मेरा कुछ सामान ...
सकाळी जाग आली तेव्हा चांगलीच थंडी वाजत होती..एकशे एकोणीस तास झोपलं तरी झोप झाल्यासारखी वाटत नाही हल्ली.... चारही बाजूंनी चादर घट्ट लपेटून घेतली तरी शिवाजी महाराजांच्या गोष्टीतल्याप्रमाणे थंडी चोरपावलांनी की कशी ते आत शिरतच होती...अजुनी फक्त रात्रीचे २ च वाजलेले असावेत अशी विनंती श्री शंकराला तेवीस वेळा करून मगच घड्याळ पाहिलं तरी ७ वाजलेलेच.. आमचं हे नेहमी असंच असतं.. पक्ष्यांचा कलाकलाट नेहमी छान वाटत असला तरी त्यांनी झोपमोड केली की आम्हाला खूप राग येतो.. पहाटे पहाटे ते काय सांगत असतात? "उठा उठा.. कामाला लागा.." की "आम्हाला इतकी थंडी वाजत असताना असे दुष्टासारखे गुरफटून झोपू नका.." जे असेल ते... पण बाहेर पक्षी म्याड सारखे गोंधळ करत होते तरी सूर्य देव अजुनी उगवत नव्हते...
पुण्यात आता खरच थंडी पडायला लागली आहे..corporation वाले नळातून बर्फाचं पाणी सोडतात आणि चहाचा कप निवांत हातात घेवून gallery त येवून बसेपर्यंतच तो निऊन जातो...रस्त्यावरून मजेत फिरताना अचानकच पाय अडखळून धप्पकन पडावं तशी थंडी पडली आहे.. अचानक आणि जोरदार...थंडी बाईंनी येवून सगळ्यांना एकदम गारठून टाकल आहे अस म्हणायला पूर्णच वाव आहे..
सकाळी सकाळी उठून gallery त आले तेव्हा दुपट्यात गुंडाळलेलं बाळ झोपेत चाळवतं तशी कॉलनी धुक्याच्या चादरीतून जरा जरा हालचाल करू लागली होती..मस्त मोठ्ठी जांभई दिली तर तोंडातून धूरच धूर आला.. म्हणजे कडक थंडीत हाsss केल्यावर तोंडातून येतो तो धूर.. आम्हाला एकदम हिमालयात गेल्यासारखा वाटायला लागलं.. तिथे असंच होतं ते मी कोणत्याकी सिनेमात नीटच पाहिलेलं.. आपलं घर अचानक एका रात्रीत उचलून कोणी हिमालयावर आणून ठेवलंय असं वाटायला लागलं.. आजूबाजूला कुठे बर्फ पडलेला दिसतोय का ते मी पाहून घेतलं...घर काय हिमालयात आलं नव्हतं सोडा.. थंडीच हिमालयातून इकडे आली असणार.. मग त्या आनंदात आम्ही तसाच धूर काढत १०-१५ मि. घालवली.. मग जे झालं ते झालं.. म्हणजे आवरायला उशीर. बस चुकली वगैरे..
सारखं सारखं श्वास घेतल्यामुळे बाहेरची थंड हवा आत जाऊन सगळं गोठून जाणार आहे असं काहीतरी म्याडसारखं वाटत होतं सकाळी.. हे असं मी म्यावला सांगायला गेले तर त्याने उलट मलाच वेड्यात काढलं... थंडी कशी छान असते आणि अजुनी तितकीशी थंडी पडली नाहीये, त्याच्या गावाला याच्यापेक्षा जास्त थंडी कशी पडते असं काहीतरी तो बडबडायला लागल्यावर मी ऐकायचंच बंद केलं.. त्याच्या जागी मला मिशा फेंदारलेला, कोवळ्या उन्हात स्वतःभोवती शेपूट लपेटून ऊन खात बसलेला आणि स्वेटर, शाल, मफलर घालून हिंडणार्‍या लोकांकडे तुच्छतेने बघणारा गुबगुबीत बोकाच दिसायला लागला..तसलाच आहे तो.. माजोर्डा.. उगीच नाही मी त्याला म्याव म्हणत...
लंपनच्या नजरेतून सकाळ बघता बघता मला स्वतःच्या लंपन असलेल्या वयाची आठवण झाली...
थंडीच्या दिवसात सकाळच्या शाळेला निघालेली बिट्टी पोरं-पोरी पहिल्या की आपोआपच आपल्या लहानपणीच्या थंडीच्या दिवसातल्या शाळेच्या आठवणी यायला लागतात, थंडीची चाहूल लागली की कपाटातून बाहेर पडणारे स्वेटर.. त्यांचा तो उबदार वास.. घरातल्या गोधडीचा वास, शाळेला जाताना असेच कुठून कुठून येणारे शेकोटीच्या धुराचे वास, थंडी आणि सुट्टी घेवून येणाऱ्या दिवाळीचा वास.. आणि या सगळ्या वासांना अजूनच वेगळं बनवणारा थंडीचा स्वतःचा एक वास.. थंडी हा ऋतू नसून एक वासच आहे असं वाटायला लागतं...
याच दिवसात शाळेत क्रीडा महोत्सव व्हायचा.. आम्ही म्हणजे खेळ बघणार नंबर एक.. त्यामुळे सकाळी शाळेत खेळाडूंच्या आधी हजर...तंतोतंत.. वर्गात कायम मागे बसून दंगा करणारी आणि शिक्षकांचा मार खाणारी पोरं-पोरी खेळात मात्र पुढे असायची... त्यावेळी त्यांना बक्षीस मिळालं की आपल्याच वर्गातली मुलं म्हणून त्यांचा खूप अभिमान वाटायचा... मग शाळेचं ग्यादरिंग, नाट्यस्पर्धा असलं काही काही यायचं... गंधर्व च्या गाण्याच्या परीक्षा पण तेव्हाच असायच्या.. त्या गाण्यांचे केलेले रियाझ, घोटून घेतलेले राग, नाटकांच्या जीव तोडून केलेल्या तालमी, घोकून घोकून बसवलेले संवाद, नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना चहा आणि पार्ले च्या बिस्किटांचा मिळणारा अल्पोपहार.. त्या चहाने थंडी कुठल्या कुठे पळून जायची.. आणि तेव्हाच्या त्या पार्ले ची सर अमृताला पण येणार नाही.. धुकं दाट होत जायचं तसा तालमींना पण रंग चढायचा.. तो रंग म्हणजे थंडीचाच रंग असल्यासारखं वाटायचं.. मग एकदाच सगळ पार पडून बक्षिस समारंभ व्हायचा... त्यात कोण कोण वक्ते येवुन भाषण करुन जायचे... व्यासपीठावर जावुन बक्षिस घेताना खूपच्या खूप मोठ झाल्यासारख वटायचं..हे सगळ होइपर्यंत नऊमाही परीक्षा आलेली असायची... थंडीबरोबर आलेली सगळी मजा थंडीबरोबरच संपून जायची...
तर असली ती थंडी... सगळ गोठवणारी पण गोठलेल्या आठवणींची ऊब सोबत घेवून येणारी..
तुम्हा सर्वांना थंडीच्या खूप खूप शुभेच्छा...!!
मेरा कुछ सामान ...
गुलझारच मेरा कुछ सामान ऐकत होते.. 
अगदी तितका आणि तसा दूर नसलास तरीही तुझ्या दूर असण्याची जाणीव पुन्हा एकदा चमकून गेली...

असं काही ऐकलं की सरसरून आठवण येते तुझी, अगदी हृदयाच्या तळापासून, खोलवरून, अतिशय आर्त हाक मारावीशी वाटते तुला अशा वेळी.. किव्वा मारूही नये..कदाचित तुझ्यापर्यंत आधीच पोहचली असेल ती... की तू स्वतःच हाक मारतो आहेस मला?
न संपणारे प्रश्न घेवून, न संपणाऱ्या वाटेवर, न संपणारी तुझी सोबत घेवून मी चालत राहते... रहमान च्या धून मधले शब्द शोधताना किव्वा गुलझार च्या शब्दातली धून शोधताना, Bergman च्या संवादांचे तळ गवसताना किव्वा सह्याद्रीची उंची जोखताना तुझ्या सोबतीने अनोखळी वाटादेखील जन्मांतरीच्या ओळखीने हसल्या होत्या..आणि आज अगदी शहरातली, पायाखालची वाट देखील ओळख दाखवत नाहीये... अर्थात तेही बरंच म्हणा कधी कधी....खूप हट्टाने दूर पाठवलं तुला मी... कशासाठी? काय तपासून पाहण्यासाठी? तू सोबत असताना तुझ्या अस्तित्वाची किनार जाणूनबुजून अमान्य करणारा माझा अहं, आज तू दूर गेल्यावर मात्र तुझा जपून ठेवलेला प्रत्येक श्वास स्वतःवर सजवून पाहतोय... तुझ्या रंगात नटून, निरखून बघतोय स्वतःलाच...तू असताना मुद्दाम तू सांगशील त्या विरुद्ध वागणारी मी माझ्याच नकळत तू सांगायचास तशी वागू लागते... तसा विचार करू लागते..इतकं कि मलाच प्रश्न पडतो, मी तुझी जास्त की माझी जास्त? मी तुझ्यासारखा विचार करते की तू माझ्यासारखा? माझ्यातून तू की तुझ्यातून मी? या वर्तुळाचा आरंभ शोधून थकून जाते मी...मग अशा वेळी पु.शी.रेगेंची "साऊ" येते मदतीला... तिची वाक्यं कानात घुमू लागतात.. "मी तुम्हाला आपलंसं करून घेतलं आहे, मला तुमचंस करून घेतलं आहे... या देवघेवीने आपण अधिक व्हायचं की स्वतःभोवती अजून नवे बांध घालायचे?"शेवटी सगळ कळत असूनही आज तू दूर आहेस हेच खरं...
आज साऊची आठवण येतेय... ती पण माझ्यासारखीच वाट पाहत होती म्हणून की त्याने पण यायला असाच वेळ घेतला म्हणून? या वाटांना मी पूर्णच अनोळखी होण्याआधी परत ये.. वाट पाहतेय...