मेरा कुछ सामान ...
एक होतं अरण्य. त्या अरण्यात एक झाड होतं.. खरंतर फुलझाड... इतरांपेक्षा सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलं येणारं.. ऋतूचक्राच्या अखंड चाललेल्या प्रवासात टप्याटप्याला फुलांनी मोहरणारं.. बहराच्या ऋतूची वाट बघणारं.. बहराची कारणं शोधणारं.. आसुसून बहरणारं..
दरवर्षी पाऊस पडायचा.. मग शरदाचं चांदणं न्हाऊ घालायचं.. शिशिर यायचा पानगळ घेऊन.. आणि वसंताच्या चाहुलीबरोबरच झाड भरुन जायचं फुलांनी.. त्याच्या खास सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलांनी.. हळू हळू गळून जायची सगळी पानं.. उरायची ती फक्त फुलंच.. अशा वेळी झाडाचा रुबाब बघण्यासारखा असायचा.. समाधानाने अजूनच फुलून यायचं झाडाचं मन अशा वेळी..
मग एकदा काय झालं, पानं नावालाही न उरलेलं आणि फुलांनी ओसंडून वाहणार्‍या त्या रुपाचं प्रतिबिंब त्या झाडाला पहायला मिळालं.. झाड थक्क... ते सुंदर होतं याची त्यालाही कल्पना होतीच, आजूबाजूच्या झाडांच्या डोळ्यात दिसायचं ते, पण त्याच्या नजरेला पडलेलं ते रुप कल्पनातीत होतं.. झालं.. खुळावलं.. वेडावलं ते झाड आपल्या रुपाला.. प्रेमात पडलं स्वतःच्याच त्या प्रतिबिंबाच्या.. बस्स.. त्याने ठरवून टाकलं की आता यातलं एकही फूल गळू द्यायचं नाही..झडू द्यायचं नाही.. बाकीच्या झाडांनी त्याला परोपरीने समजाऊन पाहिलं.. "बाबा रे.. असं नसतं करायचं.. ऋतूचक्रानुसार सुरुच राहणार, बहर पानगळ.. नुसत्या ऋतूंचं नाही तर जीवनाचं चक्र आहे हे.. मोडायचा प्रयत्न करु नकोस.. चालत रहा ठरलेल्या वाटेवरुन.. नाहीतर पस्तावशील.." पण नाही.. झाडाला कुठून पटायला हे तत्वज्ञान.. स्वतःच्या बहराच्या प्रेमात होतं ना ते!
फुलं जगवण्याच्या नादात मग नवी पालवी फुटूच दिली नाही त्याने. पानांअभावी जीवनरस बनायचा थांबला..तरी त्याला तमा नव्हती.. आपल्यात शिल्लक असलेल्या जीवनरसाच्या अखेरच्या थेंबापर्यंत फुलांना जपत राहिलं.. जगवत राहिलं.. आणि शेवटी एके दिवशी मरुन गेलं..

तरी मी कायम म्हणत असते, कितीही सुंदर दिसला तरी दु:खाचा हा असा जीवघेणा सोस बरा नव्हे...
4 Responses
  1. Anil Says:

    सुख टिकवण्याच्या आग्रहाने भोगावं लागणारं दुःख हे सुख सोडल्याने किंवा सुटू दिल्याने झालेल्या दुःखापेक्षा जास्त जीवघेणं असतं हा विचार तसा बर्‍यापैकी बरा आहे, पण ही एकच बाजू झाली. नंतर फुलं गळून जाण्याचं दुःख सोसणार नाही म्हणून कळ्याच नं येऊ देण्यासाठीही काही झाडं प्रयत्न करतातच कि. यात एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही झाडांचं passion असतं (असं ते म्हणतात) एकच ऋतु धरून ठेवायचं. passion या शब्दाचा विपर्यास होत असावा हा, कि passion-चा अर्थच असा आहे?.. विचित्र आहे ना हा प्रश्न? हाह्, passion-बद्दल नवीन शोध वगैरे लागला कि काय मला इथे! आता याच्या उलट, ऋतुचक्रामधे सहाजीकपणे फिरत राहणं नाहीतर त्यातून कायमच सुटून जाणं (या दोन्ही गोष्टी कधी कधी सारख्याच वाटतात मला!) हे फकीरीचं लक्षण वाटतं (म्हणजे फकीराला काहीच passion नसतं! हे वरच्या शोधाचं आणखी एक output!). आणि असली फकीर झाडं सोडली तर बाकी मग कितीतरी झाडं कुठल्या ना कुठल्या एकाच (किंवा मोजक्याच) ऋतुमधे अडकून पडलेली असतातच! आता याला अजून एक बाजू अशी कि, प्रत्येक ऋतुमधे जिवंत असं काहीतरी असतंच.. ते जगून घ्यावं, त्याने घायाळ व्हावं, अन् समृद्धही व्हावं आणि पुढच्या मोसमाचे वेध लागले कि मग ते प्रयत्नपुर्वक का होईना पण सुटू द्यावं (हीही पुन्हा फकीरीच झाली बहुदा).. असो. पण हे असं जगायला जे जे आडवं येतं तेही तितकंच महत्त्वाचं आहे.. त्यातलं एक म्हणजे, गेल्या (सोडल्या) मोसमात काहीतरी खोदायचं राहून गेलं अशी मनात राहिलेली खोच. आणि ही खोचच सलत राहते कधी कधी.. इतकी कि..

    कभी छोड़ी हुई मंजिल भी याद आती है राही को,
    खटक सी है जो सीने में ग़मे मंजिल ना बन जाए..

    आता मला असं वाटतंय कि माझी ही कमेंट या पोस्टमधे मांडलेल्या विषयापासून भरकटायला लागलीय.. कि नाही? हेही कळत नाही म्हणजे अवघडच आहे माझं.. द्वैती होतो कि काय मी याची भिती वाटायला लागलीय आता.. कि फकिर? हाह्.. खरंतर दोन्हीही नाही.. नुसतेच प्रश्न उभे करायला आवडणारी झाडंही असावीत काही आणि मीही त्यातलाच एक असावा!.. कुणाला (यात मीही आलोच!) हे 'वैयक्तिक' वाटत असेल (कारण तसं मलाही वाटलं क्षणभर) तर जरा जपून, कारण वैयक्तिक आणि वैश्विक यात किती जड धुकं पसरलंय त्याचा अंदाज येत राहतोच आपल्याला अधुन-मधुन!.. बाकी सर्व कुशल मंगल!


  2. Anonymous Says:

    Stylistically खूपच सुंदर उतारा आहे. पण content मध्ये काही ठिकाणी अडकलो. जसं , झाडाचा पानं गळू न देण्याचा वेडा अट्टाहास आणि नवी पालवी फुटू न देण्याचा त्याचा निग्रह यातलं गणित काही मला उमगलं नाही. म्हणजे नवी पानं उमलल्यावर ती फुलांच्या वाट्याचा आहार सुद्धा गट्टम करतील अशी विचित्र भीती झाडाला होती कि काय? बरं मग फुलांच्या ज्या सौंदर्यापाई ते झाड असं ठार वेडं झालं होतं, ते सौंदर्य टिकवण्यासाठीतरी जीवनरस निर्माण करावाच लागला असताच ना? एकंदरीत काय, वरकरणी जरी झाडाचा 'भारी पोपट' झाल्याचं भासत असलं तरी ते मुळातच डोक्याने जरा 'ठस' असावं. अशा अविचारी, आत्मघाती झाडाबद्दल मी एकच म्हणेन- 'मरेनाका मेलं तर' !


  3. Anonymous,
    :-) अहो, ओळख लपवून बोलू नका.. टीका पण समोरुन करावी.. :-) बाकी तुमची प्रतिक्रियाही योग्यच आहे... अश्या 'ठस' झाडाविषयी कोणीही 'शहाणा माणूस' असाच विचार करेल..
    आपल्या समजातल्या अनेक कलाकारांना, इतकंच काय तर देशासाठी जीव देणार्‍यांनाही बर्‍याचदा अविचारी, आत्मघातीच म्हटलं गेलंय.. So its okay...हे मनस्वीपणाचे नमुने.. शहाण्या माणसांना कसे पटावे? :-)


  4. Ani... Swapnvara... agree with every word written by u here...
    U can give a hope to anybody.... :)