Showing posts with label ललित... Show all posts
Showing posts with label ललित... Show all posts
मेरा कुछ सामान ...
कृष्ण होण्याची ओढ असणं सहाजिक आहे, स्वाभाविक आहे. कारण ते पूर्णत्व आहे. विलोभनीय, आकर्षक, मोहवणारं, प्रत्येकाला आपलसं वाटून कधीच कोणाचं नसणारं पूर्णत्व! कृष्ण होण्याचा प्रवासही नैसर्गिक प्रवास आहे. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे. एक एक पाऊल रोज स्वतःला घडवत, संघर्ष करत त्या वाटेवर चालत रहाणं.. हे सगळं प्रवाहाच्या दिशेनेच जाणं आहे.
अनय होणं अवघड आहे. कारण अनय होण्याची वाट कोणी आपणहून निवडत नाही. अनय होण्याची ओढ वाटणं नैसर्गिक नाही. त्याच्या दु:खाचं आकर्षण वाटेल कदाचित पण अनय होण्याचा प्रवास कोणी स्वतःहून निवडणं अशक्यच! आणि लादल्या गेलेल्या गोष्टीइतका त्याचा संघर्षही त्रासदायकच. रोज उठून स्वतःमध्ये ती शक्ती, ते धैर्य निर्माण करणं - समोरच्याच्या डोळ्यात दुसर्‍याच कोणाचंतरी विश्व पहायची.. ज्याचं विश्व आपल्या डोळ्यांत आहे.. ज्याच्या स्वप्नांनी आपले डोळे भरुन गेलेत. हे तो करु शकला म्हणून अनय चं कौतुक. त्याने रोज अंत पाहणार्‍या गोष्टीला सामोरं जाण्याची शक्ती रोज विनातक्रार निर्माण केली म्हणून. पण तो पुरुष होता हे ही त्याच्या कौतुकाचं कारण आहे. बाई करत राहिलीच असती तिच्या नवर्‍यावर प्रेम, त्याच्या डोळ्यात तिच्या स्वप्नांना जागा नसती तरी. रोज मरायची शक्ती गोळा करुनच रोज स्वतःला जन्माला घालणं अपेक्षितच असतं बायकांकडून. अनय चं अनय होणं म्हणूनच वेगळं. कारण ते अनपेक्षितच होतं.
सगळ्यांनाच आपलंसं वाटून शेवटी त्याचं कोणाचंच नसणं राधेला उशीरा का होईना समजलं असावं. पण तोवर तरी तिला मिळालेले आयुष्य उधळून टाकावेत असे त्याच्यासोबतचे क्षण. आपल्या डोळ्यांत जसं त्याचं विश्व आहे तसंच त्याच्याही डोळ्यांत आपलंच विश्व आहे असं वाटण्याचे भाबडे क्षण. तेवढ्या संचितावर काढता येत असावं आयुष्य बहुधा. पण अनयाच्या वाट्याला तर ते खोटे भाबडे क्षण पण नव्हते, तरी त्याच्या नजरेत कायम तीच राहिली. तिचंच विश्व. तिचीच स्वप्न. 'ती'च बनून राहिला तो तिच्या अस्तित्वाभोवती. तिच्या अस्तित्वात कोणतीही भेसळ करण्याचा प्रयत्न न करता तिला ती राहू दिलं आणि स्वतः बनून गेला तिच्या रंगाचा. जसं प्रेम तिने केलेलं कृष्णावर तसंच अनय ने राधेवर आणि मग राधेला जितका कृष्ण मिळाला तितकीही ती त्याला न मिळाल्याने तिच्याहीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन अनय झाला तो.
अनयच्या दु:खाचं आकर्षण वाटणारा तू एकटा नाहीस. पण तू कधीच अनय होऊ शकणार नाहीस. होणारच नाहीस. कारण राधा बनता येण्याची पूर्वअट आहे त्यासाठी. तू अनय होऊ शकत नाहीस कारण तुला कृष्ण मिळाला तरी तू कधीच राधा होऊ शकत नाहीस.
मेरा कुछ सामान ...
"मुद्दते गुजरी तेरी याद भी न आई हमें, और हम भूल गए हो तुझे ऐसा भी नहीं" माहितेय का हा शेर? तुला कुठून माहिती असणार म्हणा, पाषाणहृदयी आहेस तू. पण तुझ्या पाषाणहृदयाला पाझर फुटताना पाहत आलेय मी आठवतंय तेव्हापासून. मला खात्री आहे तुला हे सगळं माहिती असणार, कळत असणार. कसला भारी आहे ना हा शेर.! तसं पहायला गेलं तर तुझी आवर्जुन आठवण काढल्याला काळ लोटला. पण तुला विसरुन गेलेय असंही नाहीये. इतकी तुझ्या अस्तित्वाची माझ्या जगण्यात एकरुप व्हावी. तुझं माझं नातं असंच आहे. आणि माझंही तुझ्यावर असंच प्रेम आहे. प्रेम, कदाचित प्रेम नाही म्हणता येणार. पण प्रेमासारखं काहीतरी... उत्कट आकर्षण, अनिवार ओढ, खोल आत्मियता आणि तुझ्या माझ्या सहवासाच्या असंख्य आठवणी.. यातून निर्माण होणारं नातं कोणतं? प्रेमाचंच ना? मग प्रेमच म्हणूया. माझं तुझ्यावर खूप खूप खूप अगदी खूप प्रेम आहे. आणि तुझ्यावर अनेकानेक प्रकारे प्रेम करता येतं हे तर मला फारच प्रिय आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या भावनांचा स्पेक्ट्रम फारच मर्यादित असतो. चार पाच चांगल्या आणि चार पाच  वाईट भावनांच्या पलिकडे आपण काही भोगतच नाही. पण हे मर्यादित विश्वाच्या मर्यादित चौकटीसाठी ठिक आहे. तुला कुठं अशी काही चौकट आहे? तुझं असणंच माझ्यासाठी अफाट आहे. आणि मग त्याच प्रमाणात भावनांचा पटही विस्तारतो तुझा विचार करताना. तीन मूळ रंग... त्यांच्या मिश्रणाने तयार होणारे दुय्यम रंग आणि मग त्यांच्याही मिश्रणाने तयार होणाऱ्या अगणित रंगछटा... असा भावनांचा पसारा तयार होतो तुझ्यासाठी मनात... अबिदा परवीन गात असते, "तू मिला भी हैं तू जुदा भी हैं तेरा क्या कहना... तू सनम भी हैँ तू खुदा भी हैं तेरा क्या कहना.." तेव्हा डोळ्यांसमोर तू असतोस. कुसुमाग्रज लिहितात " तव शरिरातून कधी पेटती, लाल किरमिजी हजार ज्योती...
त्यात मिळाया पतंग होतो, परि नसे ते काम वगैरे!"
तेव्हा समोर तू येतोस. "दूरीयां ऐसीभी होंगी कभी सोचा न था, वो मेरे सामने था पर मेरा ना था" हे ऐकलं की तू आठवतोस आणि तरीही बराच काळ तू आठवलेला नसतोस हे खरंय.!
तुला बघुन वेडावलेलं, तुला असं भोगताना मला पिसावलेलं पाहून हसत असशील ना तू मनातल्या मनात? नक्कीच हसत असणार. तुझ्या घनगंभीर मुखवट्यामागे कितीही लपवलंस तरी कळतंच मला ते.
तुला माहितेय तुझ्यासोबत, तुझ्याजवळ असताना मला काय ऐकायला आवडतं? रहमान. रहमानच.. त्याची बरीचशी गाणी ना अशी ओलीचिंब करतात ऐकणार्याला. जणू काही त्या गाण्यांना स्वतःचा असा पाऊस असावा. आणि मग फिरत रहायचं गर्दीत स्वतःलाच फक्त  भिजवणारा, स्वतःपुरता, रहमानच्या सूरांचा पाऊस घेऊन. पण या अशा ओल्याचिंब भिजण्याची खरी मजा फक्त तुझ्यासोबत, तू जवळ असतानाच येते. तुला मला गच्च ओला करणारा आभाळातला पाऊस आणि मनाला चिंब करणारा रहमानचा पाऊस. बस्स! अजून काय मागावं आयुष्याकडे?
आयुष्याकडे मागण्यावरुन आठवलं, तुला माहितेय का गुरूदत्त चा तो प्यासा मधला डायलॉग? तो म्हणतो "मैं यहॉंसे बहोत दूर जा रहा हुं गुलाब." ती विचारते, "कहॉ", तो म्हणतो, " जहांसे मुझे फिर दूर ना जाना पडे." तू माझ्यासाठी ते ठिकाण आहेस. आयुष्याकडे मागावं असं काही उरत नाही तूझ्याजवळ आल्यावर. सगळे प्रश्न विरतात. सगळ्या वाटा थांबतात. थकून जाते रे मी पण बरेचदा. तूही दिसत नाहीस महिनोन् महिने.. आणि मी पण वावरत राहते शहाण्यांच्या जगात.. शोधत असते काहितरी, कधी परमेश्वराला कधी स्वतःला..पळत असते बरेचदा, कधी जगापासून कधी स्वतःपासुन.. काहीच सापडत नाही आणि कुठंच पोहोचत नाही. थकते.. चिडते.. रडते.. पुन्हा वावरते निर्विकार चेहऱ्याने.. आणि मग तू भेटतोस. न ठरवता, न सांगता.. अचानक कोणत्यातरी प्रवासाच्या शीणभरल्या वाटेवर.. अचानक समोर येतोस. खूप काळ भावनांचा स्पर्शही न झालेल्या मला जाणीव होते मन असल्याची. किती बोलू अन् किती नको असं होतं मला. तुला किती बघू डोळेभरुन अन् किती नको असं वाटतं. माझ्या कवेत न मावणार्या तुझ्या भरदार रुपाला घट्ट मिठी मारावीशी वाटते. पण असं कुठं करता येतं कितीही वाटलं तरी? तसं पहायला गेलं तर खूप अंतर आहे तुझ्या माझ्यात. मग उगीच समाधान मानायचं तुझ्या ओझरत्या स्पर्शावर, तू दिसशील तेवढ्या रुपावर.. गोंजारत रहायचं तुला नजरेनं.. अतृप्तच परतायचं तुझ्या प्रत्येक भेटीनंतर..
पण एकदा ना मी अशी येणार आहे की परतणारच नाही तुझ्याकडून! बस्स, एकदा तुला असं भेटायचंय ना, की माझं आस्तित्व वेगळं नको उरायला तुझ्यापासुन. झोकुन द्यायचंय तुझ्या मिठीत स्वतःला.. सामावुन जायचंय तुझ्या रुपात.. विरुन जायचंय तुझ्यात.. मी ना एकदा येणार आहे तुझ्याकडे न परतण्यासाठी.. Mi amor.. सह्याद्री... एकदा येणार आहे मी तुझ्याकडे अशी...!
मेरा कुछ सामान ...
एक होतं अरण्य. त्या अरण्यात एक झाड होतं.. खरंतर फुलझाड... इतरांपेक्षा सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलं येणारं.. ऋतूचक्राच्या अखंड चाललेल्या प्रवासात टप्याटप्याला फुलांनी मोहरणारं.. बहराच्या ऋतूची वाट बघणारं.. बहराची कारणं शोधणारं.. आसुसून बहरणारं..
दरवर्षी पाऊस पडायचा.. मग शरदाचं चांदणं न्हाऊ घालायचं.. शिशिर यायचा पानगळ घेऊन.. आणि वसंताच्या चाहुलीबरोबरच झाड भरुन जायचं फुलांनी.. त्याच्या खास सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलांनी.. हळू हळू गळून जायची सगळी पानं.. उरायची ती फक्त फुलंच.. अशा वेळी झाडाचा रुबाब बघण्यासारखा असायचा.. समाधानाने अजूनच फुलून यायचं झाडाचं मन अशा वेळी..
मग एकदा काय झालं, पानं नावालाही न उरलेलं आणि फुलांनी ओसंडून वाहणार्‍या त्या रुपाचं प्रतिबिंब त्या झाडाला पहायला मिळालं.. झाड थक्क... ते सुंदर होतं याची त्यालाही कल्पना होतीच, आजूबाजूच्या झाडांच्या डोळ्यात दिसायचं ते, पण त्याच्या नजरेला पडलेलं ते रुप कल्पनातीत होतं.. झालं.. खुळावलं.. वेडावलं ते झाड आपल्या रुपाला.. प्रेमात पडलं स्वतःच्याच त्या प्रतिबिंबाच्या.. बस्स.. त्याने ठरवून टाकलं की आता यातलं एकही फूल गळू द्यायचं नाही..झडू द्यायचं नाही.. बाकीच्या झाडांनी त्याला परोपरीने समजाऊन पाहिलं.. "बाबा रे.. असं नसतं करायचं.. ऋतूचक्रानुसार सुरुच राहणार, बहर पानगळ.. नुसत्या ऋतूंचं नाही तर जीवनाचं चक्र आहे हे.. मोडायचा प्रयत्न करु नकोस.. चालत रहा ठरलेल्या वाटेवरुन.. नाहीतर पस्तावशील.." पण नाही.. झाडाला कुठून पटायला हे तत्वज्ञान.. स्वतःच्या बहराच्या प्रेमात होतं ना ते!
फुलं जगवण्याच्या नादात मग नवी पालवी फुटूच दिली नाही त्याने. पानांअभावी जीवनरस बनायचा थांबला..तरी त्याला तमा नव्हती.. आपल्यात शिल्लक असलेल्या जीवनरसाच्या अखेरच्या थेंबापर्यंत फुलांना जपत राहिलं.. जगवत राहिलं.. आणि शेवटी एके दिवशी मरुन गेलं..

तरी मी कायम म्हणत असते, कितीही सुंदर दिसला तरी दु:खाचा हा असा जीवघेणा सोस बरा नव्हे...
मेरा कुछ सामान ...
तशी ती पहिल्यापासूनच हळवी.. बर्‍यापैकी स्वतःत राहणारी, तरी संवेदनशील.. नक्की कधी हे नाही सांगता येणार पण खूप आधीची आठवण म्हणजे हृदयनाथांचे आर्त स्वर लेवून भेटायला आलेल्या ग्रेसच्या गहिर्‍या निळ्या दु:खाची.. प्रेमातच पडली ती त्या वेदनेच्या.. जसजसे वय, समज आणि जाणिवा वाढत गेल्या तसतसे ह्या दु:खाच्या वाटेवरचे इतर प्रवासीही सोबती झाले.. साहिरचं चिरविरहाचं दु:ख, गुलजा़रचं चंद्रमौळी दु:ख, गुर्टूबाईंचं ते असं आर्त स्वरात "कदर न जाने मोरा सैया" म्हणणं, गुलाम अलींचं मनाचा तळ ढवळणारं "चुपके चुपके..", आमोणकरांची भैरवी, मेहदी हसनने गायलेला मिर्झा गालि़ब.. एकेक प्रवासी भेटत गेले तसं तिचं ते दु:खात विरघळून जाण्याचं वेड पण वाढत गेलं.. ती रंगीबेरंगी राजवर्खी, घनगूढ लोभसवाणी, बघता बघता मनाच्या आरपार जाणारी वेदना जगण्याचा तिने ध्यास घेतला. वेड्यासारखी ती शोधत राहिली ती आयुष्याच्या प्रत्येक क्षणात दु:खाचे कवडसे, मागत राहिली आयुष्याकडे पंचप्राण आकर्षून घेणारं दु:ख.. किंवा असं दु:ख ओंजळीत घालू शकेल असा कोणीतरी..
कधीतरी एकदा जागी झाली या वेडातून तर ओंजळीत उरलेले फक्त ओबडधोबड, कुरुप दगड-गोटे..त्याक्षणी तिला जाणवलं, पदरी पडलेल्या या भयानक दु:खापासून आता सुटका नाही आणि या दगडांना तासून, घडवून सुबक मूर्ती बनवाव्या अशी आपली प्रतिभाही नाही...
"खोटे... खोटे... खोटे..." ती स्वतःशीच म्हणाली..
"खोटे असतात सगळेच कलाकार.. का?.. का म्हणून वेदना अशी सजवून, मढवून समोर ठेवतात आपल्या? आयुष्य आपल्याकडे जे उघडनागडं दु:ख फेकतं, ते कुठे असं सुंदर असतं? आणि शब्दांची वस्त्र चढवून, सुरांची झालर लाऊन समोर येणार्‍या दु:खाच्या या फसव्या सौंदर्याला बळी पडतो आपण मूर्खासारखे.. जितकी उंची वस्त्र, जितकी भरजरी झालर, तितके जास्त शरण जातो त्याला.. तितके जास्त ओढले जातो त्याच्या आकर्षणात... पण आता खूप झालं.. बास्स.. अजून नाही.. परत नाही.. आता साक्षात रतीमदनाचं रुप घेऊन जरी वेदना समोर उभी राहिली तरी तिला भुलायचं नाही.." ती मनोमन ठरवून टाकते..
इतक्यात ब्रह्मपुत्रेकाठच्या उत्कट स्वरात बांधलेला 'गुलजार', लताच्या आवाजात कानी येतो..
 "ओ मोरे चंद्रमा, तोरी चांदनी अंग जलायें..
तोरी उंची अटारी, मैने पंख लिये कटवायें.."
आणि स्वत:च्याही नकळत त्या जीवघेण्या वेदनेला ती पुन्हा शरण जाऊ लागते....
मेरा कुछ सामान ...
"छ्या.. आपण नसतं बुवा असं जग बनवलं..."

नेहमीप्रमाणे तो स्वतःशीच विचार करत बसलेला.. हे त्याचं नेहमीचंच होतं. जग जितकं दिसायचं तेवढीच त्यातली विषमता आणि विरोधाभास अस्वस्थ करत रहायचा त्याला. आणि मग आपल्या मनात आपल्याला हवी तशी सृष्टी निर्माण करत रहाणं छंद बनून गेलेला त्याचा.

"म्हणजे, माणसाच्या आयुष्यात आनंद-दु:ख, राग-लोभ, आशा-निराशा सगळं काही हवं, पण इतकं एक्स्ट्रीम काही नको. इतकं पराकोटीचं दैन्य नको, इतका आंधळा सूड नको, ऐश्वर्याची पराकाष्ठा नको आणि असा दु:खाचा गर्ता पण नको.. थोडा फार बॅलन्स हवाच हवा. का म्हणून देवाला असं सुचलं असेल? का त्याला इतकी टोकाची विषमता निर्माण करावी वाटली असेल? आपण जग बनवलं असतं तर असं तरी नक्कीच बनवलं नसतं.."

त्याच्या विचारांची साखळी चालूच होती.

"मग तू बनवून पहा जग.."

कोणाच्यातरी आवाजाने त्याची तंद्री भंग पावली.

"कोण ते.."

"तोच.. ज्याचा तू आत्ता विचार करत होतास.. देव.. सृष्टीचा निर्माता.."

"बरं झालं भेटलास. मला आधी सांग तू जग हे असं का बनवलंस? मला मान्य आहे माणसाच्या आयुष्याचं चित्र पूर्ण करायला सगळ्या चांगल्या वाईटाची गरज आहे पण इतकी पराकोटीची टोकं का बनवलीस तू? मध्यम मार्ग का नाही निवडलास?"

देव किंचितसा हसला, म्हणाला, "अर्रे म्हणून तर मी आलोय तुला भेटायला. बघावं तेव्हा तू हाच विचार करत असतोस की तू असं निर्माण केलं असतंस, तसं निर्माण केलं असतंस. तर आज म्हटलं तुला संधी देऊनच टाकावी. आता तूच निर्माण कर तुला हवं तसं जग."

देवाचं बोलणं ऐकतच राहिला तो. काही वेळ तर त्याचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. पण नक्की कळालं तेव्हा मात्र चांगलाच खूष झाला तो.

"हो तर.. नक्कीच.. का नाही. मी तुला बनवूनच दाखवतो समतोल अशी प्रतिसृष्टी."

देव पुन्हा हसला आणि मग गंभीरपण अर्घ्य त्याचा हातावर सोडून त्याने त्याची निर्मितीक्षमता त्याला दिली. अर्थात तो काही जगात दु:ख, राग, लोभ नसावेतच या मताचा नव्हता. आयुष्य पूर्ण व्हायला सगळं हवंच हे त्याला ही माहितीच होतं. त्याप्रमाणे त्याने माणूस बनवायला घेतला. सगळ्या चांगल्या गुणांसोबत त्याने वाईट गोष्टीही घातल्या. सर्व काही प्रमाणात. काही कमी नाही की जास्त नाही. आणि बघता बघता सगळ्या सृष्टीचा डोलारा उभा राहिला. माणसाला - त्याच्या निर्मितीला त्याच्या कर्मावर सोडून तो आणि देव दोघेही नवीन जगाच्या उलाढाली बघण्यात व्यस्त झाले. त्याला खात्री होती, सगळ्या गोष्टी प्रमाणात घातल्यामुळे अशा टोकाच्या गोष्टी घडणारच नाहीत त्याच्या जगात.

पण मग कळलंच नाही कुठे कसं आणि काय झालं? काही समजायच्या आत तो एका विरोधाभासाने भरलेल्या आणि टोकाच्या भावना आणि गुंतागुंत असलेल्या जगाचा निर्माता बनला होता. गोंधळून तो ईश्वराकडे पहातच राहिला. देवाच्या चेहर्‍यावर आताही तेच मंद स्मित होतं. तो निरखून निरखून पाहू लागला, पुन्हा पुन्हा आठवू लागला. पण सर्व काही प्रमाणातच घातलेलं त्याने. मग इतक्या एक्स्ट्रीमीटीज् कशा आल्या?

सगळं काही प्रमाणात घालूनही आलेली गुंतागुंत पाहून पुरता वैतागून गेला तो. आणि तोच त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याला बोलावतंय. तो लक्ष देवून पाहू लागला. त्याचीच निर्मिती असलेला एक माणूस त्याला आळवत होता. विचार करत होता, "छ्या.. आपण नसतं बुवा असं जग बनवलं..., माणसाच्या आयुष्यात आनंद-दु:ख, राग-लोभ, आशा-निराशा सगळं काही हवं, पण इतकं एक्स्ट्रीम काही नको. इतकं पराकोटीचं दैन्य नको, इतका आंधळा सूड नको, ऐश्वर्याची पराकाष्ठा नको आणि असा दु:खाचा गर्ता पण नको.. थोडा फार बॅलन्स हवाच हवा. का म्हणून देवाला असं सुचलं असेल? का त्याला इतकी टोकाची विषमता निर्माण करावी वाटली असेल? आपण जग बनवलं असतं तर असं तरी नक्कीच बनवलं नसतं.."
मेरा कुछ सामान ...
तुझ्याविषयी काहीही कलात्मक लिहावं असा तू नाहीस. म्हणजे अजिबातच नाहीस. तरीही तुझ्याविषयी लिहिताना दहादा अडखळतेय मी, कारण तुझ्याविषयी लिहायचं म्हणजे ते तुझ्यासारखंच हवं आणि ते खूप अवघड आहे. का म्हणजे काय? सोपं लिहिणंच तर सगळ्यात अवघड असतं ना... आणि तू खूप सोपा आहेस.. म्हणूनच खूप अवघडदेखिल.. माझ्या शब्दांत मावण्यापलीकडचा..
अगदी पहिल्याने तुला भेटले तेव्हा तुझ्याविषयी काही अंदाज बांधावा इतकाही विचार न करता, "चारचौघांसारखा" असं एक लेबल लावुन तुला मेमरीत ठेऊन टाकलेलं मी. पण तुझ्या सोपेपणाची खोली कळत गेली तसं हे लेबलही गळून गेलं तुझ्यावरुन (इतर अनेक लेबलांप्रमाणेच)
तुझ्यासमोर आयुष्याचं कोणतंही तत्वज्ञान पाजळताना मला खरंतर अतिशय अपराधी वाटत असतं. एखाद्या सुंदर काचेच्या भांड्यावर ओरखडे ओढल्यासारखं. हो.. काचेच्याच.. माणसं मातीचे गोळे असतात आणि मग त्यांचा मातीचा देह बनतो. तू मात्र काचेचाच.. काचेसारखाच.. आतबाहेर निर्मळ, नितळ, पारदर्शक..
"जाऊ दे ना गं.. सोड.. एवढा काय विचार करायचाय? आपणही वागतोच असे कधी कधी. कधी नकळत, कधी जाणूनबुजून. शेवटी आपलीच माणसं आहेत ना ती." इतक्याशा एका वाक्यावर मित्र, मैत्रीणी, नातेवाईकांपासून बॉसपर्यंत कोणाचीही कोणतीही गोष्ट पाठीवर टाकताना पाहिलय मी तुला. असं कसं जमू शकतं कोणाला? आणि तेही अपरिहार्यता म्हणून नव्हे तर समजून घेऊन? वास्तविक पहिल्यांदा तुला असं बोलताना/वागताना पाहिलं तेव्हा "समाजाची खूप गरज असणारा माणूस" हे ही लेबल बहाल केलेलं मी तुला. कदाचित दुबळा. प्रतिकार न करु शकणारा किंवा प्रवाहाविरुद्ध जायला घाबरणारा. पण असं म्हणायला जावं तर असंही नाही. स्वत:ला पटलेल्या मतांवर कोणाचाही विरोध पत्करुन ठाम रहाताना पाहिलय तुला मी.. समोर कितीही मोठा माणूस असला तरीही स्वतःच्या तत्वांवर कधीही तडजोड न करता राहताना पाहिलय. स्वत:च्या मतांवर ठाम रहायचं म्हणजे जगाशी पावलोपावली भांडावं लागतं या मताची पाईक मी. तुला हे असं पहाणं माझ्यासाठी साक्षात्कारापेक्षा कमी नव्हतं. (प्रवाहाच्या विरोधात जायला घाबरणारी आणि म्हणून प्रवाहासोबत असणारी माणसं खरंतर आतून धुमसत असतात आणि ते जाणवल्यावाचून राहत नाही. तुझ्या आतबाहेर भरुन राहिलेली शांतता मात्र नवख्या माणसालाही जाणवेल. हा समजूतदारपणा कुठून आणलास?)  स्वतःच्या मतांवर ठाम राहून आपल्याला विरोध करणार्‍यांवरदेखिल निखळ प्रेम करण्याची कला कुठून मिळालीये तुला? म्हणजे आपल्या विरोधकाचा न पटणारा भाग सोडून बाकी सगळं जाणून घ्यायचं. त्यात काहीतरी आवडण्यासारखं असतंच. पण विरोधकाला विरोधापलीकडे जाणून घेण्याचा विचारच आचरणात उतरवणं केवढं अवघड आहे. (हे असं वागणं किती पुस्तकी वाटतं ना, खासकरुन वाचताना?) पण तुझ्यासोबत राहताना जाणवतं ते किती खरं आहे, किती आतून आलेलं.. अगदी नैसर्गिक.
तुला सांगण्यासाठी प्रत्येकाजवळ काहीतरी असतं. लहानग्या पोरापासून म्हातार्‍यापर्यंत आणि रस्त्यावरच्या स्टॉलवाल्यापासून मॉलमध्ये भेटलेल्या गर्भश्रीमंतांपर्यंत. सगळेच तुला काही ना काही सांगतात. अगदी पहिल्या भेटीत. काही ओळखदेख नसताना. कसं काय? बरं, आता यासाठी लागणारं खूप भारी संभाषणचातुर्य तुझ्याकडे आहे म्हटलं तर असंही नाही. वाक्यात निम्म्या वेळेला तर 'हे','ते' असलं काहीतरी वापरुन वाक्य पूर्ण करावं लागतं तुला. मग ही मोहिनी कुठली होते लोकांवर? तुझ्या गूढ सावळ्या रंगाची की पांढर्‍याशुभ्र हास्याची? कधी कधी वाटतं हात उचलून स्पर्श करावा तुझ्या सावळ्या वर्णाला. चांदीचा वर्ख बोटाला लागतो तसा तुझ्या सावळेपणाही बोटांवर घेता येईल असं वाटतं कधी कधी. बोटांवर घेतलेला तुझा तो रंग बघता बघता अंगभर पसरत जावा, त्याहीपेक्षा खोल आत्म्यापर्यंत झिरपावा. आणि मग तुझ्याच हसण्याचं चांदणं पडून उजळून जावं अंतर्बाह्य. पण नाही. हात पुढे करायला भीती वाटते. आपले हात मातीचे असल्याची जाणिव कशी पुसून टाकायची?
किती किती सोपा समजत होते मी तुला. किती दिवस. हा सगळा चांगुलपणा समजूनही तो केवळ चांगुलपणापर्यंतच मर्यादित होता. इतक्या सरळ माणसांना कशी जाणवेल प्रेमाची खोली? काळजात कळ उठावी अशी तीव्रता? (हेही तुझ्याविषयीचं पुढचं गृहीतक) प्रेम करायला काहीतरी खूप कॉम्लेक्स असावं लागतं अशी काहीतरी धारणा. किंवा जितका माणून गुंतागुंतीचा तितकं प्रेम तीव्र, खोल असले काहीतरी विचार. पण एकही प्रश्न न विचारता इतकं खोल प्रेम कसं करता आलं तुला? कधीच कोणता प्रश्न नाही.. एकही नाही.. हा रुक्मिणीचा वसा कुठे लाभला तुला?
हे एक बरं आहे की तुला जाणिव नाही तुझ्यातल्या नक्षत्रांची. वास्तविक त्यामुळे तू अजूनच उजळून निघतोस. (कधी कधी वाटतं की माणसाला आपल्या असण्याची माहिती नसली की आपण बदलत गेल्याची पण जाणिव होत नाही. आणि मग सगळंच हरवत जातं. पण नाही. हे असले विचार तुझ्यापुढे व्यर्थ आहेत. तुझ्याबाबत हे असं काहीही होणार नाही याची पूर्ण खात्री आहे मला.) कारण तू नुसताच निरागस नाहीस. आणि सगळ्यांसोबत संबंध नीट ठेवणार नुसताच डिप्लोमॅटपण नाहीस. तू असा उमजत जाताना माझ्या मनाच्या किती बेड्या गळून गेल्यात हे मी नाही सांगू शकत. विश्वास गमावणं ही जगात सगळ्यात वाईट गोष्ट असेल कदाचित आणि विश्वास परत येणं ही तितकीच सुंदर.
नातं आणि त्यातली माणसं यांचं नातं काय असतं? कदाचित नातं जास्त महत्वाचं असतं माणसांपेक्षा. पण आपलं नातं तुझ्यापेक्षा महत्वाचं कधीच नाही होऊ शकणार. आपण असू नसू, हे नातं असेल नसेल, भेटी होतील, न होतील.. पण तू असला पाहिजेस. तू आहेस तस्साच तू असला पाहिजेस. तसाच तू राहिला पाहिजेस. मला माझ्याच बेड्यांतून मुक्त करुन तू दाखवलेलं नक्षत्रांनी भरलेलं आभाळ कायमच माझ्या सोबतीला राहिल. आणि तूही असाच रहा.. नक्षत्र फुलवत...
मेरा कुछ सामान ...
सृष्टीचं कौतुक जितक करावं तितकं कमीच असं वाटण्याला निसर्ग कायमच नवनविन बहाणे देत असतो मला. दरवर्षी वसंतात फुलून फुलून येणारी आणि भरभरुन वहाणारी फुलझाडं हे त्यातलच एक कारण. शिशिर सरुन गेला की झाडांना फुटणारी पालवी बघण्यात, त्यांचा तो हिरवट कडू गंध अनुभवण्यात, त्या तुकतुकीत कोवळ्या पानांना स्पर्श करुन पहाण्यात महिनाभर आरामात निघुन जातो. पण त्याच वेळी निष्पर्ण होवुन कळ्या मिरवणार्‍या, कुठे कुठे तुरळक फुलू लागलेल्या फुलांच्या तुर्‍यांनी अजुन लक्ष वेधुन घ्यायला सुरुवात केलेली नसते. हा एक्-दिड महिना सरता सरता बर्‍यापैकी पानं पोपटीतून हिरव्या रंगात जायला लागतात. तो गर्द हिरवा रंग त्यांचं संथ,एकसुरी आयुष्य वाटतो मला.. त्यातलं अ‍ॅडव्हेंचर आता संपलेलं असतं किंवा कदाचित बाहेर तरी दिसून यायचं बंद झालेलं असतं. संथ, शांत, मुलाबाळांत रमलेल्या मध्यमवयीन गरत्या जोडप्यासारखी वाटायला लागतात झाडं बघता बघता.. आणि मग अचानक एके दिवशी डोळ्यात भरण्याइतका फुलोरा दिसतो कुठेतरी.. वसंताची चांगली घमघमीत आणि घवघवीत चाहुल लागते.
थोड थोडा म्हणता म्हणता फुलांचा पसारा चांगलाच वाढायला लागतो. तसा वर्षातला प्रत्येक ऋतू कोणत्या ना कोणत्या फुलांच्या अस्तित्वाने, त्यांच्या परिसरात असण्याने काही खास असा लक्षात राहतो (जसा पावसाळा बुचाच्या फुलांसाठी, मग चांगला जानेवारी उगवेपर्यंत झेंडुसारखी दिसणारी ती पिवळी/नारिंगी रानफुलं- मला त्यांचं नाव नाही माहिती.. अरेरे ) पण वसंताची बातच और आहे. उगीच नाही त्याला वसंत म्हणत..!
हल्ली पुणे स्टेशनकडून जहांगिरला जाणार्‍या पुलावरुन पलीकडे उतू जाणारा पांढरा-गुलाबी कॅशिया (हॉर्स कॅशिया) हिरव्यागर्द झाडांच्या पार्श्वभूमीवर अगदी उठुन दिसायला लागलाय. कितीही नाही म्हटलं तरी त्याच्याकडे बघितल्यावर पुसटसं हसु येतच चेहर्‍यावर. बस मधली शेजारची व्यक्ती हमखास संशयाने बघते त्यावेळी पण सोडा who cares? त्यावेळी ते झाड मला तोंडभर हसुन good morning म्हणत असतं आणि मी त्याला लवकर लवकर ऑफिस संपवुन मावळत्या सुर्यकिरणांना झेलणारं तुझं रूप बघायला परत येईन असं सांगत असते.
कॉलेजला असताना इंजिनीरिंगचं सबमिशन असायचं या दिवसांत. ती सगळी आदल्या रात्री जागुन केलेली कारागिरी भर उन्हाची कॉलेजला घेवुन जायच्या वेळेस ज्जाम चिडचिड झालेली असायची पण त्या तसल्या उन्हात कॉलेजच्या रस्त्यावर पिवळ्याधम्मक अमलताश उभा असायचा.. अर्थातच माझ्यासाठी.. "जाऊ दे गं.. चालायचंच." असं काहीतरी म्हणायचा. तो अमलताश ओलांडून पुढे जाताना हमखास माझा मूड बदललेला असायचा.. स्मित कॉजेलची सगळी सबमिशन्स त्याला दाखवुनच केलीयेत मी. अजुनही तिथुन जाताना तो तसाच उभा असतो. त्याच्या आजुबाजुला कसलसं बांधकामाचं सामान आणुन टाकलय. उदास वाटतो हल्ली.. अशा वेळी गुलजारचा अमलताश नाही आठवतो मग..

खिड़की पिछवाड़े को खुलती तो नज़र आता था
वो अमलतास का इक पेड़, ज़रा दूर, अकेला-सा खड़ा था
शाखें पंखों की तरह खोले हुए
एक परिन्दे की तरह
बरगलाते थे उसे रोज़ परिन्दे आकर
सब सुनाते थे वि परवाज़ के क़िस्से उसको
और दिखाते थे उसे उड़ के, क़लाबाज़ियाँ खा के
बदलियाँ छू के बताते थे, मज़े ठंडी हवा के!

आंधी का हाथ पकड़ कर शायद
उसने कल उड़ने की कोशिश की थी
औंधे मुँह बीच-सड़क आके गिरा है!!

मला मात्र माझा तो अमलताश कायम उत्साहाने सळसळणारा वाटायचा पण तो ही हल्ली असाच वाटायला लागलाय.. असो..
वसंतात हमखास भेट द्यावं असं पुण्यातलं ठिकाण म्हणजे डहाणुकर कॉलनी..!! उन्हं ऐन भरात असताना अक्षरशः स्वर्ग अवतरलेला असतो तिथे. बाहेरुन पाहिलं तर खरं वाटणार नाही इतका गोंधळ असतो रस्त्यावर पण एकदा का त्या गल्लीत शिरलं की बास्स...!! तिथल्या त्या बागेच्या भोवती ह्या सगळ्या कॅशिया, गुलमोहर आणि जॅकारंडाचंच कुंपण आहे आणि या सगळ्या फुलांची मिळुन अशी काही रंगपंचमी अवतरलेली असते की भर रस्त्यात गाडी ब्रेक लावुन थांबवलीच पाहिजे.
अशी बरीच ठिकाणं सांगता येतील.. युनिव्हर्सिटीकडून औंधला जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा नुसता गुलमोहर आहे. त्यातला काही लालभडक, काही नारिंगी, तर काही या दोन्हींमधला.. तसा NH4 पण या बाबतीत काही कमी नाही म्हणा. पण औंध रस्त्याच्या शेवटाकडे एक झिपर्‍या गुलमोहर दिसतो (नामकरण अस्मादिकांनीच केलय) तर तो झिपर्‍या माझा खास आवडीचा. तसा त्याचा रंग अगदी लालभडक नाहीये पण फुलं भरुन वाहत असतात नुसती आणि इतर वेळी त्याच्या सगळ्या फांद्या झिपर्‍यासारख्याच दिसतात, त्यामुळे ऐन बहारात फुलांच्या भारामुळे फांदी वाकलिये असा भास होतो. त्यामानाने NCL रोडला गुलमोहर कमी. तिथे जॅकारंडाचं राज्य आहे. अगदी व्यवस्थित जांभळ्या दिसणार्‍या त्या फुलांना ब्लू जॅकारंडा का म्हणतात हे मला तरी न उलगडलेलं कोडं आहे. ( आणि बोलीभाषेतलं नाव कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा) इतक्या नाजुकशा त्या फुलांना "जॅकारंडा" असलं भरगच्च अफ्रिकन आदिवासी जमातीसारखं नाव कोणी ठेवलय?
तसा वसंतातला सुगंधी ठेवा- चाफा, मधुमालती, मोगरा वैगेरेंना वगळुन तर चालणारच नाही. चाफ्याच्या झाडामागुन उगवणारा चंद्र पाहिला की हटकुन "चांद मातला" ची आठवण येते मला.. त्यातल्या मोगर्‍याविषयी तर आधी लिहिलच आहे मी. मधुमालतीविषयीची सगळ्यात पहिली आठवण म्हणजे मी अगदी ६-७ वर्षांची असतानाची. आमच्या त्यावेळच्या घरामागे कमानीवर मधुमालतीची वेल होती. ती इतके दाट होती की त्याखालची कमान दिसायचीच नाही आणि मला बरीच वर्षे इतकं आश्चर्य वाटायचं की कसले भारी वेल आहे.! अशी कशी आलिये..? आणि मग लंपनचं "मधुमाल्ती ग्राऊंड..." डेक्कनच्या आतल्या बाजुच्या बंगल्याच्या कुंपणावर हटकुन आढळणारी ही वेल..
मग हळु हळु पावसाळा येईपर्यंत या फुलांच्या सोबतीने १-२ उन्हाळी सहली नक्कीच होतात. अगदीच नाही तरी पुण्यातून इकडे-तिकडे फिरताना आपण थांबुन त्यांची विचारपूस केलीच पाहिजे असा थाट असतोच त्यांचा. तर असला हा वसंत... आता तुम्ही म्हणाल की यात फॅमिली डे चा काय संबंध आला? तर मला हल्लीच शोध लागलाय की माझ्या वसंतातल्या आठवणीतली ही बरीचशी झाडं "गुलमोहर" फॅमिली मधली तर बरीचशी जॅकारंडा फॅमिली मधली आहेत.. :-)
मेरा कुछ सामान ...
सकाळी रात्री थंडी आणि दिवसभर उकाडा अशा वातावरणातून जेव्हा दिवसभर उकाड्याच्या स्थितीत ॠतू येतो तेव्हा कधी अचानक गाडीवरुन फिरताना / बस मधुन जाताना पांढर्‍या शुभ्र सुगंधाची एक झुळूक अंगावरुन वाहुन जाते.. आणि मनात स्पष्ट स्पष्ट मोगरा उमटुन जातो. सिझन मधली पहिली मोगर्‍याची खरेदी हा माझा एक स्वतंत्र सोहळा असतो. अशी चाहुल लागल्यानंतर लगेचच येणारा वीकेंड यासाठी निवडते मी.. सकाळी सगळं आवरुन बाहेर पडते.. ऊन चांगलं डोक्यावर तापेपर्यंत सगळी कामं, एखाद्या छानशा पुस्तकाची खरेदी आवरुन अंगातुन घामाचे ओघळ वाहत असताना आणि ऊन मी म्हणत असताना, चौकातल्या एखाद्या म्हातार्‍या आजीबाईंसमोर उभी रहाते आणि अगदी मुहमांगी किमत देवुन (हो! कारण त्या क्षणी त्या मोगर्‍याच्या बदल्यात मी माझा स्वर्ग लुटायला पण तयार असते..) मी ओंजळभर मोगरा विकत घेते आणि खोल खोल श्वास घेवुन तो वास माझ्या रंध्रारंध्रात झिरपू देते. मला आठवतय तेव्हापासुन अनेक वर्षे हा मोगरा माझ्या उन्हाळ्याची साथ करत आलाय. त्याच्या सुगंधात अनेक सण-समारंभ साजरे केलेत, अनेक मैफिली रंगवल्यात.. त्या चांदणभरल्या ओंजळीचं सुगंधाचं देणं फेडायच्या मागे न लागता मी त्याच्या ॠणातच रहाणं पसंत करत आलेय. ही मोगर्‍याची खरेदी झाल्याशिवाय खर्‍या अर्थाने माझा उन्हाळा सुरु होत नाही. आणि आज हे लिहिण्याचं कारण? आज मी या सिझन मधली पहिली मोगर्‍याची खरेदी केलीय.. स्मित
मेरा कुछ सामान ...
असं म्हणतात की आयुष्यात प्रत्येक क्षण युनिक असतो. एकमेव्-अद्वितीय. आणि तो तसाच जगला पाहिजे. तरच आपण प्रत्येक अनुभवाचा परिपूर्ण प्रत्यय घेवु शकतो. पण प्रत्येक क्षणाला हा पण पाळणं अवघड आहे. आणि काही क्षण, काही नावांसाठी तर अशक्य. तसं प्रत्येकच गोष्टीला एक रुप असतं, एक रंग असतो, एक गंध असतो..पण काही नावं येतानाच आपल्यासोबत अनेक रुप, रंग, सुगंधांची गाठोडी घेवुन येतात. आजही कोणताही सिनेमा बघताना मी फक्त तो सिनेमा बघत नसते तर लहाणपणापासून सिनेमासोबत जुळलेल्या, भोगलेल्या सगळ्या आठवणी जगत असते. सिनेमाच्या त्या जगाबरोबरच अजुन एका वेगळ्या आठवणींच्या जगात फिरुन येत असते. गुलजार म्हटलं की त्यांची ती सगळी गाणी, वेळोवेळी मी त्यांच्याशी साधलेला संवाद, अनेक उत्कट क्षणांना त्यांच्या शब्दांची झालेली ती सोबत असं सगळं घेवुनच ते नाव माझ्यासमोर उभं रहातं. अशा अनेक गोष्टी आहेत. सिनेमा, गुलजार, चित्रपट संगीत, शाळा, समुद्र, प्रवास.. अशाच काही मनाच्या कोपर्‍यात मंद दरवळत रहाणार्‍या गोष्टींना दिलेला हा उजाळा.. नॉस्टॅल्जिया... साधारणतः १९९४ ते २००९ या काळाच्या मैफिली रंगवणारा. मी ७-८ वर्षांची असल्यापासून ते इंजिनीरींग होईपर्यंतच्या कालखंडातल्या आणि त्या वेळेत बालपण रंगलेल्या सगळ्यांना आठवतील अशा काही गोष्टी. स्मित
------------------------------------------------------------------------------------
सिनेमा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे मे च्या सुट्टीत थिअटरला सिनेमा बघायचा कार्यक्रम. त्यावेळी दर आठवड्याला उठुन सिनेमा बघायची पद्धत नव्हती त्यामुळे सिनेमाला जाणं हा वार्षिक किंवा सहामाही कार्यक्रम असायचा. आणि सुट्टीवरुन परत शाळा सुरु गेल्यानंतर कोणता सिनेमा बघितला याच्या चर्चा पुढची चाचणी परीक्षा येईपर्यंत अधूनमधून चविने चघळल्या जायच्या. मे च्या सुट्टीत गावी गेलो की त्या वर्षांतला त्या सुट्टीतला सगळ्यात बिग बजेट सिनेमा गावात कधी येतोय त्याची वाट पाहिली जायची. तो आला की एका दिवशी गावातल्या एकुलत्या एक चांगल्या थिअटर मध्ये त्याची एके रात्री ९ ते १२ च्या शो ची तिकीटं काढली जायची. त्यातल्या त्यात आमचे मधले काका जरा रसिक वै. म्हणता येतील असे होते. त्यामुळे तेच पुढाकार घेवुन तिकीटं काढुन आणायचे. बाकी घरातल्या पुरुषांना सिनेमा बघण्यात काही रस नव्हता आणि तशी पद्धत पण नसावी कदाचित. मग त्या दिवशी सकाळपासुनच घरात फार लगबग असायची. आम्ही सगळी चुलतभावंड त्याच विचारात गुंग. कोणी दंगा केला की लगेच, "तुला नेणार नाही मग संध्याकाळी.." अशी धमकी दिली जायची. रात्रीच्या स्वयंपाकाला दुपारच्या जेवणानंतर लगेचच सुरुवात व्हायची. सगळं आवरुन मग आई, दोन काकु जरा आराम करायच्या. आम्ही पण त्यादिवशी दुपारी त्यांना दंगा न करता झोपु द्यायचो. संध्याकाळी काका स्वतःहुन अंगण झाडणे, सडा-पाणी वै. कामं करायचे घरातल्या बायकांना तेवढीच मदत म्हणुन. पिच्चरला जायचंय, पिच्चरला जायचंय म्हणत लवकरच जेवणं आवरायची. सगळी झाकपाक, भांडीकुंडी होवुन घरातली सगळी महिला मंडळी आणि बच्चे कंपनी निघायची. घरापासुन फक्त १०० मी वर असलेल्या ठिकाणी सगळ्यांना सोडायला काका यायचे सोबत. आणि मग लहान मुलं सोबत असल्यावर जे प्रकार होतात ते सगळे प्रकार साग्रसंगीत पाड पडुन आम्ही तो सिनेमा बघायचो. ते सिनेमागृहाच्या मंतरलेल्या काळ्याभोर अंधारातले जादुई ३ तास म्हणजे पुढच्या ६ महिन्यांची बेगमी असायची. असा पाहिलेला पहिला सिनेमा आठवतो तो म्हणजे, हम आपके है कौन.! रेणुका शहाणे मरते तेव्हा ढसा ढसा रडले होते मी. आणि परत शाळा सुरु झाल्यावर कोण किती रडलं हे सांगायची मुलींच्यात चांगलीच चुरस लागलेली. अशा सुट्टीत बघितलेल्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर त्यानंतर अशाच प्रकारे बॉम्बे, दिलवाले दुल्हनिया.., कुछ कुछ होता है, राजा हिंदुस्तानी वै. वै. चित्रपट पाहिले.
पण हा म्हणजे अगदीच सठीसामाशी येणारा योग असल्यामुळे चित्रपट बघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे टिव्ही..! शुक्रवारी-शनिवारी रात्री आणि रविवारचा मराठी चित्रपट पहायला मिळणं म्हणजे त्या दिड दिवसाच्या सुट्टीतलं एक महत्वाचं काम असायचं. मला चांगलच आठवतंय ते म्हणजे, त्यावेळी शुक्रवारी जरा बर्‍यापैकी जुने आणि शनिवारी त्यातल्या त्यात नवे चित्रपट लागायचे टिव्ही वर. मग शुक्रवारचा सिनेमा जर चांगला असेल तर आई आवर्जुन बघ म्हणुन सांगायची. मग डोळे ताणुन ताणुन, मधल्या जाहिरातींना कंटाळत तो चित्रपट संपवला जायचा. मग दुसर्‍या दिवशी अपुर्‍या झोपेमुळे जे व्हायचं ते व्हायचं. पण असा असायचा तो शुक्रवारचा सिनेमा. आणि शनिवारी तर बघायलाच नको. रविवार म्हणजे उशिरा उठायचा हक्काचा दिवस (अर्थात कुठली स्पर्धा किंवा परिक्षा नसेल तरच्).! त्यामुळे शनिवारी रात्री चांगला सिनेमा लागावा हे माझी अगदी मनापासूनचे इच्छा असायची. लागला तर दुधात साखर.. आणि नाही लागला तर? अहो नाही लगला तर रविवारच्या मराठी चित्रपटाची वाट बघायची. रविवारी घरी अभक्ष भक्षणाचा भरगच्च कार्यक्रम असायचा. दुपारच्या छायागीतसोबत तो संपला की मग दुपारी जडावलेले डोळे घेवुन "दुपारी झोपू नका, नाहीतर रात्री झोप लागायची नाही" ही आईची सुचना ऐकतच झोप लागुन जायची. आणि मग ४ च्या मराठी सिनेमाची सुरुवात व्हायच्या आत घरात एकेक मेंबर जागं व्हायचा. रविवारी दुपारी प्रदेशिक चित्रपट लागायचे. त्यावेळी असं खूप वाटायचं की हे चित्रपट कळायला हवेत. आपण ते पाहिले पाहिजेत. त्यावेळी अशी काहितरी धारणा होती की हे कोणतेतरी भारी चित्रपट आहेत. पण एकदा त्याच प्रादेशिक चित्रपटात जेव्हा मराठी चित्रपट पाहिला तेव्हा मनात म्हटलं, "हात्तिच्या, म्हणजे इतर भाषांतले पण असेच चित्रपट असणार ते, वेगळं नाही काही !" आणि मग एकदम फुग्यातली हवाच काढुन टाकल्यासारखम झालं.
पण बहुतेक वेळेला सिनेमा बघताना खूपच्या खूप हरवुन जायची मी. मग असाच एखादा टाइमपास सिनेमा असला तरी. पण आईच्या आग्रहामुळे असे पांचट चित्रपट फारच कमी बघितले गेले. रविवारी दुपारी बघितलेल्या चित्रपटात अगदी अजुनही आठवतात ते म्हणजे, सामना, वजीर, सरकारनामा, निवडुंग, सगळे विनोदी मराठी सिनेमे, दर दिवाळीला न चुकता लागणारा धुमधडाका! अशोक-लक्षा-सचिन-महेश यांचे बहुतेक सगळे हिट चित्रपट रविवारी ४ लाच पाहिलेले आहेत.
या वीकेंड सिनेमाचे वेध मला तरी बुधवारपासुनच लागायचे. शाळा मनापासुन आवडायची पण तरीही या सिनेमांसाठी शुक्रवारची वाट बघायची मी. रविवारी संध्याकाळचा सिनेमा संपला की अगदी उदास्-उदास, भकास वाटायचं. कोणी बोलवायला आलं तरी जायला नको वाटायचं.. (हल्ली पण असंच होतं, पण ते सोमवारी ऑफिस आहे या कल्पनेने.. अरेरे ) असो..
मधल्या काळात कधीतरी या लोकांनी शनिवारी रात्री ९.३० कोणतंकी सिरिअल सुरु केलेलं त्यामुळे सिनेमा लागायचा १०.३० ला आणि संपायचा १.३० ला. हे म्हणजे आमच्यासाठी अतीच होतं. (हॉस्टेलला राहिल्यापासुन मात्र १.३० म्हणजे किमान वेळ झाली ते सोडा) त्यामुळे अगदीच चांगला सिनेमा असल्याशिवाय शनिवारचा सिनेमा बघणं बंद झालं.
लिहिता लिहिता अचानक आठवलं.. एक चायनीज म्हण आहे, Day by day nothing changes but when you look back, everything is changed...!!
ह्म्म... आणि त्या काळचे ते हिरो-हिरोईन्स.. सगळी खानावळ, अक्षय कुमार, गोविंदा, अजय देवगण, सुनिल शेट्टी, माधुरी, उर्मिला, रविना, काजोल, करिष्मा.. सगळे एकजात गोड गोड चॉकोलेट हिरो असलेले खान्स.. नंबर १, नंबर १ करणारा गोविंदा आणि मला ज्यांचा प्रचंड राग यायचा आणि यांना हिरो कोणी केलं हा प्रश्न ज्यांच्याकडे बघुन पडायचा असे अजय आणि सुनिल. (काजोलने अजयशी लग्न केलं त्याचा सगळ्यात मोठा धक्का मला बसलेला हे मी आजही शपथेवर सांगु शकते..) मराठी मुलगी आणि मिलियन डॉलर स्माईल ने घराघरातील बायका-पुरुषांच्या गळ्यातला ताईत बनलेली धक धक गर्ल माधुरी, मराठी पोरी बोल्ड व्हायला लागल्यात हे वाक्य जिच्यामुळे जास्त वापरलं जाउ लागलं ती उर्मिला, आपल्या अभिनयाने नेहमीच सगळी अ‍ॅवार्डस् घेवुन जाणारी काजोल. (त्यावेळी सगळ्या पेपरमध्ये तिचा उल्लेख गुणी अभिनेत्री असा असायचा. तेव्हा मला खरच असं वाटायचं की पेपरवाले ज्यांना गुणी म्हणतात ते खरच साधे-सुधे, गुणी असतात) मधुनच आपल्या एखाद्या चित्रपटाने वाद्ळ निर्माण करणारे महेश भट, पूजा भट.. त्यावेळी म्हणजे घरचे त्यांना शिव्या घालायचे यथेच्छ! लहान मुलांनी बघु नये म्हणायचे. का ते विचारायचं धाडस आम्ही कधी केलं नाही. पण अंगप्रदर्शन, भारतीय संस्कृती वै. वै. शब्दांची डोक्यात नुसती भेळ व्हायची पेपर वाचुन जे कळायचं त्यावरुन.
पुढे पुढे हे सगळं नकळत कधी मागे पडत गेलं कळलं नाही. दिल चाहता है बघितला तेव्हा असाही सिनेमा असु शकतो हे कळलं. न जाणवेल असं काहीतरी वेगळम वाटत राहिलं. पुढे हॉस्टेलला आल्यावर तर मग काही विचारालाच नको. इंग्लिश सिनेमाच्म खरं वेड हॉस्टेलच्या काळातलं. तिथे IMDB TOP सिनेमांचा फडशा पाडला. तिसर्‍या आणि शेवटच्या वर्षी तर सिनेमाचं वेड अगदी भरात होतं. तेव्हाच पहिल्यांदा PIFFला हजेरी लावली आणि तेव्हापासुन कायन न चुकता लावतेय. पहिल्या वर्षी मी सलग आठवडाभर २-३ सिनेमे रोज पाहत होते. एका शनिवारी तर ५.! संध्याकाळी बाहेर आलेय तेव्हा अक्षरशः ब्लॅंक
झालेले २ तास. हॉस्टेलला परत जाताना मी सिनेमातल्याच कोणत्यातरी रस्त्यावरुन चाललेय असं वाटत होतं. इतका बेक्कार हँगओव्हर परत कधी अनुभवला नाही मी. पहिल्यांदा PIFF पाहिल्यावर मग वर्ल्ड सिनेमाचा काळ सुरु झाला. मग हजार कटकटी करुन कुठून कुठून अशा फिल्म्स, त्यांची माहिती, सबटायटल्स मिळवुन मग असे सिनेमे पहायची मी. त्यातुनच मग सोर्सेसे भेटला, इनारित्तू, वूडी अ‍ॅलन भेटला आणि माझा सिनेमाजगाचा स्वामी, बर्गमन..! बर्गमन पहायचा म्हणजे माझ्यासाठी अगदी साग्रसंगीत कार्यक्रम असायचा. सिनेमा आणि इतर सगळी माहिती मिळवणे, सगळं आवरुन आता सिनेमा पाहिल्यानंतर काही कामं करायला लागु नयेत हा हिशोबाने सगळं आवरणं (कारण बर्गमनचा सिनेमा पाहिला की बाकी कशावर विचारही करायची स्थिती रहात नाही), हेड्फोन्स म्हणजे अगदी गरजेचे कारण शब्दन् शब्द साठवुन ठेवायचा असतो (कारण तो सिनेमा दुसर्‍यांदा पहाण्याचं धाडस मी करेन यावर माझाच विश्वास नाही)
असो... सिनेमा म्हटलं की थंडीच्या रात्रीत चादरीत गुरफटून बघितलेले, उन्हाळ्यातल्या दुपारी उकाड्याचा विसर पाडतील असे, गरमागरम चहाच्या वासाची आठवण करुन देणारे, अगदी वणवण फिरुन तिकिटं न मिळालेले, झोपेतुन उठुन ५ मिनिटात थिअटरला पोहचुन पाहिलेले, भिजुन, आतल्या एसी मध्ये कुडकुडत पाहिलेले असे सगळे सिनेमे आठवतात.. एखाद्या पांचट सिनेमाला सगळ्या ग्रुपने मिळुन केलेला दंगा, एखाद चांगला सिनेमा बघुन बदलुन गेलेलं माझं जग.. अशा अनेकानेक आठवणी दाटतात.. मला सिनेमातलं किती कळतं माहित नाही पण एखादी चांगली कलाकृती बघुन वाटणारं समाधान परत परत अनुभवावसं वाटतं.. अनेक रंग, अनेक गंध, अनेक आठवणी घेवुन येणारा हा माझा उत्सव.. कोणत्याही सिनेमाला जाताना आज मी या सगळ्या आठवणींचं गाठोडं घेवुन जात असते, त्या गाठोड्यात जमेल तशी भर टाकत असते..
मेरा कुछ सामान ...
काल माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता. ते म्हणतात ना, big day of my life. (अचूक भाव व्यक्त करेल असं मराठी भाषांतर काय आहे याचं? असो..) काल दि. २६ फेब्रु. २०११ पुण्यात संगीत क्षेत्रातील दोन दिग्गज, दोन श्रेष्ठी, उस्ताद झाकिर हुसैन आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा कार्यक्रम होता. गणेश कला क्रिडा मंच. संध्याकाळी ६.३०. माझी अक्षरशः युगानुयुगांची इच्छा होती या दोघांनाही ऐकायची. कारण तालवाद्यात तबला आणि सूरवाद्यात बासरी हे आधीच माझ्या जिव्हाळ्याचे विषय. त्यात या दोन विभुती म्हणजे संगीतक्षेत्रातल्या दंतकथा. एकत्र.. एका व्यासपीठावर आणि त्यात त्यांची जुगलबंदी म्हणजे मी चितेवरुन उठुनही गेले असते. या वीकेन्डला घरी जायच्या प्लॅनला लगेचच काट मारली. मला या कार्यक्रमाविषयी कळलं ते पण अगदी अचानकच. गुरुवारी रात्री सगळा पेपर वाचुन संपला म्हणुन कार्यक्रमांच्या, चित्रपटांच्या जाहिराती वाचत होते. त्यात मला अचानक हे दिसलं. ३ ताड नाही तरी दिड ताड उडालेच मी नक्की. बरं, पासेस घ्यायचे तर फक्त शुक्रवारचाच दिवस होता. दिवसभर ऑफिसमध्ये मी देवाच्या इतक्याच धावा करत होते की पासेस संपु नये. संध्याकाळी ६ च्या ठोक्याला ऑफिस सोडुन पळाले मी. पण बालगंधर्वला पोहचेपर्यंत ७.३० वाजुन गेलेले कारण आपल्या घाईच्या वेळी बस लवकर मिळु नये आणि ट्रॅफिक जाम असलच पाहिजे या योगावरच आमच्या नशिबाचा भर आहे. बरं पासेस घ्यायची वेळ होती ८ पर्यत. तिथे जाउन विचारलं तिकीट खिडकीवर तर ते कार्ड घेत नाहीत हा नविन सा़क्षात्कार झाला आणि इतके पैसे तर माझ्याकडे नव्हते. बरं त्या खिडकीवर बालगंधर्वांना मांडिवर खेळवलं असेल या वयाचे आजोबा बसलेले त्यामुळे "मी पैसे घेवुन येते, पास तेवढा ठेवा" हे दोनदोनदा सांगुन पण त्यांना कळालय की नाही हे मला नीटसं समजायला मार्ग नव्हता. ते फक्त मला जा..जा ची खूण करत होते. मी मनातल्या मनात स्वतःला शिव्या घालत बालगंधर्व मधल्या खोदलेल्या खड्ड्यांवरुन पळायला लागले. बाहेर आले. अर्थात संध्याकाळी ७.३० वाजता जंगली महाराज रोड ओलांडायला जेवढा वेळ लागतो तेवढाच (?) वेळ आताही लागला. मग ATM च्या बाहेर रांग मग पुन्हा रस्ता ओलांडायचा सोपस्कार, खड्ड्यांतली अडथळ्यांची शर्यत पार करुन मी त्या खिडकीपाशी पोचले. आजोबा म्हणाले,"पास संपले." "क्क्का..य???" मी म्हणजे आता फक्त रडायची बाकी होते. तोवर परत ते "थांब थांब, हा शेवटचा आहे" म्हणुन पास ठेवला त्यानी हातावर. बस्स.. माझ्या हाती स्वर्ग लागला होता. आता प्रतिक्षा होती ती शनिवार संध्याकाळची..
कोण म्हणतं पुणे कोस्मोपॉलिटन झालय? पुणेरी संस्कृती अशी राहिली नाही? ज्यांना असं वाटतं त्यांनी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना भेटी द्याव्यात. अस्सल पुणेरीपणाचे नमुने झाडुन हजर असतात. आणि त्यांचा इंगा पण चांगलाच अनुभवायला येतो. आमच्याकडे राजकारणापासुन लावणीपर्यंत, कार्यक्रम कोणताही असो, बाहेर उभे असणार्‍या लोकांचे बोलण्याचे विषय तेच. "च्यामारी, साहेबाला कसा चुना लावला?" किंवा, "ते बेनं कसं बारा....." हेच विषय.. असो, पण इथे नविन कार्यक्रम कोणते पाहिले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक भविष्य, गेला बाजार अगदीच काही नाही तर आमच्या कोणीतरी अर्णव्/प्रद्युम्न असल्या फॅन्सी नावाच्या मुलाला संगीतात कसा रस आणि गती आहे असले विषय चालु होते. अनेक वर्षांनी भेटलेली लोकं कोणी कितीचं तिकीट काढलंय या विवंचनेत होती आणि हे सगळे नमुने (अस्मादिकांना धरुन) कोणत्या एका प्रेरणेने त्या जागी जमलेले याचा विचार करुन मला खरच मनातल्या मनात संगीताच्या किमयेचं कौतुक वाटत होतं.
एकदाचे आत जाउन आम्ही स्थानपन्न झालो. ५ मि.च घोषणा झाली की उस्ताद झाकिर हुसैन साहेबांची तब्येत बरी नाही. ते कार्यक्रम करणार आहेत पण थोडा उशीर लागेल. पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य यातला जो काही थोडासा अंतराल होता त्यावेळेत तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचा जीव जावुन परत आला. आता उशीर झालाच आहे तर जरा एक चहा मारुन यावा असा विचार करुन खाली गेले. अर्थातच खाण्याच्या स्टॉलला नेहमी कोणत्याही प्रसिद्ध पुणेरी ठिकाणी जशी गर्दी असते तशीच गर्दी होती. त्या गर्दीत खायला मिळवायचा प्रयत्न करताना चुकून माझा पाय मागे असलेल्या कोण की खडुस टकल्याच्या पायावर पडला तर जणू काही मी मुद्दाम त्याच्या पायावर पाय द्यायला म्हणुनच मी ४०० रु. आणि माझा वेळ खर्च करुन तिथे आल्यासारखा किंचाळला तो. (तरी बरं मी सो कॉल्ड हील्स वै. प्रकार वापरत नाही) पण त्याचा तो आविर्भाव बघुन मला खरच मी हील्स का वापरत नाही, म्हणजे आता मुद्दाम मी त्याच्या दुसर्‍या पायावर कचकचित पाय दिला असता असा विचार मनात चमकुन गेला. काय तर म्हणे "अहो बाई, जरा सांभाळुन.." सांभाळुन ठिक आहे पण बाई???? मला मान्य आहे अगदीच मुली वै. म्हणण्याइतकी मी लहान दिसत नसले तरी बाई म्हणण्याइतकी मी खरच मोठी नाही आणि तशी दिसत पण नाही. सॉरी म्हटलं तरी त्याचं आश्चर्य काही संपेना. मग मी पुन्हा चहा मिळवण्याच्या तपश्चर्येत लागले. ५ मि. च्या अथक मारामारीनंतर चहा मिळाला. तो घेवुन मागच्या गर्दीला मी म्हटलं हातात चहा आहे, जरा वाट द्या. तर तोच शुंभ म्हणाला, "हो! नाहीतर अंगावर पडला तर जास्त लक्षात राहिल" मग तेवढ्याच पुणेरीपणे मी म्हणाले, "मग लक्षात ठेवायचा नसेल तर बाजुला सरका" आता जसा देश तसा वेष ठेवणं आलंच ना ओघाने.. असो.. तर तो १५ मि.चा उशीर म्हणता म्हणता ४० मि. झाला..
आणि तो क्षण आला.. श्वास रोखलेले.. पंचप्राण डोळ्यात गोळा झालेले.. पडदा बाजुला सरकला आणि... आह... झाकिर हुसैन साहेब तबल्यावर बसले होते. सगळ्यांनी उभं राहुन टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्यांनीही उभं राहुन अगदी कमरेत वाकुन सर्व रसिकांना अभिवादन केलं. त्यांची ती उपस्थितीच इतकी प्रसन्न होती की कोणत्यातरी अनामिक आनंदाने मन भरुन वाहतय असं वाटत होतं. त्यांची तब्येत खरच बरी नव्हती कारण तबला वाजवतानादेखिल ते खोकत वै. होते. पण कार्यक्रम जसा सुरु झाला तसा सर्व उपस्थितांना आणि कदाचित त्यांनाही सर्व स्थळाकाळाचा विसर पडला. मंद लयीतुन हळु हळु द्रुत लयीकडे जाताना त्या तबल्यातुन किती प्रकारचे नाद निघतात हे बघुन स्तब्ध व्हायला होत होतं. त्या तबल्यातुन निघणारे आवाज जास्त मुग्ध करणारे होते की त्यांची लागलेली गानसमाधी अधिक मोहक होती हे मला तरी सांगता येणार नाही. हळु हळु ती झिंग चढत जाताना त्यांनी प्रेक्षकांना मधुनच कधी तबल्याचे बोल सांगत तर कधी एखादा तुकडा उलगडुन दाखवत खिळवुन ठेवलं. सुर्यमालेचा तुकडा सादर करताना, एक पटीतुन सहापटीपर्यंत सहज फिरवुन आणलं. तर उडान सादर करताना खरच आपल्यासमोरुन एखादम हरीण उड्या मारत चाललय असं चित्र डोळ्यांसमोर उभं केलं. देणारा हजार करांनी देत असताना घेशील किती दोन करांनी हे अक्षरशः खरं आहे. खरच किती घेवु आणि किती नको असं झालेलं. सगळ्या शरीराला फक्त डोळे आणि कान असावेत असं वाटत होतं. त्याहीपेक्षा इतर कशाची जाणिवच नष्ट झालेली. समोर ते तबला वाजवत होते आणि मी ऐकत होते. त्या बोलांनी मला वेढलं होतं आणि मी माझी उरले नव्हते एवढंच आठवतं आता. त्या तबल्यावरची, डग्ग्यावरची कोणतिही जागा वापरायची ठेवली नव्हती त्यांनी. पुढचा एक तास कसा गेला काहीच कळलं नाही. त्या समाधीतून जाग आली ते डायरेक्ट मध्यंतर झाला तेव्हा. त्या मध्यंतरात कसलेतरी मान्-सन्मान आणि सत्काराचे कार्यक्रम चालु होते. त्यावेळी या इतक्या मोठ्या कलाकारात असलेल्या तितक्याच मोठ्या मनाचं दर्शन झालं. त्या वागण्यातल्या साधेपणाने आणि नम्रतेने उपस्थितांची मने अजुनच जिंकली त्यांनी यात वादच नाही. सत्कार संपल्यावर स्वतःची खुर्ची स्वतःच उचलुन नेत होते ते आत. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत आता. त्यांचं अस्तित्वच अत्यंत आनंददायक होतं याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येत होता. मध्यंतरानंतर पंडित हरिप्रसादजींच्या बासरीवादनाला सुरुवात झाली. त्या स्वरसागरात बुडुन गेले परत एकदा सगळे. साधारण अर्धा तास त्यांनी बासरी सादर केल्यानंतर मग उस्ताद त्यांच्या साथीला आले. आणि मग तर कार्यक्रम असा रंगला, असा रंगला की बास्स... पंडितजींचे सूर उस्तादजींच्या तबल्यातुन निघत होते. आणि प्रत्येक ठेक्यासरशी टाळयांचा कडकडात होत होता. शेवटची १५ मि. तर सर्वजण स्वर्गात होते. ती फक्त जादु होती. बाकी काही असुच शकत नाही. जादुगार माणसाला गायब करतो. त्यांनी 'मी'पणाला गायब केलं होतं तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या! १० वाजले. त्यांनी सादरीकरण थांबवलं पण पेक्षकांचं मन अजुन भरलं नव्हतं. जास्तच आग्रह झाला तेव्हा पंडितजी म्हणाले "अभी रुकेंगे नही तो पकडके ले जायेंगे हमे" पण लोकं ऐकण्याच्या मनस्थितीत कुठे होते? आग्रह होतच राहिला. मग अजुन दहा एक मि त्यांनी परत सादर केली तबला-बासरी. आणि मग मात्र खरच कार्यक्रम संपला होता. पडदा पडत होता आणि मी खरच अनिमिष नेत्रांनी त्या पडद्यापलीकडे जाणार्‍या त्या आकृती बघत होते. जमेल तितक्या साठवुन घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर मी घरी कशी आले आणि अजुनपर्यत काय करत होते हे मला खरच नाही सांगता येणार. त्या नाद्ब्रम्हात मी हरवलेय आणि त्यातुन बाहेर यायची माझी इच्छादेखिल नाही. ते सूर, नाद अजुन कानात आहेत, त्या आकृती नजरेसमोर आहेत आणि मी स्वत:पासुन दूर कुठेतरी त्यात हरवलेय. मला तसच हरवलेलं रहायचय.. कायमचं...
मेरा कुछ सामान ...
आयुष्यात काही क्षण सुखाचे असतात, काही दु:खाचे, काही रागाचे, लोभाचे.. पण काही क्षण मात्र असे येतात की त्यावेळी त्या भावनेपेक्षा काळिज हलवुन टाकणारी त्या भावनेची तीव्रताच मनात घर करुन रहाते.. अगदी कित्येक वर्षांनी जरी आठवले ते क्षण तरी ते तितकेच तीव्र असतात. असं म्हणतात की काळाबरोबर सगळे रंग फिकट होत जातात. पण काही रंगांचे फटकारे मात्र सूर घोटुन अधिक अस्सल व्हावे तसे अधिकच चमकदार होत रहातात....
--------------------------------------------------------------------------------
३रीत असताना शहिद भगतसिंग चित्रपट पाहिला तेव्हा त्यांच्या फाशीच्या वेळेस अक्षरशः धाय मोकलुन रडलेली ती. आणि आईने कितीही समजावलं तरी इंग्रज हा देश सोडुन गेलेत आता यावर कितीतरी दिवस तिचा विश्वास बसत नव्हता.
-------------------------------------------------------------------------------
ती बाबांची वाट बघत शाळेबाहेर उभी होती. समोरुन एक गाडी चाललेली. त्यावरचं बाळ तिच्याकडे आणि ती त्या बाळाकडे बराच वेळची पहात होते. आणि नजरेआड जायची वेळ आली तेव्हा अचानकच ते बाळ खूप गोड हसलं आणि तिला बाय्-बाय करायला हात हलवले त्याने. आज इतक्या वर्षांनंतरही ते बाळ जसंच्या तसं नजरेसमोर येतं तिच्या.
--------------------------------------------------------------------------------
१३-१४ वर्षांची असताना कधीतरी एका हिवाळी रात्री कोणत्यातरी नातेवाइकाकडे सुट्टी घालवताना "दिल ढूंढता है फिर वोही.." ऐकलं होतं. काय समजलं त्यातलं? माहित नाही. पण एक प्रश्नही न विचारता ती आता आयुष्यभरासाठी ते लिहिणार्‍या माणसाच्या प्रेमात पडली होती.
---------------------------------------------------------------------------------
८-९ त असताना तिच्या बिल्डींगमधल्या बांधकामाच्या इथे मांजरीची २ पिल्लं आलेली. ती तासन् तास त्यांच्याशी बोलत बसायची. त्यांना तिची भाषा सगळीच्या सगळी समजते यावर विश्वास होता तिचा. खरतर, त्यावेळेला सगळं जगच गप्पा मारायचं तिच्याशी. हल्ली खूप शांतता असते. तिनेच ऐकायचं बंद केलय का?
---------------------------------------------------------------------------------
हॉस्टेलवर तशी शांतताच होती सेमिस्टर संपल्यामुळे. तिला अजुन घरी जायला २ दिवस होते.
रात्री वळवाचा पाऊस आला. आता असह्य होतं हे म्हणजे. रात्री २ ला पावसात चिंब चिंब भिजत उभी होती ती. आणि त्या धुवांधार पावसात तिला स्पष्ट ऐकु आले सूर. आये ना बालम, का करु सजनी..
----------------------------------------------------------------------------------
फुलवेडीच ती.. सह्याद्रीच्या कुठल्यातरी घाटात हुंदडताना तिने अशीच खूप सारी फुलं गोळा केली होती. त्या गुच्छावर एक फुलपाखरु येवुन बसलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना. तरी स्तब्धपणे बघत राहिली त्याच्याकडे ते उडुन जाईपर्यंत..
----------------------------------------------------------------------------------
त्यांच्या दाटलेल्या आठवणीने कित्येकदा ती उशीत तोंड खूपसुन रडली होती. आज खूप वर्षांनी ते सगळे चॅटवर एकत्र भेटले. तिला खूप काही बोलायचं होतं. त्यांना सांगायचं होतं की तुम्ही सगळे खूप खूप काही आहात माझ्यासाठी. मी कधीही व्यक्त करु शकेन त्याहीपेक्षा जास्त. पण नाही बोलु शकली काहीच. त्या रात्री रडताना पहिल्यांदा परकेपणा दाटलेला.
-----------------------------------------------------------------------------------
रोज संध्याकाळी ऑफिसमधुन घरी येताना त्या फुलवालीकडुन २ रु. ची फुलं घ्यायची ती देवपुजेला. फुलवाली एकदा म्हणाली, "बाई गं, मी कदी कोनालाच २ रु. ची फुलं देत नाही. पन तुला न्हायी म्हनायला जमतच नाही बघ." कशानेतरी हवेवर तरंगल्यासरखं झालं तिला काही काळ नक्कीच...
मेरा कुछ सामान ...
सकाळी जाग आली तेव्हा चांगलीच थंडी वाजत होती..एकशे एकोणीस तास झोपलं तरी झोप झाल्यासारखी वाटत नाही हल्ली.... चारही बाजूंनी चादर घट्ट लपेटून घेतली तरी शिवाजी महाराजांच्या गोष्टीतल्याप्रमाणे थंडी चोरपावलांनी की कशी ते आत शिरतच होती...अजुनी फक्त रात्रीचे २ च वाजलेले असावेत अशी विनंती श्री शंकराला तेवीस वेळा करून मगच घड्याळ पाहिलं तरी ७ वाजलेलेच.. आमचं हे नेहमी असंच असतं.. पक्ष्यांचा कलाकलाट नेहमी छान वाटत असला तरी त्यांनी झोपमोड केली की आम्हाला खूप राग येतो.. पहाटे पहाटे ते काय सांगत असतात? "उठा उठा.. कामाला लागा.." की "आम्हाला इतकी थंडी वाजत असताना असे दुष्टासारखे गुरफटून झोपू नका.." जे असेल ते... पण बाहेर पक्षी म्याड सारखे गोंधळ करत होते तरी सूर्य देव अजुनी उगवत नव्हते...
पुण्यात आता खरच थंडी पडायला लागली आहे..corporation वाले नळातून बर्फाचं पाणी सोडतात आणि चहाचा कप निवांत हातात घेवून gallery त येवून बसेपर्यंतच तो निऊन जातो...रस्त्यावरून मजेत फिरताना अचानकच पाय अडखळून धप्पकन पडावं तशी थंडी पडली आहे.. अचानक आणि जोरदार...थंडी बाईंनी येवून सगळ्यांना एकदम गारठून टाकल आहे अस म्हणायला पूर्णच वाव आहे..
सकाळी सकाळी उठून gallery त आले तेव्हा दुपट्यात गुंडाळलेलं बाळ झोपेत चाळवतं तशी कॉलनी धुक्याच्या चादरीतून जरा जरा हालचाल करू लागली होती..मस्त मोठ्ठी जांभई दिली तर तोंडातून धूरच धूर आला.. म्हणजे कडक थंडीत हाsss केल्यावर तोंडातून येतो तो धूर.. आम्हाला एकदम हिमालयात गेल्यासारखा वाटायला लागलं.. तिथे असंच होतं ते मी कोणत्याकी सिनेमात नीटच पाहिलेलं.. आपलं घर अचानक एका रात्रीत उचलून कोणी हिमालयावर आणून ठेवलंय असं वाटायला लागलं.. आजूबाजूला कुठे बर्फ पडलेला दिसतोय का ते मी पाहून घेतलं...घर काय हिमालयात आलं नव्हतं सोडा.. थंडीच हिमालयातून इकडे आली असणार.. मग त्या आनंदात आम्ही तसाच धूर काढत १०-१५ मि. घालवली.. मग जे झालं ते झालं.. म्हणजे आवरायला उशीर. बस चुकली वगैरे..
सारखं सारखं श्वास घेतल्यामुळे बाहेरची थंड हवा आत जाऊन सगळं गोठून जाणार आहे असं काहीतरी म्याडसारखं वाटत होतं सकाळी.. हे असं मी म्यावला सांगायला गेले तर त्याने उलट मलाच वेड्यात काढलं... थंडी कशी छान असते आणि अजुनी तितकीशी थंडी पडली नाहीये, त्याच्या गावाला याच्यापेक्षा जास्त थंडी कशी पडते असं काहीतरी तो बडबडायला लागल्यावर मी ऐकायचंच बंद केलं.. त्याच्या जागी मला मिशा फेंदारलेला, कोवळ्या उन्हात स्वतःभोवती शेपूट लपेटून ऊन खात बसलेला आणि स्वेटर, शाल, मफलर घालून हिंडणार्‍या लोकांकडे तुच्छतेने बघणारा गुबगुबीत बोकाच दिसायला लागला..तसलाच आहे तो.. माजोर्डा.. उगीच नाही मी त्याला म्याव म्हणत...
लंपनच्या नजरेतून सकाळ बघता बघता मला स्वतःच्या लंपन असलेल्या वयाची आठवण झाली...
थंडीच्या दिवसात सकाळच्या शाळेला निघालेली बिट्टी पोरं-पोरी पहिल्या की आपोआपच आपल्या लहानपणीच्या थंडीच्या दिवसातल्या शाळेच्या आठवणी यायला लागतात, थंडीची चाहूल लागली की कपाटातून बाहेर पडणारे स्वेटर.. त्यांचा तो उबदार वास.. घरातल्या गोधडीचा वास, शाळेला जाताना असेच कुठून कुठून येणारे शेकोटीच्या धुराचे वास, थंडी आणि सुट्टी घेवून येणाऱ्या दिवाळीचा वास.. आणि या सगळ्या वासांना अजूनच वेगळं बनवणारा थंडीचा स्वतःचा एक वास.. थंडी हा ऋतू नसून एक वासच आहे असं वाटायला लागतं...
याच दिवसात शाळेत क्रीडा महोत्सव व्हायचा.. आम्ही म्हणजे खेळ बघणार नंबर एक.. त्यामुळे सकाळी शाळेत खेळाडूंच्या आधी हजर...तंतोतंत.. वर्गात कायम मागे बसून दंगा करणारी आणि शिक्षकांचा मार खाणारी पोरं-पोरी खेळात मात्र पुढे असायची... त्यावेळी त्यांना बक्षीस मिळालं की आपल्याच वर्गातली मुलं म्हणून त्यांचा खूप अभिमान वाटायचा... मग शाळेचं ग्यादरिंग, नाट्यस्पर्धा असलं काही काही यायचं... गंधर्व च्या गाण्याच्या परीक्षा पण तेव्हाच असायच्या.. त्या गाण्यांचे केलेले रियाझ, घोटून घेतलेले राग, नाटकांच्या जीव तोडून केलेल्या तालमी, घोकून घोकून बसवलेले संवाद, नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना चहा आणि पार्ले च्या बिस्किटांचा मिळणारा अल्पोपहार.. त्या चहाने थंडी कुठल्या कुठे पळून जायची.. आणि तेव्हाच्या त्या पार्ले ची सर अमृताला पण येणार नाही.. धुकं दाट होत जायचं तसा तालमींना पण रंग चढायचा.. तो रंग म्हणजे थंडीचाच रंग असल्यासारखं वाटायचं.. मग एकदाच सगळ पार पडून बक्षिस समारंभ व्हायचा... त्यात कोण कोण वक्ते येवुन भाषण करुन जायचे... व्यासपीठावर जावुन बक्षिस घेताना खूपच्या खूप मोठ झाल्यासारख वटायचं..हे सगळ होइपर्यंत नऊमाही परीक्षा आलेली असायची... थंडीबरोबर आलेली सगळी मजा थंडीबरोबरच संपून जायची...
तर असली ती थंडी... सगळ गोठवणारी पण गोठलेल्या आठवणींची ऊब सोबत घेवून येणारी..
तुम्हा सर्वांना थंडीच्या खूप खूप शुभेच्छा...!!
मेरा कुछ सामान ...
गुलझारच मेरा कुछ सामान ऐकत होते.. 
अगदी तितका आणि तसा दूर नसलास तरीही तुझ्या दूर असण्याची जाणीव पुन्हा एकदा चमकून गेली...

असं काही ऐकलं की सरसरून आठवण येते तुझी, अगदी हृदयाच्या तळापासून, खोलवरून, अतिशय आर्त हाक मारावीशी वाटते तुला अशा वेळी.. किव्वा मारूही नये..कदाचित तुझ्यापर्यंत आधीच पोहचली असेल ती... की तू स्वतःच हाक मारतो आहेस मला?
न संपणारे प्रश्न घेवून, न संपणाऱ्या वाटेवर, न संपणारी तुझी सोबत घेवून मी चालत राहते... रहमान च्या धून मधले शब्द शोधताना किव्वा गुलझार च्या शब्दातली धून शोधताना, Bergman च्या संवादांचे तळ गवसताना किव्वा सह्याद्रीची उंची जोखताना तुझ्या सोबतीने अनोखळी वाटादेखील जन्मांतरीच्या ओळखीने हसल्या होत्या..आणि आज अगदी शहरातली, पायाखालची वाट देखील ओळख दाखवत नाहीये... अर्थात तेही बरंच म्हणा कधी कधी....खूप हट्टाने दूर पाठवलं तुला मी... कशासाठी? काय तपासून पाहण्यासाठी? तू सोबत असताना तुझ्या अस्तित्वाची किनार जाणूनबुजून अमान्य करणारा माझा अहं, आज तू दूर गेल्यावर मात्र तुझा जपून ठेवलेला प्रत्येक श्वास स्वतःवर सजवून पाहतोय... तुझ्या रंगात नटून, निरखून बघतोय स्वतःलाच...तू असताना मुद्दाम तू सांगशील त्या विरुद्ध वागणारी मी माझ्याच नकळत तू सांगायचास तशी वागू लागते... तसा विचार करू लागते..इतकं कि मलाच प्रश्न पडतो, मी तुझी जास्त की माझी जास्त? मी तुझ्यासारखा विचार करते की तू माझ्यासारखा? माझ्यातून तू की तुझ्यातून मी? या वर्तुळाचा आरंभ शोधून थकून जाते मी...मग अशा वेळी पु.शी.रेगेंची "साऊ" येते मदतीला... तिची वाक्यं कानात घुमू लागतात.. "मी तुम्हाला आपलंसं करून घेतलं आहे, मला तुमचंस करून घेतलं आहे... या देवघेवीने आपण अधिक व्हायचं की स्वतःभोवती अजून नवे बांध घालायचे?"शेवटी सगळ कळत असूनही आज तू दूर आहेस हेच खरं...
आज साऊची आठवण येतेय... ती पण माझ्यासारखीच वाट पाहत होती म्हणून की त्याने पण यायला असाच वेळ घेतला म्हणून? या वाटांना मी पूर्णच अनोळखी होण्याआधी परत ये.. वाट पाहतेय...