मेरा कुछ सामान ...
इतरांची चंद्रांनी लगडलेली आभाळं कुतूहलाने, काहीशा असूयेनेच पहायचे ते दिवस..
माझं कोरं आभाळ टुकूटुकू बघत रहायचं सैरभैर होऊन, येऊ घातलेल्या चंद्रांच्या वाटेकडे..
एकेक चंद्र जमू लागला आभाळात तसं सजत गेलं आभाळ माझंही..
आता मी च माझ्या आभाळाकडे असूयेनं पहावं असंही वाटू लागलं..
निवडून निवडून आलेला एक एक चंद्र माझ्याकडे..
अगदी माझ्यासारखा.....
दरम्यान काय झालं हे खरंच आठवत नाही..
पण अगदी 'माझ्यासारख्यांत' काहीतरी राहून गेलं एवढं खरं..
एक दिवस जाणवलं,
कोणत्याच चंद्राने हट्ट नाही केला अमावस्येला उगवायचा..
सगळ्यांनीच समजूतदारपणे मान्य केलं एका दिशेने प्रवास करायचं..
सूर्य आला की मावळायचं असतं हे गृहितच धरलेलं सगळ्यांनी..
वाट सोडून मन मानेल तसं धावावं असं कोणालाच वाटलं नाही,
अगदी हक्काचं आभाळ असूनदेखिल..
मग माझ्यासारखं कोण होतं?
माझ्यासारखं काय होतं?
कोणापाशीच मिळाला नाही चंद्राळण्याचा खुळा अट्टहास..
क्षितिजाकडे झुकता झुकता एकेक चंद्र दुसर्‍या आभाळाचा सूर्य होऊ लागला,
सहजपणे..
जितक्या उत्कटतेने आभाळभर चंद्र सजवलेले,
तितक्याच अलिप्तपणे निरोप देतेय आता एकेकाला...
चंद्र कधीच नाही, फक्त आभाळचं माझं होतं कदाचित..
वेड्या अट्टहासापायी प्रत्येक वेळी कोसळणारं..
प्रत्येक चंद्रासाठी नव्याने उंच उडणारं..
माझं आभाळ कोरंच बरं आहे..
आता चंद्राळण्याचं वजन परत नाही सहन होणार त्याला...
6 Responses
  1. बहुतेक मला समजलं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते... छान लिहिलंय....



  2. "बहुतेक", कारण मला वाटतंय तसं असेलच असं नाही ना म्हणून :)
    मला हा ब्लॉग खूप आवडतो. अगदी मनातलं लिहिता तुम्ही. असं वाटतं मीही अशीच आहे, मलाही हेच सांगायचंय पण शब्द फक्त तुमच्याकडेच असतात. लिहित राहा. मी फ्यान आहे तुमच्या लिखाणाची :)


  3. Anonymous Says:

    अग आई ग …. कसल लिहिता तुम्ही … थेट आर पारच … मनघेवड्या आहात कि काय ??? अप्रतिम ..



  4. Anil Says:

    वाचताना सुरवातीलाच मन सैरभैर झालं माझं.. मग चंद्राळलं.. मग हरवून गेलं.. आणि पुन्हा भानावर येईस्तोवर निखळलंही.. मग कोसळलं.. काळवंडलं.. मग समजून स्थिरावलंही.. आणि मधेच फकिरीपणही चमकून गेलं.. मग काहीतरी उमजल्यासारखं वाटलं.. मग सावरलं आणि तरिही मनात एक विवंचनेची खटक राहून गेलीच. आणि ही सगळी जीवघेणी स्थित्यंतरं इतक्या बेमालूमपणे आणि सहजतेने होत गेली कि त्यात जास्त काही ओढताणही जाणवली नाही.. अतिशय तलम पात्याची सुरी ह्रद्यातून आरपार गेल्यासारखी. कमाल आहे या कवितेची! साधेसेच शब्दच इतकं भारावलेपण घेऊन कसे येतात गं तुझ्याकडे असे? वाचतच रहावंसं वाटतं.. खूप छान लिहीतेस तू!

    बाकी, या कवितेत व्यक्त झालेला अनुभव थोडाफार माझ्याही वाट्याला आलेला आहेच. आणि अजूनही कितीतरी चंद्र खुणावत असतातच.. पण माझ्या आभाळाकडं बघितलं कि वाटतं, त्याला नुसत्या येऊन जाणार्‍या फिरतीच्या चंद्रांची पायवाट होणं नाही सोसणार आता.. ह्म्म.. शेवटी कोरं आभाळंच आपलं घर होऊन गेलंय म्हणायचं अन् काय. आता इथे(ही) दोन ओळी आठवताहेत बघ मला..

    कितनी दीवारों के सायें हाथ फैलाते रहे,
    इश्क़ नें लेकिन हमें बेखानुमा रहने दिया..
    [बेखानुमा≈without-love]

    अशी तर आमची जुस्तजू.. जीवघेणी! पण हेच बरंय, नाहीतर मग फिरतीच्या चंद्रांशी आणि स्वतःशीही खूप व्यवहार करत बसावे लागतात.. खरेदी-विक्रीचे, दलालीचे, लाच-लुचपतीचे, अन् कर्जांचे. आणि शेवटी व्हायचं तेच होतं.. सगळ्यांची सगळी देणी कशीबशी फेडून परत आपल्या स्वतःच्या घरी परतावं लागतंच आपल्याला. पण त्या सगळ्या खेळात खूप मोठा धोका हाच आहे कि, आपल्यात हे परतीचं तिकिट काढण्यापुरतं स्वत्वं आणि सत्वं शिल्लक राहीलंच याची काहीच खात्री देता येत नाही खेळताना.. कारण हा खेळ कुणाला कुठे आणि किती दूरपर्यंत फरपटत नेईल याचा काही नेमच नसतो. त्यामुळे रवींद्रनाथांसारखं सगळ्यांनाच खेळ संपल्यानंतर स्वबळावर उभं राहून हे म्हणता येईलच असं नाहिये.. श्वेता, काय म्हणतात रबींदो ऐक..

    The selling and buying are over
    All the dues on both sides have been
    gathered in, and it is time for me
    to go home.
    But, gatekeeper, do you ask for
    your toll ?
    Do not fear, I have still something left.
    My fate has not cheated me of everything.