मध्ये उभा राहू शकेल, पसंतीस उतरू शकेल असा सिनेमा बनवण्यात इंटरेस्ट आहे.. पण माझ्या मते तिचा सिनेमा आर्ट फिल्म च्या नावाखाली अडकून पडलेला उत्तम सिनेमा प्रेक्षकांपर्यंत एक दर्जेदार commercial सिनेमा म्हणून पोहचवू शकेल.. माझा एक खूप आवडता mexican director आहे, Alejandro inarittu..  त्याच्या पद्धतीचा एक खूप हलकासा प्रभाव जाणवला मला आणि जो बॉलीवूड साठी खरच वेगळा आणि स्तुत्य आहे.. बॉलीवूड मध्ये ज्या प्रकारच्या चित्रपटाची मी इतके वर्षे वाट पहात होते ते समोर आल्याचं बघून खरच आनंद होतोय आज.. इथम पुढे Indian cinema म्हणजे फक्त नाच, गाणी, कॉमेडी न रहाता एक दर्जेदार कलाकृती म्हणून समोर येतील अशी इच्छा करते...