मेरा कुछ सामान ...
स्टॅटेस्टिक्स... स्टॅटेस्टिक्स... जगात रोज इतकी लोकं उपाशी झोपतात.. इतकी मुलं कुपोषित आहेत.. इतक्या स्त्रिया अन्यायाला बळी पडतात.. हे आकडे माहितीतले. रोजच्या वाचनातले. रोजच्या विचारातले. त्यासाठी कधी हळहळणे तर कधी पेटून उठणे आणि कधी त्यावरच्या उपायांत खारीचा वाटा उचलणे हे ही नित्याचे.
तसाच तो ही एक दिवस होता. नेहमीप्रमाणेच. सकाळची घाई. ठरलेली बस. बस मध्ये जागा मिळाली की पुढच्या तासाभराची निश्चिंती. भल्या गर्दीत सुखावणारं एकटेपण आणि अगदी स्वतःचा असा वेळ. कुठलाही विचार निवांतपणे करण्याची हक्काची संधी. वाटलं तर विचार करा नाहीतरे निरीक्षण करत बसा. त्यादिवशीही असंच लोकांकडे बघत बसलेले. चेहरा बघून त्या माणसाच्या आयुष्याचा, मानसिकतेचा अंदाज बांधत.. रस्त्यावरुन दिसणारी दृश्यही रोजचीच होती. काही गरीब माणसं, रस्त्यावर फिरणारी मुलं.. पण तो दिवस अगदीच काही रोजचा नसावा. त्या सगळ्यांकडे बघता बघता अशी काही तंद्री लागली त्या दिवशी की त्याचं नीटसं वर्णन आजही नाही करता यायचं मला. बघता बघता जाणवायला लागलं की ती 'मी'च आहे. आजूबाजूची प्रत्येक जिवंत गोष्ट 'मी' आहे. जी 'मी' आहे, तेच सगळीकडे आहे. सगळी माझीच रुपं आहेत. सगळ्यांत 'मी' आहे. आधी हे जाणवत होतं की यावर खूप विचार करुन झालाय. त्याचाच पुढचा भाग चालू झाला असेल डोक्यात. पण नंतर जाणवायला लागलं की डोकं बंद झालंय कधीच आणि आता जे दिसतय हे समोर घडतय. माझ्या डोळ्यांदेखत. हे विचार नाहीत. ही अनुभूती आहे.
दिव्य दृष्टी मिळूनही अर्जुनाला विश्वरुपदर्शन का झेपलं नसेल? उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांमधला हा एक महत्वाचा प्रश्न आहे माझ्या आयुष्यात. महाभारत वाचलं तेव्हा आणि भगवद्गीता वाचली तेव्हाही या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. म्हणजे अर्जुनाला कृष्णाने दिव्य दॄष्टी दिली आणि तरीही ते विश्वरुप सहन न झाल्याने अर्जुनाने त्याला विनंती केली की 'हे रुप आवरा' हे कायमच वाचत आलेय. पण अर्जुनाला नक्की काय वाटलं? त्याच्या मनात काय विचार आले? का सहन झालं नसावं त्याला? मनाच्या तळात पडून रहाणार्‍या आणि विचारांच्या भोवर्‍यात पुन्हा पुन्हा वर येणार्‍या प्रश्नांतला हा एक. असं वाटलं की त्या एका क्षणात या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सगळ्या जगाला व्यापून उरणारं एकच तत्व आहे हा विचार अध्यात्मिकदृष्ट्या कितीही उदात्त वाटत असला तरी त्याची प्रचिती सहन करण्याची ताकद निर्माण कशी करायची? ही 'मी' आहे.. ती ही 'मी' च.. तो ही 'मी' च.. चराचरात सर्वत्र 'मी' च.. प्रत्येक अन्याय करणार्‍यात 'मी', प्रत्येक अन्याय सहन करणार्‍यात 'मी', त्यासाठी लढणार्‍यांत 'मी', त्याला मारणार्‍यात 'मी'.. क्षुद्र, कातडीबचावू, कोत्या मानसिकतेचं रुप मी आणि महान, उदात्त विचारांचा उगमही 'मी' च.. पिढ्यांन् पिढ्या नासलेल्या अनेक आयुष्यांत 'मी' आणि त्यांना नासवणार्‍या कारणांतही 'मी' च.. प्रत्येक उपाशी झोपणार्‍यांत, औषधावाचून मरणार्‍यांत, कचरा वेचणार्‍यांत.. आणि ह्या सगळ्याला जबाबदार असणार्‍यांत.. हे सगळं बदलायची ताकद असूनही षंढपणे जगणार्‍यांत.. माझा घसा कोरडा पडला, क्षण भर काही जाणवेच ना. असं वाटलं की दु:ख दु:ख दु:ख भरुन आहे सगळीकडे, असं वाटलं की आता माझ्या सगळ्या शरीराचं पाणी होऊन हे सगळं दु:ख डोळ्यांवाटे वाहून जाणार आहे. एका क्षणाने भानावर आले. पाणी प्यायला गेले तर लक्षात आलं, डोळ्यांतून पाणी वाहत होतं. स्टॉप आलाच होता. कसबसं भान एकवटत खाली उतरले.
तो क्षण असह्य होता. माझा अहं कितीही मोठा असला तरी त्याचं असं व्यापक होणं नाहीच झेपलं. कदाचित त्यामुळेच नाही झेपलं. पण अहं मोठा नसता तरी झेपलं असतं की नाही शंकाच आहे. माझ्या लेखी 'मी' फक्त 'मी'च असू शकते. माझ्याइतकीच चांगली, माझ्याइतकीच वाईट. मी अजून कोणी कशी असू शकते? ना मी इतकी चांगली असू शकत, ना इतकी वाईट. आपण किती लक्ष देतो स्वतःकडे? मी किती लक्ष देते. मी अशी आहे, तशी नाही, हे आवडतं, अशी वागते.. पण शेवटी या सगळ्या वाटण्याला काहीच अर्थ नाही? आयाम नाही? 'सोSहम्' या एका शब्दांत सगळी उत्तरं एकवटतात हे मान्य करणं अपेक्षेपेक्षा फारच जड होतं. लहानपणापासून जे ऐकत आले त्याची अनुभूती एक क्षणही सहन करु शकले नाही. स्वतःच्या मर्यादांची जाणिव होणं, आणि मुख्यतः त्या मर्यादा इत़क्यातच आल्या हे स्विकारणं अजूनही शक्य नाही झालं. एक क्षणही नाही टिकू शकले मी त्या अनुभूतीपुढे? इतकीही ताकद माझ्यात नाहीये?
आणि नंतर अशाच एका निवांत वेळी या गोष्टीचा विचार करताना आठवला बुद्ध.! बुद्धालाही दु:खाचा साक्षात्कार झाला होता. असं वाटलं की, साक्षात्काराला एक क्षण पुरतो. बाकीचा काळ लागतो तो साक्षात्कार पचवण्याची ताकद मिळवायला. त्यावेळेपर्यंत बुद्ध माहिती होता. आर्यसत्य.. सम्यक जीवन, अष्टांग मार्ग.. पण बुद्ध खरा महान या दु:खामुळे झाला असं वाटलं. या दु:खाची काळीज फाटून टाकणारी जाणिव प्रत्येक क्षणी सोबत घेऊन त्याचं जगणं त्याला बुद्ध बनवत गेलं.
मला बुद्ध होणं शक्य नाही. जे एक क्षण सहन नाही करु शकले त्यासोबत जन्म कसा काढायचा? माझ्या आयुष्यातली सत्य दोनच.. 'अर्जुन'पण असह्य आहे, पण त्यातून सुटका नाही.. आणि 'बुद्ध'पण तर अप्राप्य आहे..
मेरा कुछ सामान ...
इतरांची चंद्रांनी लगडलेली आभाळं कुतूहलाने, काहीशा असूयेनेच पहायचे ते दिवस..
माझं कोरं आभाळ टुकूटुकू बघत रहायचं सैरभैर होऊन, येऊ घातलेल्या चंद्रांच्या वाटेकडे..
एकेक चंद्र जमू लागला आभाळात तसं सजत गेलं आभाळ माझंही..
आता मी च माझ्या आभाळाकडे असूयेनं पहावं असंही वाटू लागलं..
निवडून निवडून आलेला एक एक चंद्र माझ्याकडे..
अगदी माझ्यासारखा.....
दरम्यान काय झालं हे खरंच आठवत नाही..
पण अगदी 'माझ्यासारख्यांत' काहीतरी राहून गेलं एवढं खरं..
एक दिवस जाणवलं,
कोणत्याच चंद्राने हट्ट नाही केला अमावस्येला उगवायचा..
सगळ्यांनीच समजूतदारपणे मान्य केलं एका दिशेने प्रवास करायचं..
सूर्य आला की मावळायचं असतं हे गृहितच धरलेलं सगळ्यांनी..
वाट सोडून मन मानेल तसं धावावं असं कोणालाच वाटलं नाही,
अगदी हक्काचं आभाळ असूनदेखिल..
मग माझ्यासारखं कोण होतं?
माझ्यासारखं काय होतं?
कोणापाशीच मिळाला नाही चंद्राळण्याचा खुळा अट्टहास..
क्षितिजाकडे झुकता झुकता एकेक चंद्र दुसर्‍या आभाळाचा सूर्य होऊ लागला,
सहजपणे..
जितक्या उत्कटतेने आभाळभर चंद्र सजवलेले,
तितक्याच अलिप्तपणे निरोप देतेय आता एकेकाला...
चंद्र कधीच नाही, फक्त आभाळचं माझं होतं कदाचित..
वेड्या अट्टहासापायी प्रत्येक वेळी कोसळणारं..
प्रत्येक चंद्रासाठी नव्याने उंच उडणारं..
माझं आभाळ कोरंच बरं आहे..
आता चंद्राळण्याचं वजन परत नाही सहन होणार त्याला...
मेरा कुछ सामान ...
एक पल तुम मिलें
एक पल जिंदगी...
एक पल तुम नहीं,
फिरभी एक पल यह जिंदगी..
एक जिंदगी गुजार दूं तुम्हारे होने की खुशीमें..
एक उम्र निकल जाये गम्-ए-इंतजार में..
खुशी ऐसी मिले के गम का एहसास ना हो..
गम ऐसा मिले के फिर कभी खुशी की तलाश ना हो..
एक जिंदगी अगर मिलें एक जिंदगी जितनी..
एक उम्र मुझें नसीब हो एक उम्र जितनी...
एक पल तुम मिलें
एक पल जिंदगी...
एक पल तुम नहीं,
फिरभी एक पल जिंदगी..
यह मिलने बिछडनें का सिलसिला टूंटता कहाँ है?
जिंदगी तो किश्तोंमें मिलती है...!!
मेरा कुछ सामान ...
Las acasias - Spain - 85 min - 2010
खरं सांगायचं तर हा चित्रपट मी स्पॅनिश मनसोक्त ऐकता यावी म्हणून गेलेले. ती भाषा एक मला उगीचच आवडते. पण या पातळीवर साफ अपेक्षाभंग झाला माझा. ५ मि. झाली, १० झाली, १५ झाली.. कोणी काही बोलायलाच तयार नाही. आणि नंतर जे काही संवाद झाले त्यावरुन या चित्रपटात संवाद नाममात्रच असणार आहेत याची जाणिव झाली. पण थिअटर खचाखच भरलं होतं, लोकं बाजूने उभे होते त्यामुळे चित्रपट नक्कीच चांगला असणार हे मी ताडलं आणि बसून राहिले. बसले ते बरंच केलं असं वाटलं सिनेमा पाहिल्यावर. भारी सिनेमा आहे. एक ट्रकड्रायव्हर, त्याच्या ट्रकमधून प्रवास करणारी एक बाई आणि तिची ५ महिन्याची मुलगी. एक मूल सोबत प्रवास करणार म्हटल्यावर काहीश्या त्रासानेच या प्रवासाला सुरुवात होते. अनोळखी माणसांत होईल तेवढंच जुजबी बोलणं. आणि मग अख्ख्या प्रवासात फार काही न बोलताही होत राहिलेला त्यांचा संवाद. तिघांचीही अप्रतिम एक्स्प्रेशनस्.. अगदी त्या ५ महिन्यांच्या बाळाचीसुद्धा..! चित्रपटाची मुख्य गरज, चित्रपटाचा गाभाच त्यांच्या एक्स्प्रेशनस् चा आहे. फार बोलणं होतच नाही दोघांत. अगदी त्यांच्या पूर्वायुष्याची पण जुजबीच माहिती घेटलिये. पण म्हणून कुठे काही कमी वाटत नाही. जी कथा आहे ती अगदी नीट पोहचलिये. छान सिनेमा.!

Voice Over (Zad kadar) - Bulgeria - 2010 - 107 min
विघटनपूर्व सोव्हियतच्या सामाजिक परिस्थितीची कल्पना असेल तर हा चित्रपट मस्ट वॉच आहे. त्या एका कालखंडात माणसांच्या वैयक्तिक आयुष्यात चाललेली सरकारची पराकोटीची ढवळाढवळ, व्यक्तिस्वातंत्र्यावरची बंधनं आणि त्यांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम यांचं दर्शन घडवणारा हा चित्रपट. एक कॅमेरामॅन, ज्याचं त्याच्या प्रोफेशन वर प्रचंड प्रेम आहे. त्याच्या मुलाला तिथल्या हवामानाचा त्रास होतोय म्हणून त्याची बायको मुलाला घेऊन बर्लिन ला जाऊन राहते. आणि त्यांच्या संवादातून चित्रपट पुढे सरकत जातो. त्यांची पत्र ज्यांत तिने त्याला बर्लिनला येण्याविषयी लिहिलेलं असतं, त्यांचे फोनवरचे संवाद या सगळ्यांचं इंटर्प्रिटेशन ते हेर कसे करतात आणि त्यातून त्यांचं नातं कसं अफेक्ट होत जातं हे बघणेबल आहे. भारी सिनेमा..

All that remains - Switzerland - 2010 - 92 min
दोन रस्ते.. महासागरांच्या टोकांकडे जाणारे.. दोन वेगळी शहरं.. भिन्न संस्कृती.. या रस्त्यांवरुन चाललेला ४ माणसांचा प्रवास. एकमेकांच्या दिशेला चाललेला पण एकत्र न येणारा.. मध्ये पसरलेल्या समुद्रामुळे. छान संवाद. दोन्ही जोड्यांचं निर्माण होत जाणारं नातं. नकोसं असलं तरी टाकून देता न येणारं आणि त्यातच कधीतरी मग क्म्फर्टेबल होत जाणारं. मस्त सिनेमा.

या व्यतिरिक्त, Moneyball, Anytime anywhere, Palwan fate हे चित्रपटही पाहिले. Moneyball चं दिग्दर्शन भारी आहे. चित्रपटच भारी. पण विंग्रजी सिनेमाविषयी काही खास वाटू नये असाच मोसम होता. Anytime anywhere हा एक तामिळ चित्रपट पाहिला. नेहमीच्या साऊथ इंडियन सिनेमापेक्षा काहीतरी वेगळा, थोडा फार लाईट पण गंभीर शेवटाचा. Palwan fate चा कॉन्सेप्ट तर भारी होता पण सिनेमा बघताना मला झोप लागलेली.. अरेरे पहिली २० मि. पाहिला मग २० मि. झोपले मग परत १० मि. पाहिला आणि बाहेर पडले..

नॉन सिनेमॅटीक हायलाईट म्हणजे, बिग बी ला एका फुटावरुन पाहिलं. त्याच्या मागोमाग रानीला कोणी भाव देत नसताना पाहिलं. पहिल्या दिवशीच्या गोंधळात कोणीही कोणाशी आपणहोऊन बोलताना अनुभवलं (जे कोथरुडात नॉर्मली होत नाही.. डोळा मारा ) मध्येच कधीतरी महेश भट्ट फिरत होता.
याखेरीज, या वर्षांतल्या ठळक घडामोडी..

१) पुने युनिव्हर्सिटी आणि जर्मन युनि. चा टाय अप. (२०११)
२) मॅक्सम्युलर आणि FTII च्या सोबत जर्मनीच्या सहकार्याने NFAI मध्ये ३ दिवसांचा जर्मन चित्रपट महोत्सव. (गेल्या १-२ महिन्यांत)
३) पिफ च्या कंट्री फोकस मध्ये जर्मन सिनेमा.
४) बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे जर्मन एन्व्हॉय.
५) बेस्ट सिनेमा, इफ नॉट अस, हु? (जर्मन) डोळा मारा हाहा

असो... तर अशी ही १०व्या पिफची कहाणी सुफळ संपूर्ण.. स्मित
मेरा कुछ सामान ...
Times and winds (Bes vakit) - Turkey - 2006 - 111 min
३ लहान मुलं. एकाला आपल्या वडिलांचा खून करायचाय कारण ते त्याच्यापेक्षा त्याच्या लहान भावावर जास्त प्रेम करतात, दुसर्‍याला आपल्या शाळेतल्या बाई खूप खूप आवडत असतात आणि एक मुलगी, जिच्या घरात नुकतच एक बाळ आलेलं असतं. पौगंडावस्थेत असताना मुलांची मानसिक स्थिती कशी अस्थिर आणि अनप्रेडिक्टेबल असते याचं चित्रण करणारा हा चित्रपट. यांचा सोबती एक अनाथ मुलगा. एका डोंगरावरच्या खेड्यात चाललेलं यांचं आयुष्य, नव्यानेच कळू लागलेल्या काही गोष्टी, भावना.. बदलत जाणार्‍या ॠतूंसोबत त्यांचं बदलत जाणारं विश्व यांची ही कथा. तीन वेगळी आयुष्यं, म्हटलं तर वेगळी म्हटलं तर जोडलेली, या सगळ्यांच्या आतील भावना आणि वरची वागणूक हे सर्वच पहाण्यासारखं. सगळ्यांचा उत्तम अभिनय. उत्तम सिनेमॅटोग्राफी.

The day I was not born (Das lied in mir) German - 2010 - 92 min
एका लहानश्या मुलीचे आई-वडील हिटलरच्या सैनिकांनी उचलून नेल्यावर, त्या कुटुंबाचे मित्र तिला स्वत:कडेच ठेवून घेतात. तिच्या नातेवाईकांपासून लपवून. अर्थात त्यांचं तिच्यावर खूप प्रेम असतं. हीच मोठेपणी स्विमर होते. एकदा स्पर्धेसाठी जात असताना एका एयरपोर्टवर स्पॅनिश बालगीत ऐकून आपल्याला ते गाणं माहिती असल्याचं तिला जाणवतं. आणि इथून चित्रपटाला सुरुवात होते. तिला सत्य समजण्याची वेळ जवळ आलीये कदाचित, हे जाणवून तिचे वडीलही तिथे येतात आणि मग त्यांच्याकडून जेव्हा कळतं की ती त्यांची खरी मुलगी नाही तेव्हा सुरुवात होते तिच्या स्वत:च्या शोधाची. अर्थातच वडिलांचं सहकार्य नाममात्रच लाभतं. त्यांचा जीव तिच्यात खूप गुंतलाय हे जाणवतय पण आपल्या परिवारापासून त्यांनी आपल्याला वेगळं केलय याचा प्रचंड रागही आहे. नवीन भेटलेल्या माणसांवर प्रेम वाटतय पण तितकाच अनोळखीपणाही आहे. या सगळ्या मानसिक स्थित्यंतरांमधून जाणारा तिचा प्रवास छानच मांडलाय.

Belvedere - Bosnian- Herzegovian - 2010 - 90 min
शरीरावरच्या जखमा किती काळ राहतात? आणि भीतीच्या? Belvedere ही अशीच एक महायुद्धातून वाचलेल्या ज्यूंची छावणी. त्यातल्या एका कुटूंबाची कथा. कुटुंबातल्या ३ पीढ्यांची कथा. ज्यातली एक अख्खी पीढी नाहीशी झालिये पण तिचं अस्तित्व कायम जाणवत राहतं. प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगात झालेल्या जखमांच्या खुणा वावरतायेत पण पुढची पीढी अगदीच अनभिज्ञ. कधी कधी या खुणा स्विकारायलादेखिल नाकारणारी तर कधी काहीच न समजून गोंढळून जाणारी. अफाट अभिनय आणि अप्रतिम दिग्दर्शन. आजोबा आणि त्यांचा लहानगा नातू. आजोबांच्या २ बहिणी. एकीने अख्खं कुटुंब गमावलय आणि त्यांना कुठे पुरलय याची जागा तरी कळावी यासाठी तिची चाललेली ओढाताण. दुसरीचा फक्त मुलगा वाचलाय, जो अमेरीकन रीअ‍ॅलीटी शो मध्ये जायचं स्वप्न पाहतोय. या सगळ्यांची ही कथा. प्रत्येकाच्या वेगळ्या मनःस्थितीची, सहनशीलतेची, भीतीची.. युद्धातल्या छळाइतक्याच भयानक त्याच्या आफ्टरइफेक्टची.. भीतीच्या जखमा कदाचित माणसाबरोबरच संपत असाव्यात. मस्ट वॉच.

Black Thursday (czarny czwartek) - Poland - 2011 - 105 min
७० च्या सुमारास पोलंड सरकारने अचानक केलेल्या अन्नधान्याच्या भाववाढीबद्दल कामगारांनी दिलेला लढा कसा दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला याची ही कथा. ७० चा काळ असल्यामुळे त्या प्रसंगांच्या मूळ चित्रफीती उपलब्ध होत्या. त्यातल्या घटनांची पार्श्वभूमी रंगीत चित्रपट म्हणून दाखवून, ती घटना ओरिजिनल कृष्णधवल स्वरुपातली, अशी या चित्रपटाची मांडणी केलेली आहे. घडणार्‍या घटना इतक्या त्रासदायक आहेत की या मांडणीचं कौतूक चित्रपट सुरु असताना मनात येत नाहीच. संपल्यावरच जाणवतं. मस्ट वॉच यादीतला अजून एक सिनेमा.
मेरा कुछ सामान ...
दर वर्षी नवीन वर्षाच्या चाहुलीसोबतच चित्रपटरसिक ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) १२ ते १९ जानेवारीत पार पडला. यात पहायला मिळालेल्या काही चांगल्या सिनेमांविषयी थोडसं....

Here without me (inja bedoone mah) - Iran - 2011 - 100 min
एक इरानची लाईफस्टाईल सोडता हा चित्रपट बघताना काहीच अनोळखी वाटलं नाही. प्रत्येक पात्राच्या भावना इतक्या प्रभावीपणे मांडल्या होत्या की जगातल्या कोणत्याही भागातील माणूस त्या कुठे ना कुठे रीलेट करु शकेल. चित्रपटात तीनच मुख्य पात्र. आई आणि तिची २ मुलं. लग्नाला आलेली अपंग मुलगी जिला अपंगपणामुळे काँम्लेक्स आहे, चित्रपट कथा लिहिण्याची स्वप्न पहाणारा पण परिस्थितीमुळे कारखान्यात काम करणारा तिचा भाऊ आणि या सगळ्यात, आपल्या रोजच्या आयुष्यातल्या प्रश्नांमध्ये अडकलेली या मुलांची आई. सगळ्याच्या सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या सुंदर व्यक्त होत जातात. त्यांच्या सगळ्या भावना अतिशय पर्सनल असूनही त्यांची तगमग सगळ्यांपर्यंत पोहचवण्यात त्या यशस्वी झाल्यात. मुलीचं लग्न तिच्या आवडत्या मुलाशी व्हावं म्हणून चाललेली तिची धडपड पाहताना 'बातो बातो में' मधल्या रोझी ची आठवण आली मला तरी. अर्थात हा सिनेमा गंभीर पण तरीही अंगावर येणारा नाही. काही कथा हॅपी एंडिंग केल्या की फारच फिल्मी वाटतात पण याचं तसं झालं नाही. शेवटाकडे चित्रपट निघाला तेव्हा मी खरच इच्छा करत होते हॅपी एंडिंग हवम आणि ते तसच होतं. अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि उत्कृष्ट अभिनयाचा हा चित्रपट नक्की पहावा असाच आहे.

Red heart (Dli sur) - Iraq - 2011 - 78 min
एकमेकांच्या प्रेमात पडलेलं एक किशोरवयीन जोडपं. मुलीची आई नुकतीच वारलेली. घर, भावंडांना सांभाळून शाळा करणारी ती. आणि आपलं दुसरं लग्न व्हावं म्हणून तिला एका वेडगळ मुलाशी लग्नाची सक्ती करणारा तिचा बाप. त्याच्या तावडीतून पळून गेल्यावर त्या जोडप्यावर काय काय प्रसंग येतात याची ही कथा. ऐकिव किंवा वाचून कितीही माहिती असली तरी तिथली परिस्थिती पडद्यावर पाहताना कायमच अंगावर येते.. ह्म्म...

Return Ticket (Dao fu yan liu bai li) - Taiwan - 2011 - 88 min
नवीन वर्षासाठी गावी जाणार्‍या बसेस च्या कमतरतेतून फायद्याच्या उद्देशाने एका बसची एक ट्रिप अ‍ॅरेंज करुन काही कमाई करु पहाणारा एक ग्रुप. त्यांची तिकीटं विकणारी एक बाई आणि तीची घरमालकीण. या ना तय निमित्ताने शांघायमध्ये येऊन राहिलेल्या दोघींची ही कथा. अगदी डायरेक्टली काही गोष्टी न सांगता, दाखवताही दोघींची आयुष्य आपपल्या पद्धतीने बदलत जातात हे चांगलच दाखवलय. शेवटी जिला जायचं नसतम ती घरी जाते आणि जी जायचा विचार करत असते ती जाणं रहित करते. यु नेव्हर नो.. असं काहीसं.. छान चित्रपट..!

Nader and simin: A seperation (Jodaeiye Nadar az simin) - Iran - 2011 - 123 min
Brilliant direction.. हा एकच शब्द सुचतोय मला तरी. अतिशय देखणा अभिनय आणि उत्कृष्ट कथा. चित्रपट बघताना इतकं गुंतायला होतं की डोक्यात इतर काही विचारांना जागाच राहत नाही. चित्रपटाच्या बर्‍याच गोष्टींचे निर्णय प्रेक्षकांवरच सोपवलेत त्यामुळे आपली जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागते. एक घटना, २ कुटुंब. प्रत्येक माणूस आपल्या फायद्यासाठी त्या घटनेचे कसं इंटरप्रीटेशन आणि मॅनिप्युलेशन करतो ते बघताना डायरेक्टर्ला सलाम करावा वाटतो. या घटनेच्या निमित्ताने उच्च आणि कनिष्ट वर्गातली परिस्थिती आणि मानसिकता यांचंही यथार्थ दर्शन होतं. घटना संपून जाते पण आयुष्य चालूच राहतं. आणि हे उर्वरीत सगळं घेऊनच आपण बाहेर पडतो. हॅट्स ऑफ...

Pina - German - 2011 - 100 min
Pina Bousch.. ७०, ८० ची प्रसिद्ध जर्मन नृत्यांगणा. तिच्याच कोरीओग्राफिज वापरुन तिच्या सहकलाकारांनी तिला केलेला हा सलाम. तिच्या सहकलाकारांची तिच्याविषयीची मतं, तिच्या सांगितलेल्या आठवणी आणि डान्सेस यांचं कोलाज म्हणजे हा चित्रपट. डान्सची विशेष आवड असेल तर नक्की पहावा असा..
मेरा कुछ सामान ...
"प्रमाणामध्ये सर्व काही असावे." या प्रमाणात असण्यामुळेच जग सुरळीत चाललय. पण तरीही सगळ्याच गोष्टी प्रमाणात नसतात. जसं की माझा राग... प्रमाणाबाहेर. मर्यादा सोडून. पण तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा आहेत. त्यामुळे तूही कधी कधी चिडतोस. मग म्हणतोस, "माझ्याही ऐकून घेण्याला मर्यादा आहेत. काय गरज आहे हे बोलायची. तुझ्या आजूबाजूच्यांनी काय कमी केलं का तुझ्यासाठी? देन लूक अ‍ॅट पॉसिटीव्ह अ‍ॅन्ड बी हॅपी." पण मला हे ऐकू येत नाही. तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा असल्याचं मला मुळीच आवडलेलं नसतं. आणि मला यावर अमर्याद चिडायचं असतं पण तुझी मर्यादा संपल्याने त्याचं रुपांतर अमर्याद रडण्यात होतं. हे मी तुला कळू देत नाही. आता कध्धीच तुला भेटायचं नाही असं मी ठरवते कारण हे रडणं अमर्याद चालू रहाणार आहे असं मला वाटतं. पण तसं नसतं. काही वेळाने ते संपतं.मला संपणार्‍या गोष्टी आवडत नाहीत. शाळेत असताना प्रत्येक वर्षी वर्ष संपायचं. खूपच्या खूप रडू यायचं तेव्हा. नव्याची ओढ वगैरे काही नाही.
पण अमर्याद असं काही नसतं म्हणे या जगात. जसं पूर्ण चांगलं आणि पूर्ण वाईटही काही नसतं. नथिंग इज ब्लॅक ऑर व्हाईट. एव्हरीथिंग इज ग्रे. पण मला ग्रे आवडत नाही. पण व्हाइट आवडतं. मला ब्लॅकही आवडतं. पण मला ग्रे आवडत नाही. त्यामुळेच कदाचित काहीच ब्लॅक किंवा व्हाईट नाही हे मला जास्त प्रकर्षाने जाणवतं. मला ब्लॅक किंवा व्हाईट ठरवणार्‍यांची अशा वेळी गंमत वाटते मग. मला अमर्याद व्हाईट व्हायचंय. ब्लॅकही चालेल. पण ते शक्य नसावं. तसं नसतं तर गोष्टी बदलल्या नसत्या. आधी भरघोस मिळायचा तो आता तुरळक मिळतो.. लिखाणाला प्रतिसाद. कदाचित आधी मी चांगलं लिहित असेन. पण आता नाही लिहित. म्हणजे माझ्यातल्या चांगलेपणाला मर्यादा होत्या. मला माझ्यातला चांगलेपणा आवडेनासा झालाय. मग आता काय आहे? वाईटपणा? की खरेपणा.. आणि जे काही आहे ते अमर्याद की पुन्हा मर्यादित?
सगळं काही अमर्याद असलं पाहिजे. प्रेम अमर्याद, विरह अमर्याद, रागही तसाच, लोभही तसाच आणि जन्मही तसाच.. जन्म अमर्याद नाही. म्हणून मला अवकाश आवडतो. कारण तो अमर्याद आहे. पण मला पृथ्वी आवडत नाही, तिला मर्यादा आहेत. मला अवकाशाचा भाग व्हायचंय म्हणजे मी ही अमर्याद होईन. मरणाचं अवकाश वेढून असलेल्या जन्मापासून माझी सुटका होईल जेव्हा मी अवकाशाचाच भाग होईन. मी मरणाचा भाग होईन.. भाग नाही, मी मरण होईन.. अमर्याद मरण..!
मेरा कुछ सामान ...
मी लेखक असते तेव्हा,
नाकारत असते मी भाग होणं, कोणत्याही समूहाचा वगैरे..
रचनेच्या नावाखाली नियमांत बांधून, आत्मा मारुन टाकलेल्या प्राणिमात्रांपेक्षा,
माझ्या कल्पनेतले स्वैर, मुक्त आणि उत्फुल्ल जीव,
खुणावत असतात मला...

मी लेखक असते तेव्हा,
मला गरज नसते ईश्वराच्या कृपेची वगैरे..
कारण मी स्वतःच ईश्वर असते मी निर्माण केलेल्या जगाची..
त्याच्या निर्मितीपेक्षा कितीतरी सरस निर्मिती करुन,
मी स्वतःला कधीच सिद्ध केलेलं असतं माझ्या नजरेत..

मी लेखक असते तेव्हा,
मला भासत नाही उणीव कोणत्याच नात्यांची वगैरे..
या जगातल्या आपमतलबी आणि फायद्या तोट्यांची गणितं मांडणार्‍या नात्यांपेक्षा,
माझ्या लेखणीतून फुलणारी,
कितीतरी सुंदर, निखळ आणि नितळ नाती जगत असते मी,
प्रत्येक क्षणी प्रत्येक रुपात...

पण मी लेखक नसते तेव्हा,
कोसळत जातात माझ्यावर या जगात व्यतित केलेले क्षण,
कोसळत जाते मग मीच स्वतःमधून..
गुडघे टेकून हताशपणे..
गदगदत राहते एका आशेची वाट बघत..
ईश्वराला मीच नाकारलेलं असतं,
त्यामुळे बंद असते वाट त्याच्याकडे जायची..
बाहेरचं जग आणि नाती आता भुलवू शकत नाहीत मला..
त्यांच्याकडे जाणं शक्य असूनही पाठ फिरवते मी तिकडे,
आणि मी निर्माण केलेल्या जगात आता मलाच प्रवेश नसतो...
मी लेखक नसते तेव्हा...............
मेरा कुछ सामान ...
"आज गौरी भेटली.."
"काय म्हणाली?"
"अं.. काही नाही. जनरल.."
"तरी पण? इतक्या दिवसांनी भेटलात ना? तिला काही माहिती नसेलच. सांगितलस का मग?"
"हो.. सांगितलं ना."
"मग काय म्हटली?"
"काही नाही. तू ठिक आहेस ना, एवढंच विचारलं."
"बस्स?"
"हो.. स्मित तुला सांगितलं ना, काही नाती नाही बदलत. ती माणसं आपलीच राहतात. तुमच्या आयुष्यात काय झालं काय नाही. तुम्ही काय निर्णय घेतले. ते बरोबर की चूक यावर जोखत राहत नाहीत तुम्हाला. ती तुमची असतात. आणि कायम तुमच्यावर तेवढंच प्रेम करत रहातात."
"हो का? तिला तुझ्या आयुष्याशी काही घेणं देणं नसेल म्हणूनही काही म्हटली नसेल ती."
बहिणीच्या या प्रश्नाने गौरी भेटल्याचा आनंद थोबाडात मारल्यासारखा खर्रकन द्रौपदीच्या चेहर्‍यावरुन उतरला.
"घेणं देणं असतं म्हणजे काय? फक्त घरातल्या लोकांनाच असतं का ते? आणि नक्की काय असतं? माझ्या आयुष्यात जे काही झालं त्याचा तुमच्या आयुष्यावर आणि इमेजवर काय परिणाम होईल याची चिंता. हेच ना?" अजून बरंच काही बोलावसं वाटत होतं पण ती गप्प बसली.
"याही पेक्षा बरंच काहीतरी असतं." रागारागाने एवढं बोलून बहिण निघून गेली मैत्रीणींसोबत सिनेमाला. हिला काही केल्या रडू आवरेना. रडून रडून गाल चिकट वाटायला लागले तशी द्रौपदी उठली. वॉश बेसिनकडे जाऊन चेहर्‍यावर पाणी मारताना सवयीने आरशात पाहिलं. "श्या! च्यायला इतकं रडूनही आपल्या चेहर्‍यात काहीच फरक दिसत नाही. ना डोळे सुजलेले, ना लाल झालेले.. चेहरा थोडासा ओढलेला दिसतोय. बस्स.. तेवढीच काय ती रडल्याची खूण. की आपण रडतच नाही इतके, डोळे सुजण्याइतके वगैरे? आपल्याला कशाचंच मनापासून दु:ख होत नाही का? इतके दगड आहे का आपण?" या विचारासरशी तिला अजून एक हुंदका फुटला. "मुली रडतानाही सुंदर वगैरे दिसतात. झोपल्यावरही. आपण काय्यच्या कायच दिसतो झोपेतून उठल्यावर.. भूतासारखे." या विचाराने अजून एक हुंदका. म्हणजे रडू यायला लागलं की कशावरही रडूच येतं तसं काहीसं झालेलं तिचं. मग तिला रडायचा कंटाळा आला. झोपही चांगलीच आलेली. दु:खी आहे म्हणून झोप नाही आली, रात्र जागून काढली असलं काही व्हायचं नाही तिच्याबाबतीत. सकाळी ऑफीसला जायचं होतंच. त्यामुळे मुकाट्याने अंथरुणावर जाऊन पडली. रडून मन हलकं झालं की सगळा हळवेपणा पण वाहून जायचा शक्यतो तिचा. मग नेहमीप्रमाणे तिने विचार केला, "बास्स. कशाचं एवढं रडू आलं तुला? हे तुझं आयुष्य आहे. तुझ्या मर्जीने. तू निवडलेलं आणि परिणामांची तयारी ठेवत. हे असंच होणार हे माहित नव्हतं का तुला? मग त्यात रडण्यासारखं काय आहे?" विचार करता करता डोळ्यांवर पेंग यायला लागली...
समोर घरचे बसलेत. आणि ही बोलत सुटलिये. म्हणजे अक्षरश: सुटलीये. "कोणत्या समाजाची गोष्ट करता तुम्ही? मी कोणत्याही समाजाचं उत्तरदायित्व नाकारतेय. मी फक्त माझ्या आयुष्याला जबाबदार आहे. मला प्लीज कसलंही लेबल लाऊ नका. मी माणूस म्हणून नाही का जगू शकत? फक्त माणूस म्हणून? आणि माझ्या सुखाच्या व्याख्या दुसर्‍या कोणी का ठरवाव्यात? मला जे वाटतं ते करायला मिळण्यातच माझं सुख आहे. मला मुखवट्यांचा तिरस्कार आहे. मुखवटा न वापरता जगायचं आहे मला. अ‍ॅट एनी कॉस्ट.! तुम्ही काय करताय? केलाच ना इतकी वर्षे संसार? आहात सुखी?" हे असलं काही पुस्तकी बोलतेय ती आणि घरचे ऐकून घेतायेत असं एक स्वप्न ती नेहमीच जागेपणी पहायची. गंगाधर गाडगीळांच्या कथेतली हरलेली माणसं बघतात तशी स्वप्नं. अर्धवट झोपेत कूस बदलली तसे विचारही बदलले. "कसलं आयुष्य जगतोय हे आपण? कसला समाज आहे हा? माणसाला ना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. स्वातंत्र्य आणि संस्कार यांचा ३६ चा आकडा असलेला समाज कसा चालेल? पण म्हणून यातल्या कोणाचंच महत्व कमी होत नाही. स्वातंत्र्याचा संस्कार का नाही होत? आपल्याला कसा समाज हवाय नक्की? सर्वांच्या प्राथमिक गरजा तर पूर्ण व्हायला हव्या. पण कम्युनिझम नको. समाजातली स्पर्धा संपून चालणार नाही. पण ही स्पर्धासुद्धा निकोप हवी. यासाठी सगळे स्पर्धक समजूतदार हवे. मग असा समजूतदार माणूस निर्माण कसा करायचा. आणि माणसाला समजूतदार बनवायचं असेल तर मग त्याच्यातल्या नैसर्गिक उर्मींचं काय? माणूस 'घडवण्याचे' प्रयत्न इतिहासात झालेच पण माणसाच्या माणूसपणाला जास्त किंमत आहे. शेवटी माणूस हे सत्य आहे, समाज ही संकल्पना. आणि माणसाच्या नैसर्गिक उर्मी बदलल्या नाहीच आहेत अनंत काळापासून. माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे. किती सोयिस्कर वाक्य आहे. समूहात असतो तेव्हा बुद्धीमान आणि एकटा असतो तेव्हा प्राणी. माणूस हा फक्त सोयिस्कर जीव आहे.... विचार विचार.. कुठून कुठे. प्रश्नच नुसते. उत्तरं नाहीतच. कधीतरी एकदा सवडीने हे प्रश्न लिहून ठेवले पाहिजेत.. अर्रे... लाईटचं बिल भरायचं राहिलय. उद्या नक्की. ऑफिसचं काम कंटाळावाणं वाटतय हल्ली........"
झोप चढू लागली तसे विचार विस्कळीत होऊ लागले...
सकाळी ऑफिसला पोहचली तेव्हा शाल्मली फोनवरच होती नेहमीप्रमाणे. होणार्‍या नवर्‍याचा फोन. नाजूक आवाजात खुसूखुसू चाललेलं. तसं ते दिवसभरच चालू असतं म्हणा हल्ली.. "झालंय काय या बयेला? डोकं-बिकं गहाण टाकलं की काय हिने?" शाल्मली आणि द्रौपदी गेली ४-५ वर्षे सोबत होत्या. द्रौपदीला त्यांच्या टीममधली ती एकच पोरगी जरा सेंसिबल वाटायची. शाल्मली होतीही तशीच. दिसायला स्मार्ट.. हुशार, कष्टाळू.. उत्तम नृत्य करायची.. तिला स्वतःचा बिझनेस सुरु करायचा होता किंवा डान्स क्लास.. मुख्य म्हणजे तिला तिचे विचार होते. कंपनीत नविन जॉईन झाल्या तेव्हापासून त्यांचं चांगलच जमलं होतं. बराच वेळ गप्पा, चर्चा चालायच्या त्यांच्या. किंबहुना द्रौपदीच्या घटस्फोटानंतरच्या काळात "फार काही वेगळं झालं" अस न जाणवणारी शाल्मलीची एक नजर होती. पहिल्यासारखं सामावून घेणारी. नाहीतर प्रत्येक नजरेत प्रश्न.. आणि एक उपहास पण. हिचा स्वभाव आधीच रोखठोक. त्यामुळे हे व्हायचंच होतं अशा किंवा लव्ह मॅरेज होतं ना, तरी का? असल्या प्रश्नार्थक नजराच वाट्याला आल्या तिच्या. असो.. तर शाल्मली.. अनेक प्रोजेक्ट्स वर काम करताना त्यांनी रात्री जागवल्या होत्या. अनेक इव्हेंटस मध्ये शाल्मलीची हुशारी, समजूतदारपणा दिसला होता. अर्थातच अशा मुलीवर मुलं फिदा न होतील तरच नवल. एका मित्राला तिने हो म्हटलं. त्याच्या घरुन नकार होता. तोच सर्वसामान्य प्रॉब्लेम. इंटरकास्ट. हिच्या घरी कशाचीच कल्पना नव्हती पण ते विरोध करणार नाहीत याची खात्री होती हिला. त्यामुळे आधी तुझ्या घरुन परवानगी मिळव असं सांगितलेलं. पण त्याच्या घरचे ऐकेचनात तेव्हा एकमताने वेगळे झाले दोघे. "चला! ठिकच झालं. फार काही गुंतवणूक नव्हती तर प्रॅक्टिकल निर्णय घेणंच योग्य आहे." द्रौपदी म्हणालेली. कारण शाल्मलीच्या घरुनही वरसंशोधन चालूच होतं. पण आता जे काही चाललेलं तो म्हणजे पूर्णपणे धक्काच होता द्रौपदीसाठी. कालपर्यंत स्त्रियांच्या प्रश्नांवर हिरीरीने मतं मांडणारी, त्यांच्या स्वातंत्र्यावर बोलणारी शाल्मली लग्न ठरल्यावर इतकी बदलली..? तिचं डोकं वाजू लागलं..
"समर्पण हा स्त्रियांचा स्वभावच असतो. आणि आक्रमण पुरुषांचा.."
"आवरा...! असं काही नसतं. समर्पण आणि आक्रमण या भावना दोघांच्यातही असतात आणि सारख्याच असतात. फक्त त्याचं स्वरुप स्थळकाळानुसार बदलतं. तीव्रता कमी जास्त होते. पण भावना तिच. प्रत्येकालाच तीव्र समर्पणाची ओढ असते तशी आक्रमणाची पण. काहीतरी जिंकून घ्यावं आणि कुठेतरी हरुन जावं या भावना बेसिकच आहेत. गंमत म्हणजे या हरण्यामागेही जिंकण्याचा गनिमी कावा असतोच.."
"बरं मग तुला काय म्हणायचं आहे? कदाचित ही तिची जागा असेल समर्पणाची."
"कसं शक्य आहे? फक्त लग्न ठरलं म्हणून आपण कोणाशी नातं कसं निर्माण करु शकतो. कशी काळजी वाटून घेवु शकतो? कसं गोड बोलू शकतो? एखाद्याला न ओळखताच त्याच्यावर प्रेम कसं करणं शक्य आहे?"
"तू केलेलंस ना ओळखून प्रेम. काय झाल?"
"...."
"प्रेम आणि संसार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संसार करताना थोडं सांभाळून घ्यावच लागतं."
"अर्रे पण सांभाळून वगैरे घ्यायचा प्रश्न आलाच कुठे? साधी गोष्ट आहे. ज्याचा मुद्दा बरोबर असेल तो मान्य व्हायला हवा. त्यासाठी तो दोन्ही बाजूंनी नीट लॉजिकली मांडला जायला हवा. काही युक्त्या-प्रयुक्त्या वापरुन आपला मुद्दा मान्य करवुन घेणं यात स्वतःच्या स्वत्वाची हार नाही वाटत का माणसाला? आपण कोणालातरी आपल्या मताप्रमाणे चालायला लावतो हा अहं म्हणजे त्या नात्याची हार नाही का त्या? आणि ज्या नात्यांतला अहं नात्यांपेक्षा महत्वाचा असतो ती नाती बेगडी असतात."
"इतका आदर्शवाद फक्त कल्पनेत असतो. माणसाचा मूळ अहम् च काहीतरी जिंकून घेण्यात दडलेला आहे. तुला स्वतःला जिंकण्यात समाधान आहे. तिला दुसर्‍याला. पण मूळ भावना तिच. माणून बुद्धीमान आहे ना, मग तो बुद्धी वापरुन जिंकायला बघतो. आणि हा प्रकार जीवसाखळी टिकण्याच्या खेळाचा भाग आहे."
"श्शी.. नको असली नाती.."
"खरंच नको?"
"मी नाती नको म्हटलं नाहीये. असली नको म्हटलय."
"हे सगळ्याच नात्यांत होतं. तुझा तूच विचार कर. ज्याला तू सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल नातं वगैरे म्हणतेस त्यात हे नाही होत? इथे बोलणं वापरुन जिंकता, तिथे विचार वापरुन. काय फरक झाला? हे म्हणजे एखाद्या नोकरदाराने वारांगनेला नावं ठेवण्यासारखं झालं? पण दोघांच्यात फरक काय? ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धी विकतो, त्या शरीर विकतात असं उत्तर देण्यातला प्रकार.."
"..."
"कामाला लागा.."
"हं..."
काही दिवसांनी शाल्मलीचं लग्न झालं. अर्थात अतिशय धुमधडाक्यातच. द्रौपदीने तिचा विषय काढूनच टाकला डोक्यातून. शाल्मलीने कंपनीपण सोडली आणि अगदी स्वखुशीने मोठ्या पगारच्या नवर्‍याच्या घरची हाऊसमेकर झाली.
"माणसं जितक्या सहजतेने आयुष्यातून निघून जातात तशाच आठवणीपण गेल्या असत्या तर किती बरं झालं असतं. पण असं होत नाही. दिवस-महिने-वर्षे.. काळ कसा भराभर पुढे जातो. हे असं सगळं चालू असताना अचानक "आपण होतो त्याच जागी आहोत" याची जाणिव होणं फार भयानक असतं.. बघता बघता २ वर्षे निघून गेली. आणि कंपनीतलं डेजिग्नेशन सोडता काहीच बदललं नाही आपल्या आयुष्यात." भर दुपारी लंच च्या वेळेला खिडकीतून बाहेर बघताना असले विचार द्रौपदीच्या डोक्यात पिंगा घालत होते. "किती काय काय बदललं या दोन वर्षांत. बहिणींचं लग्न झालं. सुपरवूमन चा रोल करायला सुरुवातही केली तिने. घरचे आता आपल्यापाशी लग्नाचा विषय काढत नाहीत. शाल्मली ६ महिन्याच्या गोड बाळाची आई झाली. बाळ थोडं मोठं झालं की जॉब करायचा म्हणतेय. गौरी मात्र अजूनही लग्न टाळतेय. कधीतरी कॉलेजमध्ये असताना तिला आवडणार्‍या मुलाने नकार दिला म्हणून अजून एकटी आहे ती? कसं शक्य आहे हे? इतकं प्रेम वगैरे खरंच काही असतं का? पोस्ट ग्रॅज्युअशन, पीएचडी आणि आता नोकरी करायला लागूनही ३ वर्षं झाली तिला. ह्म्म.. परवा वाचलेल्या लेखाविषयी तिच्याशी बोललंच पाहिजे. आई बाळाला दूध पाजताना आणि स्त्री कोणाविषयी तरी रोमँटीक विचार करताना स्त्रवणारा हार्मोन एकच असतो म्हणे. किती वेगळ्या भावना आहेत दोन्ही. आणि जगाच्या दृष्टीने एक अतिशय उदात्त तर दुसरी अजूनही चोरटीच.. पण दोघांमागची प्रेरणा एकच? गौरीसोबत चर्चा करायला खरी मजा येईल. तसंही खूप दिवसात काही भेट नाही." गौरी ला मेसेज टाकायला म्हणून द्रौपदीने फोन हातात घेतला. आणि तेवढ्यात केबिनच्या दारावर टकटक झाली.
"मे आय कम इन?"
दारात सुहास उभा होता. सुहास तिचा कलीग. वर्षच झालेलं कंपनी जॉईन करुन पण प्रोफेशनली जितका चांगला त्याच्यापेक्षा कणभर अधिकच चांगला मित्र झालेला तिचा. तिच्या विचारांची गुंतागुंत शांतपणे ऐकून घेणारा आणि बर्‍याचदा एका झटक्यातच सगळ्या गुंतागुंतीच्या मुळावर घाव घालणारा.
"ओह.. सुहास.. ये ना.. बस..! बोला.. झालं का जेवण?"
"हो.. तू आली नाहीस."
"अं.. हं.. मूड नव्हता.."
"नेहमीप्रमाणेच.."
"..."
"असो.. ऐक.. आज संध्याकाळी क्लायंटला फायनल ड्राफ्ट द्यायचा आहे. आपण परवाचीच आयडीया फायनल करतोय. द्रौपदी यक्षाच्या प्रश्रांना उत्तरं देऊन सगळ्यांची सुटका करते."
"ओके.."
"चल मग.. तुला तर माहिती आहेच बाकी. प्रेझेंटेशन च्या तयारीला लाग.."
"येप.."
---------------------------------------------------------------------------------
"प्रेझेंटेशन भारीच झालं. काय बोललीस तू. अर्थात हे होणारच होतं म्हणा. तुझी द्रौपदी खर्‍या अर्थाने आजच्या स्त्रीला रीप्रेझेंट करते. कॉन्ग्रॅट्स मॅडम.." सुहास अखंड बडबडत होता गाडीत बसल्या बसल्या.
"पण तो यक्ष मूर्ख होता."
"म्हणजे?"
"फिलॉसॉफिकल प्रश्न कायमच सोपे असतात रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांपेक्षा. फिलॉसॉफिकल प्रश्न आणि त्यांची फिलॉसॉफिकल उत्तरं. फारच सोपा मामला आहे हे. रोजच्या जगण्यात यातलं काहीच अ‍ॅप्लिकेबल नसतं."
"तुला याचं कारण माहितेय?"
"तुला माहितेय?"
"हो.. असं होतं कारण प्रश्नांना उत्तरंच नसतात."
"?"
"माणूस प्रश्न कधी सोडवतच नाही. फक्त स्वत:ला सोडवून घेतो त्या प्रश्नांतून. पण आपल्या नशीबाला आलेला यक्षही इतका मूर्ख नसतो. तुझ्या डोक्याला कायम भुंगा लावणारं तुझं मन. त्यातून तुझी सुटका नाही. कोणाचीच नाही. आपण उत्तरं मिळवल्यासारखं करतो. प्रश्न सोडवल्यासारखं करतो पण वास्तविक पाहता यातलं काहीच झालेलं नसतं. त्यामुळे त्या यक्षाचं कधी समाधानही होत नाही आणि तो आपली कधी पाठही सोडत नाही."
"खरंय तुझं. आणि आपल्या सगळ्यांची द्रौपदी झालीये. सगळ्यांचच लग्न लागलंय.. घर, संसार, नोकरी, संस्कार आणि आपली स्वप्नं. या सगळ्यांत मात्र आपलं माणूसपण, स्वातंत्र्य लांब राहिलय. कर्णासारखं. आणि त्याच्या प्राप्तीची इच्छा व्याभिचार ठरतो मग."
"वाहवा.. आता कसं अगदी क्रिअटीव्ह हेड सारखं बोललात मॅडम.."
"बर्र.. असू द्या.."
सुहासशी बोलणं तिथेच थांबलं तरी हीचे विचार थांबेनात. घरापाशी सोडून सुहास गेला. फ्लॅटच्या काळोखात पुन्हा तिचा यक्ष तिला छळू लागला. "शेवटी गौरी काय, मी काय, शाल्मली काय किंवा माझी बहिण काय. येनकेनप्रकारेण सगळ्या द्रौपदीच. पावलोपावली छळणार्‍या यक्षासोबतच आपलं जगणं. प्रश्न सोडवण्याचा रामबाण भारतीय उपाय म्हणजे प्रश्न अस्तित्वातच नसल्याचा दावा करणे. कुपोषणाने मुलं मरतायेत तर कुपोषण नाहीच असं म्हणायचं. वाघांची शिकार होतच नाही असा दावा करायचा. हे म्हणजे सगळ्यात सोयिस्कर. बहिणीसारखं किंवा शाल्मलीसारखं. यांना प्रश्न पडतच नाहीत का? आपल्या आयुष्यासोबत जे काही घडतय, घडत आलय ती सगळी व्यवस्था कधी मान्य केली यांनी काहीच विरोध न करता? कसं जमलं यांना? यांचा हेवा करावा की किव करावी हेच कळत नाही कधी कधी. पण ओढाताण होतेच की यांची पण. गौरीची पण.. सपशेल हरुन जातोय आपण या यक्षापुढे."
विचार करुन संपेनात. उत्तरंही मिळेना आणि शांतताही वाटेना. द्रौपदीने टेबल लँप लावला. कागद पुढे ओढले आणि लिहायला सुरुवात केली, "अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.."
मेरा कुछ सामान ...
हा एक तुकडा तुझा..
आणि हा तुझा..
हा माझा खूप आवडीचा आणि लखलखता,
हा तुझ्याचपाशी असला पाहिजे..
आणि बाकी राहिलेलं सगळं तर आहेच माझं..
नाही का?
.
.
.
.
आता लक्षात येतय, माझं म्हणून जे ठेवलेलं ते फारच कमी होतं,
गहाळ होऊन गेलय कदाचित ते कधीच,
आणि असेलच तर ते बाकी तुकड्याशिवाय पूर्ण होत नाही,
सगळे तुकडे वेगवेगळ्या दिशांना ओढतात आता,
त्यांना जोडून ठेवण्यात दमछाक होते
आणि हाती काहीच लागत नाही..
कोणे एके काळी जन्माला आले तेव्हा एकसंध होते मी कदाचित...
मेरा कुछ सामान ...
तुझ्याविषयी काहीही कलात्मक लिहावं असा तू नाहीस. म्हणजे अजिबातच नाहीस. तरीही तुझ्याविषयी लिहिताना दहादा अडखळतेय मी, कारण तुझ्याविषयी लिहायचं म्हणजे ते तुझ्यासारखंच हवं आणि ते खूप अवघड आहे. का म्हणजे काय? सोपं लिहिणंच तर सगळ्यात अवघड असतं ना... आणि तू खूप सोपा आहेस.. म्हणूनच खूप अवघडदेखिल.. माझ्या शब्दांत मावण्यापलीकडचा..
अगदी पहिल्याने तुला भेटले तेव्हा तुझ्याविषयी काही अंदाज बांधावा इतकाही विचार न करता, "चारचौघांसारखा" असं एक लेबल लावुन तुला मेमरीत ठेऊन टाकलेलं मी. पण तुझ्या सोपेपणाची खोली कळत गेली तसं हे लेबलही गळून गेलं तुझ्यावरुन (इतर अनेक लेबलांप्रमाणेच)
तुझ्यासमोर आयुष्याचं कोणतंही तत्वज्ञान पाजळताना मला खरंतर अतिशय अपराधी वाटत असतं. एखाद्या सुंदर काचेच्या भांड्यावर ओरखडे ओढल्यासारखं. हो.. काचेच्याच.. माणसं मातीचे गोळे असतात आणि मग त्यांचा मातीचा देह बनतो. तू मात्र काचेचाच.. काचेसारखाच.. आतबाहेर निर्मळ, नितळ, पारदर्शक..
"जाऊ दे ना गं.. सोड.. एवढा काय विचार करायचाय? आपणही वागतोच असे कधी कधी. कधी नकळत, कधी जाणूनबुजून. शेवटी आपलीच माणसं आहेत ना ती." इतक्याशा एका वाक्यावर मित्र, मैत्रीणी, नातेवाईकांपासून बॉसपर्यंत कोणाचीही कोणतीही गोष्ट पाठीवर टाकताना पाहिलय मी तुला. असं कसं जमू शकतं कोणाला? आणि तेही अपरिहार्यता म्हणून नव्हे तर समजून घेऊन? वास्तविक पहिल्यांदा तुला असं बोलताना/वागताना पाहिलं तेव्हा "समाजाची खूप गरज असणारा माणूस" हे ही लेबल बहाल केलेलं मी तुला. कदाचित दुबळा. प्रतिकार न करु शकणारा किंवा प्रवाहाविरुद्ध जायला घाबरणारा. पण असं म्हणायला जावं तर असंही नाही. स्वत:ला पटलेल्या मतांवर कोणाचाही विरोध पत्करुन ठाम रहाताना पाहिलय तुला मी.. समोर कितीही मोठा माणूस असला तरीही स्वतःच्या तत्वांवर कधीही तडजोड न करता राहताना पाहिलय. स्वत:च्या मतांवर ठाम रहायचं म्हणजे जगाशी पावलोपावली भांडावं लागतं या मताची पाईक मी. तुला हे असं पहाणं माझ्यासाठी साक्षात्कारापेक्षा कमी नव्हतं. (प्रवाहाच्या विरोधात जायला घाबरणारी आणि म्हणून प्रवाहासोबत असणारी माणसं खरंतर आतून धुमसत असतात आणि ते जाणवल्यावाचून राहत नाही. तुझ्या आतबाहेर भरुन राहिलेली शांतता मात्र नवख्या माणसालाही जाणवेल. हा समजूतदारपणा कुठून आणलास?)  स्वतःच्या मतांवर ठाम राहून आपल्याला विरोध करणार्‍यांवरदेखिल निखळ प्रेम करण्याची कला कुठून मिळालीये तुला? म्हणजे आपल्या विरोधकाचा न पटणारा भाग सोडून बाकी सगळं जाणून घ्यायचं. त्यात काहीतरी आवडण्यासारखं असतंच. पण विरोधकाला विरोधापलीकडे जाणून घेण्याचा विचारच आचरणात उतरवणं केवढं अवघड आहे. (हे असं वागणं किती पुस्तकी वाटतं ना, खासकरुन वाचताना?) पण तुझ्यासोबत राहताना जाणवतं ते किती खरं आहे, किती आतून आलेलं.. अगदी नैसर्गिक.
तुला सांगण्यासाठी प्रत्येकाजवळ काहीतरी असतं. लहानग्या पोरापासून म्हातार्‍यापर्यंत आणि रस्त्यावरच्या स्टॉलवाल्यापासून मॉलमध्ये भेटलेल्या गर्भश्रीमंतांपर्यंत. सगळेच तुला काही ना काही सांगतात. अगदी पहिल्या भेटीत. काही ओळखदेख नसताना. कसं काय? बरं, आता यासाठी लागणारं खूप भारी संभाषणचातुर्य तुझ्याकडे आहे म्हटलं तर असंही नाही. वाक्यात निम्म्या वेळेला तर 'हे','ते' असलं काहीतरी वापरुन वाक्य पूर्ण करावं लागतं तुला. मग ही मोहिनी कुठली होते लोकांवर? तुझ्या गूढ सावळ्या रंगाची की पांढर्‍याशुभ्र हास्याची? कधी कधी वाटतं हात उचलून स्पर्श करावा तुझ्या सावळ्या वर्णाला. चांदीचा वर्ख बोटाला लागतो तसा तुझ्या सावळेपणाही बोटांवर घेता येईल असं वाटतं कधी कधी. बोटांवर घेतलेला तुझा तो रंग बघता बघता अंगभर पसरत जावा, त्याहीपेक्षा खोल आत्म्यापर्यंत झिरपावा. आणि मग तुझ्याच हसण्याचं चांदणं पडून उजळून जावं अंतर्बाह्य. पण नाही. हात पुढे करायला भीती वाटते. आपले हात मातीचे असल्याची जाणिव कशी पुसून टाकायची?
किती किती सोपा समजत होते मी तुला. किती दिवस. हा सगळा चांगुलपणा समजूनही तो केवळ चांगुलपणापर्यंतच मर्यादित होता. इतक्या सरळ माणसांना कशी जाणवेल प्रेमाची खोली? काळजात कळ उठावी अशी तीव्रता? (हेही तुझ्याविषयीचं पुढचं गृहीतक) प्रेम करायला काहीतरी खूप कॉम्लेक्स असावं लागतं अशी काहीतरी धारणा. किंवा जितका माणून गुंतागुंतीचा तितकं प्रेम तीव्र, खोल असले काहीतरी विचार. पण एकही प्रश्न न विचारता इतकं खोल प्रेम कसं करता आलं तुला? कधीच कोणता प्रश्न नाही.. एकही नाही.. हा रुक्मिणीचा वसा कुठे लाभला तुला?
हे एक बरं आहे की तुला जाणिव नाही तुझ्यातल्या नक्षत्रांची. वास्तविक त्यामुळे तू अजूनच उजळून निघतोस. (कधी कधी वाटतं की माणसाला आपल्या असण्याची माहिती नसली की आपण बदलत गेल्याची पण जाणिव होत नाही. आणि मग सगळंच हरवत जातं. पण नाही. हे असले विचार तुझ्यापुढे व्यर्थ आहेत. तुझ्याबाबत हे असं काहीही होणार नाही याची पूर्ण खात्री आहे मला.) कारण तू नुसताच निरागस नाहीस. आणि सगळ्यांसोबत संबंध नीट ठेवणार नुसताच डिप्लोमॅटपण नाहीस. तू असा उमजत जाताना माझ्या मनाच्या किती बेड्या गळून गेल्यात हे मी नाही सांगू शकत. विश्वास गमावणं ही जगात सगळ्यात वाईट गोष्ट असेल कदाचित आणि विश्वास परत येणं ही तितकीच सुंदर.
नातं आणि त्यातली माणसं यांचं नातं काय असतं? कदाचित नातं जास्त महत्वाचं असतं माणसांपेक्षा. पण आपलं नातं तुझ्यापेक्षा महत्वाचं कधीच नाही होऊ शकणार. आपण असू नसू, हे नातं असेल नसेल, भेटी होतील, न होतील.. पण तू असला पाहिजेस. तू आहेस तस्साच तू असला पाहिजेस. तसाच तू राहिला पाहिजेस. मला माझ्याच बेड्यांतून मुक्त करुन तू दाखवलेलं नक्षत्रांनी भरलेलं आभाळ कायमच माझ्या सोबतीला राहिल. आणि तूही असाच रहा.. नक्षत्र फुलवत...
मेरा कुछ सामान ...
लावायचा होता ना तुला आपल्या नात्याचा थांग..
आणि माझ्या मते ते अथांग होतं..
कसे वेडे हट्ट तरी असतात..
कसले वेडे दिवस...
कशाला हवं असायचं तुला विश्लेषण करायला प्रत्येक गोष्टीचं?
पाण्यात उतरण्या आधीच तळाचा अंदाज घ्यायची तुझी घाई,
आणि ते छान उतरुन अनुभवायची माझी पद्धत..
कधी कधी विश्लेषण करण्याच्या नादात विसरुन जातो ना आपण अनुभवणं?
समजलं नाही का तुला हे?
की अनुभवण्याच्या नादात साध्या गोष्टीही लक्षात यायच्या राहून जातात,
हे मला समजलं नाही..
जे असेल ते..
थोडी वाट पहायला हवी होती का आपण?
उशीरा का होईना सापडला असताच की आपल्याला तळ, आपल्या नात्याचा..
फक्त पाणी गढूळायला नको होतं रे..!