मेरा कुछ सामान ...
"ती गेली तेव्हा.." ऐकुन त्यातल्या अबोध सूरांनी
काळजात अनाहत कळ उठवलेली..
त्यातल्या गाभ्याला हात घालुन तो अलगद माझ्यासमोर
उलगडुन दाखवलेलास तेव्हा..

बाकिच्या बायका साड्या, दागिन्यात रमत होत्या
त्यावेळी समुद्रावरच्या वार्‍यात आणि
डोंगरावरच्या ढगांत स्वतःला हरवत होतीस तेव्हा..

आजुबाजूच्या बायका, एकमेकिंची उणिदुणी
काढण्यात समाधान मानायच्या त्यावेळी
मु़काट बसुन असायचिस आणि अशा या स्वभावामुळे
कळपापासुन वेगळं पडलेलं तुला पाहिलं तेव्हा..

तू नॉस्टॅल्जिक झाल्यावर
सांगितलेल्या आठवणींतून
तू पण माझ्यासारखीच
बंडखोर असल्याचं जाणवलं तेव्हा

पुलंच्या विनोदाला, कुसुमाग्रजांच्या शब्दाला
आणि गुलाम अलींच्या सूराला
त्याच उत्कटतेने तुला दाद देताना
अनुभवलं तेव्हा...
........
आपली आई वेगळी असल्याचं जाणवतं तेव्हा..

हल्ली हल्ली स्वतःचं म्हणुन निर्माण केलेलं कस्पटासमान अस्तित्व
मिटवुन टाकुन फक्त आईची मुलगी बनुन जावसं वाटतं..
किंवा,
कधीच स्वतःचं अस्तित्व न मिळू शकलेल्या
एका मुलीची आई...!!!
1 Response
  1. Anil Says:

    असा काही अनुभव आलेला नसला तरिही आणि म्हणुनही खूपच भिडलं तू हे असं मांडलेलं.. amazing लिहीलंयंस.. सारखं भरून येतंय वाचताना.. पुनःपुन्हा.. आणि शेवटची ओळ तर ठोकाच चुकवून जाते बघ..

    i have only dreamed of such a mother (rather, such a woman).. never actually met anyone like her.
    आणि मग हाही विचार आलेला कि, अशा आईचं भावविश्व जाणवायला जितकं तरल आणि मोकळं मन लागत असावं त्याचाच अभाव तिच्या आजुबाजुच्या माणसांमधे असण्याचीच शक्यता जरा जास्तच आहे आपल्याकडे.. कारण परंपराच तशी आहे ना आपली, त्याला कोण काय करणार! .. आणि मग अशात काय होत असेल तिच्या जीवाचं, तिच्या आभाळाएवढ्या मनाचं आणि मनभर पसरलेल्या आभाळाचं.. इथे मर्ढेकरांच्या ओळी आठवतात.. 'ऐशा टापूत चौफेर, नाही सासरं माहेरं.. कैसे गोत्रं वा प्रवरं, अनामिका.' .. हे ग्रेसकडून ऐकलेलं मी. आणि याच्याही वर मग ग्रेस या दुःखाचा जणू दैवी आकांतच मांडत असावा असं काहितरी म्हणतो बघ..

    ती अशीच भटकत राहे, चांदणे जसे वेल्ल्हाळं..
    पसरले तिच्या रोखाने, आभाळंच रानोमाळं..

    मग आता अशात, इथे या आईच्या जीवाचे सगळे उमाळे जाणून मुलीनेच आपल्या आईची आई होऊन जाणं म्हणजे त्या आईला तिचं खरं माहेर भेटल्यासारखंच होईल, नाही?.. मला तरी असंच वाटून गेलं तुझी ही कविता वाचल्यावर.