मेरा कुछ सामान ...
सोसण्याच्या पार झाले
दु:ख आता फार झाले..

शोषणारे देशप्रेमी
भांडणारे ठार झाले..

काय कुठल्या चाहुलींनी
लांडगे होश्शार झाले..

झेलली मी वादळे पण,
आसवांचे वार झाले..

सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले..

रात मागे चांद नुसता,
चांदणे बेजार झाले..

तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले..

मारव्याची साद येता,
आज मी गंधार झाले...
मेरा कुछ सामान ...
असे आज काही घडावे कशाने
तुझी याद यावी सुचावे तराणे...

कधी गायिलेले तराणे उमटता
अवेळीच यावे भरोनी नभाने...

नभाने करावी धरा चिंब आणि
धरेने नटावे नव्या वैभवाने...

नवे साज ल्यावे, नवे गंध प्यावे
नवे गंध वार्‍यात मिसळून जावे...

नवे गंध जावे नभाच्या प्रवासा
नभाला कळावे तुझे गूज त्याने...

नभाने कथावे खुळ्या पश्चिमेला
तिने लाजुनी सप्तरंगात न्हावे...

अशी सांज बघता नुरावेच भान
तुझ्या आठवांनी झुरावेच प्राण...

पुन्हा आज काही घडे हे अशाने
तुझी याद आली नि सुचले तराणे...
मेरा कुछ सामान ...
मुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood  मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...
शाय:- investment  banker  from  Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..
अरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift  झाल्यावर तिथे त्याला काही video tapes  सापडतात.. यास्मिन नूर च्या...
चित्रपटाला तिचंच narration  आहे फक्त.. तिने तिच्या भावाला पत्र पाठवण्याऐवजी त्याच्यासाठी बनवलेल्या tapes ... कळत नकळत अरुण पण तिच्या विचारांकडे ओढला जातो..तिच्या भावनांत गुंतत जातो... तिला शोधायचा प्रयत्न पण करतो...
 कोणत्या न कोणत्या धाग्याने एकमेकांशी बांधली गेलेली चार माणसं आणि त्यांचा एका कालखंडातला प्रवास..प्रत्येकाच्या कथेची गुंफण सुंदर प्रकारे केली आहे आणि शेवटाकडे जाताना व्यक्तिरेखा पण अशाच स्पष्ट होत जातात... एक चित्र पुरं व्हायला लागणाऱ्या काळातला प्रवास.. म्हटल तर धोबी घाट कथा आहे या काळाची..अरुणच्या त्या चित्राची..  मुन्नाच्या स्वप्नांची... शायच्या शोधाची... यास्मिन च्या जगण्याची... मुंबई डायरिज हे चित्रपटाचे नाव अगदी सार्थ ठरवलंय या चित्रपटाने... एखाद्या डायरी मधल्याच एका काळाची कथा, एक भाग वाटतो हा.. यातल्या प्रत्येकानेच आपलं काम इतक सुंदर केलंय की कोणाला कमी म्हणावं आणि कोणाला सरस म्हणावं.. चित्रपटाचा अजून एक plus point  किव्वा किरणचा strong  point  म्हणू आपण हवं तर...पण हा चित्रपट बननेला नाहीये.. हा तिने बनवलाय.. आणि हा बनण्यापूर्वी जसाच्या तसा तिच्या डोक्यात होता आणि त्याचप्रमाणे बनवला तिने तो.. Its a perfectly planned and imiplemented work...
आमीर खान सारखा गुणी कलाकार पुरेपूर वापरला गेला नाहीये हे कुठेतरी खटकत रहात.. इतर सगळ्या व्यक्तिरेखा जितक्या स्पष्टपणे व्यक्त झाल्यात, रंगल्यात तितका 'अरुण' रंगला नाहीये.. त्याचा मनस्वीपणा, विचार, भावना व्यक्त करणाऱ्या प्रसंगांची कमतरता जाणवत रहाते.. चित्रपटात आमीरला कमी वाव मिळाल्याची भर climax त्याच्यावर चित्रित करून भरून काढली आहे.. अर्थात त्याच्या अभिनयाची वेगळ्याने प्रसंशा करण्याची गरजच नाही इथे..
लिहायचं म्हटलं तर direction मधल्या बारकाव्यांविषयी, कथेतील बारीक सारीक जागांविषयी बरंच लिहिता येईल.. पण ते वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघणं आणि अनुभवणच असत छान आहे.. जाता जाता इथे चित्रपटाच्या पार्श्वसंगीताविषयी उल्लेख न करणं म्हणजे विषय अर्धवट सोडणं आहे.. Gustavo Santaololla च्या संगीतासोबतच पावसाच्या वेळी, चित्र काढतानाच्या वेळी ठुमरीचा वापर प्रसंगांना खूपच उठाव आणणारा आहे..
हा चित्रपट निश्चितच हिंदी चित्रपटाची समीकरणं बदलणारा आहे.. या आधी असे प्रयोग झाले नाहीत असं नाही..पण ते प्रयोग प्रायोगिक किव्वा class फिल्म म्हणूनच मर्यादित राहिले...रजत कपूर, विनय पाठक आणि त्यांच्या टीम ने खरच काही सुंदर कलाकृती दिल्या आहेत... मला सध्या आठवतोय तो त्यांचा मिथ्या चित्रपट... त्याच्या विषयी बोलायचं तर सगळं तेच लिहावं लागेल.. पण सांगायचं यासाठी की हे असे काही चित्रपट art  फिल्म म्हणूनच बघितले गेले...
किरण ने कुठेतरी स्वत:च्याच मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिचा world सिनेमा च्या मार्केट मध्ये उभा राहू शकेल, पसंतीस उतरू शकेल असा सिनेमा बनवण्यात इंटरेस्ट आहे.. पण माझ्या मते तिचा सिनेमा आर्ट फिल्म च्या नावाखाली अडकून पडलेला उत्तम सिनेमा प्रेक्षकांपर्यंत एक दर्जेदार commercial सिनेमा म्हणून पोहचवू शकेल.. माझा एक खूप आवडता mexican director आहे, Alejandro inarittu..  त्याच्या पद्धतीचा एक खूप हलकासा प्रभाव जाणवला मला आणि जो बॉलीवूड साठी खरच वेगळा आणि स्तुत्य आहे.. बॉलीवूड मध्ये ज्या प्रकारच्या चित्रपटाची मी इतके वर्षे वाट पहात होते ते समोर आल्याचं बघून खरच आनंद होतोय आज.. इथम पुढे Indian cinema म्हणजे फक्त नाच, गाणी, कॉमेडी न रहाता एक दर्जेदार कलाकृती म्हणून समोर येतील अशी इच्छा करते...
मेरा कुछ सामान ...
हा पहा हा चाललेला थोर मेळा
पाप स्वप्नी पण असे तोरा निराळा..

आज संधी लाभली अन बोलला तो
पापण्यांच्याही पहार्‍यातून डोळा..

राजहंसा ना तमा ह्या कावळ्यांची
होऊ दे वाटेल तितकी फौज गोळा...

गे, बटा का परत आणे चेहर्‍यावर
का हवा वार्‍यास वेडा हाच चाळा..

बोलती रागावल्या गोपी कुणाला
जा.. नको ना माठ फोडू खोडसाळा..

रंग माझा वेगळा हे जाणते मी
पांढरा वाटो कुणा वाटेल काळा..
मेरा कुछ सामान ...
जिथे तिथे का दिसशी मजला, तुझाच कायम विचार आहे
तुझ्याविना या जगात माझा, जगावयाला नकार आहे..

जुनेच काही मनात दाटे, फुटेल जेव्हा नवी पल्लवी
असो नसो हा वसंत आता, मनात माझ्या बहार आहे..
 
भिनून जावा नसानसातून, दंश असा दे, मला नव्याने
नको म्हणाले किती तरीही, मनात त्याला रुकार आहे..
 
खुणावणारे क्षितीज आता, कथे मला हे असे तराणे,
तिथे नवे ने सुरेल जगणे, जिथे आता अंध:कार आहे..
 
झुलायला मी दु:ख-सुखाचे, अविरत येथे झुलले झोके,
इथून पुढचा हरेक क्षण जीवना तुझ्यावर उधार आहे..
मेरा कुछ सामान ...
खोटे तुझे उमाळे, भुलण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही...

माझे म्हणू असे मी, कोणी न राहिलेले
गणती फुका सुखाची, करण्यात अर्थ नाही...

झाले कुठे जरासे आसू स्वतंत्र माझे
झाले हसेच त्यांचे, रडण्यात अर्थ नाही..

सांभाळले जरी मी, विरलेच व्योम अंती,
आता तयात तारे, विणण्यात अर्थ नाही..

उरली न ती खुमारी, स्वप्नातल्या क्षणांना
रात्रीवरी उगाचच, रुसण्यात अर्थ नाही..

सांगू कसे कुणाला, आले कुठून कोठे
खोट्या दिशा कि भाग्यच्?, पुसण्यात अर्थ नाही...

मृत्यू दिला तुम्ही जो, स्वीकारला सुखाने
आता दुवा जिण्याची, देण्यात अर्थ नाही..
मेरा कुछ सामान ...
सकाळी जाग आली तेव्हा चांगलीच थंडी वाजत होती..एकशे एकोणीस तास झोपलं तरी झोप झाल्यासारखी वाटत नाही हल्ली.... चारही बाजूंनी चादर घट्ट लपेटून घेतली तरी शिवाजी महाराजांच्या गोष्टीतल्याप्रमाणे थंडी चोरपावलांनी की कशी ते आत शिरतच होती...अजुनी फक्त रात्रीचे २ च वाजलेले असावेत अशी विनंती श्री शंकराला तेवीस वेळा करून मगच घड्याळ पाहिलं तरी ७ वाजलेलेच.. आमचं हे नेहमी असंच असतं.. पक्ष्यांचा कलाकलाट नेहमी छान वाटत असला तरी त्यांनी झोपमोड केली की आम्हाला खूप राग येतो.. पहाटे पहाटे ते काय सांगत असतात? "उठा उठा.. कामाला लागा.." की "आम्हाला इतकी थंडी वाजत असताना असे दुष्टासारखे गुरफटून झोपू नका.." जे असेल ते... पण बाहेर पक्षी म्याड सारखे गोंधळ करत होते तरी सूर्य देव अजुनी उगवत नव्हते...
पुण्यात आता खरच थंडी पडायला लागली आहे..corporation वाले नळातून बर्फाचं पाणी सोडतात आणि चहाचा कप निवांत हातात घेवून gallery त येवून बसेपर्यंतच तो निऊन जातो...रस्त्यावरून मजेत फिरताना अचानकच पाय अडखळून धप्पकन पडावं तशी थंडी पडली आहे.. अचानक आणि जोरदार...थंडी बाईंनी येवून सगळ्यांना एकदम गारठून टाकल आहे अस म्हणायला पूर्णच वाव आहे..
सकाळी सकाळी उठून gallery त आले तेव्हा दुपट्यात गुंडाळलेलं बाळ झोपेत चाळवतं तशी कॉलनी धुक्याच्या चादरीतून जरा जरा हालचाल करू लागली होती..मस्त मोठ्ठी जांभई दिली तर तोंडातून धूरच धूर आला.. म्हणजे कडक थंडीत हाsss केल्यावर तोंडातून येतो तो धूर.. आम्हाला एकदम हिमालयात गेल्यासारखा वाटायला लागलं.. तिथे असंच होतं ते मी कोणत्याकी सिनेमात नीटच पाहिलेलं.. आपलं घर अचानक एका रात्रीत उचलून कोणी हिमालयावर आणून ठेवलंय असं वाटायला लागलं.. आजूबाजूला कुठे बर्फ पडलेला दिसतोय का ते मी पाहून घेतलं...घर काय हिमालयात आलं नव्हतं सोडा.. थंडीच हिमालयातून इकडे आली असणार.. मग त्या आनंदात आम्ही तसाच धूर काढत १०-१५ मि. घालवली.. मग जे झालं ते झालं.. म्हणजे आवरायला उशीर. बस चुकली वगैरे..
सारखं सारखं श्वास घेतल्यामुळे बाहेरची थंड हवा आत जाऊन सगळं गोठून जाणार आहे असं काहीतरी म्याडसारखं वाटत होतं सकाळी.. हे असं मी म्यावला सांगायला गेले तर त्याने उलट मलाच वेड्यात काढलं... थंडी कशी छान असते आणि अजुनी तितकीशी थंडी पडली नाहीये, त्याच्या गावाला याच्यापेक्षा जास्त थंडी कशी पडते असं काहीतरी तो बडबडायला लागल्यावर मी ऐकायचंच बंद केलं.. त्याच्या जागी मला मिशा फेंदारलेला, कोवळ्या उन्हात स्वतःभोवती शेपूट लपेटून ऊन खात बसलेला आणि स्वेटर, शाल, मफलर घालून हिंडणार्‍या लोकांकडे तुच्छतेने बघणारा गुबगुबीत बोकाच दिसायला लागला..तसलाच आहे तो.. माजोर्डा.. उगीच नाही मी त्याला म्याव म्हणत...
लंपनच्या नजरेतून सकाळ बघता बघता मला स्वतःच्या लंपन असलेल्या वयाची आठवण झाली...
थंडीच्या दिवसात सकाळच्या शाळेला निघालेली बिट्टी पोरं-पोरी पहिल्या की आपोआपच आपल्या लहानपणीच्या थंडीच्या दिवसातल्या शाळेच्या आठवणी यायला लागतात, थंडीची चाहूल लागली की कपाटातून बाहेर पडणारे स्वेटर.. त्यांचा तो उबदार वास.. घरातल्या गोधडीचा वास, शाळेला जाताना असेच कुठून कुठून येणारे शेकोटीच्या धुराचे वास, थंडी आणि सुट्टी घेवून येणाऱ्या दिवाळीचा वास.. आणि या सगळ्या वासांना अजूनच वेगळं बनवणारा थंडीचा स्वतःचा एक वास.. थंडी हा ऋतू नसून एक वासच आहे असं वाटायला लागतं...
याच दिवसात शाळेत क्रीडा महोत्सव व्हायचा.. आम्ही म्हणजे खेळ बघणार नंबर एक.. त्यामुळे सकाळी शाळेत खेळाडूंच्या आधी हजर...तंतोतंत.. वर्गात कायम मागे बसून दंगा करणारी आणि शिक्षकांचा मार खाणारी पोरं-पोरी खेळात मात्र पुढे असायची... त्यावेळी त्यांना बक्षीस मिळालं की आपल्याच वर्गातली मुलं म्हणून त्यांचा खूप अभिमान वाटायचा... मग शाळेचं ग्यादरिंग, नाट्यस्पर्धा असलं काही काही यायचं... गंधर्व च्या गाण्याच्या परीक्षा पण तेव्हाच असायच्या.. त्या गाण्यांचे केलेले रियाझ, घोटून घेतलेले राग, नाटकांच्या जीव तोडून केलेल्या तालमी, घोकून घोकून बसवलेले संवाद, नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना चहा आणि पार्ले च्या बिस्किटांचा मिळणारा अल्पोपहार.. त्या चहाने थंडी कुठल्या कुठे पळून जायची.. आणि तेव्हाच्या त्या पार्ले ची सर अमृताला पण येणार नाही.. धुकं दाट होत जायचं तसा तालमींना पण रंग चढायचा.. तो रंग म्हणजे थंडीचाच रंग असल्यासारखं वाटायचं.. मग एकदाच सगळ पार पडून बक्षिस समारंभ व्हायचा... त्यात कोण कोण वक्ते येवुन भाषण करुन जायचे... व्यासपीठावर जावुन बक्षिस घेताना खूपच्या खूप मोठ झाल्यासारख वटायचं..हे सगळ होइपर्यंत नऊमाही परीक्षा आलेली असायची... थंडीबरोबर आलेली सगळी मजा थंडीबरोबरच संपून जायची...
तर असली ती थंडी... सगळ गोठवणारी पण गोठलेल्या आठवणींची ऊब सोबत घेवून येणारी..
तुम्हा सर्वांना थंडीच्या खूप खूप शुभेच्छा...!!
मेरा कुछ सामान ...
गुलझारच मेरा कुछ सामान ऐकत होते.. 
अगदी तितका आणि तसा दूर नसलास तरीही तुझ्या दूर असण्याची जाणीव पुन्हा एकदा चमकून गेली...

असं काही ऐकलं की सरसरून आठवण येते तुझी, अगदी हृदयाच्या तळापासून, खोलवरून, अतिशय आर्त हाक मारावीशी वाटते तुला अशा वेळी.. किव्वा मारूही नये..कदाचित तुझ्यापर्यंत आधीच पोहचली असेल ती... की तू स्वतःच हाक मारतो आहेस मला?
न संपणारे प्रश्न घेवून, न संपणाऱ्या वाटेवर, न संपणारी तुझी सोबत घेवून मी चालत राहते... रहमान च्या धून मधले शब्द शोधताना किव्वा गुलझार च्या शब्दातली धून शोधताना, Bergman च्या संवादांचे तळ गवसताना किव्वा सह्याद्रीची उंची जोखताना तुझ्या सोबतीने अनोखळी वाटादेखील जन्मांतरीच्या ओळखीने हसल्या होत्या..आणि आज अगदी शहरातली, पायाखालची वाट देखील ओळख दाखवत नाहीये... अर्थात तेही बरंच म्हणा कधी कधी....खूप हट्टाने दूर पाठवलं तुला मी... कशासाठी? काय तपासून पाहण्यासाठी? तू सोबत असताना तुझ्या अस्तित्वाची किनार जाणूनबुजून अमान्य करणारा माझा अहं, आज तू दूर गेल्यावर मात्र तुझा जपून ठेवलेला प्रत्येक श्वास स्वतःवर सजवून पाहतोय... तुझ्या रंगात नटून, निरखून बघतोय स्वतःलाच...तू असताना मुद्दाम तू सांगशील त्या विरुद्ध वागणारी मी माझ्याच नकळत तू सांगायचास तशी वागू लागते... तसा विचार करू लागते..इतकं कि मलाच प्रश्न पडतो, मी तुझी जास्त की माझी जास्त? मी तुझ्यासारखा विचार करते की तू माझ्यासारखा? माझ्यातून तू की तुझ्यातून मी? या वर्तुळाचा आरंभ शोधून थकून जाते मी...मग अशा वेळी पु.शी.रेगेंची "साऊ" येते मदतीला... तिची वाक्यं कानात घुमू लागतात.. "मी तुम्हाला आपलंसं करून घेतलं आहे, मला तुमचंस करून घेतलं आहे... या देवघेवीने आपण अधिक व्हायचं की स्वतःभोवती अजून नवे बांध घालायचे?"शेवटी सगळ कळत असूनही आज तू दूर आहेस हेच खरं...
आज साऊची आठवण येतेय... ती पण माझ्यासारखीच वाट पाहत होती म्हणून की त्याने पण यायला असाच वेळ घेतला म्हणून? या वाटांना मी पूर्णच अनोळखी होण्याआधी परत ये.. वाट पाहतेय...