मेरा कुछ सामान ...
"प्रमाणामध्ये सर्व काही असावे." या प्रमाणात असण्यामुळेच जग सुरळीत चाललय. पण तरीही सगळ्याच गोष्टी प्रमाणात नसतात. जसं की माझा राग... प्रमाणाबाहेर. मर्यादा सोडून. पण तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा आहेत. त्यामुळे तूही कधी कधी चिडतोस. मग म्हणतोस, "माझ्याही ऐकून घेण्याला मर्यादा आहेत. काय गरज आहे हे बोलायची. तुझ्या आजूबाजूच्यांनी काय कमी केलं का तुझ्यासाठी? देन लूक अ‍ॅट पॉसिटीव्ह अ‍ॅन्ड बी हॅपी." पण मला हे ऐकू येत नाही. तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा असल्याचं मला मुळीच आवडलेलं नसतं. आणि मला यावर अमर्याद चिडायचं असतं पण तुझी मर्यादा संपल्याने त्याचं रुपांतर अमर्याद रडण्यात होतं. हे मी तुला कळू देत नाही. आता कध्धीच तुला भेटायचं नाही असं मी ठरवते कारण हे रडणं अमर्याद चालू रहाणार आहे असं मला वाटतं. पण तसं नसतं. काही वेळाने ते संपतं.मला संपणार्‍या गोष्टी आवडत नाहीत. शाळेत असताना प्रत्येक वर्षी वर्ष संपायचं. खूपच्या खूप रडू यायचं तेव्हा. नव्याची ओढ वगैरे काही नाही.
पण अमर्याद असं काही नसतं म्हणे या जगात. जसं पूर्ण चांगलं आणि पूर्ण वाईटही काही नसतं. नथिंग इज ब्लॅक ऑर व्हाईट. एव्हरीथिंग इज ग्रे. पण मला ग्रे आवडत नाही. पण व्हाइट आवडतं. मला ब्लॅकही आवडतं. पण मला ग्रे आवडत नाही. त्यामुळेच कदाचित काहीच ब्लॅक किंवा व्हाईट नाही हे मला जास्त प्रकर्षाने जाणवतं. मला ब्लॅक किंवा व्हाईट ठरवणार्‍यांची अशा वेळी गंमत वाटते मग. मला अमर्याद व्हाईट व्हायचंय. ब्लॅकही चालेल. पण ते शक्य नसावं. तसं नसतं तर गोष्टी बदलल्या नसत्या. आधी भरघोस मिळायचा तो आता तुरळक मिळतो.. लिखाणाला प्रतिसाद. कदाचित आधी मी चांगलं लिहित असेन. पण आता नाही लिहित. म्हणजे माझ्यातल्या चांगलेपणाला मर्यादा होत्या. मला माझ्यातला चांगलेपणा आवडेनासा झालाय. मग आता काय आहे? वाईटपणा? की खरेपणा.. आणि जे काही आहे ते अमर्याद की पुन्हा मर्यादित?
सगळं काही अमर्याद असलं पाहिजे. प्रेम अमर्याद, विरह अमर्याद, रागही तसाच, लोभही तसाच आणि जन्मही तसाच.. जन्म अमर्याद नाही. म्हणून मला अवकाश आवडतो. कारण तो अमर्याद आहे. पण मला पृथ्वी आवडत नाही, तिला मर्यादा आहेत. मला अवकाशाचा भाग व्हायचंय म्हणजे मी ही अमर्याद होईन. मरणाचं अवकाश वेढून असलेल्या जन्मापासून माझी सुटका होईल जेव्हा मी अवकाशाचाच भाग होईन. मी मरणाचा भाग होईन.. भाग नाही, मी मरण होईन.. अमर्याद मरण..!
मेरा कुछ सामान ...
मी लेखक असते तेव्हा,
नाकारत असते मी भाग होणं, कोणत्याही समूहाचा वगैरे..
रचनेच्या नावाखाली नियमांत बांधून, आत्मा मारुन टाकलेल्या प्राणिमात्रांपेक्षा,
माझ्या कल्पनेतले स्वैर, मुक्त आणि उत्फुल्ल जीव,
खुणावत असतात मला...

मी लेखक असते तेव्हा,
मला गरज नसते ईश्वराच्या कृपेची वगैरे..
कारण मी स्वतःच ईश्वर असते मी निर्माण केलेल्या जगाची..
त्याच्या निर्मितीपेक्षा कितीतरी सरस निर्मिती करुन,
मी स्वतःला कधीच सिद्ध केलेलं असतं माझ्या नजरेत..

मी लेखक असते तेव्हा,
मला भासत नाही उणीव कोणत्याच नात्यांची वगैरे..
या जगातल्या आपमतलबी आणि फायद्या तोट्यांची गणितं मांडणार्‍या नात्यांपेक्षा,
माझ्या लेखणीतून फुलणारी,
कितीतरी सुंदर, निखळ आणि नितळ नाती जगत असते मी,
प्रत्येक क्षणी प्रत्येक रुपात...

पण मी लेखक नसते तेव्हा,
कोसळत जातात माझ्यावर या जगात व्यतित केलेले क्षण,
कोसळत जाते मग मीच स्वतःमधून..
गुडघे टेकून हताशपणे..
गदगदत राहते एका आशेची वाट बघत..
ईश्वराला मीच नाकारलेलं असतं,
त्यामुळे बंद असते वाट त्याच्याकडे जायची..
बाहेरचं जग आणि नाती आता भुलवू शकत नाहीत मला..
त्यांच्याकडे जाणं शक्य असूनही पाठ फिरवते मी तिकडे,
आणि मी निर्माण केलेल्या जगात आता मलाच प्रवेश नसतो...
मी लेखक नसते तेव्हा...............
मेरा कुछ सामान ...
"आज गौरी भेटली.."
"काय म्हणाली?"
"अं.. काही नाही. जनरल.."
"तरी पण? इतक्या दिवसांनी भेटलात ना? तिला काही माहिती नसेलच. सांगितलस का मग?"
"हो.. सांगितलं ना."
"मग काय म्हटली?"
"काही नाही. तू ठिक आहेस ना, एवढंच विचारलं."
"बस्स?"
"हो.. स्मित तुला सांगितलं ना, काही नाती नाही बदलत. ती माणसं आपलीच राहतात. तुमच्या आयुष्यात काय झालं काय नाही. तुम्ही काय निर्णय घेतले. ते बरोबर की चूक यावर जोखत राहत नाहीत तुम्हाला. ती तुमची असतात. आणि कायम तुमच्यावर तेवढंच प्रेम करत रहातात."
"हो का? तिला तुझ्या आयुष्याशी काही घेणं देणं नसेल म्हणूनही काही म्हटली नसेल ती."
बहिणीच्या या प्रश्नाने गौरी भेटल्याचा आनंद थोबाडात मारल्यासारखा खर्रकन द्रौपदीच्या चेहर्‍यावरुन उतरला.
"घेणं देणं असतं म्हणजे काय? फक्त घरातल्या लोकांनाच असतं का ते? आणि नक्की काय असतं? माझ्या आयुष्यात जे काही झालं त्याचा तुमच्या आयुष्यावर आणि इमेजवर काय परिणाम होईल याची चिंता. हेच ना?" अजून बरंच काही बोलावसं वाटत होतं पण ती गप्प बसली.
"याही पेक्षा बरंच काहीतरी असतं." रागारागाने एवढं बोलून बहिण निघून गेली मैत्रीणींसोबत सिनेमाला. हिला काही केल्या रडू आवरेना. रडून रडून गाल चिकट वाटायला लागले तशी द्रौपदी उठली. वॉश बेसिनकडे जाऊन चेहर्‍यावर पाणी मारताना सवयीने आरशात पाहिलं. "श्या! च्यायला इतकं रडूनही आपल्या चेहर्‍यात काहीच फरक दिसत नाही. ना डोळे सुजलेले, ना लाल झालेले.. चेहरा थोडासा ओढलेला दिसतोय. बस्स.. तेवढीच काय ती रडल्याची खूण. की आपण रडतच नाही इतके, डोळे सुजण्याइतके वगैरे? आपल्याला कशाचंच मनापासून दु:ख होत नाही का? इतके दगड आहे का आपण?" या विचारासरशी तिला अजून एक हुंदका फुटला. "मुली रडतानाही सुंदर वगैरे दिसतात. झोपल्यावरही. आपण काय्यच्या कायच दिसतो झोपेतून उठल्यावर.. भूतासारखे." या विचाराने अजून एक हुंदका. म्हणजे रडू यायला लागलं की कशावरही रडूच येतं तसं काहीसं झालेलं तिचं. मग तिला रडायचा कंटाळा आला. झोपही चांगलीच आलेली. दु:खी आहे म्हणून झोप नाही आली, रात्र जागून काढली असलं काही व्हायचं नाही तिच्याबाबतीत. सकाळी ऑफीसला जायचं होतंच. त्यामुळे मुकाट्याने अंथरुणावर जाऊन पडली. रडून मन हलकं झालं की सगळा हळवेपणा पण वाहून जायचा शक्यतो तिचा. मग नेहमीप्रमाणे तिने विचार केला, "बास्स. कशाचं एवढं रडू आलं तुला? हे तुझं आयुष्य आहे. तुझ्या मर्जीने. तू निवडलेलं आणि परिणामांची तयारी ठेवत. हे असंच होणार हे माहित नव्हतं का तुला? मग त्यात रडण्यासारखं काय आहे?" विचार करता करता डोळ्यांवर पेंग यायला लागली...
समोर घरचे बसलेत. आणि ही बोलत सुटलिये. म्हणजे अक्षरश: सुटलीये. "कोणत्या समाजाची गोष्ट करता तुम्ही? मी कोणत्याही समाजाचं उत्तरदायित्व नाकारतेय. मी फक्त माझ्या आयुष्याला जबाबदार आहे. मला प्लीज कसलंही लेबल लाऊ नका. मी माणूस म्हणून नाही का जगू शकत? फक्त माणूस म्हणून? आणि माझ्या सुखाच्या व्याख्या दुसर्‍या कोणी का ठरवाव्यात? मला जे वाटतं ते करायला मिळण्यातच माझं सुख आहे. मला मुखवट्यांचा तिरस्कार आहे. मुखवटा न वापरता जगायचं आहे मला. अ‍ॅट एनी कॉस्ट.! तुम्ही काय करताय? केलाच ना इतकी वर्षे संसार? आहात सुखी?" हे असलं काही पुस्तकी बोलतेय ती आणि घरचे ऐकून घेतायेत असं एक स्वप्न ती नेहमीच जागेपणी पहायची. गंगाधर गाडगीळांच्या कथेतली हरलेली माणसं बघतात तशी स्वप्नं. अर्धवट झोपेत कूस बदलली तसे विचारही बदलले. "कसलं आयुष्य जगतोय हे आपण? कसला समाज आहे हा? माणसाला ना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. स्वातंत्र्य आणि संस्कार यांचा ३६ चा आकडा असलेला समाज कसा चालेल? पण म्हणून यातल्या कोणाचंच महत्व कमी होत नाही. स्वातंत्र्याचा संस्कार का नाही होत? आपल्याला कसा समाज हवाय नक्की? सर्वांच्या प्राथमिक गरजा तर पूर्ण व्हायला हव्या. पण कम्युनिझम नको. समाजातली स्पर्धा संपून चालणार नाही. पण ही स्पर्धासुद्धा निकोप हवी. यासाठी सगळे स्पर्धक समजूतदार हवे. मग असा समजूतदार माणूस निर्माण कसा करायचा. आणि माणसाला समजूतदार बनवायचं असेल तर मग त्याच्यातल्या नैसर्गिक उर्मींचं काय? माणूस 'घडवण्याचे' प्रयत्न इतिहासात झालेच पण माणसाच्या माणूसपणाला जास्त किंमत आहे. शेवटी माणूस हे सत्य आहे, समाज ही संकल्पना. आणि माणसाच्या नैसर्गिक उर्मी बदलल्या नाहीच आहेत अनंत काळापासून. माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे. किती सोयिस्कर वाक्य आहे. समूहात असतो तेव्हा बुद्धीमान आणि एकटा असतो तेव्हा प्राणी. माणूस हा फक्त सोयिस्कर जीव आहे.... विचार विचार.. कुठून कुठे. प्रश्नच नुसते. उत्तरं नाहीतच. कधीतरी एकदा सवडीने हे प्रश्न लिहून ठेवले पाहिजेत.. अर्रे... लाईटचं बिल भरायचं राहिलय. उद्या नक्की. ऑफिसचं काम कंटाळावाणं वाटतय हल्ली........"
झोप चढू लागली तसे विचार विस्कळीत होऊ लागले...
सकाळी ऑफिसला पोहचली तेव्हा शाल्मली फोनवरच होती नेहमीप्रमाणे. होणार्‍या नवर्‍याचा फोन. नाजूक आवाजात खुसूखुसू चाललेलं. तसं ते दिवसभरच चालू असतं म्हणा हल्ली.. "झालंय काय या बयेला? डोकं-बिकं गहाण टाकलं की काय हिने?" शाल्मली आणि द्रौपदी गेली ४-५ वर्षे सोबत होत्या. द्रौपदीला त्यांच्या टीममधली ती एकच पोरगी जरा सेंसिबल वाटायची. शाल्मली होतीही तशीच. दिसायला स्मार्ट.. हुशार, कष्टाळू.. उत्तम नृत्य करायची.. तिला स्वतःचा बिझनेस सुरु करायचा होता किंवा डान्स क्लास.. मुख्य म्हणजे तिला तिचे विचार होते. कंपनीत नविन जॉईन झाल्या तेव्हापासून त्यांचं चांगलच जमलं होतं. बराच वेळ गप्पा, चर्चा चालायच्या त्यांच्या. किंबहुना द्रौपदीच्या घटस्फोटानंतरच्या काळात "फार काही वेगळं झालं" अस न जाणवणारी शाल्मलीची एक नजर होती. पहिल्यासारखं सामावून घेणारी. नाहीतर प्रत्येक नजरेत प्रश्न.. आणि एक उपहास पण. हिचा स्वभाव आधीच रोखठोक. त्यामुळे हे व्हायचंच होतं अशा किंवा लव्ह मॅरेज होतं ना, तरी का? असल्या प्रश्नार्थक नजराच वाट्याला आल्या तिच्या. असो.. तर शाल्मली.. अनेक प्रोजेक्ट्स वर काम करताना त्यांनी रात्री जागवल्या होत्या. अनेक इव्हेंटस मध्ये शाल्मलीची हुशारी, समजूतदारपणा दिसला होता. अर्थातच अशा मुलीवर मुलं फिदा न होतील तरच नवल. एका मित्राला तिने हो म्हटलं. त्याच्या घरुन नकार होता. तोच सर्वसामान्य प्रॉब्लेम. इंटरकास्ट. हिच्या घरी कशाचीच कल्पना नव्हती पण ते विरोध करणार नाहीत याची खात्री होती हिला. त्यामुळे आधी तुझ्या घरुन परवानगी मिळव असं सांगितलेलं. पण त्याच्या घरचे ऐकेचनात तेव्हा एकमताने वेगळे झाले दोघे. "चला! ठिकच झालं. फार काही गुंतवणूक नव्हती तर प्रॅक्टिकल निर्णय घेणंच योग्य आहे." द्रौपदी म्हणालेली. कारण शाल्मलीच्या घरुनही वरसंशोधन चालूच होतं. पण आता जे काही चाललेलं तो म्हणजे पूर्णपणे धक्काच होता द्रौपदीसाठी. कालपर्यंत स्त्रियांच्या प्रश्नांवर हिरीरीने मतं मांडणारी, त्यांच्या स्वातंत्र्यावर बोलणारी शाल्मली लग्न ठरल्यावर इतकी बदलली..? तिचं डोकं वाजू लागलं..
"समर्पण हा स्त्रियांचा स्वभावच असतो. आणि आक्रमण पुरुषांचा.."
"आवरा...! असं काही नसतं. समर्पण आणि आक्रमण या भावना दोघांच्यातही असतात आणि सारख्याच असतात. फक्त त्याचं स्वरुप स्थळकाळानुसार बदलतं. तीव्रता कमी जास्त होते. पण भावना तिच. प्रत्येकालाच तीव्र समर्पणाची ओढ असते तशी आक्रमणाची पण. काहीतरी जिंकून घ्यावं आणि कुठेतरी हरुन जावं या भावना बेसिकच आहेत. गंमत म्हणजे या हरण्यामागेही जिंकण्याचा गनिमी कावा असतोच.."
"बरं मग तुला काय म्हणायचं आहे? कदाचित ही तिची जागा असेल समर्पणाची."
"कसं शक्य आहे? फक्त लग्न ठरलं म्हणून आपण कोणाशी नातं कसं निर्माण करु शकतो. कशी काळजी वाटून घेवु शकतो? कसं गोड बोलू शकतो? एखाद्याला न ओळखताच त्याच्यावर प्रेम कसं करणं शक्य आहे?"
"तू केलेलंस ना ओळखून प्रेम. काय झाल?"
"...."
"प्रेम आणि संसार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संसार करताना थोडं सांभाळून घ्यावच लागतं."
"अर्रे पण सांभाळून वगैरे घ्यायचा प्रश्न आलाच कुठे? साधी गोष्ट आहे. ज्याचा मुद्दा बरोबर असेल तो मान्य व्हायला हवा. त्यासाठी तो दोन्ही बाजूंनी नीट लॉजिकली मांडला जायला हवा. काही युक्त्या-प्रयुक्त्या वापरुन आपला मुद्दा मान्य करवुन घेणं यात स्वतःच्या स्वत्वाची हार नाही वाटत का माणसाला? आपण कोणालातरी आपल्या मताप्रमाणे चालायला लावतो हा अहं म्हणजे त्या नात्याची हार नाही का त्या? आणि ज्या नात्यांतला अहं नात्यांपेक्षा महत्वाचा असतो ती नाती बेगडी असतात."
"इतका आदर्शवाद फक्त कल्पनेत असतो. माणसाचा मूळ अहम् च काहीतरी जिंकून घेण्यात दडलेला आहे. तुला स्वतःला जिंकण्यात समाधान आहे. तिला दुसर्‍याला. पण मूळ भावना तिच. माणून बुद्धीमान आहे ना, मग तो बुद्धी वापरुन जिंकायला बघतो. आणि हा प्रकार जीवसाखळी टिकण्याच्या खेळाचा भाग आहे."
"श्शी.. नको असली नाती.."
"खरंच नको?"
"मी नाती नको म्हटलं नाहीये. असली नको म्हटलय."
"हे सगळ्याच नात्यांत होतं. तुझा तूच विचार कर. ज्याला तू सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल नातं वगैरे म्हणतेस त्यात हे नाही होत? इथे बोलणं वापरुन जिंकता, तिथे विचार वापरुन. काय फरक झाला? हे म्हणजे एखाद्या नोकरदाराने वारांगनेला नावं ठेवण्यासारखं झालं? पण दोघांच्यात फरक काय? ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धी विकतो, त्या शरीर विकतात असं उत्तर देण्यातला प्रकार.."
"..."
"कामाला लागा.."
"हं..."
काही दिवसांनी शाल्मलीचं लग्न झालं. अर्थात अतिशय धुमधडाक्यातच. द्रौपदीने तिचा विषय काढूनच टाकला डोक्यातून. शाल्मलीने कंपनीपण सोडली आणि अगदी स्वखुशीने मोठ्या पगारच्या नवर्‍याच्या घरची हाऊसमेकर झाली.
"माणसं जितक्या सहजतेने आयुष्यातून निघून जातात तशाच आठवणीपण गेल्या असत्या तर किती बरं झालं असतं. पण असं होत नाही. दिवस-महिने-वर्षे.. काळ कसा भराभर पुढे जातो. हे असं सगळं चालू असताना अचानक "आपण होतो त्याच जागी आहोत" याची जाणिव होणं फार भयानक असतं.. बघता बघता २ वर्षे निघून गेली. आणि कंपनीतलं डेजिग्नेशन सोडता काहीच बदललं नाही आपल्या आयुष्यात." भर दुपारी लंच च्या वेळेला खिडकीतून बाहेर बघताना असले विचार द्रौपदीच्या डोक्यात पिंगा घालत होते. "किती काय काय बदललं या दोन वर्षांत. बहिणींचं लग्न झालं. सुपरवूमन चा रोल करायला सुरुवातही केली तिने. घरचे आता आपल्यापाशी लग्नाचा विषय काढत नाहीत. शाल्मली ६ महिन्याच्या गोड बाळाची आई झाली. बाळ थोडं मोठं झालं की जॉब करायचा म्हणतेय. गौरी मात्र अजूनही लग्न टाळतेय. कधीतरी कॉलेजमध्ये असताना तिला आवडणार्‍या मुलाने नकार दिला म्हणून अजून एकटी आहे ती? कसं शक्य आहे हे? इतकं प्रेम वगैरे खरंच काही असतं का? पोस्ट ग्रॅज्युअशन, पीएचडी आणि आता नोकरी करायला लागूनही ३ वर्षं झाली तिला. ह्म्म.. परवा वाचलेल्या लेखाविषयी तिच्याशी बोललंच पाहिजे. आई बाळाला दूध पाजताना आणि स्त्री कोणाविषयी तरी रोमँटीक विचार करताना स्त्रवणारा हार्मोन एकच असतो म्हणे. किती वेगळ्या भावना आहेत दोन्ही. आणि जगाच्या दृष्टीने एक अतिशय उदात्त तर दुसरी अजूनही चोरटीच.. पण दोघांमागची प्रेरणा एकच? गौरीसोबत चर्चा करायला खरी मजा येईल. तसंही खूप दिवसात काही भेट नाही." गौरी ला मेसेज टाकायला म्हणून द्रौपदीने फोन हातात घेतला. आणि तेवढ्यात केबिनच्या दारावर टकटक झाली.
"मे आय कम इन?"
दारात सुहास उभा होता. सुहास तिचा कलीग. वर्षच झालेलं कंपनी जॉईन करुन पण प्रोफेशनली जितका चांगला त्याच्यापेक्षा कणभर अधिकच चांगला मित्र झालेला तिचा. तिच्या विचारांची गुंतागुंत शांतपणे ऐकून घेणारा आणि बर्‍याचदा एका झटक्यातच सगळ्या गुंतागुंतीच्या मुळावर घाव घालणारा.
"ओह.. सुहास.. ये ना.. बस..! बोला.. झालं का जेवण?"
"हो.. तू आली नाहीस."
"अं.. हं.. मूड नव्हता.."
"नेहमीप्रमाणेच.."
"..."
"असो.. ऐक.. आज संध्याकाळी क्लायंटला फायनल ड्राफ्ट द्यायचा आहे. आपण परवाचीच आयडीया फायनल करतोय. द्रौपदी यक्षाच्या प्रश्रांना उत्तरं देऊन सगळ्यांची सुटका करते."
"ओके.."
"चल मग.. तुला तर माहिती आहेच बाकी. प्रेझेंटेशन च्या तयारीला लाग.."
"येप.."
---------------------------------------------------------------------------------
"प्रेझेंटेशन भारीच झालं. काय बोललीस तू. अर्थात हे होणारच होतं म्हणा. तुझी द्रौपदी खर्‍या अर्थाने आजच्या स्त्रीला रीप्रेझेंट करते. कॉन्ग्रॅट्स मॅडम.." सुहास अखंड बडबडत होता गाडीत बसल्या बसल्या.
"पण तो यक्ष मूर्ख होता."
"म्हणजे?"
"फिलॉसॉफिकल प्रश्न कायमच सोपे असतात रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांपेक्षा. फिलॉसॉफिकल प्रश्न आणि त्यांची फिलॉसॉफिकल उत्तरं. फारच सोपा मामला आहे हे. रोजच्या जगण्यात यातलं काहीच अ‍ॅप्लिकेबल नसतं."
"तुला याचं कारण माहितेय?"
"तुला माहितेय?"
"हो.. असं होतं कारण प्रश्नांना उत्तरंच नसतात."
"?"
"माणूस प्रश्न कधी सोडवतच नाही. फक्त स्वत:ला सोडवून घेतो त्या प्रश्नांतून. पण आपल्या नशीबाला आलेला यक्षही इतका मूर्ख नसतो. तुझ्या डोक्याला कायम भुंगा लावणारं तुझं मन. त्यातून तुझी सुटका नाही. कोणाचीच नाही. आपण उत्तरं मिळवल्यासारखं करतो. प्रश्न सोडवल्यासारखं करतो पण वास्तविक पाहता यातलं काहीच झालेलं नसतं. त्यामुळे त्या यक्षाचं कधी समाधानही होत नाही आणि तो आपली कधी पाठही सोडत नाही."
"खरंय तुझं. आणि आपल्या सगळ्यांची द्रौपदी झालीये. सगळ्यांचच लग्न लागलंय.. घर, संसार, नोकरी, संस्कार आणि आपली स्वप्नं. या सगळ्यांत मात्र आपलं माणूसपण, स्वातंत्र्य लांब राहिलय. कर्णासारखं. आणि त्याच्या प्राप्तीची इच्छा व्याभिचार ठरतो मग."
"वाहवा.. आता कसं अगदी क्रिअटीव्ह हेड सारखं बोललात मॅडम.."
"बर्र.. असू द्या.."
सुहासशी बोलणं तिथेच थांबलं तरी हीचे विचार थांबेनात. घरापाशी सोडून सुहास गेला. फ्लॅटच्या काळोखात पुन्हा तिचा यक्ष तिला छळू लागला. "शेवटी गौरी काय, मी काय, शाल्मली काय किंवा माझी बहिण काय. येनकेनप्रकारेण सगळ्या द्रौपदीच. पावलोपावली छळणार्‍या यक्षासोबतच आपलं जगणं. प्रश्न सोडवण्याचा रामबाण भारतीय उपाय म्हणजे प्रश्न अस्तित्वातच नसल्याचा दावा करणे. कुपोषणाने मुलं मरतायेत तर कुपोषण नाहीच असं म्हणायचं. वाघांची शिकार होतच नाही असा दावा करायचा. हे म्हणजे सगळ्यात सोयिस्कर. बहिणीसारखं किंवा शाल्मलीसारखं. यांना प्रश्न पडतच नाहीत का? आपल्या आयुष्यासोबत जे काही घडतय, घडत आलय ती सगळी व्यवस्था कधी मान्य केली यांनी काहीच विरोध न करता? कसं जमलं यांना? यांचा हेवा करावा की किव करावी हेच कळत नाही कधी कधी. पण ओढाताण होतेच की यांची पण. गौरीची पण.. सपशेल हरुन जातोय आपण या यक्षापुढे."
विचार करुन संपेनात. उत्तरंही मिळेना आणि शांतताही वाटेना. द्रौपदीने टेबल लँप लावला. कागद पुढे ओढले आणि लिहायला सुरुवात केली, "अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.."