मेरा कुछ सामान ...
काल माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता. ते म्हणतात ना, big day of my life. (अचूक भाव व्यक्त करेल असं मराठी भाषांतर काय आहे याचं? असो..) काल दि. २६ फेब्रु. २०११ पुण्यात संगीत क्षेत्रातील दोन दिग्गज, दोन श्रेष्ठी, उस्ताद झाकिर हुसैन आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा कार्यक्रम होता. गणेश कला क्रिडा मंच. संध्याकाळी ६.३०. माझी अक्षरशः युगानुयुगांची इच्छा होती या दोघांनाही ऐकायची. कारण तालवाद्यात तबला आणि सूरवाद्यात बासरी हे आधीच माझ्या जिव्हाळ्याचे विषय. त्यात या दोन विभुती म्हणजे संगीतक्षेत्रातल्या दंतकथा. एकत्र.. एका व्यासपीठावर आणि त्यात त्यांची जुगलबंदी म्हणजे मी चितेवरुन उठुनही गेले असते. या वीकेन्डला घरी जायच्या प्लॅनला लगेचच काट मारली. मला या कार्यक्रमाविषयी कळलं ते पण अगदी अचानकच. गुरुवारी रात्री सगळा पेपर वाचुन संपला म्हणुन कार्यक्रमांच्या, चित्रपटांच्या जाहिराती वाचत होते. त्यात मला अचानक हे दिसलं. ३ ताड नाही तरी दिड ताड उडालेच मी नक्की. बरं, पासेस घ्यायचे तर फक्त शुक्रवारचाच दिवस होता. दिवसभर ऑफिसमध्ये मी देवाच्या इतक्याच धावा करत होते की पासेस संपु नये. संध्याकाळी ६ च्या ठोक्याला ऑफिस सोडुन पळाले मी. पण बालगंधर्वला पोहचेपर्यंत ७.३० वाजुन गेलेले कारण आपल्या घाईच्या वेळी बस लवकर मिळु नये आणि ट्रॅफिक जाम असलच पाहिजे या योगावरच आमच्या नशिबाचा भर आहे. बरं पासेस घ्यायची वेळ होती ८ पर्यत. तिथे जाउन विचारलं तिकीट खिडकीवर तर ते कार्ड घेत नाहीत हा नविन सा़क्षात्कार झाला आणि इतके पैसे तर माझ्याकडे नव्हते. बरं त्या खिडकीवर बालगंधर्वांना मांडिवर खेळवलं असेल या वयाचे आजोबा बसलेले त्यामुळे "मी पैसे घेवुन येते, पास तेवढा ठेवा" हे दोनदोनदा सांगुन पण त्यांना कळालय की नाही हे मला नीटसं समजायला मार्ग नव्हता. ते फक्त मला जा..जा ची खूण करत होते. मी मनातल्या मनात स्वतःला शिव्या घालत बालगंधर्व मधल्या खोदलेल्या खड्ड्यांवरुन पळायला लागले. बाहेर आले. अर्थात संध्याकाळी ७.३० वाजता जंगली महाराज रोड ओलांडायला जेवढा वेळ लागतो तेवढाच (?) वेळ आताही लागला. मग ATM च्या बाहेर रांग मग पुन्हा रस्ता ओलांडायचा सोपस्कार, खड्ड्यांतली अडथळ्यांची शर्यत पार करुन मी त्या खिडकीपाशी पोचले. आजोबा म्हणाले,"पास संपले." "क्क्का..य???" मी म्हणजे आता फक्त रडायची बाकी होते. तोवर परत ते "थांब थांब, हा शेवटचा आहे" म्हणुन पास ठेवला त्यानी हातावर. बस्स.. माझ्या हाती स्वर्ग लागला होता. आता प्रतिक्षा होती ती शनिवार संध्याकाळची..
कोण म्हणतं पुणे कोस्मोपॉलिटन झालय? पुणेरी संस्कृती अशी राहिली नाही? ज्यांना असं वाटतं त्यांनी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना भेटी द्याव्यात. अस्सल पुणेरीपणाचे नमुने झाडुन हजर असतात. आणि त्यांचा इंगा पण चांगलाच अनुभवायला येतो. आमच्याकडे राजकारणापासुन लावणीपर्यंत, कार्यक्रम कोणताही असो, बाहेर उभे असणार्‍या लोकांचे बोलण्याचे विषय तेच. "च्यामारी, साहेबाला कसा चुना लावला?" किंवा, "ते बेनं कसं बारा....." हेच विषय.. असो, पण इथे नविन कार्यक्रम कोणते पाहिले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक भविष्य, गेला बाजार अगदीच काही नाही तर आमच्या कोणीतरी अर्णव्/प्रद्युम्न असल्या फॅन्सी नावाच्या मुलाला संगीतात कसा रस आणि गती आहे असले विषय चालु होते. अनेक वर्षांनी भेटलेली लोकं कोणी कितीचं तिकीट काढलंय या विवंचनेत होती आणि हे सगळे नमुने (अस्मादिकांना धरुन) कोणत्या एका प्रेरणेने त्या जागी जमलेले याचा विचार करुन मला खरच मनातल्या मनात संगीताच्या किमयेचं कौतुक वाटत होतं.
एकदाचे आत जाउन आम्ही स्थानपन्न झालो. ५ मि.च घोषणा झाली की उस्ताद झाकिर हुसैन साहेबांची तब्येत बरी नाही. ते कार्यक्रम करणार आहेत पण थोडा उशीर लागेल. पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य यातला जो काही थोडासा अंतराल होता त्यावेळेत तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचा जीव जावुन परत आला. आता उशीर झालाच आहे तर जरा एक चहा मारुन यावा असा विचार करुन खाली गेले. अर्थातच खाण्याच्या स्टॉलला नेहमी कोणत्याही प्रसिद्ध पुणेरी ठिकाणी जशी गर्दी असते तशीच गर्दी होती. त्या गर्दीत खायला मिळवायचा प्रयत्न करताना चुकून माझा पाय मागे असलेल्या कोण की खडुस टकल्याच्या पायावर पडला तर जणू काही मी मुद्दाम त्याच्या पायावर पाय द्यायला म्हणुनच मी ४०० रु. आणि माझा वेळ खर्च करुन तिथे आल्यासारखा किंचाळला तो. (तरी बरं मी सो कॉल्ड हील्स वै. प्रकार वापरत नाही) पण त्याचा तो आविर्भाव बघुन मला खरच मी हील्स का वापरत नाही, म्हणजे आता मुद्दाम मी त्याच्या दुसर्‍या पायावर कचकचित पाय दिला असता असा विचार मनात चमकुन गेला. काय तर म्हणे "अहो बाई, जरा सांभाळुन.." सांभाळुन ठिक आहे पण बाई???? मला मान्य आहे अगदीच मुली वै. म्हणण्याइतकी मी लहान दिसत नसले तरी बाई म्हणण्याइतकी मी खरच मोठी नाही आणि तशी दिसत पण नाही. सॉरी म्हटलं तरी त्याचं आश्चर्य काही संपेना. मग मी पुन्हा चहा मिळवण्याच्या तपश्चर्येत लागले. ५ मि. च्या अथक मारामारीनंतर चहा मिळाला. तो घेवुन मागच्या गर्दीला मी म्हटलं हातात चहा आहे, जरा वाट द्या. तर तोच शुंभ म्हणाला, "हो! नाहीतर अंगावर पडला तर जास्त लक्षात राहिल" मग तेवढ्याच पुणेरीपणे मी म्हणाले, "मग लक्षात ठेवायचा नसेल तर बाजुला सरका" आता जसा देश तसा वेष ठेवणं आलंच ना ओघाने.. असो.. तर तो १५ मि.चा उशीर म्हणता म्हणता ४० मि. झाला..
आणि तो क्षण आला.. श्वास रोखलेले.. पंचप्राण डोळ्यात गोळा झालेले.. पडदा बाजुला सरकला आणि... आह... झाकिर हुसैन साहेब तबल्यावर बसले होते. सगळ्यांनी उभं राहुन टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्यांनीही उभं राहुन अगदी कमरेत वाकुन सर्व रसिकांना अभिवादन केलं. त्यांची ती उपस्थितीच इतकी प्रसन्न होती की कोणत्यातरी अनामिक आनंदाने मन भरुन वाहतय असं वाटत होतं. त्यांची तब्येत खरच बरी नव्हती कारण तबला वाजवतानादेखिल ते खोकत वै. होते. पण कार्यक्रम जसा सुरु झाला तसा सर्व उपस्थितांना आणि कदाचित त्यांनाही सर्व स्थळाकाळाचा विसर पडला. मंद लयीतुन हळु हळु द्रुत लयीकडे जाताना त्या तबल्यातुन किती प्रकारचे नाद निघतात हे बघुन स्तब्ध व्हायला होत होतं. त्या तबल्यातुन निघणारे आवाज जास्त मुग्ध करणारे होते की त्यांची लागलेली गानसमाधी अधिक मोहक होती हे मला तरी सांगता येणार नाही. हळु हळु ती झिंग चढत जाताना त्यांनी प्रेक्षकांना मधुनच कधी तबल्याचे बोल सांगत तर कधी एखादा तुकडा उलगडुन दाखवत खिळवुन ठेवलं. सुर्यमालेचा तुकडा सादर करताना, एक पटीतुन सहापटीपर्यंत सहज फिरवुन आणलं. तर उडान सादर करताना खरच आपल्यासमोरुन एखादम हरीण उड्या मारत चाललय असं चित्र डोळ्यांसमोर उभं केलं. देणारा हजार करांनी देत असताना घेशील किती दोन करांनी हे अक्षरशः खरं आहे. खरच किती घेवु आणि किती नको असं झालेलं. सगळ्या शरीराला फक्त डोळे आणि कान असावेत असं वाटत होतं. त्याहीपेक्षा इतर कशाची जाणिवच नष्ट झालेली. समोर ते तबला वाजवत होते आणि मी ऐकत होते. त्या बोलांनी मला वेढलं होतं आणि मी माझी उरले नव्हते एवढंच आठवतं आता. त्या तबल्यावरची, डग्ग्यावरची कोणतिही जागा वापरायची ठेवली नव्हती त्यांनी. पुढचा एक तास कसा गेला काहीच कळलं नाही. त्या समाधीतून जाग आली ते डायरेक्ट मध्यंतर झाला तेव्हा. त्या मध्यंतरात कसलेतरी मान्-सन्मान आणि सत्काराचे कार्यक्रम चालु होते. त्यावेळी या इतक्या मोठ्या कलाकारात असलेल्या तितक्याच मोठ्या मनाचं दर्शन झालं. त्या वागण्यातल्या साधेपणाने आणि नम्रतेने उपस्थितांची मने अजुनच जिंकली त्यांनी यात वादच नाही. सत्कार संपल्यावर स्वतःची खुर्ची स्वतःच उचलुन नेत होते ते आत. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत आता. त्यांचं अस्तित्वच अत्यंत आनंददायक होतं याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येत होता. मध्यंतरानंतर पंडित हरिप्रसादजींच्या बासरीवादनाला सुरुवात झाली. त्या स्वरसागरात बुडुन गेले परत एकदा सगळे. साधारण अर्धा तास त्यांनी बासरी सादर केल्यानंतर मग उस्ताद त्यांच्या साथीला आले. आणि मग तर कार्यक्रम असा रंगला, असा रंगला की बास्स... पंडितजींचे सूर उस्तादजींच्या तबल्यातुन निघत होते. आणि प्रत्येक ठेक्यासरशी टाळयांचा कडकडात होत होता. शेवटची १५ मि. तर सर्वजण स्वर्गात होते. ती फक्त जादु होती. बाकी काही असुच शकत नाही. जादुगार माणसाला गायब करतो. त्यांनी 'मी'पणाला गायब केलं होतं तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या! १० वाजले. त्यांनी सादरीकरण थांबवलं पण पेक्षकांचं मन अजुन भरलं नव्हतं. जास्तच आग्रह झाला तेव्हा पंडितजी म्हणाले "अभी रुकेंगे नही तो पकडके ले जायेंगे हमे" पण लोकं ऐकण्याच्या मनस्थितीत कुठे होते? आग्रह होतच राहिला. मग अजुन दहा एक मि त्यांनी परत सादर केली तबला-बासरी. आणि मग मात्र खरच कार्यक्रम संपला होता. पडदा पडत होता आणि मी खरच अनिमिष नेत्रांनी त्या पडद्यापलीकडे जाणार्‍या त्या आकृती बघत होते. जमेल तितक्या साठवुन घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर मी घरी कशी आले आणि अजुनपर्यत काय करत होते हे मला खरच नाही सांगता येणार. त्या नाद्ब्रम्हात मी हरवलेय आणि त्यातुन बाहेर यायची माझी इच्छादेखिल नाही. ते सूर, नाद अजुन कानात आहेत, त्या आकृती नजरेसमोर आहेत आणि मी स्वत:पासुन दूर कुठेतरी त्यात हरवलेय. मला तसच हरवलेलं रहायचय.. कायमचं...