मेरा कुछ सामान ...
"प्रमाणामध्ये सर्व काही असावे." या प्रमाणात असण्यामुळेच जग सुरळीत चाललय. पण तरीही सगळ्याच गोष्टी प्रमाणात नसतात. जसं की माझा राग... प्रमाणाबाहेर. मर्यादा सोडून. पण तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा आहेत. त्यामुळे तूही कधी कधी चिडतोस. मग म्हणतोस, "माझ्याही ऐकून घेण्याला मर्यादा आहेत. काय गरज आहे हे बोलायची. तुझ्या आजूबाजूच्यांनी काय कमी केलं का तुझ्यासाठी? देन लूक अ‍ॅट पॉसिटीव्ह अ‍ॅन्ड बी हॅपी." पण मला हे ऐकू येत नाही. तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा असल्याचं मला मुळीच आवडलेलं नसतं. आणि मला यावर अमर्याद चिडायचं असतं पण तुझी मर्यादा संपल्याने त्याचं रुपांतर अमर्याद रडण्यात होतं. हे मी तुला कळू देत नाही. आता कध्धीच तुला भेटायचं नाही असं मी ठरवते कारण हे रडणं अमर्याद चालू रहाणार आहे असं मला वाटतं. पण तसं नसतं. काही वेळाने ते संपतं.मला संपणार्‍या गोष्टी आवडत नाहीत. शाळेत असताना प्रत्येक वर्षी वर्ष संपायचं. खूपच्या खूप रडू यायचं तेव्हा. नव्याची ओढ वगैरे काही नाही.
पण अमर्याद असं काही नसतं म्हणे या जगात. जसं पूर्ण चांगलं आणि पूर्ण वाईटही काही नसतं. नथिंग इज ब्लॅक ऑर व्हाईट. एव्हरीथिंग इज ग्रे. पण मला ग्रे आवडत नाही. पण व्हाइट आवडतं. मला ब्लॅकही आवडतं. पण मला ग्रे आवडत नाही. त्यामुळेच कदाचित काहीच ब्लॅक किंवा व्हाईट नाही हे मला जास्त प्रकर्षाने जाणवतं. मला ब्लॅक किंवा व्हाईट ठरवणार्‍यांची अशा वेळी गंमत वाटते मग. मला अमर्याद व्हाईट व्हायचंय. ब्लॅकही चालेल. पण ते शक्य नसावं. तसं नसतं तर गोष्टी बदलल्या नसत्या. आधी भरघोस मिळायचा तो आता तुरळक मिळतो.. लिखाणाला प्रतिसाद. कदाचित आधी मी चांगलं लिहित असेन. पण आता नाही लिहित. म्हणजे माझ्यातल्या चांगलेपणाला मर्यादा होत्या. मला माझ्यातला चांगलेपणा आवडेनासा झालाय. मग आता काय आहे? वाईटपणा? की खरेपणा.. आणि जे काही आहे ते अमर्याद की पुन्हा मर्यादित?
सगळं काही अमर्याद असलं पाहिजे. प्रेम अमर्याद, विरह अमर्याद, रागही तसाच, लोभही तसाच आणि जन्मही तसाच.. जन्म अमर्याद नाही. म्हणून मला अवकाश आवडतो. कारण तो अमर्याद आहे. पण मला पृथ्वी आवडत नाही, तिला मर्यादा आहेत. मला अवकाशाचा भाग व्हायचंय म्हणजे मी ही अमर्याद होईन. मरणाचं अवकाश वेढून असलेल्या जन्मापासून माझी सुटका होईल जेव्हा मी अवकाशाचाच भाग होईन. मी मरणाचा भाग होईन.. भाग नाही, मी मरण होईन.. अमर्याद मरण..!
मेरा कुछ सामान ...
मी लेखक असते तेव्हा,
नाकारत असते मी भाग होणं, कोणत्याही समूहाचा वगैरे..
रचनेच्या नावाखाली नियमांत बांधून, आत्मा मारुन टाकलेल्या प्राणिमात्रांपेक्षा,
माझ्या कल्पनेतले स्वैर, मुक्त आणि उत्फुल्ल जीव,
खुणावत असतात मला...

मी लेखक असते तेव्हा,
मला गरज नसते ईश्वराच्या कृपेची वगैरे..
कारण मी स्वतःच ईश्वर असते मी निर्माण केलेल्या जगाची..
त्याच्या निर्मितीपेक्षा कितीतरी सरस निर्मिती करुन,
मी स्वतःला कधीच सिद्ध केलेलं असतं माझ्या नजरेत..

मी लेखक असते तेव्हा,
मला भासत नाही उणीव कोणत्याच नात्यांची वगैरे..
या जगातल्या आपमतलबी आणि फायद्या तोट्यांची गणितं मांडणार्‍या नात्यांपेक्षा,
माझ्या लेखणीतून फुलणारी,
कितीतरी सुंदर, निखळ आणि नितळ नाती जगत असते मी,
प्रत्येक क्षणी प्रत्येक रुपात...

पण मी लेखक नसते तेव्हा,
कोसळत जातात माझ्यावर या जगात व्यतित केलेले क्षण,
कोसळत जाते मग मीच स्वतःमधून..
गुडघे टेकून हताशपणे..
गदगदत राहते एका आशेची वाट बघत..
ईश्वराला मीच नाकारलेलं असतं,
त्यामुळे बंद असते वाट त्याच्याकडे जायची..
बाहेरचं जग आणि नाती आता भुलवू शकत नाहीत मला..
त्यांच्याकडे जाणं शक्य असूनही पाठ फिरवते मी तिकडे,
आणि मी निर्माण केलेल्या जगात आता मलाच प्रवेश नसतो...
मी लेखक नसते तेव्हा...............
मेरा कुछ सामान ...
"आज गौरी भेटली.."
"काय म्हणाली?"
"अं.. काही नाही. जनरल.."
"तरी पण? इतक्या दिवसांनी भेटलात ना? तिला काही माहिती नसेलच. सांगितलस का मग?"
"हो.. सांगितलं ना."
"मग काय म्हटली?"
"काही नाही. तू ठिक आहेस ना, एवढंच विचारलं."
"बस्स?"
"हो.. स्मित तुला सांगितलं ना, काही नाती नाही बदलत. ती माणसं आपलीच राहतात. तुमच्या आयुष्यात काय झालं काय नाही. तुम्ही काय निर्णय घेतले. ते बरोबर की चूक यावर जोखत राहत नाहीत तुम्हाला. ती तुमची असतात. आणि कायम तुमच्यावर तेवढंच प्रेम करत रहातात."
"हो का? तिला तुझ्या आयुष्याशी काही घेणं देणं नसेल म्हणूनही काही म्हटली नसेल ती."
बहिणीच्या या प्रश्नाने गौरी भेटल्याचा आनंद थोबाडात मारल्यासारखा खर्रकन द्रौपदीच्या चेहर्‍यावरुन उतरला.
"घेणं देणं असतं म्हणजे काय? फक्त घरातल्या लोकांनाच असतं का ते? आणि नक्की काय असतं? माझ्या आयुष्यात जे काही झालं त्याचा तुमच्या आयुष्यावर आणि इमेजवर काय परिणाम होईल याची चिंता. हेच ना?" अजून बरंच काही बोलावसं वाटत होतं पण ती गप्प बसली.
"याही पेक्षा बरंच काहीतरी असतं." रागारागाने एवढं बोलून बहिण निघून गेली मैत्रीणींसोबत सिनेमाला. हिला काही केल्या रडू आवरेना. रडून रडून गाल चिकट वाटायला लागले तशी द्रौपदी उठली. वॉश बेसिनकडे जाऊन चेहर्‍यावर पाणी मारताना सवयीने आरशात पाहिलं. "श्या! च्यायला इतकं रडूनही आपल्या चेहर्‍यात काहीच फरक दिसत नाही. ना डोळे सुजलेले, ना लाल झालेले.. चेहरा थोडासा ओढलेला दिसतोय. बस्स.. तेवढीच काय ती रडल्याची खूण. की आपण रडतच नाही इतके, डोळे सुजण्याइतके वगैरे? आपल्याला कशाचंच मनापासून दु:ख होत नाही का? इतके दगड आहे का आपण?" या विचारासरशी तिला अजून एक हुंदका फुटला. "मुली रडतानाही सुंदर वगैरे दिसतात. झोपल्यावरही. आपण काय्यच्या कायच दिसतो झोपेतून उठल्यावर.. भूतासारखे." या विचाराने अजून एक हुंदका. म्हणजे रडू यायला लागलं की कशावरही रडूच येतं तसं काहीसं झालेलं तिचं. मग तिला रडायचा कंटाळा आला. झोपही चांगलीच आलेली. दु:खी आहे म्हणून झोप नाही आली, रात्र जागून काढली असलं काही व्हायचं नाही तिच्याबाबतीत. सकाळी ऑफीसला जायचं होतंच. त्यामुळे मुकाट्याने अंथरुणावर जाऊन पडली. रडून मन हलकं झालं की सगळा हळवेपणा पण वाहून जायचा शक्यतो तिचा. मग नेहमीप्रमाणे तिने विचार केला, "बास्स. कशाचं एवढं रडू आलं तुला? हे तुझं आयुष्य आहे. तुझ्या मर्जीने. तू निवडलेलं आणि परिणामांची तयारी ठेवत. हे असंच होणार हे माहित नव्हतं का तुला? मग त्यात रडण्यासारखं काय आहे?" विचार करता करता डोळ्यांवर पेंग यायला लागली...
समोर घरचे बसलेत. आणि ही बोलत सुटलिये. म्हणजे अक्षरश: सुटलीये. "कोणत्या समाजाची गोष्ट करता तुम्ही? मी कोणत्याही समाजाचं उत्तरदायित्व नाकारतेय. मी फक्त माझ्या आयुष्याला जबाबदार आहे. मला प्लीज कसलंही लेबल लाऊ नका. मी माणूस म्हणून नाही का जगू शकत? फक्त माणूस म्हणून? आणि माझ्या सुखाच्या व्याख्या दुसर्‍या कोणी का ठरवाव्यात? मला जे वाटतं ते करायला मिळण्यातच माझं सुख आहे. मला मुखवट्यांचा तिरस्कार आहे. मुखवटा न वापरता जगायचं आहे मला. अ‍ॅट एनी कॉस्ट.! तुम्ही काय करताय? केलाच ना इतकी वर्षे संसार? आहात सुखी?" हे असलं काही पुस्तकी बोलतेय ती आणि घरचे ऐकून घेतायेत असं एक स्वप्न ती नेहमीच जागेपणी पहायची. गंगाधर गाडगीळांच्या कथेतली हरलेली माणसं बघतात तशी स्वप्नं. अर्धवट झोपेत कूस बदलली तसे विचारही बदलले. "कसलं आयुष्य जगतोय हे आपण? कसला समाज आहे हा? माणसाला ना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. स्वातंत्र्य आणि संस्कार यांचा ३६ चा आकडा असलेला समाज कसा चालेल? पण म्हणून यातल्या कोणाचंच महत्व कमी होत नाही. स्वातंत्र्याचा संस्कार का नाही होत? आपल्याला कसा समाज हवाय नक्की? सर्वांच्या प्राथमिक गरजा तर पूर्ण व्हायला हव्या. पण कम्युनिझम नको. समाजातली स्पर्धा संपून चालणार नाही. पण ही स्पर्धासुद्धा निकोप हवी. यासाठी सगळे स्पर्धक समजूतदार हवे. मग असा समजूतदार माणूस निर्माण कसा करायचा. आणि माणसाला समजूतदार बनवायचं असेल तर मग त्याच्यातल्या नैसर्गिक उर्मींचं काय? माणूस 'घडवण्याचे' प्रयत्न इतिहासात झालेच पण माणसाच्या माणूसपणाला जास्त किंमत आहे. शेवटी माणूस हे सत्य आहे, समाज ही संकल्पना. आणि माणसाच्या नैसर्गिक उर्मी बदलल्या नाहीच आहेत अनंत काळापासून. माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे. किती सोयिस्कर वाक्य आहे. समूहात असतो तेव्हा बुद्धीमान आणि एकटा असतो तेव्हा प्राणी. माणूस हा फक्त सोयिस्कर जीव आहे.... विचार विचार.. कुठून कुठे. प्रश्नच नुसते. उत्तरं नाहीतच. कधीतरी एकदा सवडीने हे प्रश्न लिहून ठेवले पाहिजेत.. अर्रे... लाईटचं बिल भरायचं राहिलय. उद्या नक्की. ऑफिसचं काम कंटाळावाणं वाटतय हल्ली........"
झोप चढू लागली तसे विचार विस्कळीत होऊ लागले...
सकाळी ऑफिसला पोहचली तेव्हा शाल्मली फोनवरच होती नेहमीप्रमाणे. होणार्‍या नवर्‍याचा फोन. नाजूक आवाजात खुसूखुसू चाललेलं. तसं ते दिवसभरच चालू असतं म्हणा हल्ली.. "झालंय काय या बयेला? डोकं-बिकं गहाण टाकलं की काय हिने?" शाल्मली आणि द्रौपदी गेली ४-५ वर्षे सोबत होत्या. द्रौपदीला त्यांच्या टीममधली ती एकच पोरगी जरा सेंसिबल वाटायची. शाल्मली होतीही तशीच. दिसायला स्मार्ट.. हुशार, कष्टाळू.. उत्तम नृत्य करायची.. तिला स्वतःचा बिझनेस सुरु करायचा होता किंवा डान्स क्लास.. मुख्य म्हणजे तिला तिचे विचार होते. कंपनीत नविन जॉईन झाल्या तेव्हापासून त्यांचं चांगलच जमलं होतं. बराच वेळ गप्पा, चर्चा चालायच्या त्यांच्या. किंबहुना द्रौपदीच्या घटस्फोटानंतरच्या काळात "फार काही वेगळं झालं" अस न जाणवणारी शाल्मलीची एक नजर होती. पहिल्यासारखं सामावून घेणारी. नाहीतर प्रत्येक नजरेत प्रश्न.. आणि एक उपहास पण. हिचा स्वभाव आधीच रोखठोक. त्यामुळे हे व्हायचंच होतं अशा किंवा लव्ह मॅरेज होतं ना, तरी का? असल्या प्रश्नार्थक नजराच वाट्याला आल्या तिच्या. असो.. तर शाल्मली.. अनेक प्रोजेक्ट्स वर काम करताना त्यांनी रात्री जागवल्या होत्या. अनेक इव्हेंटस मध्ये शाल्मलीची हुशारी, समजूतदारपणा दिसला होता. अर्थातच अशा मुलीवर मुलं फिदा न होतील तरच नवल. एका मित्राला तिने हो म्हटलं. त्याच्या घरुन नकार होता. तोच सर्वसामान्य प्रॉब्लेम. इंटरकास्ट. हिच्या घरी कशाचीच कल्पना नव्हती पण ते विरोध करणार नाहीत याची खात्री होती हिला. त्यामुळे आधी तुझ्या घरुन परवानगी मिळव असं सांगितलेलं. पण त्याच्या घरचे ऐकेचनात तेव्हा एकमताने वेगळे झाले दोघे. "चला! ठिकच झालं. फार काही गुंतवणूक नव्हती तर प्रॅक्टिकल निर्णय घेणंच योग्य आहे." द्रौपदी म्हणालेली. कारण शाल्मलीच्या घरुनही वरसंशोधन चालूच होतं. पण आता जे काही चाललेलं तो म्हणजे पूर्णपणे धक्काच होता द्रौपदीसाठी. कालपर्यंत स्त्रियांच्या प्रश्नांवर हिरीरीने मतं मांडणारी, त्यांच्या स्वातंत्र्यावर बोलणारी शाल्मली लग्न ठरल्यावर इतकी बदलली..? तिचं डोकं वाजू लागलं..
"समर्पण हा स्त्रियांचा स्वभावच असतो. आणि आक्रमण पुरुषांचा.."
"आवरा...! असं काही नसतं. समर्पण आणि आक्रमण या भावना दोघांच्यातही असतात आणि सारख्याच असतात. फक्त त्याचं स्वरुप स्थळकाळानुसार बदलतं. तीव्रता कमी जास्त होते. पण भावना तिच. प्रत्येकालाच तीव्र समर्पणाची ओढ असते तशी आक्रमणाची पण. काहीतरी जिंकून घ्यावं आणि कुठेतरी हरुन जावं या भावना बेसिकच आहेत. गंमत म्हणजे या हरण्यामागेही जिंकण्याचा गनिमी कावा असतोच.."
"बरं मग तुला काय म्हणायचं आहे? कदाचित ही तिची जागा असेल समर्पणाची."
"कसं शक्य आहे? फक्त लग्न ठरलं म्हणून आपण कोणाशी नातं कसं निर्माण करु शकतो. कशी काळजी वाटून घेवु शकतो? कसं गोड बोलू शकतो? एखाद्याला न ओळखताच त्याच्यावर प्रेम कसं करणं शक्य आहे?"
"तू केलेलंस ना ओळखून प्रेम. काय झाल?"
"...."
"प्रेम आणि संसार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संसार करताना थोडं सांभाळून घ्यावच लागतं."
"अर्रे पण सांभाळून वगैरे घ्यायचा प्रश्न आलाच कुठे? साधी गोष्ट आहे. ज्याचा मुद्दा बरोबर असेल तो मान्य व्हायला हवा. त्यासाठी तो दोन्ही बाजूंनी नीट लॉजिकली मांडला जायला हवा. काही युक्त्या-प्रयुक्त्या वापरुन आपला मुद्दा मान्य करवुन घेणं यात स्वतःच्या स्वत्वाची हार नाही वाटत का माणसाला? आपण कोणालातरी आपल्या मताप्रमाणे चालायला लावतो हा अहं म्हणजे त्या नात्याची हार नाही का त्या? आणि ज्या नात्यांतला अहं नात्यांपेक्षा महत्वाचा असतो ती नाती बेगडी असतात."
"इतका आदर्शवाद फक्त कल्पनेत असतो. माणसाचा मूळ अहम् च काहीतरी जिंकून घेण्यात दडलेला आहे. तुला स्वतःला जिंकण्यात समाधान आहे. तिला दुसर्‍याला. पण मूळ भावना तिच. माणून बुद्धीमान आहे ना, मग तो बुद्धी वापरुन जिंकायला बघतो. आणि हा प्रकार जीवसाखळी टिकण्याच्या खेळाचा भाग आहे."
"श्शी.. नको असली नाती.."
"खरंच नको?"
"मी नाती नको म्हटलं नाहीये. असली नको म्हटलय."
"हे सगळ्याच नात्यांत होतं. तुझा तूच विचार कर. ज्याला तू सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल नातं वगैरे म्हणतेस त्यात हे नाही होत? इथे बोलणं वापरुन जिंकता, तिथे विचार वापरुन. काय फरक झाला? हे म्हणजे एखाद्या नोकरदाराने वारांगनेला नावं ठेवण्यासारखं झालं? पण दोघांच्यात फरक काय? ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धी विकतो, त्या शरीर विकतात असं उत्तर देण्यातला प्रकार.."
"..."
"कामाला लागा.."
"हं..."
काही दिवसांनी शाल्मलीचं लग्न झालं. अर्थात अतिशय धुमधडाक्यातच. द्रौपदीने तिचा विषय काढूनच टाकला डोक्यातून. शाल्मलीने कंपनीपण सोडली आणि अगदी स्वखुशीने मोठ्या पगारच्या नवर्‍याच्या घरची हाऊसमेकर झाली.
"माणसं जितक्या सहजतेने आयुष्यातून निघून जातात तशाच आठवणीपण गेल्या असत्या तर किती बरं झालं असतं. पण असं होत नाही. दिवस-महिने-वर्षे.. काळ कसा भराभर पुढे जातो. हे असं सगळं चालू असताना अचानक "आपण होतो त्याच जागी आहोत" याची जाणिव होणं फार भयानक असतं.. बघता बघता २ वर्षे निघून गेली. आणि कंपनीतलं डेजिग्नेशन सोडता काहीच बदललं नाही आपल्या आयुष्यात." भर दुपारी लंच च्या वेळेला खिडकीतून बाहेर बघताना असले विचार द्रौपदीच्या डोक्यात पिंगा घालत होते. "किती काय काय बदललं या दोन वर्षांत. बहिणींचं लग्न झालं. सुपरवूमन चा रोल करायला सुरुवातही केली तिने. घरचे आता आपल्यापाशी लग्नाचा विषय काढत नाहीत. शाल्मली ६ महिन्याच्या गोड बाळाची आई झाली. बाळ थोडं मोठं झालं की जॉब करायचा म्हणतेय. गौरी मात्र अजूनही लग्न टाळतेय. कधीतरी कॉलेजमध्ये असताना तिला आवडणार्‍या मुलाने नकार दिला म्हणून अजून एकटी आहे ती? कसं शक्य आहे हे? इतकं प्रेम वगैरे खरंच काही असतं का? पोस्ट ग्रॅज्युअशन, पीएचडी आणि आता नोकरी करायला लागूनही ३ वर्षं झाली तिला. ह्म्म.. परवा वाचलेल्या लेखाविषयी तिच्याशी बोललंच पाहिजे. आई बाळाला दूध पाजताना आणि स्त्री कोणाविषयी तरी रोमँटीक विचार करताना स्त्रवणारा हार्मोन एकच असतो म्हणे. किती वेगळ्या भावना आहेत दोन्ही. आणि जगाच्या दृष्टीने एक अतिशय उदात्त तर दुसरी अजूनही चोरटीच.. पण दोघांमागची प्रेरणा एकच? गौरीसोबत चर्चा करायला खरी मजा येईल. तसंही खूप दिवसात काही भेट नाही." गौरी ला मेसेज टाकायला म्हणून द्रौपदीने फोन हातात घेतला. आणि तेवढ्यात केबिनच्या दारावर टकटक झाली.
"मे आय कम इन?"
दारात सुहास उभा होता. सुहास तिचा कलीग. वर्षच झालेलं कंपनी जॉईन करुन पण प्रोफेशनली जितका चांगला त्याच्यापेक्षा कणभर अधिकच चांगला मित्र झालेला तिचा. तिच्या विचारांची गुंतागुंत शांतपणे ऐकून घेणारा आणि बर्‍याचदा एका झटक्यातच सगळ्या गुंतागुंतीच्या मुळावर घाव घालणारा.
"ओह.. सुहास.. ये ना.. बस..! बोला.. झालं का जेवण?"
"हो.. तू आली नाहीस."
"अं.. हं.. मूड नव्हता.."
"नेहमीप्रमाणेच.."
"..."
"असो.. ऐक.. आज संध्याकाळी क्लायंटला फायनल ड्राफ्ट द्यायचा आहे. आपण परवाचीच आयडीया फायनल करतोय. द्रौपदी यक्षाच्या प्रश्रांना उत्तरं देऊन सगळ्यांची सुटका करते."
"ओके.."
"चल मग.. तुला तर माहिती आहेच बाकी. प्रेझेंटेशन च्या तयारीला लाग.."
"येप.."
---------------------------------------------------------------------------------
"प्रेझेंटेशन भारीच झालं. काय बोललीस तू. अर्थात हे होणारच होतं म्हणा. तुझी द्रौपदी खर्‍या अर्थाने आजच्या स्त्रीला रीप्रेझेंट करते. कॉन्ग्रॅट्स मॅडम.." सुहास अखंड बडबडत होता गाडीत बसल्या बसल्या.
"पण तो यक्ष मूर्ख होता."
"म्हणजे?"
"फिलॉसॉफिकल प्रश्न कायमच सोपे असतात रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांपेक्षा. फिलॉसॉफिकल प्रश्न आणि त्यांची फिलॉसॉफिकल उत्तरं. फारच सोपा मामला आहे हे. रोजच्या जगण्यात यातलं काहीच अ‍ॅप्लिकेबल नसतं."
"तुला याचं कारण माहितेय?"
"तुला माहितेय?"
"हो.. असं होतं कारण प्रश्नांना उत्तरंच नसतात."
"?"
"माणूस प्रश्न कधी सोडवतच नाही. फक्त स्वत:ला सोडवून घेतो त्या प्रश्नांतून. पण आपल्या नशीबाला आलेला यक्षही इतका मूर्ख नसतो. तुझ्या डोक्याला कायम भुंगा लावणारं तुझं मन. त्यातून तुझी सुटका नाही. कोणाचीच नाही. आपण उत्तरं मिळवल्यासारखं करतो. प्रश्न सोडवल्यासारखं करतो पण वास्तविक पाहता यातलं काहीच झालेलं नसतं. त्यामुळे त्या यक्षाचं कधी समाधानही होत नाही आणि तो आपली कधी पाठही सोडत नाही."
"खरंय तुझं. आणि आपल्या सगळ्यांची द्रौपदी झालीये. सगळ्यांचच लग्न लागलंय.. घर, संसार, नोकरी, संस्कार आणि आपली स्वप्नं. या सगळ्यांत मात्र आपलं माणूसपण, स्वातंत्र्य लांब राहिलय. कर्णासारखं. आणि त्याच्या प्राप्तीची इच्छा व्याभिचार ठरतो मग."
"वाहवा.. आता कसं अगदी क्रिअटीव्ह हेड सारखं बोललात मॅडम.."
"बर्र.. असू द्या.."
सुहासशी बोलणं तिथेच थांबलं तरी हीचे विचार थांबेनात. घरापाशी सोडून सुहास गेला. फ्लॅटच्या काळोखात पुन्हा तिचा यक्ष तिला छळू लागला. "शेवटी गौरी काय, मी काय, शाल्मली काय किंवा माझी बहिण काय. येनकेनप्रकारेण सगळ्या द्रौपदीच. पावलोपावली छळणार्‍या यक्षासोबतच आपलं जगणं. प्रश्न सोडवण्याचा रामबाण भारतीय उपाय म्हणजे प्रश्न अस्तित्वातच नसल्याचा दावा करणे. कुपोषणाने मुलं मरतायेत तर कुपोषण नाहीच असं म्हणायचं. वाघांची शिकार होतच नाही असा दावा करायचा. हे म्हणजे सगळ्यात सोयिस्कर. बहिणीसारखं किंवा शाल्मलीसारखं. यांना प्रश्न पडतच नाहीत का? आपल्या आयुष्यासोबत जे काही घडतय, घडत आलय ती सगळी व्यवस्था कधी मान्य केली यांनी काहीच विरोध न करता? कसं जमलं यांना? यांचा हेवा करावा की किव करावी हेच कळत नाही कधी कधी. पण ओढाताण होतेच की यांची पण. गौरीची पण.. सपशेल हरुन जातोय आपण या यक्षापुढे."
विचार करुन संपेनात. उत्तरंही मिळेना आणि शांतताही वाटेना. द्रौपदीने टेबल लँप लावला. कागद पुढे ओढले आणि लिहायला सुरुवात केली, "अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.."
मेरा कुछ सामान ...
हा एक तुकडा तुझा..
आणि हा तुझा..
हा माझा खूप आवडीचा आणि लखलखता,
हा तुझ्याचपाशी असला पाहिजे..
आणि बाकी राहिलेलं सगळं तर आहेच माझं..
नाही का?
.
.
.
.
आता लक्षात येतय, माझं म्हणून जे ठेवलेलं ते फारच कमी होतं,
गहाळ होऊन गेलय कदाचित ते कधीच,
आणि असेलच तर ते बाकी तुकड्याशिवाय पूर्ण होत नाही,
सगळे तुकडे वेगवेगळ्या दिशांना ओढतात आता,
त्यांना जोडून ठेवण्यात दमछाक होते
आणि हाती काहीच लागत नाही..
कोणे एके काळी जन्माला आले तेव्हा एकसंध होते मी कदाचित...
मेरा कुछ सामान ...
तुझ्याविषयी काहीही कलात्मक लिहावं असा तू नाहीस. म्हणजे अजिबातच नाहीस. तरीही तुझ्याविषयी लिहिताना दहादा अडखळतेय मी, कारण तुझ्याविषयी लिहायचं म्हणजे ते तुझ्यासारखंच हवं आणि ते खूप अवघड आहे. का म्हणजे काय? सोपं लिहिणंच तर सगळ्यात अवघड असतं ना... आणि तू खूप सोपा आहेस.. म्हणूनच खूप अवघडदेखिल.. माझ्या शब्दांत मावण्यापलीकडचा..
अगदी पहिल्याने तुला भेटले तेव्हा तुझ्याविषयी काही अंदाज बांधावा इतकाही विचार न करता, "चारचौघांसारखा" असं एक लेबल लावुन तुला मेमरीत ठेऊन टाकलेलं मी. पण तुझ्या सोपेपणाची खोली कळत गेली तसं हे लेबलही गळून गेलं तुझ्यावरुन (इतर अनेक लेबलांप्रमाणेच)
तुझ्यासमोर आयुष्याचं कोणतंही तत्वज्ञान पाजळताना मला खरंतर अतिशय अपराधी वाटत असतं. एखाद्या सुंदर काचेच्या भांड्यावर ओरखडे ओढल्यासारखं. हो.. काचेच्याच.. माणसं मातीचे गोळे असतात आणि मग त्यांचा मातीचा देह बनतो. तू मात्र काचेचाच.. काचेसारखाच.. आतबाहेर निर्मळ, नितळ, पारदर्शक..
"जाऊ दे ना गं.. सोड.. एवढा काय विचार करायचाय? आपणही वागतोच असे कधी कधी. कधी नकळत, कधी जाणूनबुजून. शेवटी आपलीच माणसं आहेत ना ती." इतक्याशा एका वाक्यावर मित्र, मैत्रीणी, नातेवाईकांपासून बॉसपर्यंत कोणाचीही कोणतीही गोष्ट पाठीवर टाकताना पाहिलय मी तुला. असं कसं जमू शकतं कोणाला? आणि तेही अपरिहार्यता म्हणून नव्हे तर समजून घेऊन? वास्तविक पहिल्यांदा तुला असं बोलताना/वागताना पाहिलं तेव्हा "समाजाची खूप गरज असणारा माणूस" हे ही लेबल बहाल केलेलं मी तुला. कदाचित दुबळा. प्रतिकार न करु शकणारा किंवा प्रवाहाविरुद्ध जायला घाबरणारा. पण असं म्हणायला जावं तर असंही नाही. स्वत:ला पटलेल्या मतांवर कोणाचाही विरोध पत्करुन ठाम रहाताना पाहिलय तुला मी.. समोर कितीही मोठा माणूस असला तरीही स्वतःच्या तत्वांवर कधीही तडजोड न करता राहताना पाहिलय. स्वत:च्या मतांवर ठाम रहायचं म्हणजे जगाशी पावलोपावली भांडावं लागतं या मताची पाईक मी. तुला हे असं पहाणं माझ्यासाठी साक्षात्कारापेक्षा कमी नव्हतं. (प्रवाहाच्या विरोधात जायला घाबरणारी आणि म्हणून प्रवाहासोबत असणारी माणसं खरंतर आतून धुमसत असतात आणि ते जाणवल्यावाचून राहत नाही. तुझ्या आतबाहेर भरुन राहिलेली शांतता मात्र नवख्या माणसालाही जाणवेल. हा समजूतदारपणा कुठून आणलास?)  स्वतःच्या मतांवर ठाम राहून आपल्याला विरोध करणार्‍यांवरदेखिल निखळ प्रेम करण्याची कला कुठून मिळालीये तुला? म्हणजे आपल्या विरोधकाचा न पटणारा भाग सोडून बाकी सगळं जाणून घ्यायचं. त्यात काहीतरी आवडण्यासारखं असतंच. पण विरोधकाला विरोधापलीकडे जाणून घेण्याचा विचारच आचरणात उतरवणं केवढं अवघड आहे. (हे असं वागणं किती पुस्तकी वाटतं ना, खासकरुन वाचताना?) पण तुझ्यासोबत राहताना जाणवतं ते किती खरं आहे, किती आतून आलेलं.. अगदी नैसर्गिक.
तुला सांगण्यासाठी प्रत्येकाजवळ काहीतरी असतं. लहानग्या पोरापासून म्हातार्‍यापर्यंत आणि रस्त्यावरच्या स्टॉलवाल्यापासून मॉलमध्ये भेटलेल्या गर्भश्रीमंतांपर्यंत. सगळेच तुला काही ना काही सांगतात. अगदी पहिल्या भेटीत. काही ओळखदेख नसताना. कसं काय? बरं, आता यासाठी लागणारं खूप भारी संभाषणचातुर्य तुझ्याकडे आहे म्हटलं तर असंही नाही. वाक्यात निम्म्या वेळेला तर 'हे','ते' असलं काहीतरी वापरुन वाक्य पूर्ण करावं लागतं तुला. मग ही मोहिनी कुठली होते लोकांवर? तुझ्या गूढ सावळ्या रंगाची की पांढर्‍याशुभ्र हास्याची? कधी कधी वाटतं हात उचलून स्पर्श करावा तुझ्या सावळ्या वर्णाला. चांदीचा वर्ख बोटाला लागतो तसा तुझ्या सावळेपणाही बोटांवर घेता येईल असं वाटतं कधी कधी. बोटांवर घेतलेला तुझा तो रंग बघता बघता अंगभर पसरत जावा, त्याहीपेक्षा खोल आत्म्यापर्यंत झिरपावा. आणि मग तुझ्याच हसण्याचं चांदणं पडून उजळून जावं अंतर्बाह्य. पण नाही. हात पुढे करायला भीती वाटते. आपले हात मातीचे असल्याची जाणिव कशी पुसून टाकायची?
किती किती सोपा समजत होते मी तुला. किती दिवस. हा सगळा चांगुलपणा समजूनही तो केवळ चांगुलपणापर्यंतच मर्यादित होता. इतक्या सरळ माणसांना कशी जाणवेल प्रेमाची खोली? काळजात कळ उठावी अशी तीव्रता? (हेही तुझ्याविषयीचं पुढचं गृहीतक) प्रेम करायला काहीतरी खूप कॉम्लेक्स असावं लागतं अशी काहीतरी धारणा. किंवा जितका माणून गुंतागुंतीचा तितकं प्रेम तीव्र, खोल असले काहीतरी विचार. पण एकही प्रश्न न विचारता इतकं खोल प्रेम कसं करता आलं तुला? कधीच कोणता प्रश्न नाही.. एकही नाही.. हा रुक्मिणीचा वसा कुठे लाभला तुला?
हे एक बरं आहे की तुला जाणिव नाही तुझ्यातल्या नक्षत्रांची. वास्तविक त्यामुळे तू अजूनच उजळून निघतोस. (कधी कधी वाटतं की माणसाला आपल्या असण्याची माहिती नसली की आपण बदलत गेल्याची पण जाणिव होत नाही. आणि मग सगळंच हरवत जातं. पण नाही. हे असले विचार तुझ्यापुढे व्यर्थ आहेत. तुझ्याबाबत हे असं काहीही होणार नाही याची पूर्ण खात्री आहे मला.) कारण तू नुसताच निरागस नाहीस. आणि सगळ्यांसोबत संबंध नीट ठेवणार नुसताच डिप्लोमॅटपण नाहीस. तू असा उमजत जाताना माझ्या मनाच्या किती बेड्या गळून गेल्यात हे मी नाही सांगू शकत. विश्वास गमावणं ही जगात सगळ्यात वाईट गोष्ट असेल कदाचित आणि विश्वास परत येणं ही तितकीच सुंदर.
नातं आणि त्यातली माणसं यांचं नातं काय असतं? कदाचित नातं जास्त महत्वाचं असतं माणसांपेक्षा. पण आपलं नातं तुझ्यापेक्षा महत्वाचं कधीच नाही होऊ शकणार. आपण असू नसू, हे नातं असेल नसेल, भेटी होतील, न होतील.. पण तू असला पाहिजेस. तू आहेस तस्साच तू असला पाहिजेस. तसाच तू राहिला पाहिजेस. मला माझ्याच बेड्यांतून मुक्त करुन तू दाखवलेलं नक्षत्रांनी भरलेलं आभाळ कायमच माझ्या सोबतीला राहिल. आणि तूही असाच रहा.. नक्षत्र फुलवत...
मेरा कुछ सामान ...
लावायचा होता ना तुला आपल्या नात्याचा थांग..
आणि माझ्या मते ते अथांग होतं..
कसे वेडे हट्ट तरी असतात..
कसले वेडे दिवस...
कशाला हवं असायचं तुला विश्लेषण करायला प्रत्येक गोष्टीचं?
पाण्यात उतरण्या आधीच तळाचा अंदाज घ्यायची तुझी घाई,
आणि ते छान उतरुन अनुभवायची माझी पद्धत..
कधी कधी विश्लेषण करण्याच्या नादात विसरुन जातो ना आपण अनुभवणं?
समजलं नाही का तुला हे?
की अनुभवण्याच्या नादात साध्या गोष्टीही लक्षात यायच्या राहून जातात,
हे मला समजलं नाही..
जे असेल ते..
थोडी वाट पहायला हवी होती का आपण?
उशीरा का होईना सापडला असताच की आपल्याला तळ, आपल्या नात्याचा..
फक्त पाणी गढूळायला नको होतं रे..!
मेरा कुछ सामान ...
या आयुष्याचं काय करायचं असतं? म्हणजे नेमका उद्देश काय असतो? मी खरच सांगते मी महत्वाकांक्षी नाही. low aim is crime वगैरे वाक्य ज्यांना आवडतात त्यांना आवडो आणि ज्यांना अशी महत्वाकांक्षा आहे त्यांना असो. पण सगळ्याच लोकांवर महत्वाकांक्षी असण्याचं आणि स्पर्धा करण्याचं बंधन का? कशासाठी? मला सामाजिक बांधिलकीची वगैरे फार चाड नाही. दुरुन तमाशा बघणार्‍यांतला पिंड म्हणा हवंतर. कारण सगळंच निरर्थक वाटतं. जन्म निरर्थक.. जगणं निरर्थक.. निरर्थकाचाच खेळ वाटतो सगळा मला तरी. महित नसलेल्या वाटेवरुन माहित नसलेल्या गावाकडे जाणारा हा प्रवास. गाव कुठलं आहे हे माहित नाही त्यामुळे कुठे थांबूही शकत नाही. हा प्रवास मुक्कामाला न पोहचताच संपणार आहे. हा प्रवास माझ्यासोबत संपणार आहे की प्रवासासोबत मी संपणार आहे. आणि मी च संपून गेले तर काय गाव आणि काय मुक्काम? मेल्यानंतरचं कोणी बघितलंय? मला नाही फरक पडत मी मेल्यावर कोण किती रडेल याचा? कोणी रडेल की नाही याचा तरी.. मला नाही वाटत फार लोकप्रियता असावी आयुष्यात.. किंवा पैसा, सुखं वगैरे... घर, गाडी, विमानप्रवास वगैरे नसतानाही सुख असतंच की. मेल्यावर घर कुठे नेणार आहे मी.? या इतक्या इतक्याश्या मुक्कामात टीचभर जागेसाठी नाही आटापिटा करावा वाटत मला तर माझं काय चुकलं? 
एखादं माणूस फकिर असू नये का? असूच शकत नाही का? काही माणसं असतात ना (म्हणजे खरंतर पुरुष कारण माझ्यातरी बघण्यात आजवर एकही अशी बाई नाही..) बापजाद्यांनी कमवून ठेवलेल्या किंवा स्वत:च कमवलेल्या पैशावर मनमौजी रहाणारी.. त्यांना कुटुंबिय असतात किंवा नसतात. असले तरी ते त्यांना बांधून ठेवू शकत नाही कारण ते पुरुष असतात. नावं ठेवतील कदाचित पण फकिर आहे म्हणुन त्यांचा जगण्याच हक्क कोणी नाकारत बसत नाही. मग माझा पण नाकारला जाऊ नये असं मला वाटलं तर माझं काय चुकलं? मला माझं आयुष्य जगायला कोणाची परवानगी का लागावी? माझा जन्म होवुन अनेक वर्षे लोटली. मला एक हाडामांसाचं शरीर आहे आणि ते जगवायला जे जागतं ते मिळवायची, कमवायची ता़कद, कौशल्य, बुद्धी इ. गोष्टीही आहेत आणि ते मी कमवतेय देखिल. मग तरीही मला स्वत:वर अधिकार मिळवायला माझं अस्तित्व सिद्ध का करावं लागावं. 'मी आहे' एवढ्या गोष्टीने ते का सिद्ध होत नाही. माझं होत नाही तर मग पुरुषांचं कसं होतं? का होतं? आधी मला स्त्री मुक्ती फॅसिनेटींग वाटायची.. मग दांभिक वाटायला लागली. आता काहीच वाटत नाही. काही प्रश्न जेन्युइन आहेत पण मला फक्त माझ्यापुरतं उत्तर हवय. कोणी स्वार्थी म्हटलं तर म्हणो. स्वतः काहीतरी भव्यदिव्य मिळवा, काहीतरी करुन दाखवा (म्हणजे काय?) आणि मग तुम्हाला तुमच्या मनासारखं वागता येईल हे साटंलोटं का? अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा.. हे सगळं अधिक अधिक मिळवायच्या अपेक्षा का? सामान्यपणे लोकांना वाटतं तसं (लोक म्हणतेय मी बायका नाही) घर-संसार ही स्वप्न नाही आली कधी मनात पण मग म्हणून समाजप्रवर्तक, द्र्ष्टा नेता वगैरे होण्याची स्वप्न पाहिली पाहिजेत असं का? उदात्त हेतूला वाहिलेलं आयुष्य अर्थपूर्ण वगैरे असा काही समज असेल.. तर असू दे ना. मी कुठे नाही म्हटलं? पण तो समज मला पटलाच पाहिजे का?  नेतृत्वगुण, समजूतदारपणा, बाणेदार वृत्ती, सोशिकपणा, सात्विकता वगैरे वगैरे चं गुणगाण इतकं ऐकत आलेय मी की अशीच आहे असं मला वाटायला लागलेलं एके काळी. वास्तविक माझ्यात कोणतेही नेतृत्वगुण वगैरे नाहीत. मी कोणालाही दिशा वगैरे दाखवु शकत नाही, समजून घेऊ शकत नाही, ज्याला मी धडाडी, बाणेदारपणा समजत वगैरे समजत होते तो निव्वळ आक्रस्ताळेपणा आहे. आणि हे सगळं उमजलं तेव्हा निराशेच्या खोल गर्तेत जाण्याचा पण अनुभव घेवुन झालाय माझा. पण मी अशी आहे तर मी काय करु? आपल्या खर्‍या भावना दडपून उगीच सोशिकतेचा किंवा प्रेमळपणाचा आव मला नाही आणावासा वाटत. आणि मला महान महान स्वप्नही नाही पडत.. यात माझं काय चुकलं?
कुठलं बंधन नाही.. बेड्या नाहीत.. अपेक्षा नाही.. अपेक्षापूर्ती नाही. जगण्यापुरतं कमवावं..मनमोकळं हसावं. बोलावसं वाटेल त्याच्याशी बोलावं. कधी पंडीतजींच्या मियां मल्हारात तर कधी गुर्टूबाईंच्या ठुमरीत बुडून जावं... मोत्झार्ट चालू असताना व्हॅन गॉग अजून वेगळा समजतो का हे शोधण्यात तासन तास घालवावे.. बर्गमन पाहताना फुटून जावं.. पाठीवारच्या सॅकमध्ये २ कपडे आणि पायात चपला एवढ्या भांडवलावर वाट फुटेल तिकडे चालत रहावं. कुठल्यातरी गावात रात्र कुडकुडावी.. कुठल्यातरी पर्वतावर दिवस तळपावा.. माहित नसलेल्या तळ्यात सुर्य बुडावा.. हात लाऊन पाहता येईल एतका चंद्र जवळ भासावा... कुठल्या आडवाटेने न समजलेल्या भाषेतलं गाणं कानी यावं आणि सोबत रहाता येणार नाही हे माहित असूनही जीव ओवाळून टाकणारे प्रियजन भेटावेत.... बस्स.. जगणं जाणून घेत रहावं आणि जाणून घेत रहावं.. रोज कळतय वाटेपर्यंत नव्याने अडकावं.. अडकलय असं वाटेपर्यंत सुटून जावं.. मला असं जगावसं वाटलं तर काय चुकलं? आयुष्याचा प्रवास खर्‍या अर्थाने प्रवासच व्हावा.. आणि हिमालयाच्या किंवा आल्पस् च्या कुशीत किंवा अ‍ॅमेझॉनच्या खोर्‍यात, किंवा नाईल च्या काठी किंवा पॅसिफिकच्या मध्यावर.. कुठेही संपून जावं कसलाही मागमूस न ठेवता..मातीचा देह मातीत मिसळून जावा.. मला असं मरावसं वाटलं तर माझं काय चुकलं?
मेरा कुछ सामान ...
जन्माला येतो तेव्हाही वाहतच असतं रक्त शरीरात,
वाढत जातं दिसामासांनी..
आपल्याही नकळत अव्याहतपणे सुरु असते प्रक्रिया त्याच्या निर्माणाची..
शुद्धीकरणाची..
येणार्‍या प्रत्येक क्षणागणिक
आणि जाणार्‍या प्रत्येक श्वासागणिक
एकेका थेंबामागे घडत असतं महाभारत...
अखंडपणे..
अचानक वार होतो एखादा आणि भळभळायला लागतं..
.
.
.
.
.
.
कवितापण अशीच जन्माला येते....
मेरा कुछ सामान ...
Hii..!
प्रिय लिहिलं नाही कारण तू मला प्रिय आहेसच याची मला खात्री नाही. किंवा खूप जास्त प्रिय असावीस. Narcissist ना शेवटी.. ह्म्म्म.. कशी आहेस? म्हणजे आता मला खरच आठवत नाही की तू कशी आहेस. स्वतःविषयी विचार करताना मला नेहमी असं वाटतं की, ' अर्रे मी अशीच तर आहे पहिल्यापासून, फक्त आता स्वतःविषयी अमुक अमुक गोष्ट शब्दांत मांडू शकते. (आणि गरज पडलीच तर त्यामागची कारणमीमांसादेखिल स्पष्ट करु शकते.)' असो, तर याप्रकारे तुझ्याविषयीदेखिल मला काही आठवत नाही, त्यामुळे काही नवीनही वाटत नाही.
हल्ली मी परत बोलायला लागलेय. म्हणजे खाई खाई सुटल्यावर माणसं जशी खात सुटतात तशी मी बोलत सुटलेय त्याच्याशी. त्यामुळेच मी त्याला माझी दर्दभरी दास्ताँ पण सांगितली. (वास्तविक, जे झालं त्याच्याविषयी मला दर्दच काय पण इतरही काही वाटत नाही.) पण बहुधा लोकांना दर्द वाटत असावा. म्हणून मग मी देखिल तो वाटू देते. म्हणजे मलाही कधी कधी रडायला हक्काचा खांदा मिळेल अशी आशा वाटते. खरंतर तो नाही मिळाला तरी हरकत नसते. मिळाल्याचा आनंदही नसतो, बरं, तो खांदा मी वापरेनच याचीही खात्री नसते. पण हा खांदा मिळण्याचा प्रकार भलताच रोमँटीक असतो. खांद्यावर रडून झाल्यावर जे काही होतं ते मात्र प्रॅक्टीकल असतं. (की नॅचरल?) पण खरी गंमत ही नाहीये. खरी गंमत ही आहे की, हे सगळं माहित असूनही असंच व्हावसं वाटतं. (व्हावसं वाटतच असंही नाही पण होऊ नये यासाठीही मी काही करत नाही.)
मी फार मी मी करते. कदाचित मला दुसरं काहीच करता येत नसावं. हे जाणवलं की मी विचार करते. shame based conscience आणि guilt based conscience यातला कुठला मला जास्त सूट होईल याचा. कुठलाच नाही असं उत्तर मिळालं की मला विकृत असल्यासारखं वाटतं. आत्महत्या करणे हा चांगला मार्ग असू शकतो पण ते फारचं रोमँटीक वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात मी भलतीच प्रॅक्टीकल असल्यामुळे मला ते जमणार नाही हे ही जाणवतं. स्वतःला नाकारण्यात काही हशील नाही कारण मग माझं नसलेलं conscience कुठूनसं "खोटारडी! खोटारडी" म्हणून ओरडू लागतं. स्वतःला स्विकारणं हा रोमँटीसिजम आहे. त्यामुळे तो ठराविक काळानंतर संपतो. माझ्याबाबतीत तो संपला आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींना अर्थ नाही.
मिळवायचंय ते मिळत नाही ही समस्या नाहीच आहे. काय मिळवायचं तेच समजत नाही ही समस्या आहे. बरं ते समजलं आणि काही मिळालं तरी मग त्यानंतर इतर काही हवसं वाटणारच नाही याची काय खात्री? किंबहुना असं वाटेल याचीच शक्यता जास्त. मग मला काहीच मिळवावसं वाटत नाही. तरी पण मी उत्तरं मिळवते. मिळवायला, गमवायला किंवा बदलायला ती माणसांपेक्षा कमी हानिकारक असतात.  बायका कन्फ्युज असतात असं पुरुषांचं मत असतं हे मला हल्लीच कळलं. आपल्यात बाईपणाचा अवशेष सापडला याचा आनंद मानून घ्यावा असा माझा विचार होता पण मग मला इतर बर्‍याच गोष्टींप्रमाणे याही गोष्टीचा बाईपणाची स्पेसिफिक संबंध लावता येत नाही असं कळलं.
मला पाऊस पडताना परत परत का रोमँटीक वाटत रहातं याचं उत्तर मिळवायचा प्रयत्न चालुये सध्या. असं वाटणं हा मी स्वतःशी केलेला अजून एक खोटारडेपण आहे असा निष्कर्ष निघाल्यास मला खूप काळाने परत एकदा वाईट वाटू शकतं.
असो. आजच्याला इतकच. काळजी घे म्हणत नाही मी तुला. कारण ते खोटं वाटतं. You are sane (selfish?) enough to take care of yourself. जाते.
Bye..!
मेरा कुछ सामान ...
कविता कोणाला काय देते याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असले तरी कवितेचं हे देणं तिच्यासारखंच उत्कट व भरभरून असतं. आपण कधी नकळत, कधी जाणूनबुजून, कधी वेळ काढून हक्काने तिच्याकडे जात राहतो ही गोष्ट सगळ्यांतला समान दुवा आहे.
कवितासंग्रह हा काही एका बैठकीत वाचून काढायचा साहित्यप्रकार नाही. आस्वाद घेत चवीचवीने, रेंगाळत, एकेका कवितेला मुरवून घेत पुढे जाण्यात खरी मजा असते. खासकरुन कवितेच्या बाबतीत असं तेव्हा होतं, जेव्हा कविता आपल्याला, मग ती कळत असो वा नसो, चटकन आपलीशी वाटते. आणि असं रेंगाळावंसं वाटत असतानाही वाहवा देत देतच आपल्याला पुढच्या कवितेकडे अधाशीपणे वळावसं वाटणं यांत कवितेचं यश असतं.
'कविता' या साहित्यप्रकाराच्या सामान्य माणसांतील लोकप्रियतेबद्दल मतंमतांतरे असू शकतात. पण प्रत्येक लेखकाच्या- अगदी थोडं फार लिहू शकणार्‍याच्याही मनात कवितेविषयी एक विशिष्ट जागा असतेच. कदाचित त्यामुळेच एखाद्या कथा-कादंबर्‍या लिहिणार्‍या लेखकाच्या कवितासंग्रहाविषयीदेखिल रसिकांना तेवढीच उत्सुकता असते.
कविता महाजन यांचा "मृगजळीचा मासा" हा काव्यसंग्रह अशाच उत्सुकतेने वाचून काढला. 'ब्र' आणि 'भिन्न' सारख्या सामाजिक विषयांवरच्या कादंबर्‍या वाचल्यानंतर जेव्हा त्यांचं 'ग्राफिटी वॉल' वाचलं तेव्हा त्या कादंबर्‍या जणू नव्याने वाचल्यासारखं वाटलं. सगळी पार्श्वभूमी एका वेगळ्या कोनातून समजली आणि त्याचवेळी त्यांची कवितेविषयीची मतंसुद्धा समजली. त्या म्हणतात - "वास्तवाने निबर झालेल्या त्वचेवर एखाद्या कोवळ्या स्पर्शाने उगवलेली शिरशिरी म्हणजे कविता." आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे, कविता हा आयुष्याच्या सगळ्या धबडग्यातून मिळालेला मोकळा श्वास आहे हे सांगणारं त्यांचं हे वाक्य - "कविता! बाकी गोष्टी कृत्रिम श्वासोच्छवासासारख्या! प्रेम-प्रतिष्ठा- प्रसिद्धी- पैसा- इत्यादी काहीही कवितेमुळे मिळत नसलं तरी मी तिच्या ऑक्सिजनमुळेच तर जिवंत आहे. "
त्यांच्या या मतांमुळे तर पुस्तक वाचायला घेताना प्रचंड उत्सुकता होती. आणि त्यांचं कादंबरीकारापेक्षा एक खूप वेगळं रुप पहायला मिळेल याची खात्रीही. अर्थातच हा संग्रह अपेक्षा पूर्ण करणाराच ठरला. त्यांनी दिवास्वप्नांना हे पुस्तक अर्पण केलंय! "त्यांनीच जणू बळ दिलं खरी स्वप्नं पहायला आणि ती प्रत्यक्षात उतरवायला." आणि अनुक्रमात दिलेल्या कविता सुरु होण्याआधी एक अजून अर्पणपत्रिका दिसते जी उखडलेल्या हातांविषयी बोलते, कारण पंख तर तसेही काल्पनिक असतात. पुस्तक आपली पकड घेतं ते इथपासून!
या संग्रहाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर एक स्त्री आहे म्हणून त्यांच्यातला माणूस मागे पडत नाही आणि माणूसपणाला जागत स्त्रीत्व नाकारण्याचा वेडेपणाही त्या करत नाहीत. कदाचित म्हणूनच कवयित्रींच्या लिखाणाविषयीच्या सगळ्या पारंपारिक गृहितकांना मोडीत काढत या संग्रहातली त्यांची कविता आयुष्याच्या अनेक अंगाना सहज स्पर्श करुन जाते, वाचकाला अंतर्मुख बनवते.
कवितेत वापरलेल्या नवनवीन प्रतिमा महानगरीय जाणिवांतून आल्याच कळतं, पण त्यातूनही भेटणारा महानगरांतला असा एक वेगळा निसर्ग त्या प्रतिमांतून आपल्यासाठी तरी (शहरांतील लोकांसाठी) अधिक दृश्यमान आणि परिचित वाटतो.प्रतिमांचा वेगळेपणा नजरेत भरणारा असला तरी तो केवळ वेगळेपणाच्या हेतूने आलेला नाही. कवितेइतक्याच प्रतिमाही सहज आहेत.
नात्यांत एकाकडून दुसर्‍यावर होणार्‍या अन्यायाविषयी किंवा झालेल्या चुकांविषयी बोलण्याच्या पारंपारिक मानसिकतेपेक्षा नात्यांत अपरिहार्यपणे होत जाणारे बदल - ज्यात खरंतर कोणीच दोषी नसतं - आणि त्यातूनही जिवंत राहणारी नात्यांची मुळं ही कवितेला प्रगल्भ तर बनवतातच पण वाचकाला जास्त भिडतातसुद्धा. खूप जवळच्या नात्यांतले गुंते जगताना मनाच्या आंतरिक पातळीवर चाललेला कोलाहल, ज्यातला कुठलाच एक धागा स्वतंत्रपणे बाजूला करता येत नाही पण त्यांची स्वतंत्र व सगळी मिळून असणारी उत्कटता शब्दातीत असते, अशा भावना खूप सुट्या, स्वतंत्र मांडण्यात आणि तरीही त्यांतील उत्कटता अबाधित ठेवत मांडण्यात त्या कमालीच्या यशस्वी झाल्यात.
बाहेरच्या वर्णनातून सुरु झालेली कविता मग हळू हळू 'त्याच्या'वर येते.. त्याच्यावर थबकल्यासारखी वाटतेय तोवरच हे सगळे भ्रम आहेत हे जाणवून अधिक आत्ममग्न होते. कवितेचा हा शोधाचा प्रवास चालू राहतो, कधी मनाच्या कडेने तर कधी मनाच्या प्रवाहात झोकून देऊन! हा शोध मग येऊन थांबतो मरणापाशी आणि त्यातूनही बाकी राहतं कवितेचं देणं! सगळ्या कवितासंग्रहाचा आकृतीबंध मांडायचा झाला तर असा मांडता येईल. पण मुक्तछंदाच्या कोणत्यातरी ४ ओळी काढून त्यांचा दाखला देणं हा कवितांवर शुद्ध अन्याय होईल. या कविता अनुभवायच्या आहेत आपल्या आपणच.
अतिशय सुरेख लयीत चाललेल्या कविता समेवर शेवट कराव्या अशा संपतात.. एक अख्खं आवर्तन घेऊन. पण ही लय त्यातल्या सुरांची नसते तर विचारांची असते, कविता वाचताना डोळ्यांसमोर उभ्या रहाणार्‍या दृश्यांची असते, कधी कल्पनेची असते.
स्वतःविषयी निर्विकार होत जातानाच्या, स्वत:च्याच विस्मरणात जातानाच्या अनाहत भावनेतून स्वतःच्या घराकडे आणि घरातील लोकांकडे पहाण्याची दृष्टी बदलते आणि त्यातूनच कधी एका क्षणी फुलून येते प्रतिकाराची ठिणगी.. हा क्षण कसा असतो? कायमच इतरांना समजेल अशा भाषेत बोलणं आपल्यालाही टोचतंच की कधी कधी. असह्य होतं मग अशावेळी आणि कंठातून फुटतो आपल्या सूरांतला आपला शब्द. कदाचित हा आवाज ब्र असतो.. आणि ब्र उच्चारल्यावर पुढचं बोलू लागतो आपण. पण हा 'ब्र' फुटण्याचा एक क्षण कसा असतो? हे असे अनेक पकडायला अवघड क्षण नेमकेपणाने समोर येत जातात आणि आपल्या मनाचा तळ ढवळून येताना रोखणं मग आपल्याही हातात रहात नाही.
कविता क्लिष्ट आणि दुर्बोध नसल्या तरी त्यांनी विलक्षण खोली आहे. पूर्वार्धात लिहिलेल्या काही कविता स्वतःबाहेर फारशा जात नाहीत पण तरीही त्या बंदिस्त वाटत नाहीत. स्वतःतच एक आसमंत मोकळा झालाय त्यांच्यासाठी.. एक जग आहे.. खूप एकटं तरी खूप परिचित .. अशा जगाची सफर करुन येतो आपण. अर्थात स्वतःच्याच आत एक फेरी मारुन येतो. त्यात प्रत्येकाला काही ना काही समान सापडेल हे नक्की.
इंदिरा संत किंवा शांताबाईंच्या कवितांमधला स्त्रीत्वाचा तरल आणि अतिशय गाभ्यातून यावा असा आविष्कार घडतोच यात पण काळानुरुप बदलून आल्याने जास्त आपलासा वाटतो, प्रामाणिक वाटतो. वास्तवाच्या जवळ जातानादेखील या कविता आपल्यातली तरलता हरवू देत नाहीत हे विशेष. आत्यंतिक निराशेच्या आणि एकाकीपणाच्या अनुभूतीदेखील रोजच्या जगण्यातील साध्या वर्णनातून त्या अशा समोर उभ्या करतात की पुस्तक मिटल्यावरही त्या अनुभूती मनभर व्यापून रहातात. मरणाविषयी त्यांनी अखेरी ज्या बर्‍याच कविता लिहिल्यात त्यात मरणाविषयीची कुतूहल, कधी दाटलेल्या शिणवट्यातून त्याची वाटणारी गरज तर कधी भीती, कधी त्याची केलेली आळवणी, कधी चपखल शब्द वापरणार्‍या कवीनेप्रमाणे चपखलपणे माणसं निवडणारं मरण तर कधी प्रियकरासारखी त्याच्या मिलनाची पाहिलेली स्वप्नं अशा अनेकानेक अंगांनी त्या भावना मांडल्यात. आणि त्यातूनही राखेतल्या कोंबासारखा आशावाद डोकावत असतो. कवयित्रीच्या मनातील कवितेविषयीच्या भावना, 'कवितेविषयी चार पत्रं' यात समोर येतात आणि मग लेखकाच्या नजरेतून दिसणारी कविता वाचता वाचता, वाचणार्‍या प्रत्येकाच्याच आयुष्यात कविता किती रुजून गेली आहे, आपल्यासोबत आपल्या तळहातावरच्या रेषांसारखी जन्माला आली आहे हे जाणवतं.
हा कवितासंग्रह मला तरी एखाद्या अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रासारखी वाटला. प्रत्येक कविता म्हणजे रंगाचा सुरेख, घाटदार फटकारा आहे. घोटवलेल्या तानेसारखा, अस्सल, लखलखीत! स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व जपणारा. आणि हे सगळं मिळून तयार होणारं जे चित्रं असतं ते आपलंच असतं. आपलीच प्रतिमा. किंवा आपल्या मनाची. म्हणूनच अ‍ॅब्स्ट्रॅक्ट तरीही खूप समजणारी.
मेरा कुछ सामान ...
स्वप्नभरल्या लोचनांना त्रास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता..

परतवूनी लावले मी आसवांना
मग मुक्याने सोडला नि:श्वास नुसता..

बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता..

एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता..

भास! सारे भास!! - अंती हे उमजता,
मी सुखाचा निर्मिला आभास नुसता..
मेरा कुछ सामान ...
(व्हॅन गॉग.. पोस्ट इंप्रेशनिस्ट कलाकारांमधलं खूप महत्वाचं नाव. त्याच्या रंग, रेषा जशा भुरळ घालतात तसाच त्याच्या आयुष्याचा प्रवासही. स्टारी नाईट्स नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या ३ कलाकृती. Starry Night Over the Rhone, Cafe Terrace at Night आणि The Starry Night)
------------------------------------------------------------------------------------
1.JPG
निळेपणाच्या छटा नवीन नव्हत्याच मला कधी,
आठवणी येतात त्याच्या कितीतरी आधीपासून वहातेय निळाई श्वासात..
पण तू अंधार रंगवायला काढलास तेव्हा
कोणाला वाटलं होतं अंधारपण असा..
इतका रंगीत असेल?
खरच, ती कोणती वेळ होती,
जेव्हा तुझ्या मनातल्या अंधाराचं लखलखीत प्रतिबिंब पडलेलं आकाशात?
घनगर्द निळा आणि गूढ हिरवाईच्या छटा लेऊन आभाळ डोकावत राहिलं पाण्यात..
कोणालाही कळू न देता तूच रुजवलीस ना स्वप्नं त्यांच्या डोळ्यांत..
आणि मग त्यातली काही तूच उधळूनही लावलीस आभाळात
अंगभूत लहरीपणानुसार...
वेडे लोक त्यालाच चांदण्या म्हणतात अजूनही..
जग कधीच नव्हतं तुझ्यासाठी..
तुलाही सोसलच नसतं ते..
पण सारंकाही तसंच राहिलय तुझ्यानंतर..
अजूनही रात्री सगळं गाव शांत झोपलेलं असतं..
एखाद्या कॉफीशॉपमधली तुरळकशी वर्दळ सोडता,
जर्द पिवळ्या प्रकाशाला शोषत असतो गूढ अंबर..
परमेश्वरही दुसर्‍या दिवसापर्यंत निश्चिंत झालेला असतो..
पण त्या स्वप्नांचं काय?
तुला माहितेय?
अजूनही त्या स्वप्नांचे ढीग पेटत असतात आकाशात
डोळे कितीही मिटून घेतले तरी आभाळ येतच अंगावर..
जगाला तेव्हाही कोणाशी घेणंदेणं नव्हतं...
आताही नसतेच..
गावकुसाबाहेर कुठल्या वेदनेचं पातं,
कुठल्या प्रतिक्षेत आभाळ तोलून उभं आहे आज परत,
याची तशीही कुणाला कल्पना असते?
3.JPG
2.JPG
मेरा कुछ सामान ...

(असं म्हणतात की, The best love stories in your life happen when you dont know anything about love. Well, I still dont think I know anything about love. पण नक्की आठवतय 'नंदा प्रधान' वाचताना जे झालेलं माझ्या मनाचं ते.. आणि त्यानंतर भेटलेल्या, न भेटलेल्या अगणिक लोकांविषयी वाटलं ते.. त्या सर्वांसाठी..)
**************************************************
नातं बनतं म्हणजे काय?
नातं तुटतं म्हणजे तरी काय?
कोणतंही नातं बनत नाही..
तुटत तर त्याहून नाही...
जिग्-सॉ पझलसारखच वाटायला लागतं आयुष्य कधी कधी,
सगळ्या गोष्टी असतात,
त्या फक्त शोधुन जागच्या जागी बसवायच्या..
तसच काहीसं होतं का नात्यांचं?
आपल्या मनात सगळ्याच नात्यांची काही काही रुपं असतात,
आणि मग माणसं बघुन ती भरायची..
अपेक्षेपलीकडची नाती कधी असतात का?
घटना बदलतील कदाचित,
मतितार्थ मात्र तोच..!
आयुष्याचा कॅनव्हास इतका मोठा झालाय,
कसं रहायचं मर्यादित प्रेम करत?
प्रत्येक मित्रात सापडलेला थोडा थोडा प्रियकर
आणि प्रत्येक प्रियकरातला खूपसारा मित्र..
आणि काही काही तर अगदीच कधीही न भेटलेले पण..
कुणाचा धीरगंभीर स्वभाव आणि गाईचे डोळे,
कोणी उत्साहाचा झरा,
कोणाच्या कुंचल्यात जादू,
कोणाच्या गळ्यात..
कोणी प्रचंड आदराला पात्र,
आणि कोणासाठी उगीचच दाटुन आलेली माया..
कोणी नुसते निर्मळ..
कोणी समजुतदार आणि प्रेमळ..
कोणाचा निर्हेतुक खमकेपणा,
तर कोणाचा सहेतुक थंडपणा..
माझं मलाच कळतय आज प्रेम किती प्रकारे करता येवु शकतं..
आणि कदाचित पुढेही कळत राहिल अजून किती प्रकारे?
तुम्ही मला प्रिय होतात..
इतरांपेक्षा प्रिय झालात..
प्रियतम.. प्रियतर...!
'प्रियकर'???
हे लेबल लागलं की नाही,
याने खरच कितीसा फरक पडतो..
प्रत्येकासाठीचा माझा पदर वेगळा होता..
प्रत्येकासाठी माझ्यापाशी असलेलं दानही वेगळं होतं..
प्रश्न, उत्तरं, व्याख्या आणि बंधनं याच्या पार कधीच पोहचलेलं असतं मन...
आपण का व्याख्या मिळवायच्या नादात माणसं हरवुन बसायचं?
शेवटी व्याख्या आली म्हणजे तिचं अपूर्णत्वही आलं,
अपवादही आले..
त्यापेक्षा शब्दांपलीकडचं सगळच कसं पर्फेक्ट.. परिपूर्ण..
काय फरक पडला आपल्या नात्यात, कबुली दिली गेली किंवा नाही त्याचा..
काय फरक पडला, तुम्हाला माहिती होतं तरी की नाही त्याचा..
आणि काय फरक पडला असता,
अजून काही घोटवलेल्या वाक्यांची पुनरावृत्ती झाली असती तर त्याचाही?
खरंतर, नात्याच्या व्याख्येची खरी गरज तिसर्‍याच माणसाला असते..
कोणत्याही व्याख्येत न गुंतता प्रेम करु शकले,
म्हणुनच कदाचित तुम्हालाही खूप कौतुक वाटलं त्याचं..
पण तुमच्यापैकी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांच्याबद्दल कधी कधी वाटतं,
कदाचित कोणीच सर्वांगाने जाणलं नाही मला..
त्याचं वैषम्य वाटावं असंही काही नाही म्हणा..
हत्ती आणि आयुष्याच्या रुपकाप्रमाणे
करतच रहातो आपण चूक
कोणत्याही माणसाला जोखण्याची..
कदाचित मला स्वतःचा थांग अजून लागला नाहीये
त्यामुळे मी शिकलेय कोणाला ओळखल्याचे दावे न करायला..
पण तुम्ही?
तुम्हाला तरी पटलीये का ओळख स्वतःची खरच..?
आणि माझीही? पूर्ण नाही पण पुरेशी तरी?
त्यामुळे, ज्यांनी मला एकाच कोनातून जोखलं,
त्यांच्या वाट्याला दु:ख आलंही असेल..
ह्म्म...
तुम्हाला समजलं की नाही हे मला माहित नाही,
पण तुम्ही कोणी कधीच नव्हतात एकमेकांच्या रीप्लेसमेंट्साठी..
माझ्या प्रिय प्रियकरांनो,
शेवटी आज मी जी काही आहे ती तुमच्यासकट आहे,
कोणाला.. अगदीच कोणालाही न वगळता...
माझ्या असण्यात जितकी मी आहे,
तितकेच तुम्हीही आहात...
शेवटी माझी तुमच्यापासून सुटका नाहीच..
जिथे स्वतःपासूनच सुटका नाही तिथे तुमच्यापासून कशी?
(तशी माझी सुटका तुमच्यापासून नव्हतीच कधी..
कारण मला बांधुन घालणारेही तुम्ही नव्हताच..
इथे स्वतःच्याच निर्दय तावडीत सापडलेय मी..)
असो.. तुम्ही भेटलात,
मी अजून भेटले स्वत:ला..
स्वतःच्या स्वतःकडे चाललेल्या प्रवासातल्या काही वाटा,
अधिक मोहरल्या असतील कदाचित,
सुकर वाटल्या असतील कदाचित,
उलट बर्‍याचदा तुमचा उत्प्रेरक म्हणुन फायदाच झाला
त्या वाटा जोखताना...
मला माझ्याच आयुष्यात असं मुरवत नेल्याबद्दल
तुमचे आभार..
**************************************************
मेरा कुछ सामान ...

अजून मला आठवतात तुझ्यासोबतचे क्षण..
परत एकदा प्रेमात पडल्यासारखं काहीतरी झालेलं..
मनात म्हटलं हे काय भलतच,
आणि आयुष्याच्या अशा वळणावर...?
बरं.. तू असा जगमित्र,
मला अजून माझाही शोध नीटसा नाही लागलेला..
अनंत विस्तारलेली क्षितिजं समोर घेवुन तू उभा,
आणि मी परतीच्या वाटा बंद झालेल्या वळणावर..
प्रश्न तुझ्या वार्‍यालाही फिरकत नाहीत,
आणि माझ्यासमोर उत्तरांचीच कोडी..
अजून आठवतात ते क्षण.. वेडावलेले..
युगांनंतर जिवंत झाल्यासारखं वाटलेलं..
गुलमोहराच्या झाडाखाली,
अमलताशाला कवेत घेवुन येणारं वारं,
स्पर्शून जात होतं तुझ्या-माझ्यातील पोकळीला..
तुझ्या पौर्णिमेच्या सावळ्या चेहर्‍यावर
अष्टमीचा चंद्र वितळत चाललेला...
तुला खूप काही सांगायचं असताना,
न सुचलेले अर्धे-अधिक शब्द,
आपल्या त्या खळाळत्या हास्यात वळते करुन घेत होतास तू..
आणि तुला शहाणा म्हणू की वेडा ह्या संभ्रमात
मी अधिकाधिक रुतत चाललेली...
अजूनही आठवतात ते सगळे क्षण..
आणि मग माझीच नजर लागू नये तुला चुकून,
म्हणुन मग लपवुन टाकते तुला
माझ्या मनाच्या घनगर्द अंधारात..
आणि मग कधी एका क्षणी,
तुझं अस्तित्व विसरुन, स्वतःतच गुंग होऊन,
खोल उतरत रहाते त्या अंधारात..
आत.. आत.. खूप खोल..
आता वर पाहिलं तर आभाळही दिसत नाही..
खालच्या खोलीचा अंदाजही येत नाही..
अशा वेळी मला मग सोडावेच लागतात,
जिवाच्या आकंताने तुझ्या प्रतिमेचे घट्ट धरुन ठेवलेले हात..
हा तळ माझ्या एकटीचा..
ही वाटही माझ्या एकटीचीच..
पण आता व्याख्येत अडकुन रहायचा कंटाळा आलाय रे..
कशाला नसते अट्टहास..
हे जे काही आहे
त्यासकट मला आठवतात अजूनही..
तुझ्यासोबत घालवलेले काही क्षण...
मेरा कुछ सामान ...
वेदनेतलं सौंदर्य अजून कळायचं होतं आणि वेदनेतही कला असते हे गावी नव्हतं त्या वयातली ही गोष्ट.. इतर कोणत्याही मराठी घराप्रमाणे आमच्याही घरात "स्मिता पाटील" हे नाव कौतुकाने, आदराने घेतलं जायचं. त्याबरोबरच व्यक्त व्हायची तिच्या अकाली निधनाची हळहळ आणि तिच्या सौंदर्याचा आवर्जून केलेला उल्लेख. तिला बघायची प्रचंड उत्सुकता तेव्हापासूनची. मग तिचा फोटो असाच कधीतरी कुठेतरी पाहिला तेव्हा मात्र ग्रेसची संध्याकाळ चेहर्‍यावर उतरल्यासारखे भाव आणि २८ युगांची वेदना साठवणारे ते डोळे बघून जे काही वाटलं त्यात 'सुंदर आहे' हा विचार अजिबातच नव्हता. आणि तिथून पुढे अनेक वर्ष हे मत काही बदललं नाही. पण ते काहीही असलं तरी तिच्याकडे वळून वळून पहावं असं काहीतरी त्या चेहर्‍यात नक्की होतं. काय ते अजूनही पुरेसं उलगडलय असं वाटत नाही पण एखाद्या गोष्टीविषयी गूढ आकर्षण वाटावं आणि मोठ्या माणसाच्या आड लपून लहान मुलं जशी भीतीदायक गोष्ट पहात रहातात तसं तिच्याकडे पाहत रहावं असं मात्र वाटलेलं.
आज वाटतं की तिच्या या संमोहीत करणार्‍या आकर्षणाचं मूळ आहे तिच्या डोळ्यात.. बॉलीवूडमध्ये सुंदर सुंदर डोळ्यांवर सगळं मिळून जेवढं लिहिलं असेल कदाचित तेवढंच एकट्या स्मिताच्या डोळ्यांवर लिहिलं गेलं असेल. तिच्याविषयीचा कोणताही संदर्भ तिच्या डोळ्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही.
तसं त्यानंतर तिला पडद्यावर पाहिलेलं ते म्हणजे "पग घुंगरु बांध" आणि "आज रपट जाये" मध्ये. आणि ते पाहून कळलं नव्हतं की हिचा का एवढा बोलबाला आहे.
smita patil1.jpg
तिला खळखळून हसताना कधी पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. अगदीच उमटलं तर एखादं तृप्ततेचं हसू वाटावं, समजतय- न समजतय तोवर नाहिसं होऊन जाणारं हसूच पाहिलय मी तिच्या चेहर्‍यावर. माणसाच्या नेणिवा त्याच्या जाणिवांवर सदैव कुरघोडी करत असतात असं वाटतं तिचं हसू पाहिलं की.. तिच्या नेणिवांमधली खोल दु:ख तिच्या चेहर्‍यावर नितळ हसू येऊच द्यायची नाहीत जणू. तशी हसली असेल तरी 'स्मिता पाटील' म्हटलं की तो चेहरा नजरेसमोर येत नाही. सगळ्यात असून नसल्यासारखा वाटावा असा तिचा वावर. अतिशय निर्विकारपणे एखादा योगी संसारात वावरावा तशीच भासायची ती कायम. एक खूप गूढ वर्तुळ वावरतय भोवती आणि त्याच्या परिघात फार कमी लोकांना प्रवेश आहे असं वाटायचं.. कदाचित त्यामुळेच त्या परीघात जाणार्‍यांवर तिचं जे प्रेम असेल ते अजून जास्त उत्कट होत असेल..
स्वतःचे स्वतंत्र विचार असलेली, आपलं डोकं वापरणारी, आपली मतं मांडणारी आणि वाटा चोखाळणारी होती ती. मेंढरांच्या कळपातलं तिचं वेगळेपण चटकन नजरेत भरेल कोणाच्याही अशी. तिचं समर्पण आणि निष्ठा तिच्याकडे बघताच कळुन येते नाही? ८ महिन्यांचे गरोदर असताना चित्रपटसृष्टीसाठी निघालेल्या मोर्चात भर उन्हात अन्यथा कोण कशाला चालेल? तिची बंडखोर वृत्ती तिच्या कामातूनही व्यक्त झालीच पण दुर्दैव असं की तिच्या बोल्डपणाची चर्चा प्रमाणापेक्षा जास्त झाली. 'चक्र'मधलं तिचं अफाट काम त्या अंघोळीच्या प्रसंगाने झाकोळलं गेलं जणू. तसं तिच्या नितळ, मोहमयी सौदर्य आणि झळाळत्या कलागुणांची दखल अगदी हॉलीवूडकडूनही घेतली गेली म्हणा. प्रसिद्ध अमेरिकन समिक्षक Elliott Stein म्हणालेला "At 25 Smita is clearly the queen of Indian parallel cinema, as much an icon for film-makers of the milieu as was Anna Karenina for young directors in France at the outset of their new wave. Patil is not a classic beauty but the lady glows. She never makes a false move on screen." एकाच काळात "उंबरठा" आणि "अर्धसत्य" सारख्या परस्परविरोधी भूमिका स्मिताच साकारु जाणे.
तिचा ज्योतिषशास्त्राचा खूप चांगला अभ्यास होता म्हणे. राज बब्बरशी लग्न झाल्यावर ती त्याला म्हणायची "आपलं लग्न तर झालं, पण मी तुझी फार काळ साथ नाही देऊ शकणार." हल्लीच बच्चनने कुठेतरी स्मिताच्या अशा गूढ स्वभावाविषयी सांगितलं. त्याचा तो 'कुली' चा जगप्रसिद्ध अपघात होण्याच्या आदल्या रात्री १ ला स्मिताचा कॉल आलेला त्याला. तिने विचारलं, "आप ठिक तो है. मुझे बहुत बुरा सपना आया आपके बारे में" आणि दुसर्‍या दिवशी हा अपघात झाला त्याला. ती खरच गूढ होती का?
तब्बल ७ वर्ष ती समांतर चित्रपटांशीच सलग्न राहिली. "आज रपट जाये" गाण्याच्या चित्रिकरणानंतर ती घरी येऊन रडलेली ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती असते. आणि तिची वृत्ती बघता ते खरंही वाटतं. कमर्शिअल सिनेमातली स्पर्धा आणि वेळा सांभाळताना माझ्यातल्या माणसाचा मी अपमान करतेय असं मला वाटतं हे तिचं वाक्यच खूप काही सांगुन जातं.
स्मिता-नसीरुद्दीन्-गिरीश कर्नाड यांची जुगलबंदी बघणं हा कायमच एक भारी अनुभव असतो. स्मिता-नसीर चा बाजार मधला प्रसंग, ज्यात स्त्री-मुक्तीवर भाष्य केलय. इतक्या सहज साध्या प्रसंगात ते जे सांगून जातात- खरं तर स्त्रीला स्वत:पासूनच मुक्त व्हायची गरज आहे. आज ह्याचा आधार, हा नाही म्हणून त्याला सोडून दुसर्‍याकडे जाणे ही मुक्ती नव्हे. असं कोणाकडे जावसं वाटणंच थांबायची क्रिया म्हणजे मुक्ती आहे. आणि अगदी हेच मला आठवलं गौरीचं "कारागृहातून पत्रे" वाचताना. त्या कथेची नायिका पण अशाच काही विचारांची. अर्थात ती कथा असल्याने त्यात अजून बरच काही मांडलय ते तिथेच वाचण्यासारखं..(गौरीच्या कथा कधी मोठ्या पडद्यावर मांडता आल्या असत्या तर स्मिताला नक्की कालिंदीची भूमिका करायला आवडली पण असती. आणि तिला तीच मिळाली असती कदाचित.)
मंथन मध्ये स्मिता-गिरीशची दृश्य आवर्जून पहावी अशी. खासकरुन तिची म्हैस मेल्यावर ती त्याच्याकडे जाते आणि तो तिला पैसे देऊ करतो. ती घेत नाही. बाहेर पळत सुटते रडत रडत. तिला खरी अपेक्षा असते त्याच्या सहानुभूतीची. त्यालाही हे माहित असून त्याच्या स्वतःच्या मर्यादांमध्ये तो अडकलेला असतो. त्याचाही मुद्राभिनय लाजवाब आणि स्मिताची तर सगळीच देहबोली.. अगदी सुरुवातीच्या क्षणापासून.
तिला तिच्या जवळच्या मैत्रिणी 'स्मि' म्हणायच्या म्हणे. ती एक उत्कृष्ट फोटोग्राफरही होती. तिने अगदी व्यावसायिक वाटावेत असे फोटो काढले आहेत. हेमामालिनीचं देखिल फोटोशूट केलेला तिने. आणि "अगदी प्रोफेशनल वाटतात फोटो" अशी दाद पण मिळवलेली.
खरंतर राज बब्बरशी तिने लग्न करायचा घेतलेला निर्णय अर्थातच धक्कादायक होता सगळ्यांना. रातोरात तिची प्रतिमा खराब झाली. पण असल्या गोष्टींची पर्वा करणार्‍यांतली ती कधीच नव्हती. खरतर लग्नही केलंच पाहिजे असाही तिचा आग्रह नव्हता. समाजाला दाखवायला म्हणुन काही करायला कायमच तिचा विरोध. म्हणुनच कदाचित "जैत रे जैत" ची नायिका खर्‍या स्मिताच्या जवळ जाणारी वाटते. म्हणजे स्मिता प्रेम करेल तर ते तिच्यासारखच करेल. तिचं ते बाजिंदी असणारं मनमानी रुप, तिचं ढोलियावरचं प्रेम. आणि ते मिळवण्यासाठी तिने केलेलं सगळंकाही हे केवळ शब्दातीत. नुसत्या "जैत रे जैत" वर पानंच्या पानं लिहावीत असं.
१७ ऑक्टोंबर १९५५ ला एका मंत्री आणि समाजसेविका दांपत्याच्या पोटाला जन्माला आलेली ही मुलगी. मराठी शाळेत शिकलेली. अस्सल मराठी वातावरणात वाढलेली स्मिता. पहिल्यांद कॅमेरासमोर आली ती बातम्या द्यायला म्हणुन.. घाईघाईत तिने जीन्सवर गुंडाळलेल्या साडीत लोक तिला "साडीत खूप सुंदर दिसतेस" अशी प्रतिक्रिया द्यायचे तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचं खट्याळ हसू कसं असेल याची कल्पनापण अभावानेच करवते. बुद्धाच्या बंद डोळ्यांआड जे अफाट दु;ख होतं तसच काहीसं स्मिताच्या उघड्या, टपोर्‍या डोळ्यांबाबत. तिथेच श्याम बेनेगलनी स्मिताला टिपलं. "चरनदास चोर" हा लहान मुलांचा चित्रपट असला तरी 'स्मिता पाटील' आणि 'श्याम बेनेगल' ही दोन नावं चित्रपटसृष्टीला दिल्यावबद्दल तो कायम लक्षात राहिल.
आयुष्य हा शेवटी एक निर्दयी, विरोधाभासात्मक खेळ आहे याची परत जाणिव व्हावी अशा घटनांतील एक घटना म्हणजे स्मिताचा शेवट आहे. स्त्री-सक्षमीकरणाच्या अनेक गोष्टी ज्यात तिने पुढाकार घेतला त्यात मातामृत्यूप्रमाण रोखण्याच्या बाबींचाही समावेश होता. आणि तिच्या मृत्यूनंतर आता इतक्या वर्षांनी मृणाल सेन म्हणाले की निष्काळजीपणामुळेच स्मिताचा मृत्यू झाला. प्रतिकच्य जन्मानंतर १३ अवघ्या काही दिवसांनी, १३ डिसेंबर १९८६ ला स्मिताचं असं निघुन जाणं हा चित्रपटसृष्टीला बसलेला नक्कीच मोठा धक्का होता. कारण चित्रपटसृष्टीची गणितं बदलण्याचं सामर्थ्य ती बाळगुन होती. आपल्या पदार्पणातच शबानाला टक्कर दिली होती तिने आपसुकच. लोकांच्या मनात कायमच त्यांची स्पर्धा राहिली. पहिल्या दोन चित्रपटांनंतरच तिची तुलना शबानाशी होवु लागली होती. स्मिताला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मात्र शबानाच्या आधी मिळाला. आणि मग शबानाला तीन सलग ८३ (अर्थ), ८४ (खंडहर), ८५ (पार). आणि हे शेवटपर्यंत चालुच राहिलं.
उण्यापुर्‍या १० वर्षांची कारकीर्द. सगळे मिळून ८० चित्रपट. २ राष्ट्रीय आणि १ फिल्मफेअर आणि पद्मश्री विजेती. ती एकमेव आशियाई चित्रपट कलाकार आहे जिचे चित्रपट पॅरिस आणि ला रोशलमध्ये व्यक्तिविशेष म्हणुन प्रदर्शित केले गेले. शेवटी 'स्मिता' विषयी काहीही विचार करताना ना.धो. महानोरच जास्त योग्य वाटतात. "या पंखावरती, मी नभ पांघरती, मी भिंगरभिवरी बाई चांदन्यात न्हाती" असो किंवा "असं एखादं पाखरु वेल्हाळ, त्याला सामोरं येतया आभाळ" असो. माझ्यासाठी तरी अशीच आहे स्मिता..
-----------------------------------------------------------------------------
(गौरी न वाचलेल्यांसाठी: कालिंदी ही गौरीच्या "थांग" आणि "मुक्काम" ची नायिका. थोडी थोडी उंबरठा मधल्या स्मितासारखी. पण कालिंदीला पार्टनर पण सापडतो.)
मेरा कुछ सामान ...
हे म्हणजे भलतंच...
माध्यम आलं म्हणजे माध्यमाची चौकट आली..
बंधनं आली..
गावाला पोहचणं लांब राहिलं..
गाडीचा मेंटेनंस आणि वाहतुकीच्या नियमांनीच जीव काढलाय..
बरं सगळं असच असावं ना मग.
तर ते ही नाही..
अफाट वेगाचं वेड घेवुन दर्‍याखोर्‍यांतून पर्वतांना टक्कर देणारी वावटळ,
आणि खोलीतल्या पंख्याची नियंत्रित झुळूक
यांना कोणीतरी एकत्र बांधून आता सोबत चाला म्हटलय..
छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..
मेरा कुछ सामान ...
एखादं छानसं चित्र काढायला घ्यावं, ते मनाप्रमाणे जमतही यावं पण मध्येच लहर फिरल्यासारखे त्यात गडद, उदासिन रंग भरावेत आणि मग असंच फाडून फेकून द्यावं असं काहीसं नियतीने गुरुदत्तच्या बाबतीत केल्यासारखं वाटतं कायम त्याचा विचार करताना. पण त्या चित्राच्या राहिलेच्या, अस्तित्वात असलेल्या खुणा इतक्या विलोभनीय आहेत की आयुष्याच्या या कुटील आणि जटील प्रक्रियांचा राग येतो पण गुरुदत्तच्या अलौकिक प्रतिभेची पाळंमुळंदेखिल अशाच कुठल्यातरी गुंतागुंतीच्या प्रक्रियेत असतील हे जाणवुन स्तब्ध व्हायला होतं.
वसंत कुमार शिवशंकर पडुकोण.. ९ जुलै १९२५ ला बेंगलोरमध्ये जन्माला आलेला हा मुलगा पुढे गुरुदत्त नावाने चित्रपट क्षेत्रातला महारथी ठरला.. १९४१-४६ त्याने उदयशंकर यांच्याकडे त्याने ५ वर्षे नृत्य, नाट्य प्रशिक्षण पण घेतलं. त्यावेळी त्याने सादर केलेलम सर्पनृत्य त्याच्या मृत्यूविषयी असलेल्य गूढ ओढीचं प्रतिक होतं का? खरा कलाकार हा नेहमी असमाधानी असतो म्हणतात. पण त्याचं असमाधानी असणं त्याला इतकं अस्वस्थ करुन गेलं का? किंवा का करुन गेलं?उण्यापुर्‍या ३९ वर्षांचं आयुष्य आणि त्यात सगळं मिळून २० वर्षांचं करीअर. त्यातही सुरुवातीची काही वर्षे किरकोळ भुमिका, सहाय्यक दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक अशी कामं करण्यात गेली.. आणि हा माणुस जगातला एक नामवंत दिग्दर्शक बनला. टाइम्स च्या १० रोमँटीक सिनेमांच्या यादीत त्याच प्यासा आहेच, झालच तर १०० बेस्ट चित्रपटांमध्ये पण त्याचा समावेश आहे आणि तो स्वतः सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक..
गुरुदत्त म्हटलं की खूप पूर्वी लहानपणी कधी बघितलेली त्याची पहिली झलक आजही नजरेसमोर जशीच्या तश्शी उभी रहाते. एक शांत, धीरगंभीर मूर्ती, ठसठशीत चेहरा, विशाल भालप्रदेश, त्याच्यावरच्या नाजुकशा आठ्यांचं जाळं आणि काळेभोर डोळे. त्या नजरेला नजर द्यायचं सामर्थ्य राहु नये, आपल्या आतलं काहीतरी शोषून घेतेय असं वाटायला लावणारी ती नजर. अशी काही वेदना त्याच्या नजरेत आहे की आपसूक नजर खाली तरी झुकावी नाहीतर त्याच्या नजरेतच गुंतून तरी पडावी. त्याच्या चेहर्‍यावरची ही वेदना कधीच पुर्णपणे नाहीशी झालेली मी तरी पाहिली नाही. अगदी मि. & मिसेस ५५ मध्ये मधुबालासोबतचे नटखट रुमानी प्रसंग करताना पण त्या आठ्या तशाच.. ( and again हे सांगितल्याशिवाय रहावत नाही की हा सिनेमा मधुबालासाठी पाहिलाच पाहिजे. तिने विशीतली अल्लड, लग्नाळलेली, अरागस यौवना अशी काही उभी केलिय की आह..! तिच्या त्यातल्या एका एका वाक्यावर, अदेवर मी हजार जन्म ओवाळायला तयार.. तिच्यावर परत कधीतरी..) पण तिच्यासमोरही हा पठ्ठ्या असा काही उभा राहिलाय की तिच्या त्या अलौकिक वावरापुढे तो अजिबात झाकोळला जात नाही. मोस्ट रोमँटीक जोड्यांमध्ये ही जोडी नक्की..!
फ्रेंच न्यु वेव्ह ची चळवळ अजून व्याख्येत बसायची होती, आकाराला यायचे होती त्यावेळी गुरुदत्तने त्याचा प्यासा बनवला होता. किंबहुना Francois Truffaut चा 400 blows (१९५९), जो खर्‍या अर्थाने इटालियन निओरीअ‍ॅलिझम सिनेमामध्ये प्रयत्नपूर्वक आणणारा प्रयोग म्हणून पाहिला जातो त्याच्या २ वर्षे आधी प्यासा (१९५७) प्रदर्शित झाला होता. 400 blows मधली एका किशोरवयीन मुलाची कथा आणि प्यासामधल्या युवकाची व्यथा ही एकाच पातळीवरची आहे. गुरुदत्त हा खर्‍या अर्थाने चित्रपटाच्या क्षेत्रातील एक दूरदृष्टी असलेला, स्वतःची प्रतिभा, विचार असलेला, वेगळ्या वाटा चोखाळणारा एक बुद्धीमान दिग्दर्शक होता. आशियाई सिनेमा त्यावेळी जगात एवढा प्रभावी नसल्यामुळे कदाचित गुरुदत्तचे प्रयत्न व जागतिक पातळीवरील मान्यता मर्यादित राहिली पण त्याहीवेळी त्याचे चित्रपट जर्मनी, फ्रांस आणि जपान मध्ये हाऊसफुल चालत होते हे विशेष.!
'कागज के फूल' हा त्याचा त्याच्या अपेक्षेबाहेर फ्लॉप झालेला एकमेव चित्रपट पण आज हा सिनेमा गुरुदत्तची अजोड कलाकृती म्हणुन पाहिला जातो आणि अर्थातच तो आहे. सिनेमास्कोप चे तंत्रज्ञान पहिल्यांदा हिंदी सिनेमात वापरले गेले ते याच चित्रपटाच्या निमित्ताने. झाली गंमत अशी की त्यावेळी २० सेंच्युरी फॉक्स ही चित्रपटातली प्रसिद्ध कंपनी भारतात काही चित्रिकरण करत होती आणि परत जाताना त्यांच्या लेन्सेस इथेच राहुन गेल्या. त्याचदरम्यान गुरुदत्त 'कागज़ के फूल' साठी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात होता. त्याला ही बातमी कळाल्याबरोबर लगेच तो आपले सिनेमॅटोग्राफर मुर्थींना घेवुन तिथे पोहचला आणि त्या लेन्सेस त्याने मिळवल्या. त्या चित्रपटात त्याने केलेल्या कॅमेर्‍याच्या करामती आणि छायाप्रकाशाचा वापर हे कायमच चर्चेत राहिलेले आहेत पण 'वक्तने किया क्या हंसी सितम'च्या वेळी गुरुदत्त विचार करत असताना अचानक सूर्यप्रकाशाची एक तिरीप त्याला दिसली आणि त्याने ठरवलं की असं काहीतरी आपल्याला करायचय आणि मग त्याच्या इच्छेनुसार सेटच्या छतावर सूर्यप्रकाशाचा आणि आरशांचा वापर करुन प्रकाशाचा तो झोत निर्माण केला ज्यात एक झालेल्या गुरुदत्त आणि वहिदाच्या प्रतिमांनी त्यांच्या आत्म्याच्या मिलनाची कल्पना त्याला हवी तशी साकारली पडद्यावर. गीता दत्तच्या जादुई आवाज आणि बर्मनदाच्या सूरांच्या पार्श्वभूमीवर कैफी आझमींच शब्द आणि हा छायाप्रकाशाचा केलेला खेळ बघणार्‍याच्या मनावर कायमचा ठसा उमटवुन जातो हे मात्र खरं..! 'कागज़ के फूल' मधल्या अशा अनेक प्रसंगांचा उल्लेख करता येईल.या चित्रपटात प्रथमच कथा पुढे नेण्यासाठी गाण्यांचा वापर करण्यात आला. ही कथा त्याच्या स्वतःच्या आयुष्याची कथा होती आणि ती स्वत:ची वाटू नये म्हणुन त्याने त्यात अनेक वेळ बदलही केले. त्यातल्या त्याचा आणि वहिदाच्या भेटीचा प्रसंग, वहिदाला पार्टीत पाहिल्यानंतर झालेला त्याचा-तिचा संवाद, त्याचं आणि त्याच्या मुलीचं नातं अशा अनेकानेक गोष्टी माझ्यातरी कायमच्या स्मरणात राहिल्यात.
त्याच्या प्यासाच्या निर्मितीवर एक स्वतंत्र कथा होईल एतक्या गोष्टी त्या चित्रपटाशी निगडीत आहेत. अबरार अल्वीच्या या मूळ कथेचं नाव होतं 'कश्मकश', मूळ नायक होता 'चित्रकार किंवा लेखक', गुलाबोचं पात्र नव्हतंच. अबरार ला माटुंग्याला भेटलेली खरीखुरी गुलाबो गुरुदत्तसमोर त्यांनी मांडली आणि प्यासाची कथा त्याच्या मनात पुर्ण झाली. उच्चभ्रु, पांढरपेशा समाजाच्या तकलादु भावना मांडायला सोन्यासारख्या झळझळीत मनाच्या पण परिस्थितीने वेश्या बनवलेल्या गुलाबोपेक्षा बळकट विरोधी बाजू अजून काय असू शकते? प्यासाचे पहिले काही प्रसंग चित्रित झाल्यावर ते जेव्हा पाहिले गेले तेव्हा सगळ्या लोकांचं मत पडलं की गुलाबोच्या भुमिकेसाठी वहिदा योग्य नाही. तिला बदलण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव पण आला पण त्याने ऐकलं नाही. पुढ कलकत्त्याला जाऊन जेव्हा 'जाने क्या तुने कही' चित्रित झालं, ते पाहिल्यावर मात्र सगळ्यांनी एकमताने निर्वाळा दिल की हीच गुलाबो. बाकी त्या गाण्यात वहिदाने जो काही अभिनय केलाय त्यावर फिदा आपण..! (त्यातली तिची अदाकारी बघून 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल' हे गाणं वहिदा-गुरुदत्त जोडीवर चित्रित झालेलं पहायला काय मजा आली असती राव.! असा विचार कायम मनात येऊन जातो)
'ये दुनिया अगर मिल भी जायें तो क्या है' म्हणणारा त्याच्यातला नायक आयुष्याकडून बर्‍याच अपेक्षा करत असावा. त्याची polyamorous relationship ची ओढ मात्र ना गीता दत्त समजू शकली ना वहिदा. काळाच्या पुढे दृष्टी असलेल्या या कलाकाराच्या अपेक्षाही काळाच्या पुढच्या असाव्यात. गुणी आणि सुंदर स्त्रीयांविषयी त्याला कायमच आकर्षण राहिलं त्याच्या आयुष्यभर. विजया-गीता-वहिदा.. आणि यातल्या कोणा एकीला निवडायची त्याची इच्छा नव्हती. खासकरुन गीता-वहिदा मध्ये. एकदा गुरुदत्त म्हणालेला, "लाइफ में यार क्या है। दो ही तो चीज है, कामयाबी और फेल्युअर। इन दोनों के बीच कुछ भी नहीं है। देखो ना, मुझे डायरेक्टर बनना था, बन गया, एक्टर बनना था बन गया, पिक्चर अच्छी बनानी थी, अच्छी बनी। पैसा है सबकुछ है, पर कुछ भी नहीं रहा।"
त्याच्या आयुष्यात त्याने ज्या लोकांना चित्रपटांसाठी निवडलं ते मात्र शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहिले. जॉनी वॉकर, अबरार अल्वी, व्ही.के.मुर्ती.. चित्रपटाच्या यशापयशाचा त्याच्या या नात्यांवर काही परिणाम नाही होऊ दिला त्याने. पण अबरार अल्वीने प्रसिद्ध केलेल्या गुरुदत्तच्या आठवणींत त्याने स्वत:विषयीच जास्त लिहिल्याचं ऐकलं तेव्हा परत एकदा या क्षेत्रातल्या मुखवट्यांची चीड आल्यावाचून राहिली नाही. आणि गुरुदत्तच्या जाण्यानंतर त्यांच्या हातून कोणतीही खास कलाकृती निर्माण झालेली नाही हे विशेष.. असो..
'चौदहवी का चांद' आणि 'साहब, बीबी और गुलाम' हे चित्रपट गुरुदत्तने दिग्दर्शित केले नसले तरी त्यांच्यावर गुरुदत्तची छाप स्पष्ट जाणवते. आणि या चित्रपटांशी कायम त्याचं नाव जोडलेलंच रहाणार आहे. त्याने अभिनेता व्हावं अशी काही त्याची खास इच्छा नव्हती. किंबहुना प्यासासाठी त्याने दिलीपकुमारची निवड केलेली (थँक गॉड तो आला नाही आणि गुरुदत्तने तो रोल केला.)
फ्रेंच न्यू वेव्ह ची जी auteur theory होती ती गुरुदत्तला अगदी तंतोतंत लागू होते. सिनेमा बनवण्यात तंत्रज्ञान असलं तरी त्याची सर्जनशीलता सगळ्या प्रकारचे तांत्रिक अडथळे पार करुन झळाळुन उठायला समर्थ होती.
गुरुदत्तने त्याच्या आयुष्यातलं पहिलं स्वतंत्र दिग्दर्शन वयाच्या २६व्या वर्षी केलं. देव आनंदच्या बाझी चित्रपटाचं. तिथुन पुढे १३ वर्षांचा काळ फक्त.. यानंतरही त्याने काही थ्रिलर चित्रपट बनवले. सी.आय्.डी, आरपार, जाल वगैरे. पण गुरुदत्त म्हटलं की डोळ्यासमोर प्रामुख्याने येणारी नावं म्हणजे, प्यासा, कागज़ के फूल, साहिब, बीबी और गुलाम आणि चौदहवी का चांद..!
त्याच्या या वैयक्तिक आयुष्यातल्या अपयशाने पोखरलेला हा प्यासा मि. ५५, १० ऑक्टोंबरच्या रात्री दारुच्या नशेत झोपेच्या अतिरिक्त गोळ्या खाऊन एकटा जावा?"गमसे अब घबराना कैसा, गम सौ बार मिला" असं का नाही म्हटला तो त्याच्या खर्‍या आयुष्यात? का नाही स्वतःची अशी समजूत काढू शकला?
आपल्या मुलांना एकदा भेटू द्यावं म्हणुन गीता दत्त सोबत झालेलं भांडण पुरं पण करता येऊ नये? आपल्या मुलांना भेटता पण येऊ नये त्याला? 'ये इन्सां के दुष्मन समाजो की दुनिया' ही दुनिया कदाचित तुझ्यासाठी नव्हतीच रे कधी.. पण तरी तू आल्यासारखं थोडं थांबायला पहिजे होतंस... त्याचं या जगात येणं आणि जाणं चटका लावुन जाणारं होतं खरं.. त्याच्याविषयी विचार करताना The Shawshank Redemption मधलं एक वाक्य कायम मनात घोळत रहातं,"Andy being gone. I have to remind myself that some birds aren't meant to be caged. Their feathers are just too bright. And when they fly away, the part of you that knows it was a sin to lock them up DOES rejoice. But still, the place you live in is that much more drab and empty that they're gone." जगातून निघुन गेलेल्या गुरुदत्तच्या संदर्भात जग असंच दिसलंय मला कायम..!
मेरा कुछ सामान ...
Love is as contagious as a cold. It eats away at your strength, morale... If everything is imperfect in this world, love is perfect in its imperfection असं तो म्हटला खरं पण चित्रपटांवर प्रेम करुनही ते अतिशय perfect बनवले त्याने. कुठेही काही imperfect राहिलं नाही त्या प्रेमात.
चित्रपट तसं पाहिलं तर मनोरंजनाच्या क्षेत्रातलं अगदी नवं माध्यम. अगदी दिड दोनशे वर्षांचा हा प्रवास. पण हे कथा मांडण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. किंबहुना सर्वात प्रभावी म्हटलं तरी वावगं ठरू नये. सूरांमधली आर्तता, चित्राच्या रंग-रेषांचे अर्थ, कवितेची गूढता समजाऊन घ्यायला रसिकाला स्वतःची एक क्षमता लागते, शक्ती-बुद्धी खर्च करावी लागते. पण बहुतांशी चित्रपटात 'ये हृदयीचे ते हृदयी घालणं बरच सोपं असतं. समोर दिसणारी माणसं समजावुन घेणं हे एखाद्या पुस्तकातील व्यक्तीरेखा वाचून, तिचं चित्र डोक्यात तयार करुन मग समजावुन घेण्यापेक्षा सहज करण्यासारखं आणि कमी कटकटीचं काम असतं. (अर्थात हे फक्त खराखुरा अभिनय करणार्‍यांविषयी.. अभिनयाच्या नावाखाली जमलेल्य बाजरगर्दीविषयी नाही..) तर असं हे माध्यम. पण तरीही कल्पनाविलास, खूप सारी अ‍ॅक्शन, हॉरर, थ्रिलर यापेक्षा माणसच्या खोल मनात दडलेल्या भावना, नात्यांचे पैलु, रंग, भावभावना दाखवणार्‍या कलाकृती माझ्या जास्त जिव्हाळ्याच्या. आणि कदाचित त्यामुळेच stanley kubrick पेक्षा Ingmar Bergman आणि Nolan पेक्षा Alejandro Inarittu जास्त जवळचा. आवडते, प्रतिभावान सगळेच पण Bergman जास्त जिव्हाळ्याचा.
इन्गमार बर्गमन- एक जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक. अनेक महान दिग्दर्शकांसाठी आयडॉल ठरलेला आणि रसिकांसाठी पर्वणी. १४ जुलै १९१८ ला स्वीडनमध्ये एका नर्सच्या आणि धर्मगुरुच्या पोटी जन्माला आलेला 'इन्गमार'ने बर्‍याच कडक म्हणावं अशा वातावरणात बालपण घालवलं. त्याच्या चुकांबद्दल बंद, अंधार्‍या कपाटात वेळ पण घालवला. त्यानंतर १६व्या वर्षी बर्गमनने हिटलरच्या सेनेत रीतसर ५-५ महिन्यांचे दोन कंपल्सरी सेशन पण पूर्ण केले. आणि १९३७ मध्ये त्याचा खरा प्रवास सुरु झाला. स्टॉक्लोहोममध्ये ड्रामा स्कूलमध्ये नाव घातलं त्याने कला आणि वाड्मयाच्या अभ्यासासाठी.
बर्गमनने त्याच्या एका मुलाखतीत म्हटलेलं की त्याला एक अख्खा सिनेमा close up मध्ये करायला आवडेल. कलाकारांच्या चेहर्‍याचा अशक्य सुंदर उपयोग करुन घेतला त्याने भावना, प्रसंग, त्यांची तीव्रता लोकांपर्यंत पोहचवायला. आणि यासाठी कायम त्याच्या कंपूत अतिशय चांगल्या कलाकारांचा संच राहिला. Liv Ullmann, Bibi Andersson, Erland Josephson, Ingrid Thulin, Max von Sydow हे त्याच्या चित्रपटातून कायमच समोर येत राहिलेले काही कलाकार. Persona मध्ये तर एकही वाक्य न बोलता Liv ने जे काही चेहर्‍यावर दाखवलय, त्या भावना, ती गूढता आपल्या मनावर कायमची छाप पाडून जाते. आणि तिच्यावरच चित्रित झालेला दुसर प्रसंग म्हणजे Cries and Whispers मध्ये तो तिच्या म्हातारं होत जाण्याचं वर्णन करत असताना तिच्या चेहर्‍यावर एकटक खिळुन राहिलेला कॅमेरा. तिने जे काही दाखवलय त्या चेहर्‍यावर ती म्हणजे कविताच आहे एक. ग्रेसची कविता. त्याच्या सगळ्या सिनेमांची खासियत म्हणजे हे प्रचंड ताकदीचे कलाकार, त्यांचे भले मोठे close ups आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे अप्रतिम भाव. मुद्राभिनय किती जास्त प्रेक्षणिय असू शकतो, किती परिणाम करु शकतो हे पहायचं असेल तर बर्गमनचा सिनेमा पहावा.
I write sripts to serve as skeletons awaiting the flesh and sinew of images असं तो स्वत:च म्हटलाय अणि नंतर तर त्याच्या कलाकारांमध्य आणि त्याच्यामध्ये इतका छान सूर जुळला होता की तो आपल्या सिनेमाचे संवाद वगैरे लिहायचा नाही, कलाकारांना प्रसंग आणि व्यक्तिरेखा समजावुन दिली की त्या प्रसंगी ती व्यक्ती कशी वागेल, काय बोलेल हे तुम्हीच म्हणा असं तो सांगायचा. The more you become personal, the more it becomes universal हे वाक्य बर्गमनच्या सिनेमाला अगदी १००% लागु होतं. त्याचे सगळेच विषय, प्रेम, राग, भीती, द्वेष, वेडेपणा, आजारपण, विश्वासघात असे.. माणसाच्या मनाच्या अशा काही अवस्था ज्यात माणुस सर्वांत जास्त अस्थिर, चंचल, स्फोटक असतो. माणसाच्या मनात खोलवर दडलेले सगळे विकार उफाळुन आलेले असतात. स्वतः बर्गमनने त्याच्या २ सर्वोत्कृष्ट कलाकृती त्याच्या आजरपणाच्या काळात लिहिल्यात ज्यावेळी तो मानसिकरीत्यापण खचलेला होता, nervous breakdown च्या अवस्थेला पोहचलेला होता.
त्याचा सिनेमा बघायला जाणार असाल तर मात्र अतिशय सावध! आपलं सगळं लक्ष त्या दिड-दोन तासात कुठेच विचलित न होऊ देता, त्याच्या प्रत्येक सेकंदावर लक्ष देऊनच सिनेमा पहावा लागतो. कारण बहुतेकदा तो चित्रपट पहाण्याची ती पहिली आणि शेवटची वेळ असते. तो चित्रपट पहाण्याचं धाडस आपल्याकडून परत होईलच याची काहीच खात्री देता येत नाही. आणि त्यामुळेच त्या चित्रपटातलं कोणतही वाक्य, कोणतंही expression चुकवणं पण मुळीच परवडणारं नसतं! त्याच्या चित्रपटातली बरीचशी वाक्यं अशी असतात की आपण स्तब्ध व्हायलाच पाहिजे. एखादं पुस्तक वाचता वाचता मध्येच एखादी ओळ अशी येते की की तशीच ओलांडून आपण पुढे नाही जाऊ शकत तसेच. थांबावच लागतं तिथे. विचार करावा वाटतो, मुरवुन घ्यावं वाटतं ते.. आणि असे प्रसंग खूपदा येतात बर्गमनचा सिनेमा बघताना. त्याच्या भाषेत सांगायचं तर, "no form of art goes beyond ordinary consciousness as film does. Straight to our emotions, deep into the twilight room of the soul!" आणि त्याने माणसाच्या मनातल्या या संधीप्रकाशाच्या वेळा अशक्य समर्थपणे उभ्या केल्यात. 'संधीप्रकाश' किती नेमका शब्द वापरलाय! दिवसाचा सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारा, हुरहुर लावणारा, कावरंबावरं करणारा हा काळ. एक दिवस सोडून चाललेला असतो कधीच परत न येण्यासाठी, रात्रही पटकन कुशीत घेत नसते. दिवस ठीक असतो, रात्र पण, संध्याकाळ चढत जाणं हे मात्र जीवघेणं असतं. अशा जीवघेण्या कालखंडांची मालिका मनात घेवुन माणुस वावरत असतो कुठेतरी. या सगळ्या अंतरीच्या कळांचं त्या उत्कटतेने चित्रण करणारा एक बर्गमनच!
Wild Strawberries मधला तो खडूस वाटणारा म्हातारा आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळुन बघताना त्याला झालेल्या जाणिवा, घडलेल्या गोष्टी, घडाव्याशा वाटणार्‍या पण न घडलेल्या गोष्टी, आठवणी, मृत्यूची भीती या सगळ्याच्या भोवर्‍यांत त्याचं अडकणं, उलगडत जाणं अत्यंत प्रेक्षणिय असतं. Me and my wife are dependent on each other. It is out of selfish reasons we haven't beaten each other to death a long time ago. असं एखादं मध्येच येवुन जाणारं वाक्य आजुबाजूच्या अनेक नात्यांचं अपरिहार्य वास्तव मांडतात समोर. आणि When your were little you belived in Santa Claus, now you belive in God हे वाक्य माणसाच्या आगतिकतेचं.
त्याच्या Persona विषयी बोलायला तर शब्दच नाहीत माझ्याकडे. नि:संशय ती त्याची सर्वोत्तम कलाकृती आहे. Persona आणि Hour of the Wolf हे त्याचे माझ्यावर सर्वात जास्त स्वार झालेले चित्रपट आहेत. त्यांच्या प्रभावातून बाहेर यायला तुम्हाला किती वेळ लागेल हे तुम्ही खरच नाही सांगु शकत. Hour of the Wolf हा त्याचा एकमेव हॉरर सिनेमा. हा चित्रपट नेहमी वास्तव आणि आभास (स्वप्न) यांच्या सीमेवर चालत रहातो. अशाच एका प्रसंगावर येऊन संपतो. ते नक्की काय होतं, कशाचं रुपक, काय म्हणायचय हे सगळे घोर आपल्या जीवाला लावुन सिनेमा संपून जातो. आणि परत 'You see what you want to see!' म्हणत सत्य आणि आभास यातलं खरं खोट ठरवायची जबाबदारी पण घेत नाहीत त्या व्यक्तीरेखा. असाच एक प्रसंग Cries and Whispers मध्ये पण आहे. सत्य की स्वप्न याची जबाबदारी प्रे़क्षकांवर सोडूनदेखिल मनावर कायमचा ठसा आणि विचार करायला लावतील अशा कल्पना मनात सोडून जातात हे प्रसंग. Hour of the Wolf मधली growing old together ची संकल्पना अशीच पकड घेणारी. केवळ अफाट. हा चित्रपट कित्येक दिवस मनातून जात नव्हता. वातावरणनिर्मितीचा अभ्यास करावा हा चित्रपट पाहुन एखाद्याने. तीच गोष्ट नात्यांची. The Silence मधलं दोन बहिणींचं नातं असो की Persona मधलं नर्स, पेशंटचं नातं असो. नाती वरवर काय, कशी असतात आणि त्याच्या मागे किती खोलवर दडलेल्या कोणकोणत्या गोष्टी असतात याची जाणीव कदाचित त्या नात्यातील माणसांना होणं पण अवघड असतं. अशा या गोंधळाच्या जागांतील नेमक्या ठिकाणी बोट ठेवतो तो. त्या व्यक्तीरेखा मग आपल्यातूनच बाहेर आल्यासारख्या वाटायला लागतात. Smiles of a Summer Night मधली I am tired of people, but it cant stop me from loving them म्हणणारी म्हातारी Mrs. Armfeldt माझ्यातूनच बाहेर आल्यासारखी वाटायला लागली मला. हे वाक्य ऐकलं तेव्हा मुव्ही पॉज करुन बसलेले मी. कित्ती कित्ती जास्त नेमक्या भावना आहेत या.! तीच पुढे म्हणते Beware of good deeds. They cost far too much and leave a nasty smell..!
Winter Light मध्ये पण त्याच्याकडे प्रेम व्यक्त करायला आलेली ती तिच्या कष्टाने धरुन ठेवलेल्या स्वाभिमानामागे असलेली समर्पणाची तीव्र ओढ व्यक्त करते तेव्हा पण असचं स्तब्ध व्हायला होतं.
मी कोणाच्यातरी मुलाखतीत वाचलं की पाहिलं होतं, माणुस तेच चांगल्याप्रकारे मांडू शकतो जे तो स्वत: जगलाय. तेच लोकांना भिडू शकेल असं पोहचवु शकतो तो. कदाचित नात्यातली गुंतागुंत, माणसाच्या अशा सगळ्या भावना लोकांपर्यत इतक्या समर्थपणे पोहचवु शकण्यामागे त्याचं स्वतःचं आयुष्य आहे कुठेतरी. चार अयशस्वी आणि पाचव्या २५ वर्ष टिकलेल्या संसारासोबत त्याची अनेक अफेअर्स पण झाली. सगळी मिळुन ९ मुलं. या सगळ्या गुंतागुंतीच्या नात्यांच्या छटा त्याच्या सिनेमांमध्ये नक्कीच पडल्या असणार. किंबहुना त्याच्या सगळ्याच विचारांच्या. वयाच्या ८व्या वर्षीपासून त्याचा देवावरचा विश्वास उडाला होता म्हणे. आणि The Silence मध्येच हा शोध संपलेला त्याच्यामते. पण त्याही आधी The Seventh Seal मध्ये 'We must make an idol of our fear, and call it god.' हे म्हणुन गेलाच आहे तो.
शेवटी ६० वर्षांची प्रदीर्घ कारकिर्द.. ६३ चित्रपटांचे, टिव्ही सिरीअलचे दिग्दर्शन, ६३ च्या कथा, निर्मिती आणि अनेक कामं.. ३ ऑस्कर अशी भरघोस कामगिरी केल्यावर त्याचं एकुणच मत असं होतं की, "My basic view of things is not to have any basic view of things. From having been so dogmatic, my views on life have been dissolved. They dont exist anymore." इतका अशक्य माणुस त्याच्या कलाकृतीतून अनुभवणं हे खूप भारी असतं. खरतर त्याच्यावर लिहायची पन योग्यता नाही माझी पण रहावलं नाही. कायम शोध घेत रहावं अशी व्यक्ती आहे बर्गमन माझ्यासाठी. प्रचंड आदर्, आकर्षण आणि गूढतेचं वलय असतं कायम त्याचा विचार करताना. आणि कितीही नाही म्हटलं, अशक्यता माहिती असली तरी वाटून जातं, "अगदी आता आता पर्यंत पण होता तो. ३० जुलै २००७ पर्यंत.. एकदा, फक्त एकदा भेटता आलं असतं तर..."
मेरा कुछ सामान ...
पत्रास कारण की,
आज दुपारी पाऊस पडला..
या मोसमातला पहिलाच..
काम होतंच, तरी पण मुद्दाम बाहेर पडले ऑफिसच्या,
कोणीतरी ढकलून दिल्यासारखी..
उष्ण वारं वाहत होतं..
तुझे श्वास असेच भासायचे.. बहुतेक..
रस्त्याच्या कडेने धुळीच्या छोट्या छोट्या वावटळी
तयार होऊन विरत होत्या..
हल्ली तुझे विचार विरतात असेच थोडेसे भिरभिरुन..
वादळं होत नाहीत त्यांची..
इतका भरुन येऊन पण बरसत नव्हता तो,
तूही असाच गप्प रहायचास ना बोलायचं असताना..
काहीच मनाला येईना तेव्हा मुकाट्याने परत येऊन डोकं घातलं कामात..
नेहमी दुर्लक्ष झाल्यावरच बरसायची खोड त्याला.. तुलाही..
असो, पाऊस पडून गेला..
आता कसं स्वच्छ वाटतय, मस्त, मोकळंमोकळं..
रडून झाल्यावर वाटतं तसं..
बाकी ठिक..



ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...
मेरा कुछ सामान ...
मी जरा जास्तच उशीरा जन्म घेतला याची प्रामाणिक खंत ज्या लोकांकडे बघुन मला वाटते त्यातलं एक ठळक नाव म्हणजे किशोर कुमार.. आभास कुमार गांगुली.. मुख्य म्हणजे त्याच्या आवाजाने आणि त्याबरोबरच वेळोवेळी कळत गेलेल्या विक्षिप्तपणाच्या कथांमुळे. (कारण जगाने वल्ली ठरवलेल्या लोकांबद्दल आकर्षण तर आहेच पण त्यांच्यासोबत माझं सूत जरा लवकरच जमतं असा माझा अनुभव आहे.. असो..)
"कुणी विचारायला येवु नये, नाहीतर खूप चिडचिड होईल" असं वाटतं आणि "कोणी विचारायला का येत नाहीये?" असं वाटुन पण त्रागा होत असतो अशा वेळी किशोरचा आवाज पांघरुन बसणे हा कायमच एक सोयिस्कर मार्ग असतो.
शब्दांकडे अतिरीक्त लक्ष देण्याची खोड म्हणजे माझ्या आठवणींपलीकडची. मला आठवतय तेव्हापासून गाण्यातील शब्दांकडे जरा जास्तच चिकित्सकपणे लक्ष देत आलिये मी. अगदी सूरप्रधान शास्त्रिय गायकी ऐकतानापण ती चीज सगळी समजत नाही तोवर अस्वस्थ वाटत रहातं. पण शब्दांकडे लक्षच जाऊ नये किंवा त्यांना दुय्यम स्थान मिळावं अशी काही जादू आपल्या आवाजाने करुन, त्याच्या सूरांनीच तो मला ओढुन, बांधुन ठेवायला लागला तेव्हा मात्र त्याच्यापुढे हात टेकले मी.
किशोरच्या गाण्यातल्या या गद्यात घेतलेल्या छटा, म्हणजे एखादं उपहासात्मक हास्य, एखादा उसासा या गोष्टी जितक्या खल्लास करतात तितक्या कोणाच्याच नाही असा माझा तरी अनुभव आहे. "कैसे कहे हम, प्यारने हमको" या गाण्यात तो जे ऊपहासाने हसलाय ना की प्रत्यक्ष त्या सिच्युअशनला असं हास्य कोणी दिलं तर संबंधित व्यक्तीने तिथेच शरमेनं मरुन जावं.
त्याच्याविषयीच्या सगळ्या कथा म्हणजे एकेक आश्चर्यच वाटायच्या ऐकताना. आणि नंतर नंतर त्याच्याविषयी काहीही ऐकल्याचं आश्चर्य वाटलं तर त्या आश्चर्य वाटण्याचं आश्चर्य वाटावं इतकं त्याचं विक्षिप्तपण अंगवळणी पडलं. निर्माते पैसे वेळेवर न देण्याच्या भीतीने म्हणे त्याला कायम ग्रासलेलं असायचं. त्यातून त्या वाटण्यापोटी त्याने केलेले सत्राशे साठ प्रकार तर त्याहून अजब. कुठे अर्धाच मेकअप कर, कुठे शुटींगमधून पळुनच जा, कुठे निर्मात्याच्या घराबाहेर रोज सकाळी जाऊन ओरड, घराबाहेर "beware of kishore" अशी पाटीच लाव.. एक ना दोन, हजार कथा. विक्षिप्त वाटायला लावणार्‍या.. पण त्याचबरोबर त्याचं स्वत:च्याच परसदारच्या वृक्षराजीशी गप्पा मारणं, त्यांना मित्र मानणं, मधुबालासाठी इस्लाम स्विकारणं, शेवटपर्यंत तिची सोबत करणं याही काही गोष्टी त्याचा विचार करुन करुन हैराण करायला लावणार्‍या. आणि "आ चलके तुझे मै लेके चलुं" मधल्या हळुवार भावना लिहिणारा हाच झुमरु आहे हे कळलं तेव्हापासून तर मनाला चटका लावुन गेलाय तो. तो नक्की कसा होता, काय होता याचा विचार करणं हा रिकाम्या वेळेचा छंदच बनून गेला मग..
किशोर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो त्याचा मिष्किल, खट्याळ चेहरा पण कदाचित त्याच्या इच्छेप्रमाणे तो रिटायर्ड होऊन खांडव्याला जाऊन राहिला असता तर या खट्याळ चेहर्‍यामागे लपलेला "आ चलके.." लिहिणार्‍या कवीने त्याच्याकडून नक्कीच काहीतरी लिहुन घेतलं असतं.. तो थोडा अजून उलगडायला मदत झाली असती कदाचित..
कॉलेजच्या काळात असताना लागलेलं किशोरच वेड मात्र पुरं झपाटून टाकणारं होतं. तेव्हा त्याच्या बर्‍याच पैलुंचा वेड्यासारखा शोध घेतला मग. मधुबालाच्या जिवंतपणाला आणि खळखळत्या उत्साहाला तितकीच समर्थ साथ देऊ शकणारा एक किशोरच वाटायचा मला. बाकी एखादा गुरुदत्त सोडला तर सगळेच तिच्यासमोर पानी कम वाटायचे. अगदी कधी कधी देवानंदसुद्धा... ती सुद्धा त्याच्यासोबत बालिशपणा करताना फुलून आल्यासारखी वाटायची कायम मलातरी. "चांद रात, तुम हो साथ" असो, "आंखोमे तुम दिल मे तुम" असो नाहीतर "हाल कैसा है" किंवा "पांच रुपय्या बारा आना".. माहित नाही नक्की काय ते, पण त्याचं अस्तित्वच मोहून टाकणारं होतं. आजही ही सगळी गाणी दोनशे अठराव्यांदा ऐकतानादेखिल मी नाचत असते एवढं मात्र खरं.. आणि त्याची दु:खी गाणी ऐकणं हा तर सोहळाच असतो. नको नको म्हणताना ओढत नेतोच तो आपल्याला त्या मनस्थितीत.. क्षणात तोडुन टाकतो सगळ्या जगापासून..
त्याला सगळ्यात समर्पक विशेषण द्यायचं झालं तर मला एवढच सुचतं की त्याचा आवाज उमदा होता. म्हणजे खरच त्याची गाणी ऐकताना कायम असं वाटायचं की एखादं देखणं, भारदस्त व्यक्तिमत्व गातय. त्यामुळे प्रत्यक्षात त्याची बरीच गाणी पाहिली तेव्हा प्रचंड मोठा भ्रमनिरास झालेला माझा.
त्याची आवर्जुन बोलावी, उल्लेख करावी अशी गाणी भरपूर आहेत आणि एखाद्या गाण्यातल्या एखाद्या ओळीत त्याने केलेल्या करामती सांगायच्या म्हटलं तर तेच लिहित बसावं लागेल मला. पण मला वाटतं त्याचा असा शोध घेत रहाणं हेच जास्त छान आहे. एखादं गाणं शंभरवेळा ऐकुन झालेलं असतानासुद्धा अचानक नंतर त्याने एखाद्या शब्दांत केलेली गंमत जाणवते तेव्हा आपल्याही नकळत आपण त्याला दाद देवुन जातो.
तसं आज त्याच्याविषयी बोलायचं काही खास कारण नाही पण त्याच्याविषयीचं हे सगळं वाटणं मांडायचं होतं कुठेतरी.. त्याचा सूर सच्चा होता, लकबी वेड्या.. काळजाला सुगंधी जखमा करुन गेलेला मोगरा होता तो.. किशोर.. त्याच्या नावाप्रमाणेच - आभास.. त्याच्या सूरांनी वार करुन छळणारा. आणि या जखमांसाठीच कायम त्याच्या मागे मागे जायला भाग पाडणारा..
मेरा कुछ सामान ...
म्हणजे कसं ना...
धडाडतं उर,
थरथरता सूर,
नयनी स्वप्नं,
देही कंप...
किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्‍याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं..
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
मेरा कुछ सामान ...
मला समजलिये
स्वप्नांच्या प्रदेशाला जाणारी वाट..
चंद्राशिवायच्या चांदण्यांनी भरलेल्या रात्रीत,
जेव्हा चांदण्या उतरलेल्या असतात क्षितिजावर
एका उडीत चांदण्यांवर पाय पडतील इतक्या जवळ..
आणि मग त्या चांदण्यांचे ठसे घेवुन जातिल मला
स्वप्नाच्या प्रदेशात..
जवळच आहे..
स्पष्ट दिसतिये वाट..
तिथवरच तर चालायचय...
.
.
.
क्षितिजापर्यंत....
मेरा कुछ सामान ...
अजून काही मनात दाटे
तुझे हसू पापण्यांत दाटे
तुला पिसे लागता नभाचे
धुके नव्याने वनात दाटे..
==*==*==*==*==*==*==*==*==*==
जगी मानभावी उमाळे असे
मला पोळती हे उन्हाळे असे..
जरा शिंप रे तू तुझे चांदणे
जरी कोरडे पावसाळे असे..
==*==*==*==*==*==*==*==*==*==
चंद्रावरती स्वप्ने आता मिरवत नाही,
बागेश्रीही तार मनाची हलवत नाही,
शिकले मीही हसण्या दुसर्‍यांच्या अश्रुंना,
आता माझे जगणे मजला चकवत नाही..
==*==*==*==*==*==*==*==*==*==
मेरा कुछ सामान ...
मस्त भुरभूर पाऊस चालु होता. आता शहरापासुन थोडं बाहेर आल्यावर ड्रायविंग पण संथ, एका लयीत चालु होतं. गाडितली म्युझिक सिस्टिम शांत होती पण मनात बडे गुलाम अली घुमत होते.. "आये ना बालम.. का करु सजनी.." शहराबाहेर कुठेतरी शिफ्टिंगचं सामान घेवुन चाललेला ट्रक दिसला तिला गाडीपुढे..

कितव्या शहरातलं कितवं शिफ्टिंग होतं हे काय माहिती..त्या न मोजता येणार्‍या पसार्‍यात तशाच न मोजता येण्यासारख्या आठवणी.. त्यांचे फोटोग्राफीचे प्रयोग...
"अर्रे हळू....!!!"
"काय?"
"आठवणींची कुपी अलगद उघडायची असते.. सांडुन गेली अत्तरासारखी तर दरवळ राहिल फक्त.. आणि तोही पकडता यायचा नाही मग..!"
"धसमुसळी तू आहेस, मी नाही.."
"अ‍ॅहॅहॅ...!"

अचानक वाजणार्‍या हॉर्नने तंद्री भंगली तिची. संध्याकाळ आताशी चाहुल देत होती. पावसाळ्याच्या शेवटाला मावळतीचा सुर्य आकाशात जसे रंग उधळतो तशीच आजची पण वेळ. पण काही मनात उतरत नव्हतं..

दाटुन आलेली निळी संध्याकाळ असते. गडद गार, चिंब ओली, दिवसभर पावसात हुंदडुन येवुन गपगार झालेले असतात दोघेही..
"स्कॉच?"
"स्कॉच..!"
"चिअर्स..!"
काही न बोलता अचानक व्हायोलिन आणुन हातात ठेवते त्याच्या.
"काय वाजवु?"
"काहीही.."
बीथोवेन ची धून निघायला लागते.. हेच का वाजवायचं असतं याला नेहमी..(किंवा मला हेच ऐकायचं असतं हे कसं कळतं याला?) भरुन आलेल्या डोळ्यांसोबत मन भरुन जातं, सूर ऐकु येईनासे होतात तेव्हा ती म्हणते,
"काय होईल रे तुझं किंवा माझं आपण वेगळे झालो तर?"

तिच्या असल्या प्रश्नांना व्यावहारिक उत्तरं दिली की तिचा नूर भावनिक होतो आणि भावनिक दिली की व्यावहारीक होतो हे त्याला चांगलच कळुन चुकलेलं. या आईवेगळ्या मुलीची आई आणि तिच्यातल्या आईचं मूल पण होण्याची जबाबदारी याचीच असायची. तिला अजुन एक दुरावा किती असह्य आहे याची कल्पना होती त्याला... तिचं डोकं मांडीवर घेवुन थोपटत रहायचा मग तो शांतपणे..

त्यांच्या नेहमीच्या जागी गाडी पार्क करुन ती निघाली हातातलं सामान घेवुन. मस्त दाटलेली कच्च हिरवळ. उमलेली रानफुलं.. आणि त्यांच्या सौंदर्याशी स्पर्धा करणारी फुलपाखरं.. अगदी अशीच स्थिती. नुकत्याच सरुन गेलेल्या पावसानंतर जंगलात, झाडाझुडपात भटकुन आल्यावरचा त्याच्या अंगाला येणारा एक मिश्र वास असायचा, कडवट हिरवा.. ओलसरसा.. तिला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायचा तो वास. त्याला आवरुही न देता त्याच्या कॉलरमध्ये नाक खुपसून मिठीत पडुन रहायची त्याच्या..

गडद निळी किनार असलेलं मोरपंखी रंगाचं फुलपाखरु, लाल ठिपके मिरवणारं.. तिच्या मते त्या फुलपाखराचे रंग तिला मिळालेत आज. सकाळपासुन त्या रंगांचं वेड घेवुन फिरत असते सगळ्या शहरातून. मग कधीतरी मनासारखे रंग मिळाल्यावर तो ड्रेस घालुन आलेली असते ती...
"ए, मी कशी दिसतेय?"
"अं..."
"सांग ना, कशी दिसतेय मी?"
"अंघोळ केली नाही वाटतं आज?"
"अरसिक कुठला..दुष्ट..!"


ठेच लागल्यामुळे भानावर आली ती.. त्यांचा तो नेहमीचा पॉइंट.. टेकडीवर सगळयात उंच.. थोडा वेगळासा.. दुसर्‍या बाजुला असलेला. खरतर तिला खूप भीती होती अशा उंचीची पण त्याच्यामुळे यायला लागली. एकदिवस अचानक त्याने असाच तिला नको नको म्हणत असताना अक्षरशः भाग पाडलं होतं पॅराग्लायडिंग करायला..
"चल.."
"कुठे?"
"आपण पॅराग्लायडिंग करतोय.."
"वेडा आहेस का तू? तुला माहिती आहे ना मला भीती वाटते.."
"चल गं.. मी आहे ना..."
त्याच्या आग्रहाखातर आणि त्याच्यावर विश्वास ठेवुन झोकुन दिलं तिने स्वतःला. डोळे किलकिले करुन पहाता पहाता तिला स्वतःच्याच चित्रात उतरल्यासारखं व्हायला लागलं.. आणि मग तिने घेतलेला धरतीवर बरसण्याच्या वेडाचा आकाशाचा छंद..

आपण खरच किती बदललो त्याच्यामुळे.. पण तो काहीच बदलला नाही का? आत्ता जाणवतय हे. त्याने कधीच आपला आग्रह म्हणुन पत्र लिहिली नाहित की मी बोल म्हटले म्हणुन बोलला नाही. किती वेळा.. किती वेळा...
"ढॅन्टॅणॅन...!!"
"हे काय नविन?"
"हा घे कागद.. पत्र लिही मला.."
"कोण मी?"
"नाही. तुझा व्हायोलीन..! अर्थात तूच"
"काय वेड्-बिड लागलं की काय तुला? मला नाही लिहिता येत तुझ्यासारखं.."
"ते काही नाही. लिहिलंच पाहिजे.."
"हे बघ! एक काम करु, तू लिही. मी तुला बघत बसतो.."
"काही गरज नाहिये.. लिही.. लिही.. लिही..."
आणि मग चक्क तासभर बसुनही तिने कुठूनतरी शोधुन काढलेल्या त्या पिवळसर, जीर्ण, तिला जपुन ठेवायच्या असलेल्या पानावर त्याने फक्त I love you लिहुन दिलं होतं...

किती वेड्यासारखे हट्ट असायचे ना आपले आणि वेड्यासारखे प्रश्न पण. त्याला त्रास होत असेल का या सगळ्याचा? Individuality, Individuality म्हणता म्हणता किती अवलंबत गेलो आपण त्याच्यावर नकळत. माझे प्रश्न खरच होते की त्याला समोर बघुनच पडायचे...
"सगळ्या रंगांवर चंद्र सांडला तर काय होईल?"
"..."
"सांग ना.. तुझ्या व्हायोलिनवर जसा सांडतो तसा माझ्या रंगांवर सांडला तर?"
"चंदेरी होऊन जातिल तुझे रंग आणि पर्यायाने तुझी स्वप्नं.. कॅनव्हास कायम चांदीचा वर्ख लागल्यासारखा होऊन जाईल आणि तुझ्या नव्या खरपुस कॅनव्हासवर गर्द हिरवा डोंगर काढताना तुला रानात गेल्यासारखं नाही वाटायचं मग..!"
"..."
प्रश्न अजुनही पडतायेत रे.. मला अजूनही उत्तरं हवियेत. कुठे आहेस तू?

आज पुन्हा त्याच कड्यावर उभी आहे ती.. आज पुन्हा पाऊस आहे. वारं असं भणाणलय की पाऊस उलटा ढकलला जातोय त्या उंचीवर. तिच्यासोबत आहे त्याचा व्हायोलिन, तिचा कॅनव्हास, तिचे प्राणप्रिय रंग, त्यांचे फोटोग्राफिचे प्रयोग आणि कुठून कुठून तंगडतोड करुन जमवलेल्या रेकॉर्डस्.. आज तिला उंचीची भीती वाटत नाहिये. पाय पुढे टाकुन बघतेय ती. पॅराशुटशिवाय मारु का उडी तुझ्या आठवणींसोबत? मला पण पहायचाय कसा त्रास होतो, कशा असतात खर्‍या-खुर्‍या शारिरीक प्राणांतिक वेदना... तुला पण अशाच वेदना झालेल्या का त्या अपघातानंतर? आणि काय सांगायचं होतं तुला अंधुकशा त्या नजरेतुन? एकदा तरी डोळे टक्क उघडले असतेस तर वाचलं असतं मी नक्की.. तू कायम हेच कारण सांगायचास ना तुझ्या कमी बोलण्याचं?
"ए.. बोल ना काहितरी.."
"काय बोलु? मला बोलण्यासारखं काही ठेवतेस का तू? सगळंच तर समजतं तुला माझ्याकडे बघतानाच. वेगळं काय बोलणार?"
"काहीही बोल.. मी कधी विचारते का तुला काय बोलु म्हणुन. वटवटत तर असते सारखी.. आज तू बोल. मी फक्त ऐकणार.."
आणि तो बोलण्याची वाट बघताना त्याच्याकडे बघत बघत वेळ जायचा निघुन. तो बोलायचाच नाही शेवटी. आणि त्याच्या त्या गूढ तरी खोडकर चेहर्‍यावरचे रेषांचे आणि रंगांचे अर्थ लावताना हरवुनच जायची ती, विसरुन जायची की तिला ऐकायचय.. काय काय ऐकु यायचं तिला, काय काय बोलायचा तो मुक्यानेच..

कायमची शांतता भरुन राहिलेली आता. सगळ्या सामानाकडे एका निष्क्रिय तटस्थपणे पाहुन घेतलं तिने एकदा. हल्ली त्याच्या फोटोकडेही तशीच बघायची ती.. त्याच्या बोलण्याचे, हसण्याचे, असण्याचे.. सगळेच भास आता असह्य होत होते तिला.. आणि त्याच्या खुणा पुसून टाकायच्या होत्या आता. मनातुन कसं जाणार होतं सगळं? पण असले विचार येत नव्हते. मुर्खपणा असला तरी तेच करावसं वाटत होतं. बॅग धरली तिने कड्यावर. परत मागे घेतली. आता याच तर आठवणी आहेत. यांच्यासोबत तर जगायचय. याच काढुन टाकल्या तर काय राहिलं मग तुझ्या नसण्याच्या भकास पोकळीशिवाय? पण तसही यांच्या सोबतीने ती पोकळी कुठे भरुन निघणार आहे? पण मिटवुन टाकण्याचा अट्टहास का? कारण असण्याचा फायदा नाही. फायद्या-तोट्याची गणितं कधीपासून मांडायला लागले मी आपल्या नात्यात?

मनातल्या या आंदोलनांपुढे टिकणं अवघड झालं तशी तिथल्या खडकावर पुन्हा बसुन घेतलं तिने. ह्म्म... अशक्य.. अशक्य... त्याच्याइतकच अशक्य आहे त्याचा स्पर्श झालेल्या कुठल्याही गोष्टीला दूर ढकलणं.. आणि का हट्ट करा? अजुनही मिळतेच आहे की त्याची सोबत.. त्याचा अबोलपणाच वाटतो अजुनही त्याचं नसणं म्हणजे. आणि जोवर हे वाटतं तोवर हे सगळं जीवापाड सांभाळेन मी. त्याच्या सगळ्या खुणा सांभाळेन.. एक मोठ्ठा उसासा सोडला तिने. अंधार चांगला दाटु लागला तशी परत फिरली मग.. सगळ्या आठवणींसकट.. सगळ्या समानासकट...
मेरा कुछ सामान ...
स्वतःच्या मनात दाटलेल्या अमावस्येला
लाखोली वाहत असताना एकदातरी पहायचा होतास

माझ्या नजरेत उतरलेला चंद्र...
**********************************

जग नसतं दीपलं पण
वाट दाखवण्यापुरतं चांदणं नक्की होतं

माझ्या चंद्रमौळी आकाशात...
**********************************

भैरवी बरीच रेंगाळली होती,
तरी तू आला नाहिस..

गालावर सुकून गेलं चंद्रपाणी..
**********************************

डोळे गच्च मिटुन
सगळी कवाडं बंद करुन बसले

तरी श्वासात दरवळत होताच चंद्र...
**********************************

चंद्राळलेलं आभाळ नाही मिळालं तुला
पण तोवर माझ्यात रुजला होता

तुझा चंद्राचा हट्ट...
**********************************

निघुन जातात तुझ्यासारख्याच
नि:शब्द शांततेत

हल्ली चाहुली उठवत नाहीत चंदेरी वादळं...
मेरा कुछ सामान ...
simone de beauvior चं 'द सेकंड सेक्स' चा करुणा गोखले यांनी केलेला अनुवाद वाचनात आला हल्लीच. ५५० पानाचं हे पुस्तक वाचायला मी तब्बल १० दिवस घेतले. कारण मांडलेल्या प्रत्येक विश्लेषणावर, संदर्भांवर विचार करतच पुढे जाणं गरजेचं होतं. हे पुस्तक तसं पहाता स्त्रीवादावरचं बायबल समजलं जातं पण आजच्या काळात, आजच्या पिढीचा आणि त्यांच्या जडणघडणीचा विचार करता त्याला आपण स्त्री घडणीचा इतिहास म्हणु शकतो. किंवा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र सगळंच. कारण स्त्रीविषयीची जीवशास्त्रीय सत्यं, तिचा इतिहास, मिथ्यके, जडणघडण, तिच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचा तिचा वावर, त्या भुमिका आणि तिच्या मानसिक अवस्था या सगळ्याच गोष्टींचा तर्कसंगत आणि सविस्तर उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.
आता, इथे हा लेख वाचणार्‍या बर्‍याच स्त्रिया खर्‍या अर्थाने स्वतंत्र व्यक्ती म्हणुन जगत/वावरत असल्या आणि पुरुष स्त्रियांनी माणुस म्हणुन जगण्याच्या संकल्पनेचे पुरस्कर्ते असले तरी या सर्वांची सुरुवात कुठे झाली? काय, कसे व कधी? या सर्वांची उत्तरं मिळवायला, घडणार्‍या परिस्थितीचे मानसशास्त्रीय विश्लेषण करायला हे पुस्तक वाचण अपरिहार्य आहे.
'Woman is not born but made' पुस्तकातील अर्पणपत्रिकेच्या जागी असलेलं हे वाक्य. या वाक्यावरच थांबुन आपण विचार करु लागतो आणि त्यानंतर मांडलेल्या प्रत्येक सिद्धांतावर, स्पष्टीकरणवर थांबुन, विचार करुन, स्वतःचं परिक्षण करुन मगच पुढे जाणं ह क्रम बनुन जातो.
माझ्याविषयीच बोलायचं झालं तर, आमच्या घरात कधीच मुलगा-मुलगी असा भेद नाही केला गेला आम्हा भावंडांमध्ये, परंतु पितृसत्ताक पद्धती नक्की पाहिली. कुटुंबप्रमुख म्हणुन वडिलांची ठेवली जाणारी बडदास्त लक्षात येण्याइतकी उघड होती.. हे असं का, ही परिस्थिती का घडली याचं विश्लेषण करण्यात मी माझ्या बालपणाचा बराच काळ खर्ची केला. पण ही परिस्थिती घडण्यामागची मानसशास्त्रची एक धूसरशी कल्पना जी मनात येत होती ती धडधडीतपणे, सुर्यप्र्काशासारखी लख्ख समोर आली या पुस्तकाच्या निमित्ताने. आणि पुन्हा एकदा वैश्विक सत्याचा सा़क्षात्कार झाला म्हणायला हरकत नाही.
घरात मुलं वाढवताना तरी समानता असल्यामुळे यातल्या बर्‍याच गोष्टी वाचताना अपरिचित वाटल्या पण थोडाच वेळ. लगेचच आपल्या आजुबाजूला, ऐकिव आणि माहितीतल्या गोष्टी आठवतात आणि सहजपणे दिलेल्या स्पष्टीकरणाचं समर्थन करतात.
पुस्तकाचं एवढं कौतुक ऐकुनही खरतर वाचायला घेताना मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी धाकधुक होतीच की परदेशी स्पष्टीकरणं, तिथल्या सामाजिक परिस्थितीच्या आणि सुधारणवादी कल्पनांच्या अनुषंगाने केलेला उहापोह भारतीय समाजाला कितपत लागु होईल? पण स्त्रीचा हा धांडोळा वैश्विक आहे. बर्‍याचशा गोष्टी वाचताना तर ती भारतीय समाजाविषयीच बोलतेय किंवा भारतीय सामाजिक परिस्थितीची पुर्ण जाणिव असलेल्या माणसाचंच हे लिखाण आहे असं वाटतं.
मला आठवत नाही नक्की केव्हापासून पण १२-१३ वर्षांची असल्यापासून, जेव्हापासून स्त्री-पुरुष भेदाची सामाजिक जाणिव व्हायला लागली तेव्हापासून स्वत:ला माणुस म्हणुनच वागणुक मिळावी या बाबतीत मी आग्रही आहे माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकच व्यक्तीकडून. गेलं एक तप स्वतःचं हे भान जाणिवपुर्वक सांभाळलय मी आणि इतरांनाही सांगितलय. हो, जाणिवपुर्वकच. कारण तुम्ही जरा बेसावध राहिलात तरी लगेच हे फरक, ही विषमता आग्रही/मोठी होऊन बसते. स्त्रियांवर केले जाणारे टिपिकल विनोद जेव्हापासून ऐकले तेव्हापासुन आपल्याला असं व्हायचं नाही हे पक्कं ठरवलेलं मनाशी. कारण त्या विनोदांत अतिशयोक्तीचा भाग असला तरी त्याची थोडी थोडी झलक मी आजुबाजूच्या बायका-मुलींच्यात बघतच होते. पण त्यावेळी स्त्री-पुरुष समानतेपेक्षापण आपल्याला दोन्हीचे चांगले गुण घेवुन जास्तीत जास्त चांगलं, पुर्ण आणि स्वतंत्र व्हायचं आहे हे ठरवलं होतं. त्यामुळे समारंभ असो की ऑफिस, ५-७ मिनिटात तयार होवुन बाहेर पडणं किंवा खरेदीचा कंटाळा, तिसर्‍या व्यक्तीविषयी चर्चा चाललेली असते अशा ग्रूपमध्ये न जाणं या गोष्टी माझ्या नैसर्गिक आहेत की त्या ऐकलेल्या, वाचलेल्या विनोदांवर प्रतिक्रिया म्हणुन आल्यात याचा शोध घेणं अवघड आहे.
पुस्तकातल्या बर्‍याचशा गोष्टी तर मला अशा वाटल्या की अगदी माझ्यावरुनच लिहिल्यात की काय? निसर्गाकडे लहानपणीपासूनच ओढा होता पण निसर्गाच्या प्रेमात पडावं, त्याच्याशी एकरुप होण्याची ओढ वाटावी याचं माझ्यापुरतं कारण मी १५व्या वर्षी शोधलेलं की ते एक असं ठिकाण आहे जिथे मला माझ्या स्त्री असण्याची बंधनं किंवा वेगळेपणा भोगावा लागणार नाही.. एक असं ठिकाण जिथे माझं स्त्री असणं आड येत नाही. जिथे माझी ओळख स्त्री देहाच्या पलीकडे जाऊन फक्त एक माणुस म्हणुन असेल. आता १५ वर्षांच वय म्हणजे स्त्री म्हणुन मिळणारी वेगळी वागणुक लक्षात येण्याचं आणि त्याचा अतीव राग, चीड मनात दाटण्याचं वय. आणि स्त्रियांच्या निसर्गाकडे असण्याच्या ओढ्याचं स्पष्टीकरण पुस्तकात पाहिलम तेव्हा स्वतःविषयीच नविन शोध लागल्यासारखं वाटलं मला. आणि अशा शोध लागण्याच्या आणि अचंबित होण्याच्या वेळा पुस्तक वाचताना अनेकदा येतात.
अजुनही मला माझ्या आयुष्यातले काही क्षण अगदी प्रकर्षाने आठवतात ज्या क्षणी मी विचार केला होता की,"बर्‍याच मुली इतकही नाही करत", किंवा "बर्‍याच मुली इतकाही विचार नाही करत, मी तरी बरी!" आणि पुढच्याच क्षणी पाल अंगावर पडल्यासारखी सटपटले होते. मुली?? माझं स्त्री असणं माझ्यात इतकं भिनलय का? माझा स्वतःवरचा ताबा किंवा स्वतःला जाणिवपुर्वक लावलेलं वळण इतक दुबळं आहे का? की एका क्षणासाठी का होईना पण असा विचार माझ्या मनात यावा? कितीही नाही म्हटलं तरी सामाजिक परिस्थितीमुळे आपल्या अंतर्मनावर होणारे संस्कार, परिणाम दूर ठेवणं जड जातं. अष्टोप्रहर जागृत रहावं लागतं त्यासाठी, कारण मोठं झाल्यावर क्वचित का होईना पण माझ्या सातमजली हसण्याबद्दल किंवा मोकळ्या वागण्याबद्दल भुवया वर गेलेल्या पाहिल्यात मी.
मी एक प्रवास सुरु केलाय आणि मला नक्की माहित आहे की त्यात सुख, सोय फारशी नसली तरी स्वातंत्र्य आणि समाधान नक्कीच आहे. या टप्यावर मला हे पुस्तक वाचायला मिळालं ही व्यक्तिशः माझ्या फायद्याची गोष्ट वाटते मला. या पुस्तकाने माझ्या संकल्पना अधिक सुस्पष्ट आणि स्वच्छ झाल्या आहेत, घटनांच्या, सवयींच्या कारणमीमांसा अधिक आशयघन झाल्यात हे नक्की. प्रत्येक स्त्री-पुरुषाने नक्की वाचावं असं पुस्तक आहे हे. त्या निमित्ताने आपल्या वागण्याचं आणि आपल्या आजुबाजूच्या सर्वच व्यक्तींच्या वागण्याचं परिक्षण अधिक चांगल्या प्रकारे करु शकू आपण.
पुस्तकाच्या सुरुवातीला सिमोनचा परिचय आणि अल्पचरित्र दिलय. त्यातल्या मतमतांतरात काही पटतं, काही नाही पटत. अगदीच उदाहरणादाखल सांगायचं झालं तर तिच्यावर झालेला आरोप की 'ती वयाच्या ४५व्या वर्षापर्यंत हॉटेलात राहिली. पुरुषांसारखं सडेफटींग रहाणं म्हणजेच चांगलं असा चुकीचा आदर्श तिने घालुन दिला' पण मला वाटतम की अशा intellectual किंवा philosophical पातळीच्या माणसाचं ते लक्षन असु शकतं. त्या उंचीला तिचं स्त्री असणं किंवा पुरुष असणं याचा काही फरक पडत नाही. ही गोष्ट सगळ्यात कमी महत्वाची असते अशा ठिकाणी. त्यामुळे तिचं तसं वागणं हा तिच्या त्य स्वभावाचा भाग झाला, पुरुषी अनुकरणाचा नाही. असो.. अशा अनेक गोष्टी आहेत. तिथेच पुस्तकाच्या गुणदोषांचीपण समीक्षा केली आहे. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की या सगळ्या गुणदोषांसह हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरेल.
याहीपुढे जाऊन 'द सेकंड सेक्स'च्या निमित्ताने "Man is not born but made" म्हणत पुरुष जर त्यांच्या घडणीचा विचार आणि विवेचन करु शकले तर खूप चांगलं होईल.