मेरा कुछ सामान ...


कुछ कम ही तआल्लुक हैं, मोहोब्बत का जुनून से..
दिवाने तो होते हैं, बनायें नहीं जातें..
सुदर्शन फकीर च्या या ओळी खूप खूप आठवल्या लैला मजनू बघताना. हा चित्रपट बघून जवळ जवळ दिड महिना उलटला आणि चित्रपट किती चालला याची मला फार कल्पना नाही. इम्तियाजचा स्पष्ट प्रभाव असलेली मांडणी, आजच्या काळात अतिशयोक्त वाटणार्या भावना आणि नविन अनोळखी चेहरे.. पण त्याचबरोबर काश्मिरचं अलौकिक सौंदर्य, जॉय बरुआ आणि निलाद्र कुमार यांचं स्वर्गीय संगीत,  इर्शाद कामिलचे गुलजारीश शब्द, अविनाश तिवारीचा खर्जातला आवाज आणि लाजवाब अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू होत्या. चित्रपट त्याच्या सगळ्या मर्यादांसह सुंदरच वाटला मला. खासकरुन मध्यंतरानंतरचा भाग. जिथे कैस मजनू बनत जातो आणि लैलाच्या व्यक्तिमत्त्वातली तिलाही ठाऊक नसलेली लैला साकार होऊ लागते. इतकं भीषण सुंदर, उत्कट काही घडत जातं नजरेसमोर तेव्हा त्याच्या मर्यादांचा विचार करणे आणि  त्याची कारणमिमांसा शोधण्याची उठाठेव करणे आपल्यालाच क्षुद्र बनवत असतं. हे असं घडताना थांबवू नये कोणी कोणाला.. रोखू नये त्या मरणाच्या वाटेवर जाण्यापासून.... जळू द्यावं स्वतःच्याच अग्नीत आणि उडू द्यावी वार्यावर राख पुन्हा पुन्हा असे मजनू बनण्यासाठी..

म्हणूनच या ओळी चित्रपट पाहिल्यापासून माझी पाठ सोडत नाहियेत. पुन्हा, पुनःपुन्हा आणि पुन्हा लैला मजनू ची गाणी ऐकताना या ओळी कायम कुठेतरी बॅकग्राऊंडला आहेत असं वाटतंय.
खूप वर्षांनी रहमान-गुलझार जोडीचा नसलेला किंवा त्यांच्यापैकी कोणीच नसलेला आणि सगळाच्या सगळा आवडलेला अल्बम आलाय. आणि गेले काही आठवडे तो रिपीट मोड वर ऐकतेय मी..

लैला तर लैलाच आहे. कोणीही सामान्य मुलगी असावी तितकी सामान्य.. तिच्यातल्या लैलापासून अनभिज्ञ.. पण कोणी कैस तिच्यासाठी मजनू व्हावा अशी. ज्याच्यामुळे तिच्यातली लैला जागी व्हावी अशी. लैला तशी खास नाहीच.. पण लैलाला बघायला जी मजनूची नजर लागते ती कैस सोडून कोणाकडेच नाहीये. त्या नजरेनेच लैलाची आठवण बनवलीये कैसच्या मनात आणि मग तो म्हणतो, 

मैंने बात ये तुमसे कहनी हैं.. तेरा प्यार खुशी की टहनी हैं....
मैं श्याम-सहर अब हंसता हुं.. मैंने याद तुम्हारी पहनी हैं...

त्याला लैला हवीये पण ती नाहीये असं नाहीच. ती आहेच. तिची आठवण ओढून घेतलिये त्याने मनभर. मग कसला दुरावा?
तो म्हणतो,

मेरे गुनाहोंमें, मेरे सवाबोंमे..
शामिल तू...
भूली अठ्ठनीसी, बचपन के कुर्तेमेंसे,
मिल तू..

या आणि अशा अनेक गुलजारीश कल्पनांनी भरलेली आहेत यातली गाणी.
आणि त्यात आतिफचा आवाज..!
" मेरी लैला.. लैला.. ख्वाब तू हैं पहला.." या ओळीतल्या लैला म्हणण्यातली त्याची आर्तता आणि पं. भीमसेन जोशींची 'विठ्ठला.. मायबापा' म्हणण्यातली आर्तता यात मला तरी कुठे फरक वाटत नाही. आणि या आर्ततेने लैलाला स्वतःतल्या लैलाच्या त्या रुपाचा शोध लागतो. ज्यासाठी मरण आणि मरणाचं भय हा भागच कुठे उरला नाहीये

"ना यहाँ दिखावा है.. ना यहाँ दुनियावी जजबात है...
जीत ली हैं आखिर में हम दोनोंने ये बाझीया.."
मरणानंतर असं म्हणण्याची रुहानी अवस्था त्यांच्या अनुभवायला येते. मरण त्यांच्या एकत्र येण्याचा सोहळा बनून जातो.
"सुबह सुबह ये बात हो..
नजर मिले जरा.. जरा रात हो.."
असं वाटणारं गुलजारीश कल्पनांचं आयुष्य त्यांना लाभतं.. 

तोवर मात्र चालू असतं लैलाचं आयुष्य.. मजनूशी अनभिज्ञ.. पण मजनूला मजनू झालेलं पाहून उजळून जातं.. जसं राधेच्या प्रेमाने कृष्ण उजळून गेला होता. राधा राधा राहिलीच नाही. ती कृष्ण बनून गेली. हा कृष्णाच्या उजळून जाण्याचा क्षण होता.  तशीच लैलापण... आणि मग लैलाला तिचा मार्ग समजला, जेव्हा मजनू तिला म्हणाला..
"मैं असल में तू हूं.. तेरे नकल नही..."

"शोर हुवा.. घनघोर हुवा... फिर गौर हुवा...
हर दर्द मिटा.. हर फर्क मिटा.. मैं और हुवा..
कोई बात नई.. करामात नई.. कायनात नई..
आग लगी, कुछ खाक हुवा.. कुछ पाक हुवा.."
असं म्हणणार्या मजनूला, असं म्हणन्यात जो जुनून आहे त्याला, तीच व्यक्ती समजून घेऊ शकेल जिने आपल्या आतली धग ज्वालामुखी बनण्यातली वेदना आणि नंतरची शांतता अनुभवलिये.. आपल्यातल्या मजनूला आपल्यापेक्षा वरचढ होताना अनुभवलंय..

जेव्हा कोरस म्हणतो "तेरा खत्म हुआ अक्ल का सफर..' तेव्हा " इश्क बडा नाजूक मिजाज होता हैं.. अक्ल का बोज ऊठा नही पाता" या ओळींची आठवण झाल्यावाचून राहत नाही.
बरोबर ओळी आहेत..
सरफिरीसी बात हैं मेरी.. आयेगी ना ये समझ तेरी..

मजनूला मजनू बनायला लैलाची गरज नाहीये.. लैला अगदी निमित्तमात्र. पण कदाचित पहाडोंके परे जायचं त्याचं स्वप्न त्याला वेडा समजता ऐकून घेणारी कदाचित ती पहिली आणि एकमेव असेल. कदाचित ते स्वप्न बोलू शकावं  ज्याच्यासमोर अस त्याला कोणे भेटलं नसावं..कदाचित तो बोलू शकला नसावा. काय असते वेळ? काळ? एक क्षण पुरतो आणि तो आला की मग आयुष्यभर सरत नाही.
मजनूचा तो क्षण कधी सरलाच नाही. लैलासोबत असण्याचा क्षण. इतरांना कळू शकता लैला कायम सोबत होती त्याच्या.  कायम.. प्रत्येक क्षणात..प्रत्येक कणात.. फुलांत.. पानांत.. त्याच्यात.. तो वेगळा उरलाच नाही लैलापासून..

जॉय बरुआ, निलाद्री कुमार, मोहीत-अरिजीत-आतिफ आणि ईर्शाद कामिल.. गाण्यातलं काव्य.. कवितेतलं गाणं.. संगीतातली उत्कटता.. आणि वेडेपणातलं सौंदर्य.. यातलं पहिल्यांदा काय सुचलं आणि नंतर त्यात काय गुंफलं हे शोधणं अशक्य व्हावं इतक्या या गोष्टी तद्रूप पावल्या आहेत.
किती किती सुंदर जागा आहेत..
"दिल सवालोसेही ना दे रुला " म्हणणारी एखादी ओळ..  " मेरी लैला.." म्हणण्यातली आर्तता.. "तुम नजर में रहो.."गाण्याच्या सुरुआतीला वा़जवलेला तुकडा.. 'आंखे बोले, हो लबपे खामोशी' मधल्या खामोशीचा खर्ज.. नंतर ड्रम वर वाजवलेला पहाडी ठेका.. "हाफिज हाफिज " मधला मॅडनेस.. गयी कामसे मधली म्युझिकल ची आठवण करुन देणारी धून..

या अल्बम ने बर्याच गोष्टी झाल्या. एखाद्या अल्बम ने झपाटून जाणं किती मस्त असतं हे विसरलेच होते मी काही काळात.. तो वेडेपणा या अल्बमच्या निमित्ताने परत आला. एक छान अल्बम आता प्लेलिस्ट मध्ये ॅड झाला.. त्या निमित्ताने परत एकदा खूप काळाने काही लिहावसं वाटलं.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आतली लैला आणि मजनू दोघेही आपल्यापेक्षा वरचढ होत नाहीत याबद्दल विषण्ण हायसं वाटलं...